बुधवार, २७ जानेवारी, २०१६

देऊळ


आमच्या सोसायटीच्या समोर २ मोठे टॉवर आणि एक मंगल कार्यालय झाले आणि आमच्या समोरच्या रस्त्याची गल्ली झाली. यथाकाल गल्लीच्या तोंडाचा काही रिक्षावाल्यानी ताबा घेतला आणि तिथे आपला स्टॅण्ड सुरु केला. काही दिवसांनी रिक्षास्टॅण्डला स्थैर्य प्राप्त झाले आणि एका रिक्षासंघटनेचा बोर्डपण लागला. पुढे काय होणार याचा मी अंदाज बांधला आणि माझा अंदाज खरा ठरला...

रिक्षावाल्यानी दत्ताचे देऊळ बांधायचा संकल्प सोडला. बहुधा आमच्या सोसायटीने हरकत घेतली म्हणून रिक्षावाल्यानी पलिकडच्या बाजुला छोटे दत्तमंदिर बांधायला घेतले. रिक्षावाल्याना दत्त का प्रिय आहे हे मला न उलगडलेले कोडे आहे. नुकतीच दत्तजयंती झाली तेव्हा रिक्षावाले माझ्याकडे आले, तेव्हा मी त्यांना मला शक्य होती तेव्हढी वर्गणी पण दिली.

परवाच मी रुपालीत जाण्यासाठी रिक्षा घेतली, तेव्हा एका रिक्षावाल्याशी गप्पा मारायला सुरुवात केली.

मी विचारले, "काय हो, सगळ्या रिक्षास्टॅण्डवर दत्त जास्त करून दिसतो. ते का?"

"काय माहित नाही साहेब?"

"पण मग गावात एव्हढी देवळे अगोदरच असताना आणखी ही देवळे कशासाठी?"

"काय आहे साहेब, कामावर निघताना कुठेतरी डॊकं टेकवले की मन प्रसन्न राहतं साहेब".

मग मी त्याला विचारले,

"अहो पण डोकं टेकवायला आपल्या घरात देव असतोच की... घरातला देव काय मन प्रसन्न ठेवायला कमी पॉवरफुल असतो का?"

रिक्षावाला आता एकदम गडबडुन गेला आणि मग स्वत:ला सावरून मोठ्याने हसला आणि म्हणाला,

"देवळाच्या निमित्ताने आमच्या व्यवसायातली चार लोकं एकत्र येतात आणि बांधलेली राहतात"

मग रिक्षावाल्याने मला वेगवेगळ्या रिक्षास्टॅण्डवरचे रिक्षावाले कायकाय उपक्रम चालवतात, ते त्याने मला सांगितले. त्यावर घरातला देव नाक्यावरच्या चार लोकांना एकत्र आणण्यास असमर्थ आहे एव्हढाच मी त्यातुन निष्कर्ष काढला आणि मग मला त्याला अधिक प्रश्न विचारण्यात मला पण, का कुणास ठाऊक, रस उरला नाही.

तोपर्यंत रुपाली आली होती... रिक्षातला वेताळ मग रुपालीत जाउन लोंबकळु लागला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: