बुधवार, २१ एप्रिल, २०१०

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

इन्द्रराज पवारांचा (http://misalpav.com/node/12007)पिंडदानाचा अनुभव एक अशीच आठवण जागी करून गेला. त्यांनी पिंडदानाचे दोन वेगवगळे विधी का असा प्रश्न विचारला आहे. मला त्याचे उत्तर असे द्यावेसे वाटते की विधी ज्या समाजाची जशी समूहदृष्टी तसे आकार घेतात.

सतरा अठरा वर्षांपूर्वीची गोष्ट असेल. माझ्या एका काकांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचे पार्थिव वैकुंठावर घेऊन गेलो तेव्हा त्या दिवशी गर्दी अशी नव्हती पण क्यु मध्ये ४-५ पार्थिवे होती. काकांच्या पार्थिवा अगोदर एका वृद्धम्हातार्‍या मजुराचे पार्थिव होते. तो एका सोसायटीचा वॉचमन म्हणुन काम करत होता. त्याचे क्रियाकर्म करण्यासाठी सोसायटीमधले काही लोक उपस्थित होते. एकंदर परिस्थितीचा आढावा घेऊन दहनपूर्व विधी करायचे नाही असे काकांच्या आम्ही निकटर्तीयानी ठरवले होते आणि शांतपणे सर्व जण रांग पुढे सरकण्याची वाट बघत होते.

एवढ्यात हळुहळु लोकांची गर्दी वाढायला लागली म्हणता म्हणता १००-१५० मजुर आणि झोपडपट्टीवासीयांचा जमाव जमला. एक शववाहिका भरकन आली आणि एका पोरसवदा मजुराचे पार्थिव बाहेर काढून ठेवण्यात आले. इतका वेळ असलेली शांतता पूर्णपणे भंग पावली होती. जमलेल्या जमावाचा कर्कश्श गोंगाट चालला होता. मरण पावलेला तरूण भाजून मृत्युमुखी पडला होता.

आज दहनासाठी रांग आहे आणि नंबर लागायला वेळ लागेल असे जेव्हा जमावाच्या लक्षात आले तेव्हा त्यांच्या काही जण पुढे येऊन अगोदर वाट पहात असलेल्या लोकांकडे जाउन आम्हाला रांगेत पुढे जाउ द्या म्हणुन आग्रह करु लागले. अगोदर वाट पहात असलेल्या लोकानी शांतपणे जमावाला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला तेव्हा जमावाने आवाज वाढवायला सुरुवात केली आणि वैकुंठाचे ऑफिस गाठले. ऑफिसात ते काय करतात याची मला त्या प्रसंगात पण उत्सूकता निर्माण झाली म्हणुन मी पण हळुच मागे गेलो.

"ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!" जमावातील एकाने अर्ज केला.

ऑफिसातील कर्मचार्‍याने त्यांना समजावून सांगायचा प्रयत्न केला की, एकच दाहिनी चालु असल्यामुळे आज वेळ लागेल याची कल्पना दिली. पण जमाव ऐकायच्या मनस्थितीत नव्ह्ता.

"मालक, तिकडे स्लॅब अर्धवट राहिलीय. तुमचं च्या-पाणी देतो की राव!" गर्दीतून एक आवाज आला. जमाव 'च्या-पाण्या'वर आल्याने वैकुंठातले कर्मचारीपण खजिल आणि हतबल झाले आणि बाहेर येउन रांगेत ताटकळत असलेल्या लोकांची परवानगी मागू लागले.

साहजिकच सुशिक्षितपणाने झुंडशाही पुढे हार खाल्ली. तोवर मृत्युबद्द्लच्या सर्व जाणीवा बोथट होऊन गेल्या होत्या. मी ज्या समाजात जन्माला आलो आणि वाढलो त्याने दिलेला सुसंकृतपणा हा कुचकामाचा असून तो कमकुवतपणा असल्याची खात्री झाली.

अजूनही वैकुंठावर कुणासाठी जायची वेळ आली त्या दिवशीचा कोलाहल आठवतो, आणि कानात घुमत राहतात ते शब्द - "ओ मालक, आमची ब्वाडि पयली घ्या की हो!"

४ टिप्पण्या:

Maithili म्हणाले...

Baap rre....
Something really strange...!

शिरीष म्हणाले...

इथे जर खरी हार कोणाची झाली असेल तर ती आपल्याला सुसंस्कृत बनलो असे वाटणाऱ्या शिक्षणाची. मला तरी ह्या वेगळे काही वाटले नाही.. तो एक सुंदर व्यवहार होता की जो आपण भावनाप्रधान बनून समजू शकत नाही

Atul Kumthekar म्हणाले...

mala waatTe ki doan goshti yaa lekhat mix zalyaa aahet.

1. haa specific incidence
2. general statement of susanskrit pana ni sanskarancha practical life madhe upyog (aajchya bhartaatil)

mudda no 2 var mi kaalchaach ek prasanga nodavu ichhito. Eka ghari gelo hoto. Tithli stri hee politically strong (jaati criteria var var aaleli) husband shikshak. husband to mi - 'kapal motha zalela distay tumcha' mi 'hoa - ataa tyach direction la vaadhnaar!' te -'buddhimatta valyancha te lakshan' me 'pan kaai upyog naai bagha yaa buddhimattecha aaj' tae 'pan samadhaan milta naa...'
mala waatTe yaa dusrya uttaraat dusrya muddyacha uttar aale. hindi filmi style mhanaycha tar Amitabh chya aai cha dialog 'tumara bap chor hein likhnae waale, tumare kaun thhe?' kinai??

Pahily muddya baabat mhanje haa vishishta prasanga - mi tar maaf karun taakle aste. chaar susanskrut loak ekatra aale tari te ektya peksha chowghanchi soy adhik pahatil, agadi hasat hasat, pathivar thaap marun - ya baabat mi kaslihi paij lavayla tayaar aahe... mag bola, hae tar majur, ashikshit. parat tyanna kharach kaahi karan hote. slab geli tar pika milnaar naahi, tyancha poat chalnaar naahi mag. tyamule mi mothya manane maaf karun taakle aste...

Unknown म्हणाले...

लेख आवडला, असे अनुभव माणसाला बराच काही सांगून जातात, आणि परंपरेतून कारणमीमांसा वजा केली फक्त कर्मकांड उरते, त्याचा भावनांशी संबंध उरत नाही.