गुरुवार, २२ मार्च, २०१२

बंधुराजांसाठी पत्रिकामेलन

माझ्या एका मामेभावाला सध्या "कर्तव्य आहे". हा माझा भाऊ चांगला शिकलेला आहे म्हणजे अमेरीकेत चांगल्या विद्यापीठात संगणक अभियांत्रिकीत एमेस केलेला आहे. शिवाय मायक्रोसॉफ्ट मध्ये गेले ५-६ वर्षे तरी टिकून आहे. माझ्यावर त्याच्यासाठी पत्रिकामेलन करायची जबाबदारी आलेली आहे. हे आमचे बंधुराज ज्या मुलींची माहिती पसंत पडेल त्या मुलींचे जन्मटिपण मला कळवतात. मग मी त्याला पत्रिका जुळते की नाही हे कळवतो.

नुकतेच माझ्या भावाने मला चार मुलींची जन्मटिपणे पाठविली आणि माझे मत मागितले. मी त्याला दोन पत्रिका जुळत असल्याचे आणि उरलेल्या दोन जुळत नसल्याचे सांगितले. आणि नेमके झाले असे की न जुळणार्‍या पत्रिकेतली एक मुलगी त्याला खूप आवडली होती तिच्या इतर माहितीवरून. त्याने मला मेल पाठवून विचारले की "दादा, मला तू नको म्हटलेल्या मुलींपैकी एक खूप आवडली आहे. तू का नाही म्हणतोयस ते जरा खुलासेवार सांगशील का?"

वास्तविक या मुलीला ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून नाही म्हणताना मला अवघड गेले. त्याचे कारण सर्वाना कळावे म्हणून या लेखाचा प्रपंच.

या मुलीच्या मूळ पत्रिकेत टोकाचे चांगले आणि त्रासदायक असे योग आहेत (अर्थात चांगले योग असल्यामुळेच तीचे आयुष्य असे घडले की ती माझ्या भावाला पसंत पडली. यात शंकाच नाही). अशा परिस्थितीत उपवर वधू आणि उपवर मुलगा यांच्या पत्रिकेतले प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांची कसे interact करतात हे आधुनिक ज्योतिषी बघतात आणि संभाव्य नातेसंबंधातील चढ-उतारांचा अंदाज बांधतात. या संभाव्य नातेसंबंधाची कल्पना जातकाला दिल्यावर जातकाने आपल्याला काय झेपेल वा काय झेपणार नाही याचा विचार करून निर्णय घेणे अपेक्षित असते. पण आपल्याकडे हा निर्णय ज्योतिषाला घ्यायला भाग पाडले जाते. असो.

या माझ्या भावाला आवडलेल्या मुलीच्या मूळ पत्रिकेत काही महत्वाचे योग आहेत ते असे -
* ख-मध्याजवळ ६ अंशातील शुक्र-मंगळ युती, या मंगळाचा हर्षल बरोबर केंद्र योग, शुक्राचा नेपच्यून बरोबर नवपंचम योग आणि प्लुटो बरोबर लाभ योग (हे दोन्ही योग जोरदार आहेत). एकंदर मामला नुसता रोमॅंटीकच नाही तर या व्यक्तीची सेक्सची गरज above average आहे हे नक्की. पण शुक्राने तयार केलेली शुक्र=मंगळ -शनी ही रचना कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* लग्नाशी अंशात्मक युतीमुळे ताकदवान झालेला शनि - हा शनी ताकदवान असल्यामुळे मूळ पत्रिकेतील कोणत्या मध्यबिंदू रचनेत शनि अंतर्भूत आहे हे पहावे लागते. ते बघितले असता षोडषांशात शनि=शुक्र-नेपच्यून तसेच शनि= रवि-शुक्र या मध्यबिंदू रचना तयार झालेल्या दिसतात. या पण रचनांची फले वरीलप्रमाणेच म्हणजे कामसुखात वैफल्य आणि असमाधान दाखवते.
* चंद्र-प्लुटो २ अंशातील केंद्रयोग - भावनिक प्रक्षोभाची प्रवृत्ती
* बुध-नेपच्यून केंद्रयोग - स्वत:ला किंवा इतरांना फसवत राहण्याची प्रवृत्ती.

थोडक्यात या मुलीची एकदोन तरी प्रेमप्रकरणे बर्‍यापैकी पुढे (सर्व अर्थानी!) जाऊन फसलेली असणार.

पण एव्हढ्यावर ही पत्रिका मी तरी नाकारणार नाही. कारण लग्नानंतर अनेक लोक बदलू शकतात. पण त्यासाठी एकमेकांच्या पत्रिका खर्‍या अर्थाने पूरक असायला हव्या. त्यासाठी वर म्हटल्या प्रमाणे एका पत्रिकेतील प्रत्येक ग्रह दूसर्‍या पत्रिकेतील ग्रहांशी कसे interact करतो ते पहायला हवे. यासाठी या पत्रिका एकमेकांसमोर मांडल्या असता पुढीलप्रमाणे ग्रहयोग दिसतात-



यात डावीकडील चिन्हे माझ्या भावाच्या पत्रिकेतील ग्रहांची यादी आहे. मधली यादी ग्रहयोगांची चिन्हे आहेत. आणि उजवीकडील चिन्हे मुलीच्या पत्रिकेतील ग्रह दर्शवतात (ही सर्व चिन्हे आंतरराष्ट्रीय असून ज्याना कळत नाहीत तो खरा ज्योतिषी नाही). या यादीवर जर नीट नजर टाकली तर असे दिसेल की मुलीच्या पत्रिकेतील बलिष्ठ शनि माझ्या भावाच्या रवि आणि शुक्राशी युति करतो.

माझ्या मते ही युति या दोघांच्या संसाराला किंवा नातेसंबंधाना मारक आहे कारण यात पत्नी डॉमिनेटींग होतेच शिवाय कुटुम्बसुख कमी होऊन आर्थिक अडचणी कायम उभ्या राहतात. आता कुटुम्बसुख कमी म्हणजे भांडणे होतीलच असं नाही तर एकमेकांचा सहवासाच्या संधी कमी. नवरा-बायको वेगवेगळ्या गावात काम करत असतील तर वरील प्रमाणे शुक्राचे योग असलेली व्यक्ती आपल्या जोडीदाराशी एकनिष्ठ राहण्याची शक्यता अमेरीकेसारख्या देशात कमीच..

तेव्हा मी माझ्या भावाला दिलेला पुढे न जाण्याचा सल्ला तुम्हाला पटतोय का ते पहा...

रविवार, ११ मार्च, २०१२

गणपतीचा शोध

लोकहो,

लहानपणी मी गणपतीभक्त होतो. याचे प्रमुख कारण लंक्यांच्या स्कॉलरशिपच्या क्लास मध्ये संकष्टीला आणि गणेशोत्सवात अथर्वशीर्षाची २१ आवर्तने व्हायची. तेव्हापासून बर्‍यापैकी नियमित पणे अथर्वशीर्षाची आवर्तने मी करत असे. पण "गणपती विघ्नहर्ता नाही तो विघ्नकर्ता आहे, तेव्हा भजायचे असेल तर दूसर्‍या देवाला भज" असे आई म्हणायची. आईला असे कसे विचारले तर उत्तर देता येत नसे मग मला आईचा राग यायचा. पण मी मात्र माझी गणेशभक्ती मी नेटाने पुढे चालु ठेवली होती.

पुढे मी पुण्याला टिळक विद्यापीठात संस्कृत मध्ये विशारद (बीए) करायला जाउ लागलो. दूसर्‍या वर्षी आम्हाला वैदिक साहित्य अभ्यासायला होते. शिकवायला प्रा. सुचेता परांजपेबाई होत्या. त्यांनी आपल्या पूजाविधींमधले अनेक मंत्र निरर्थकपणे शतकानुशतके जपले जात असल्याचे सांगितले. उदा. मंत्रपुष्पांजलीचा आणि गणपतीचा काहीही संबंध नाही, हे कळले तेव्हा मी उडालोच. परांजपेबाईनी असेही सांगितले की वेदांत गणपती कुठेही नाही आणि केवळ गणपती या शब्दामुळे "गणांनां त्वा गणपतिं..." ही ऋचा गणपतीच्या पूजेत ओढून ताणून लोकांनी वापरायला सुरुवात केली. पण हे काहीच नाही, पुढे जे कळले त्यामुळे माझा गणपतीवरच्या श्रद्धेला सुरुंग लागला. परांजपे बाईनी सांगितले की गणपती ही नीच देवता आहे, सूर्य, अग्नि, विष्णु या वैदिक देवतांप्रमाणे ती उच्च देवता नाही. यावर मी वर्गात बाईना प्रश्न केला की नीच देवता म्हणजे काय तर त्यांनी सांगितले की ती अनार्यांची देवता आहे, जसे सोट्या, म्हसोबा, वेताळ या जशा नीच देवता आहेत. मी उडालोच आणि दूसर्‍याक्षणी माझी गणपती वरची श्रद्धा पार उडाली. आई मला जे सांगत होती, त्यात वावगे नसावे असे वाटू लागले.

यानंतर जवळजवळ वीस-बावीस वर्षे गेली. अचानक प्रा. दामोदर कोसंबी या प्रखर बुद्धिमत्तेच्या विद्वानाने लिहीलेल्या मिथ अ‍ॅण्ड रिअ‍ॅलीटी या पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचत असताना रंजक माहिती कळली की गणपती हा शंकरापासून झालेला पुत्र नव्हे. (म्हणजे तो शंकर-पार्वतीचा अनौरस पुत्र ठरतो.) पुराणकथांमागे आजच्या नीतिमत्तेला न झेपणारे वास्तव लपलेले असते याचा हा एक दाखला होता. याच पुस्तकात लोकदैवतांचे ब्राह्मणीकरण कसे होते याची रोचक चर्चा कोसंबीनी केली आहे. त्यामुळे गणपतीचे काळाच्या ओघात ब्राह्मणीकरण अर्थात status upgradation कसे झाले असावे याचा अंदाज बांधणे फारसे अवघड जात नाही.

तरीही गणपती ही नीच देवता आहे याचा मला अधिकृत पुरावा हवा होता आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडत होतो. गणपती हा विघ्नकर्ता म्हणजे त्रासदेणारा. ही आईने सांगितलेली माहिती खरी की खोटी हा प्रश्न अधून मधून सतावायचा. पण त्याचेही उत्तर मला काळाच्या ओघात मिळायचे होते. दरम्यान मिसळपाव वरील एक सदस्य श्री श्रावण मोडक यानी लोकायत वाचायला सांगितले. बहुतांश लोकांची अशी समजूत असते की प्राचीन भारतात एकच संस्कृती अस्तित्वात होती ती म्हणजे वैदिक संस्कृती. पण तसे नसून त्यावेळेस वैदिक संस्कृतीला समांतर अशी म्हणजे दासांची (अनार्यांची) संस्कृती पण अस्तित्वात होती ती म्हणजे लोकायत.

अचानक स रा गाडगीळ यांनी लोकयताचा मराठीतून करून दिलेला परिचय वाचनात आला. त्यात गणपतीच्या शूद्रत्वाचे अधिकृत दाखले त्यांनी दिले आहेत. हे दाखले अनेक धर्माग्रंथांचे आहेत. त्यातले महत्त्वाचे म्हणजे मनुस्मृती आणि याज्ञवल्क्य यांच्या स्मृती - हिंदू लॉचे महत्त्वाचे आधारग्रंथ.  गणपती हा विघ्नकर्ता आहे हे अनेक ग्रंथ अधोरेखित करतात.

एक शोधवर्तूळ पूर्ण झाले. माझी आई बरोबर ठरली. ती आज हयात असती तर तिला नक्कीच आनंद वाटला असता.

जाता जाता - गणपती अथर्वशीर्षाचा आणि अथर्ववेदाचा काहीही संबंध नाही अशी माहिती नुकतीच "लोकदैवतांचे विश्व" या रा. चिं. ढेर्‍यांच्या पुस्तकात मिळाली.

मी मात्र आता गणपतीला माझ्या घरातून केव्हाच हद्दपार केला आहे.


पी.एस. २८ एप्रिल २०१२
गणपतीला मी हद्दपार केला ते शूद्र देवता म्हणून असा अनेकजण समज करून घेतील. पण तसे अजिबात नाही. मी त्याला हद्दपार केला त्याचे विघ्नकर्तृत्व सिद्ध झाल्यामुळे. माझी मूळ समस्या वेगळीच आहे. शूद्र देवतांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकते. गुन्हेगारांचे शुद्धीकरण आणि पुनर्वसन होऊ शकते. धर्मत्याग केलेल्याला धर्मात परत येण्यासाठी धर्माचे दरवाजे उघडे आहेत, पण शूद्रांचे ब्राह्मणीकरण/उन्नयन होऊ शकत नाही. हे काही केल्या पटत नाही... 

शनिवार, ३ मार्च, २०१२

१४ मार्च २०१२ रोजीची अत्यंत शुभ गुरु-शुक्र युती

आगामी काळात लवकरच म्हणजे १४ मार्च २०१२ रोजी सायन वृषभ राशीत ९ अंश ३३ मिनिटांवर (म्हणजेच निरयन मेष राशीत १५ अंश ३२ मि वर ) गुरु-शुक्र युती होत असून हा अत्यंत जोरदार शुभ योग आहे. ही शुभ युती गोचर मंगळ आणि प्लुटो यांच्या बरोबर अंशात्मक नवपचंम योग करत असल्याने विशेष जोरदार शुभ बनली आहे.

या युतीमुळे सायन वृषभ रास ७-११ अंश (निरयन मेष रास १३-१७ अंश), सायन कन्या रास ७ -११ अंश (निरयन सिंह रास १३-१७ अंश), सायन मकर रास ७-११ अंश (निरयन धनु रास १३-१७ अंश) हे क्षेत्र अत्यंत शुभ बनले आहे.

या क्षेत्रात ज्यांच्या जन्मपत्रिकेत लग्न, ख-मध्य किंवा रवि, चंद्रादि व्यक्तिगत ग्रह या क्षेत्रात असतील तर आगामी काळ या जातकांना शुभ जाणार हे नक्की.

आनंददायी घटना एव्हढे शब्द या ग्रह रचनेचा फलादेश सांगण्यास पुरेसे आहेत. कोणताही नवा प्रकल्प सुरु करण्यास हा १२ मार्च ते १४ मार्च हा कालावधी अत्यंत शुभ आहे.

या शिवाय कोणत्याही सनातील खालील जन्मतारखाना ज्यांचे जन्म झाले आहेत त्यांना ही युती अत्यंत शुभ जाईल.

२८ एप्रिल ते २ मे
३० ऑगस्ट ते ४ सप्टेम्बर
२८ डिसेंबर ते २ जानेवारी

लोकहो, या शुभ कालावधीचा जास्तीत जास्त फायदा घ्या!