सोमवार, २८ जानेवारी, २०१३

"एकच प्याला" या नाटकाची पदे


२८ ०१ २०१३

संचालक,
राम गणेश गडकरी डॉट कॉम

मी आपल्या "राम गणेश गडकरी डॉट कॉम" या साईटला भेट दिली. आपला उपक्रम स्तुत्य आहेच पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी राहून गेलेली आहे. ती आपण कृपया तातडीने ती दुरुस्त करावी ही विनंति.

गडकर्‍यांच्या "एकच प्याला" या नाटकाची पदे (आणि प्रस्तावना) त्यांचे जीवश्च कंठ्श्च मित्र आणि साहित्यिक कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांनी लिहीलेली आहेत. आपण तयार केलेल्या  "एकच प्याला" या नाटकाच्या इंटरनेट आवृत्तीत आपण पदे अंतर्भूत केलेली आहेत, पण ती कै. विठ्ठल सीताराम गुर्जर यांची असल्याचा कुठेही उल्लेख मला सापडला नाही. यामुळे केवळ कै. विठ्ठल सीताराम गुर्जर  यांचे केवळ श्रेय नाकारले जात नसून लोकांमध्ये ही पदे गडकर्‍यानी रचली अशी चुकीची समजूत पसरण्याची शक्यता खूप आहे, हे आपण लक्षात घ्याल अशी आशा करतो.

आपण ही चूक लवकरात लवकरात दुरूस्त कराल अशी आशा करतो.

कळावे,
आपला
राजीव उपाध्ये
प्रति: rajeev-upadhye.blogspot.com
       सर्व इंटरनेट फोरम्स
   

रविवार, २७ जानेवारी, २०१३

शिक्षेची जरब



केवळ मराठी वृत्तपत्रात आलेल्या बातम्यावरून  जर जागतिक परिस्थितीचा अंदाज बांधायचा झाला तर भारत सोडून जगात सर्वत्र आलबेल आहे असे वाटायला लागते. पण खरोखर जागतिक परिस्थितीचा अंदाज बांधायचा असेल तर CNN, BBC अशा कुबड्या घ्याव्या लागतात. जागतिक बातम्यांसाठी मी रोज DW हा चॅनेल बघतो. मध्यपूर्वेतल्या अनेक देशातली अस्वस्थतता जर्मन चष्म्यातून मला बघायला आवडते.

सांगायचा मुद्दा असा की, हे जागतिक वृत्त बघितल्यावर मला हळुहळु आपण भारतात तुलनेने सुखी आहोत ही भावना सुखावायला लागते. म्हणजे इतरांचे दु:ख आणि आक्रोश पाहिल्याशिवाय आपले सुख आपल्याला कळत नाही (आणी त्याच न्यायाने इतरांचे सुख बघितल्याशिवाय आपले दु:ख आपल्याला जाणवत नाही.)

नुकतेच दिल्लीत झालेल्या बलात्काराच्या घटनेने देश ढवळून निघाला. ही घटना आपल्या पर्यंत माध्यमांमुळे पोचली तेव्हा आपण अस्वस्थ झालो. पण एक लक्षात घ्या की अधिकृत आकडेवारीनुसार भारतात दर तासाला ~३ बलात्कार होत असतात. हा हिशेब सन २०१० सालच्या पोलिसांकडे नोंदल्या गेलेल्या आकडेवारीवर आधारीत आहे.(संदर्भ - http://www.thehindu.com/multimedia/archive/00948/India_s_rape_crisis_948146a.pdf)

म्हणजे बलात्काराच्या एका वृत्तापुरत्या आपल्या संवेदना जाग्या झाल्या होत्या. दर तासाला होणार्‍या ~३ बलात्कारांचे कुणाला सोयरसुतक नव्हते... आणि नसेल.

बलात्कारासाठी फाशीच्या शिक्षेची मागणी केली गेली. ती मागणी मान्य झाली असती तर ४९८-अ प्रमाणे खोट्या तक्रारींचे प्रमाण नक्कीच वाढले असते. खोट्या तक्रारी आणि खोट्या पुराव्यांनी कितीजण फासावर चढले असते माहित नाही, पण खोट्या कोर्ट्केसेसनी अनेक पुरुष उध्वस्त झाले असते हे मात्र नक्की.

पण मुद्दा तो नाही...

मुद्दा फाशीच्या जरबेचा आहे.  फाशीची शिक्षा आज अस्तित्वात असून दुर्मिळातले दुर्मिळ गुन्हे घडत आहेतच. कसाबच्या फाशीने दहशतवाद कुठे थांबणार आहे. कारण कसाबच्या शिक्षेची वेदना दहशतवाद्यांपर्यंत कधी पोचणारच नाही.

कुणी असं म्हणतात की जन्मठेपेची शिक्षा जास्त वेदनादायक असते. पण लोक म्हणतात "चांगल्या वर्तणुकीच्या" सबबीवर गुन्हेगार लवकर सुटू शकतो. म्हणजे इथेही जन्मठेपेच्या कैद्याने काय "भोगले" हे लोकांपर्यंत ( आणि भावी गुन्हेगारांपर्यंत) पोहोचत नाही. परिणामी नवे गुन्हेगार निर्माण होण्याच्या प्रक्रियेवर कोणताही परिणाम होत नाही.

तात्पर्य एव्हढेच की शिक्षेची जरब बसायला शिक्षेतील वेदना जोपर्यंत मेंदूत नोंदवली जात नाही तोपर्यंत शिक्षेची जरब निर्माण होत नाही. 



सोमवार, २१ जानेवारी, २०१३

खोटे बोलणे आणि ग्रहयोग


मागे एकदा सप्तमातील मंगळ आणि राहु-मंगळ युतिबद्दल आधुनिक संशोधन काय सांगते याविषयी लिहिले होते. हे संशोधन करणारे श्री आल्फी लाव्हॉय यांनी खोटारडेपणा विषयी त्यांना सापडलेले ग्रहयोग एका ज्योतिषांच्या ग्रुपवर नुकतेच प्रसिद्ध केले आहेत. आत्तापर्यंत बुध-नेपच्यूनमध्ये   युति,प्रतियुति, केंद्र आणि अर्धकेंद्र हे योग असतील तर ती व्यक्ती खोटारडी मानली जायची. पण  श्री आल्फी लाव्हॉय यांच्या संशोधनानुसार खोटारडे पणा हा बुध-नेपच्यून योगापुरता मर्यादित नाही. तर तो खालील ग्रहयोगात पण दिसतो. फक्त या ग्रहयोगातील खोटारडेपणाची प्रतवारी वेगवेगळी असणार. त्याचा शोध घ्यायला हवा...असो.

श्री आल्फी लाव्हॉय यांच्यामते खोटारडेपणा दर्शविणारे ग्रहयोग ( युति,प्रतियुति, केंद्र आणि अर्धकेंद्र) ...

चंद्र-गुरु
चंद्र-नेपच्यून
बुध-शनि
शुक्र-नेपच्यून
रवि-गुरु
शुक्र-शनि
मंगळ-हर्षल
गुरु-शनि

यापैकी चंद्र-गुरु आणि रवि-गुरु युति असणार्‍या व्यक्ती खोटे बोलू शकतात हे स्वीकारायला थोडे अवघडे आहे. सहज गंमत म्हणून माझी निंदा-नालस्ती, स्वत:ची अतिरेकी स्तुती करणार्‍या "एका व्यक्ती"ची माझ्या संग्रहातील पत्रिका बघितली तर त्यात रवि-गुरु अर्धकेंद्र योग आणि चंद्र-नेपच्यून आणि गुरु-शनि केंद्र योग सापडले. म्हणजे खोटारडेपणाचा ट्रिपलडोस...

शनिवार, १२ जानेवारी, २०१३

विसंगती आणि शंका


एक विसंगती?

धार्मिक भावना भडकतात तेव्हा भडकवणारा दोषी असतो.
मात्र लैंगिक भावना भडकतात तेव्हा भडकणारे दोषी असतात...

एक शंका

निसर्गाने निर्माण केलेल्या स्त्री-पुरुषांच्या लैंगिक रचनेत काही मुदलातच दोष आहे का? म्हणजे बघा अवयव तेच फक्त शुक्राणुंच्या ऐवजी पुरुषाच्या शरीरात बीजांड निर्मिती झाली असती आणि तर पुरुषाचे उद्दीपन मासिकधर्मा पुरतेच मर्यादित राहिले असते. स्त्रीयांच्या शरीरात  अवयव तेच पण फक्त तेथे शुक्राणुंची निर्मिती होऊन फक्त समागमाच्या वेळी त्यांचा उत्सर्ग झाला असता तर आज मोठ्या प्रमाणात दिसणारा लैगिक (गैर)व्यवहार आपोआप नियंत्रित राहिला असता.

निसर्गा तू चूकलास रे बाबा! तुला वठणीवर कसे आणायचे?

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

गुदगुल्या


लोक हो!

सध्या कृष्णमूर्तींच्या गोटात माझ्या नावाने खडे फोडणे चालू असले तरी बाकी माझी नवीन वर्षाची सुरुवात गुदगुल्या करणारी झाली आहे. 

आतापर्यंत मी वेगवेगळ्या निमित्ताने, संशोधनपर निबंध ते  लेख, वृत्तपत्रीय सदर लिहीणे (सकाळ) इत्यादि लेखन केले आहे  (माझ्या पत्रिकेत बुध angular असल्याने ताकदवान झाला आहे). पण मी काढलेले प्रकाशचित्र कधी प्रसिद्ध होईल असे अजिबात वाटले नव्हते.   माझा मित्र आणि गुरुबंधु  चिंतन मधुकर उपाध्याय  याचे मी काढलेले  व्यक्तिचित्र शुभा मुद्गल यांच्या छोटेखानी मुलाखतीसोबत चक्क Times of India मध्ये प्रसिद्ध झाल्याचे कळले तेव्हा मला जवळजवळ हर्षवायुच होणे बाकी होते.

चिंतन आणि मी एकाच वेळेस विख्यात धृपदगायक पंडित उदय भवाळकर यांच्याकडे धृपद शिकत होतो. मला पाठदुखीमुळे धृपदाची तालिम (पहाटे पाच ते दहा) थांबवावी लागल्यामुळे मी माझी क्रिएटिव्ह एनर्जी छायाचित्रणाकडे वळवली.

२०१३ मध्ये शास्त्रीयसंगीताच्या क्षेत्रात ज्यांच्याकडे आशेने बघावे अशांपैकी एक चिंतन आहे, असं शुभाजीनी म्हटलं आहे.

तुम्ही पण चिंतनचे गाणं जरूर ऐका आणि माझ्या त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!

शुभा मुद्गलांची टाईम्स मधली मुलाखत

मी चिंतनचे पुण्यात एका मैफलीत काढलेले मूळ व्यक्तीचित्र



Miller of The Dee या सुप्रसिद्ध इंग्लिश कवितेचे मी केलेले मराठी स्वैर रुपांतर



कुण्या नदीच्या तीरावरती एक पिठाची गिरणि वसे
मालक त्या हो पिठगिरणीचा स्वछंदी आनंदि असे
जात्याच्या तो सुरात मिसळी स्वानंदाचे गीत कसे
ना हेवा मी करी कुणाचा, कुणी न माझा करीतसे

कुशल प्रजेचे बघण्या राजा येइ एकदा नदितीरी
श्रमपरिहारक सुरावटी त्या राजहृदयि मात्सर्य भरी
"चुकसी मित्रा" राजा वदला "हेवा वाटे तव मजला,
वैभव सारे भोगत असुनी कष्टि कसा मी? सांग मला"

चकित होउनी गिरणीवाला टोपी काढत घाम पुसे
"खाइ भाकरी मम कष्टांची" वदुनी असे मिष्कील हसे
"कधी न मजला कर्ज कुणाचे, साथ नदीची या जन्मी,
ओघावर त्या गिरणी चाले ऐसे असता काय कमी"

उत्तर त्याचे ऐकुन राजा निजांतरी तो सुखावला
सद्गद हृदये पुन: पुन: हे स्वत:शीच तो पुटपुटला
"ऐशा तुजसम प्रजाननांचे कौतुक वाटे मज मोठे,
पिठमंडित तव टोपी पुढती रत्नजडित मम मुकुट कुठे"

निज सदनी मग येई राजा, मनात त्याच्या हेच असे
"ना हेवा तो करी कुणाचा कुणी न त्याचा करीतसे  --- (पुन:प्रकाशित)