सोमवार, १५ जुलै, २०१९

परंपरेशी ऐशीतैशी



समाजाच्या ब-याचशा धारणा अतार्किक असतात. अशा अतार्किक धारणांचे ओझे मानवी समूह कशासाठी निर्माण करतात, का बाळगतात?

विशिष्ट चिन्हांशी एकनिष्ठतेची अपेक्षा ही अशीच एक अपेक्षा...

समजा अ आणि ब हे दोन भिन्न समूह आहेत. त्यांच्या भिन्न परंपरा आहेत. अ हा समूह उभे गंध लावतो आणि ब हा समूह आडवे गंध लावतो. आणखी वेगळे उदा० घ्यायचे झाले तर एक घराणे पंचमात तानपुरा लावते तर दूसरे घराणे निषादात तानपुरा लावते.

दोन्ही समूहांची आपापल्या परंपरांवर ठाम निष्ठा आहे कारण ज्या अर्थी परंपरा टिकलेली आहे त्या अर्थी त्यात निश्चितच "काहीतरी अर्थ असला पाहिजे" ही धारणा त्यामागे आहे.

मग कधीतरी अ या समूहातल्या व्यक्तीची ब या समूहाची गाठ पडते.  उभ्या गंधवाल्यावर आडव्या गंधवाल्याची छाप पडते. मग ती व्यक्ती आडवे गंध लावायचे धाडस करते आणि परंपरा मोडल्याबद्दल टीकेचा धनी बनते (आजच्या जमान्यात ट्रोलींग). 

वास्तविक उभे गंध आणि आडवे गंध या दोन्ही परंपरा आहेत आणि त्या पूर्णपणे नॉर्मल असल्याने एकाने दूस-याचे अनुकरण करणे हे असाधारण कसे ठरते?  कदाचित उभे किंवा आडवे गंध न लावता तिरके गंध लावले किंवा अजिबातच लावले नाही तर ते एकवेळ परंपरा मोडण्याचे निमित्त होऊ शकेल.

पण तरीही व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर न करणारा समूह कितपत पुढारलेला मानायचा? हा प्रश्न उरतोच...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: