मंगळवार, ३० जुलै, २०१३

राग!

काल माझ्या शाळेतल्या मित्राने मला एका व्याख्यानाचा व्हिडीओ (http://youtu.be/U0S9179jgRc)बघायला सांगितला म्हणुन डाउनलोड करुन आवर्जुन बघितला.
या व्याख्यानाच्या शैलीने आमची पिढी घडवली
या शैलीला नाव काय द्यायचं सुचत नव्हतं
पण आता सुचलं - हे होतं "गद्यगायन"...
आवर्जुन बघायचं कारण
ते दोन गायक होते
पु. ल. देशपांडे आणि वाजपेयी
त्यांनी दोघांनी आळवला "राग सावरकर"
एकाची ग्वाल्हेर गायकी तर दुसर्‍याची गंधर्व गायकी
एकांनी आपली बंदीश कागद (नोटेशन) बघुन मांडली
तर दुसर्‍याने उत्स्फूर्तपणे...
हा "सावरकर" राग उत्तरांगप्रधान,
आलापी फारशी नाही. जयपुरसारखी एकदम उडी मारून बंदीशीला सुरुवात...
"सशस्त्र क्रांति" हा वादी सूर
"राष्ट्रवाद" हा संवादी
"नास्तिकता" "बुद्धीवाद" हे अनुवादी सूर
(सहिष्णुता समभाव हे विवादी सूर...!)
पु लंनी अनुवादी सुरांचे सौंदर्य खुलवले
तर वाजपेयीनी वादी-संवादी
असे पकडले होते...
तर अंदमानतल्या हालअपेष्टांचे सूर तानपुर्‍यावर
असे जुळले होते
अहाहा!
एक मात्र खरं
अशी गद्यगायकी
आजकाल ऐकायला मिळत नाही...
राग सावरकर पण
फारसा कोणी गात नाहीत...
मला मात्र "राग तिलक" फारफार आवडतो...

सोमवार, २९ जुलै, २०१३

सूक्ष्मकथा - ६



मला लोकांची (आणि पर्यायाने समाजाची)
एक गोष्ट कळत नाही...

तुम्ही त्यांच्याबरोबर शर्यतीत भाग घेतला तर
त्यांना तुम्हाला हरवायचे असतं
मग तुम्ही शर्यत जिंकू नये म्हणून
ते काहीही करतात...
अगदी शर्यतीतून बाहेर पण काढतात...

पण नियती गंमत करते,
ती तुम्हाला अशा ठिकाणी ठेवते की
तिथे हारजित काहीही नसतं...

मग हेच लोक
तुम्ही शर्यतीत भाग घेत नाही
म्हणुन तुम्हाला दोष देत राहतात.