रविवार, २५ जानेवारी, २०१५

अनिसची (बोगस) आह्वाने







सहजच लक्षात आलं,


अनिस मंत्राने आजार बरे करणार्‍यांवर चवताळते आणि

मग त्यांना आह्वान देते की आम्ही अमक्य-तमक्या आजाराचे

इतके-तितके रुग्ण आणुन देतो. त्यांना बरे करून दाखवा.


आता बघा...


एखाद्याने मंत्राने (किंवा तत्सम उपायांनी) आजार

खरोखरच बरे केले असतील तर

ते ’प्लासिबो-इफेक्ट’ मुळे हे नक्की.


’प्लासिबो-इफेक्ट’मध्ये उपचारांवर आणि ते करणार्‍यावर

गाढ श्रद्धा असावी लागते.


आह्वानातील सॅंपलमध्ये असलेल्या रुग्णांमध्ये पूर्वअट असलेली

ही ’गाढ श्रद्धा’ अनिस कुठुन आणि कशी आणणार?

त्याचे प्रशस्तिपत्रक अनिस कशाच्या आधारावर देणार?


म्हणजे अनिसचे हे पण आह्वान बोगस हे नक्की...


दूसरं असं...


आपला आजार प्लासिबो-इफेक्ट्ने बरा व्हावा असं एखाद्याला

वाटत असेल तर त्यात ढवळाढवळ करायचा अधिकार

अनिस सारख्या त्रयस्थ घटकाला आहे का?

शकुन

काल मकरंद दामलेने विचारलेल्या अनपेक्षित (Superstitious OR Optimistic ?) प्रश्नाने भंबेरी उडाली. पण मी शकुनावर विश्वास ठेवतो का याचे प्रामाणिक उत्तर "हो" आणि "नाही" असेच आहे. ’नाही’ अशासाठी की मीठ सांडल किंवा मांजर आडवं गेलं तर मी अपशकुन नक्कीच मानत नाही. पण ज्या बाह्य घटनांनी माझी मानसिक अवस्था बदलते त्या मला शकुनासारख्याच वाटतात. उदा. काही माणसांना माझ्यात सगळं वाईटच दिसत आलेलं असतं, त्यांना फकत माझ्या अपयशाची चर्चा आणि चिकित्सा करण्यात रस असतो. अशी माणसं मी नक्की अपशकुनी मानतो. कारण अशी माणसे भेटले की फक्त चोची मारायचेच काम करतात किंवा कडवट स्मृतीना जागं करायचा प्रयत्न करत बसतात. बर्‍याचवेळा असे लोक समोरून आल्यास मी फुटपाथ बदलतो किंवा आजकाल चक्क अपमान करून हाकलुन देतो. पण अचानक एखादी मनाला प्रसन्न करणारी घटना घडली किंवा व्यक्ती भेटली तर आशा निर्माण व्हायला किंवा टिकुन राहायला मदत होते. विशिष्ट घटना विशिष्ट मानसिक अवस्था निर्माण करतात.


तुमचं मला माहित नाही, पण मला तरी माझी मानसिक अवस्था at will अजुनही बदलता येत नाही, हे कबुल करायला मला लाज कमीपणा वाटत नाही.


मग भारद्वजाचा शकुन का बरं?


७८ साली कोथरूडला राहायला आलो तेव्हा आम्ही अगोदर जिथे राहात होतो तिथे बरीच परिस्थिती विचित्र होती. घर बांधायचा निर्णय आईवडिलांनी मनाचा हिय्या करून घेतला होता. घर बांधुन झाले आणि सगळी पुंजी त्यात संपली. तोपर्यंत जी माफक मौजमजा आमच्या तिघांच्या आयुष्यात होती ती पण संपली. त्या परिस्थितीत अनेक बाबतीत झालेली दडपणुक उफाळुन यायची. मार्क असुनही, धाकट्या भावाला शिकायला मिळाले पाहिजे, म्हणुन आईला मेडिकलला जाता आले नव्हते. पुढे रिझर्व्ह बॅंकेत आईला नोकरी लागली तेव्हा आईच्या हॉकीला तिथे भरपूर वाव मिळाला आणि आर्थिक स्वातंत्र्य (आईचा पगार होता महिना र १८० आणि आजोबांचा रु१४०!) आणि स्थैर्य पण मिळाले. त्यामुळे आई तिथे मनोमन रमली होती. पण लग्न झाल्यावर नोकरी करण्यावर सासर्‍याने नुसती गदा आणली नाही तर मी काही महिन्यांचा तान्हा असताना आईला अनाथाश्रमाचा रस्ता दाखवला होता (आईची ६३ सालची ८पानी विस्तृत सुसाईड नोट मला २०००साली आई गेल्यावर सापडली तेव्हा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मला मिळाली). या मानसिक आघातांनी ती खचली ती कायमचीच...प्रचंड उर्जा असलेल्या व्यक्तीचे सातत्त्याने खच्चीकरण झाले की काय होऊ शकते याचे अत्यंत नमुनेदार उदाहरण म्हणजे माझी आई.


नव्या घरात राहायला आल्यावर मात्र आर्थिक चणचणीमुळे काही प्रश्न नव्याने निर्माण झाले. त्यात जमेची बाजु एव्हढीच की वडिलांना कसलेही व्यसन नव्हते आणि कोणतेही आतबट्ट्याचे व्यवहार त्यांनी कधी केले नाहीत. नेमके त्याच वेळेस आईच्या वडिलांनी आईला सांगितले की, "अगं तुमच्या घराभोवती इतके भारद्वाज आहेत म्हणजे ही तुमची वास्तू तुम्हाला लाभणार बरं का?" आजोबांनी दिलेल्या धीरामुळे काही वेळ का होईना भारद्वाजाचे दर्शन झाले की आईचे मन उभारी धरायचे.


मला आजही भारद्वाज दिसला की आईचा तो उजळलेला चेहेरा आठवतो आणि म्हणुनच तो एक शुभ शकुन वाटतो...