मंगळवार, ८ मार्च, २०१६

आधार



चार्वीचा शाळेतला एक मित्र आहे. अनुप्रियम... त्याचा मला खुप हेवा आणि कोतुक वाटते. तो हूषार आहेच पण उत्तम चित्रे काढतो. यावर्षी म्हणजे १२वीच्या वर्षी (त्याच्या भावाचे दहावीचे) त्याचे वडिल अचानक गेले. पण या पठ्ठ्याने हा प्रसंग शांतपणे झेलला आणि आत्ता NID आणि UCEED च्या प्रवेशपरीक्षा  उत्तम तर्‍हेने पास झाला आहे.

नुकतीच त्याच्या वॉलवर नजर टाकली तेव्हा कुणाचे तरी सांत्वनपर शब्द दिसले,
"Be brave beta we all are with you"

का नाही हेवा वाटणार?

मला त्याच्यासारखे खंबीर का बनता आले नाही या विचाराने अजुन अधुनमधुन अस्वस्थ व्हायला होते.

माझे वडिल मी आय.आय.टीत असताना गेले तेव्हा मी पूर्णपणे कोसळून गेलो. मी १२ वीत परिक्षेच्या अगोदर १ महिना असताना माझ्या वडिलांना दूसरा ऍटॅक आला तेव्हा डॉकटरांनी स्पष्ट सांगितले होते, "येईल तो दिवस आपला समजा. केव्हा काय होईल ते सांगता येणार नाही."

त्यानंतर भयानक मानसिक अस्वस्थतेत आम्ही सहा वर्षे लढा दिला. रात्री मला आणि आईला दचकुन जाग यायची तेव्हा वडिलांचा श्वासोच्छवास चालु आहे की नाही हे बघुन परत झोपी जात असु.

त्यादिवसात वडिलांच्या (हलकट आणि नीच) नातेवाईकांकडुन कसलाच आधार नव्हता. होता तो आईच्या आई-वडिलांकडुन आणि वडिलांच्या ऑफिसमधल्या सहकारी आणि मित्रांकडुन.

वडिलांचे अंत्यसंस्कार उरकुन स्मशानातुन बाहेर पडता-पडता चुलत्याची अस्वस्थता लपली नाही. त्या थेरड्याला वडिलकीची भूमिका कधीच निभावता आली नाही, पण भावाची चिता विझली नाही तोच पुतण्या परदेशी जाणार का याची काळजी त्याला अस्वस्थता करत होती...

घरी आल्यावर दू:ख मोकळे करायची पण सोय नव्हती. ’फंडाचे पैसे किती मिळतील’ आणि ’घर विकुन टाका’  इथपर्यंत चौकशा आणि सल्ले चहुबाजुनी येत होते. अभ्यासात लक्ष लागत नव्हते तेव्हा विचारपूस करणे राहिले बाजुला, त्यात भरीसभर म्हणुन आय.आय.टीत विळदकर नावाच्या एका प्राध्यापकाने मी ड्रग्ज घेतो का अशी अफवा पसरवायला कमी केले नव्हते (माझ्या सुदैवाने माझ्या मित्रांनी तेव्हा त्याला गप्प बसवले होते). अशा असंख्य गोष्टी आहेत.

मला चार्वीच्या मित्रासारखे खंबीर राहता आले नाही याची कारणे मला आता हळुहळु समजत आहेत. त्याच्या आजुबाजुला खच्ची करणारी माणसे नाहीत ... पितृछत्र हरवले असले तरी नशीबवान आहे तो...

मंगळवार, १ मार्च, २०१६

एक घरवापसी


आत्ता १५-२० मि. पूर्वीचा प्रसंग...

मारूतीमंदिरपाशी आलो आणि लाल सिग्नल पडला आणि अडकलो. सिग्नल हिरवा होईपर्यंत डोळ्यासमोर घडलेला प्रसंग.

माझ्या उजव्या बाजुला  सिग्नलपोलपाशी एक १६-१७ वर्षाचा गुलाबफुल विक्रेता आणि एक किचेन आणि तत्सम खेळणी विक्रेता यांच्याबरोबर एका पंचेचाळीशीच्या मनुष्याचा काहीतरी संवाद चालु होता. पंचेचाळीशीचा मनुष्य जोरजोरात बोलत असल्याने लक्ष वेधले गेले.

"अरे हे गळ्यात काय घातलंय माहिती आहे का तुला?" पंचेचाळीशीचा मनुष्य बहुधा कार्यकर्ता असावा. त्याने गुलाबफुल विक्रेत्याच्या गळ्यातल्या लॉकेटला उद्देशुन प्रश्न विचारला होता.

गुलाबफुल विक्रेता हसत हसत काहीतरी पुटपुटला. मला ते रस्त्यावरच्या गाड्यांच्या आवाजात ऐकु आले नाही.

"अरे, हा मेलेला मनुष्य आहे. मेलेल्या माणसाला असा कुणी गळ्यात घालतात का? आपण माणुस मेल्यावर त्याला घरात ठेवतो का?

ते दोघे काळेकभिन्न विक्रेते काहीही कळत नसल्याने हसत-हसत काहीतरी पुटपुटत होते. पण काय ते मात्र कळत नव्हते. त्यामुळे माझी उत्सुकता मात्र वाढत चालली होती.

"अरे या मेलेल्या माणसाला गळ्यात घालण्यापेक्षा मी तुम्हाला चांगला ॐ उद्या आणुन देतो. तो गळयात घाला" सिग्नलला गर्दी वाढल्यामुळे कार्यकर्त्याला आता चेव चढला आणि त्याचा आवाज आणखी वाढला.

नंतरचा संवाद मात्र गाड्यांच्या कलकलाटामुळे ऐकु आला नाही पण बघबघेपर्यंत त्या कार्यकर्त्याने तो गळयातला "मेलेला माणुस" खेचुन काढला. तेव्हढ्यात सिग्नल हिरवा झाला आणि मला तिथुन निघावे लागले.

रात्रीच्या अंधारात भरगर्दीत  चाललेल्या या घरवापसीने मनात बरीच प्रश्नचिन्हे चमकायला लागली होती...