आधुनिक ज्योतिषातील एक मूलभूत तत्त्व असे आहे - उगवते म्हणजे लग्नबिंदूशी युती करणारे आणि ख-मध्याशी युती करणारे (जन्मवेळी बरोब्बर डोक्यावर असलेले) ग्रह हे फलिताच्या दृष्टीने ताकदवान असतात. म्हणजे एखाद्या पत्रिकेत रवि-गुरु युती जर जन्म वेळेला उगवत असेल किंवा बरोबर डोक्यावर येत असेल तर ती व्यक्ती तिच्या जन्मस्थळी उर्वरीत आयुष्य जगल्यास नक्कीच उत्कर्ष साधेल. पण या व्यक्तीने स्थलांतर केले तर नव्या ठिकाणी पत्रिकेचे स्थानांतर केल्यावर स्थानांतरीत लग्न किंवा ख-मध्य यांच्याशी होणारे योग विचारात घावे लागतात.
पत्रिकेचे स्थानांतर म्हणजे काय?
याला इंग्रजीत रिलोकेशन अशी संज्ञा आहे. ज्या ठिकाणी जातक स्थलांतर करणार असेल ते ठिकाण जन्मस्थळ असे मानून नव्याने पत्रिका मांडली तर लग्न आणि ख-मध्य बदलतात. हे नवीन बिंदू मिळाले की त्यांच्याशी जर इतर ग्रहांचे शुभ योग होत असतील तर पत्रिका बलवान होते आणि उत्कर्षाची शक्यता वाढते.
उदाहरण
नुकतेच माझे एक मित्र माझ्याकडे त्यांची पत्रिका घेऊन आले होते. गेले काही महिने ते पुण्यात गुदमरून गेले आहेत. पुणे सोडून दूसरीकडे कुठे स्थायिक होता येईल का हा प्रश्न त्यांना सतावत आहे. त्यांनी प्रथम मी कुठे स्थायिक होऊ असा प्रश्न विचारला. नंतर कलकत्त्याचा विचार करू का असा उपप्रश्न विचारला. सोबत सौ बरोबर होत्या. त्यांनी फक्त भारतातलीच ठिकाणे सूचवा असे सांगितले.
आता माझ्या या मित्रासाठी योग्य "स्थळ" शोधायची कामगिरी माझ्याकडे आली होती. हे योग्य स्थळ असे पाहिजे की तिथे नशीबाची साथ मिळावी, स्वीकारलेल्या नोकरी अथवा व्यवसायात यश मिळायला हवे. संपत्ती निर्माण करता यावी. माझ्या मित्राच्या पत्रिकेत संधी किंवा नशीबाची साथ दाखवणारा रवी-गुरूचा मध्यम दर्जाचा (साडेपाच अंशातील अप्लायिंग) नवपंचम योग आहे. हा योग त्यांच्या पत्रिकेत बर्यापैकी कार्यरत आहे. आता हा योग कुठे-कुठे बलवान होतो तर माझ्या मित्राचा जन्म झाला तेव्हा (म्हणजे त्या दिवशी आणि त्या वेळी) ज्या ज्या ठिकाणी रवी आणि गुरु लग्न किंवा ख-मध्यावर होते, ती सर्व ठिकाणे जातकाला नशीबाची साथ देणारी किंवा संधी देणारी होतील.
माझ्याकडे असलेले एक अत्याधुनिक सॉफ्ट्वेअर वापरून हा शोध घेतला असता मला खालील नकाशा मिळाला.

या नकाशात सर्वात डावीकडील हिरवी उभी रेषा, गुरु जिथे जिथे ख-मध्यावर येतो ती ठिकाणे दाखवते, तर उजवीकडील तांबडी उभी रेषा, रवी जिथे जिथे ख-मध्यावर येतो ती ठिकाणे दाखवते. हिरवी वक्र रेषा, गुरु जातकाच्या जन्म दिवशी आणि जन्म वेळी जिथे जिथे लग्नावर येतो ती ठिकाणे दाखवते तर तांबडी वक्र रेषा रवि जातकाच्या जन्म दिवशी आणि जन्म वेळी जिथे जिथे लग्नावर येतो ती ठिकाणे दाखवते. या सर्व ठिकाणी माझ्या मित्राच्या पत्रिकेतील रवि-गुरु नवपंचम योग बलवान होतो.
आता इथे माझ्या मित्राच्या पत्नीने "फक्त भारतातलीच ठिकाणे सूचवा" असे बजावल्याने वर समोर आलेले पर्याय उपयोगाचे नाहीत. म्हणून मित्राची इच्छा असलेले कलकत्ता हे ठिकाण कितपत योग्य आहे हे तपासणे आवश्यक ठरते.
कलकत्ता जन्मस्थळ मानून पत्रिका परत मांडली असता सायन कुंभ रास ३ अंश ४२ मि हा ख-मध्य मिळतो. या ख-मध्याशी मित्राचा जन्मशुक्र ३ अंशात युती करत असल्याने शुक्र बलवान होतो, पण जन्म पत्रिकेत शुक्राचा जन्मशनी बरोबर अर्ध केंद्रयोग तर जन्मप्लुटो बरोबर त्र्यर्ध केंद्रयोग(१३५ अंश) आहे. हे दोन्ही योग अतिशय त्रासदायक आहेत ते आर्थिक अडचणी आणि कौटुंबिक कलह दाखवतात. त्यामुळे माझ्या मित्राने सुचवलेल्या "कलकत्ता" या पर्यायाला बाद करणे आवश्यक ठरते. आता दूसरा पर्याय सध्या डोळ्यासमोर नसल्याने राहता राहीले पुणे. मित्राचे वास्तव्य बरेच वर्षे पुण्यातच आहे. पुण्यात आल्यावरच या जातकाच्या उत्कर्षास सुरुवात झाली म्हणून मी पुणे हे जन्मस्थान मानून पत्रिका स्थानांतरीत केली (परत मांडली).
पुण्याच्या पत्रिकेत सायन मकर रास १९ अंश ५१ मि हा ख-मध्य मिळाला. या ख-मध्याशी हर्षल, प्लुटो, शनी, नेपच्यून हे चार ग्रह शुभ योग करतात. असे चार-चार शुभ योग असल्यावर उत्कर्ष झाला नाही तरच नवल. कारण ख-मध्यावर एखादा ग्रह गोचर भ्रमणाने आला की ते सर्व एकदम सक्रिय होतात आणि उत्कर्षाच्या संधी निर्माण होतात.
या सर्व विश्लेषणाचे तात्पर्य असे की ज्योतिषातील मूलभूत गृहितकांचा आधार घेऊन उत्कर्ष कुठे या प्रश्नाचे उत्तर शोधता येते, बदली होणार असेल तर बदलीच्या ठिकाण कितपत लाभदायक ठरेल याचाही विचार करता येतो.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा