बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

श्राव्यपुस्तके


गेले काही दिवस मला ’श्राव्यपुस्तक’ या कल्पनेने खुप पछाडलेले आहे. हा प्रकार जाम आवडला.  blinklist आणि audible  या दोन सेवांचे मी एका वर्षाचे शुल्क मोजून सभासदत्व पण घेऊन टाकले. blinklist वरील पुस्तके संक्षिप्त स्वरूपात असतात तर audible वरील पुस्तके ही पूर्ण स्वरूपात असतात.

गमतीचा भाग म्हणजे, या नंतर पुस्तक श्रवणाचा जो सपाटा सुरु झाला, त्यामुळे माझा मीच कोड्यात पडलो - हे मला यापूर्वीच का सुचले नाही? एक प्रश्न असाही पडला की श्राव्यपुस्तके आवडायला लागली म्हणजे आता वय झाले असे समजायचे का?

काय असेल ते असो. गेली काही वर्षे पुस्तक वाचन वेगवेगळ्या कारणांमुळे इतके मंदावले की आता ते बंद पडेल की काय अशी भीति निर्माण झाली होती. त्यात फेसबुकावरचा वापर वाढल्यामुळे तिथल्या विद्वानांनी न्यूनगंड निर्माण केला होता, तो वेगळाच.  पुस्तके ठेवायला लागणारी घरातली उपयुक्त जागा कमी होणे, पाठदूखी, माझी वाचनाची आवडती खुर्ची मोडणे आणि तशीच खुर्ची परत न मिळणे, अशी अनेक कारणे वाचन कमी होण्यामागे आहेत. पण वाचन झाल्याची अस्वस्थता काय असते, हे मात्र शब्दात मांडता येणे आहे. माझी मुलगी शिक्षणासाठी परगावी असल्यामुळे निर्माण झालेला मोकळा वेळ ही अस्वस्थता जास्त गहिरी करतो.

सहसा अव्यंग व्यक्ती, दृष्य आणि श्राव्य या दोन संवेदनांचा वापर ज्ञानसंपादनासाठी करते. यात श्रेष्ठ काय यात मला पडायचे नाही. पण या दोन संवेदनांद्वारे ज्ञानग्रहणाची क्षमता मात्र सारखी नसते, हे मात्र नक्की. सध्याच्या युगात दृष्य संवेदनांद्वारे ज्ञानसंपादनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. पण  आमची पिढी आणि त्याअगोदरच्या कमीकमी एकदोन पिढ्या रेडीओ ऐकता-ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. रेडीओने आमच्यावर केलेले संस्कार अनन्यसाधारण आहेत. माझ्या मेंदूचा श्राव्य-बाह्यक (auditory cortext) विकसित होण्यात रेडीओचा वाटा मोठा आहे. सकाळी वंदेमातरम्, उत्तमशेती, प्रादेशिक बातम्या, नाट्यसंगीत मग शालेय कार्यक्रम, शाळेतून घरी आल्यावर मराठी बातम्या किंवा न कळणार्‍या हिंदी/इंग्रजी बातम्या, मग नभोनाट्य, आपली आवड किंवा माझी आवड, युववाणी  हे ऐकतऐकत आमची पिढी घडली. यात  बाजारभाव, हवामानाचा अंदाज याबरोबर प्रासंगिक भाषणे किंवा चर्चा किंवा रात्रीच्या संगीतसभा, पुणे विद्यापीठाचे संस्कृत मधुन होणारे दीक्षांत समारंभाचे आणि इंदिरा गांधीच्या जाहिर सभांचे, क्रिकेट सामन्यांचे रेडीओवृत्तांत हे सगळे श्राव्य ज्ञानसंपादानाचे, मनोरंजनाचे विशेष मेनूआयटेम होते.

बरं तेव्हा रेडीओला रिमोट नव्हता. रेडीओ घरातली मोठी माणसे लावायची. मोठी माणसे सांगतील तेव्हा ऐकायचा आणि बंद करायचा. आपला रेडीओ बंद असेल तेव्हा शेजारच्यांचे रेडीओ त्यांचे काम करत असायचे. रेडीओने कुटुंब (टिव्ही मग कंप्युटर/स्मार्टफोनच्या तूलनेत) एका अदृष्य धाग्याने बांधले गेलेले असायचे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुख्य म्हणजे आज माणसागणिक कंप्युटर/स्मार्टफोन असतो किंवा कुटुंबागणिक टिव्ही असतो तसे रेडीओच्या बाबतीत नव्हते. कारमध्ये रेडीओ होता पण तो काही अंतरावर होता त्यामुळे मोबाईल सारखा धोकादायक बनला नव्हता.

श्राव्यपुस्तकांना निश्चित काही मर्यादा आहेत. ही पुस्तके आकृत्या, कोष्टके, चित्रे किंवा फोटोशिवाय आपल्याशी संवाद साधतात पण प्रभावीपणे साधतात. ही पुस्तके चाळता येत नाहीत आणि घरातली जागा पण अडवून ठेवत नाहीत. संदर्भ म्हणून पण श्राव्यपुस्तके वापरता येणे अवघड आहे पण श्राव्यपुस्तके लोळत ऐकता येतात. ही पुस्तके हूंगता येत नाहीत पण त्यांना वाळवी लागत नाही.

तात्पर्य एव्हढेच की रेडीओच्या श्रवणातली एकाग्रता श्रवणेंद्रियांच्या विकासात महत्त्वाची ठरली. ही विकास पावलेली श्रवणेंद्रिये मधल्या काळात कुठेतरी हरवली आणि निपचित पडली पडली होती. श्राव्यपुस्तकांनी ती आता परत खडबडून झाली आहेत.

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

विघ्नकर्ता


काल रात्री दहा वाजता लेकीला आणायला विमानतळावर गेलो.


एक्झिट गेटमधून बाहेर पडताना भयानक ट्रॅफिक जॅम होता. वाहतूक नियंत्रण करायला पोलिस पण नव्हते आणि एअरफोर्सचे पण कुणी नव्हते. ट्रॅफिक पुढे सरकत नव्हता म्हणून डीझेल वाचविण्यासाठी इंजिन बंद केले. आणि मग नको होते ते झाले.

गाडी बंद पडली चालू होईना.

बराच वेळ प्रयत्न करूनही चालु होईना तेव्हा गाडी तिथेच सोडायचा निर्णय घेतला. जवळच्या पार्किंग लॉट पर्यंत गाडी ढकलत नेणे गर्दीत अशक्य होते.

गाडी जवळच आडोशाला उभी करायचे ठरवले. पण मदतीला कुणी आले नाही. शेवटी मी आणि चार्वीने कशीबशी ढकलत एक्झिट गेटच्या भिंतीजवळ आणली.

मनातल्यामनात हवालदिल झालो. एक मन म्हणाले,
"गणपतीला शिव्या घालतोस ना. चांगली अद्दल घडली".

गाडी लॉक केली. ओला आणि उबर बुकींग घेत नव्हते म्हणून प्रीपेड टॅक्सी केली. प्रीपेड टॅक्सीवाल्याने पण मनस्ताप दिला म्हणून रागाचा पारा चढला होता. त्यात तो परधर्मीय. त्यामुळे डोक्यात अनेक विचित्र भावना आणि विचारांची वादळे चालू झाली. शेवटी डेक्कन जिमखाना जवळ आल्यावर प्रीपेड टॅक्सी सोडून रिक्षाने घरी यायचे ठरवले.

प्रीपेड टॅक्सीवाला, डेक्कनला उतरल्यावर म्हणाला "साब रिसिट लेके जाओ". मग आणखी एक धक्का बसला, टॅक्सीवाल्याने खिशातून पाकीट काढले आणि म्हणाला, "डेक्कन का चार्ज ५५० ही है. १०० रु वापस ले लो"
माझी अपेक्षा नव्हती, पण मी ते मुकाट घेतले आणि रिक्षा पकडून घरी आलो. 

घरी आल्यावर मूड पूर्णपणे बिघडलेला होता. लेकीशी थोड्या गप्पा मारल्या आणि रात्री १२.३० ला झोपायला गेलो. झोप लागली नाही. मन सारखे हिणवत होते, 
"गणपतीला शिव्या घालतोस ना. चांगली अद्दल घडली".

रात्रभर डोक्यात असंख्य विचार... आता गणेशचतुर्थीला मेकॅनिक कसा शोधायचा, पोलिसांनी गाडी ओढून नेली असली तर ती कशी मिळवायची. एअरफोर्सच्या लोकांनी नेली असली तर त्यांना काय उत्तरे द्यायची. कुणाला किती पैसे चारायचे इ. इ.

सकाळी बायकोने आणि लेकीने सांगितले म्हणून मेकॅनिकच्या ऐवजी  टाटाच्या 24x7 road assistance service ला फोन केला आणि तक्रार नोंदवली. पाकीटात भरपूर पैसे बरोबर घेतले.
लेकीने धीर दिला,
"बाबा, काळजी करू नका. काहीही होणार नाही!"
जाताना एक मन मला डिवचत होते तर दूसरे मन नेहेमीप्रमाणे गणपतीला शिव्या घालत होते,
"विघ्नकर्त्या, बरोब्बर चतुर्थीला नावाला जागलास!"

त्यात पाउस चालु झाला आणि मी छत्रीत न्यायला विसरलो. मग टेंशन मध्ये आणखी भर...
शेवटी एकदाचा विमानतळावर पोचलो आणि आश्चर्याचा धक्काच बसला,

गाडी जागेवरच होती आणि गाडीला जॅमरपण नव्हता.
दोन पोलिस येऊन फक्त चवकशीकरून गेले आणि गाडी लवकर हलवा एव्हढंच म्हणाले. मग काही वेळाने टाटाचा मेकॅनिक आला आणि त्याने गाडी स्टार्ट करून दिली (बॅटरी संपली होती.)

आश्चर्याचा एक आणखी एक धक्का, टाटाने ठरवले होते तितकेच म्हणजे फकत साडेसहाशे घेतले. मीच मग त्याला शंभराची एक नोट काढून दिली (माझे जगण्याचे नियम फार सोप्पे आहेत. त्यातला एक - वाईट अनुभव देणार्‍याना मी शिक्षा करू शकत नाही पण चांगले अनुभव देणार्‍यांना शाबासकी नक्कीच देऊ शकतो). आज पाकीट हलके होणारच यासाठी मनाची तयारी केली होती त्या पार्श्वभूमीवर सगळंच अनपेक्षित घडत होते.

शेवटी स्वत:ला तिन-चार चिमटे काढले आणि गाडी स्टार्ट करून घराकडे निघालो. येताना सगळीकडचे गणपती माझ्याकडे बघून हसताहेत असा सारखा भास होता...

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

गूढ आणि धक्कादायक



१९९२ साली व्हिएन्ना येथे झालेल्या एका जागतिक परिषदेतील कार्यशाळेत माझा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला होता (मला त्या कॉन्फरन्सला जाता आले नव्हते). त्या पेपरचा प्रथम लेखक मी होतो.

पण काळाच्या ओघात काहीतरी जादू झाली आहे...

तो पेपर नंतर २०११ साली, २०१३,  २०१६ आणि २०१७ मध्ये नंतरच्या संशोधकांनी संदर्भ म्हणून उल्लेख केला आहे.  धक्कादायक भाग असा हे सर्व नंतरचे संशोधक संदर्भाचा उल्लेख करताना माझा उल्लेख द्वीतिय लेखक म्हणून करत आहेत.

हे नंतरचे निबंध खालील प्रमाणे

- http://citeseerx.ist.psu.edu/viewdoc/download?doi=10.1.1.297.2901&rep=rep1&type=pdf
- http://pep.ijieee.org.in/journal_pdf/11-273-14709960557-9.pdf
- https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=21&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjPzIX8kNbVAhUHXLwKHafnBgY4FBAWCCYwAA&url=http%3A%2F%2Fpep.ijieee.org.in%2Fjournal_pdf%2F11-273-14709960557-9.pdf&usg=AFQjCNF8IiiWiGQ06B1LiK8tg9Zv7k5_dg
- https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=25&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjPzIX8kNbVAhUHXLwKHafnBgY4FBAWCEAwBA&url=http%3A%2F%2Fwww.ijarcs.info%2Findex.php%2FIjarcs%2Farticle%2Fdownload%2F3405%2F3409&usg=AFQjCNFRQfvc1CFH2Z_Kpx42MaO3Za5n4A


हा योगायोग किंवा अपघात नक्कीच नाही. कारण संशोधक संदर्भ यादी तयार करताना सहसा काळजी घेतात. पण हे काहीतरी गूढ आणि धक्कादायक आहे.