सोमवार, १५ जुलै, २०१९

परंपरेशी ऐशीतैशी



समाजाच्या ब-याचशा धारणा अतार्किक असतात. अशा अतार्किक धारणांचे ओझे मानवी समूह कशासाठी निर्माण करतात, का बाळगतात?

विशिष्ट चिन्हांशी एकनिष्ठतेची अपेक्षा ही अशीच एक अपेक्षा...

समजा अ आणि ब हे दोन भिन्न समूह आहेत. त्यांच्या भिन्न परंपरा आहेत. अ हा समूह उभे गंध लावतो आणि ब हा समूह आडवे गंध लावतो. आणखी वेगळे उदा० घ्यायचे झाले तर एक घराणे पंचमात तानपुरा लावते तर दूसरे घराणे निषादात तानपुरा लावते.

दोन्ही समूहांची आपापल्या परंपरांवर ठाम निष्ठा आहे कारण ज्या अर्थी परंपरा टिकलेली आहे त्या अर्थी त्यात निश्चितच "काहीतरी अर्थ असला पाहिजे" ही धारणा त्यामागे आहे.

मग कधीतरी अ या समूहातल्या व्यक्तीची ब या समूहाची गाठ पडते.  उभ्या गंधवाल्यावर आडव्या गंधवाल्याची छाप पडते. मग ती व्यक्ती आडवे गंध लावायचे धाडस करते आणि परंपरा मोडल्याबद्दल टीकेचा धनी बनते (आजच्या जमान्यात ट्रोलींग). 

वास्तविक उभे गंध आणि आडवे गंध या दोन्ही परंपरा आहेत आणि त्या पूर्णपणे नॉर्मल असल्याने एकाने दूस-याचे अनुकरण करणे हे असाधारण कसे ठरते?  कदाचित उभे किंवा आडवे गंध न लावता तिरके गंध लावले किंवा अजिबातच लावले नाही तर ते एकवेळ परंपरा मोडण्याचे निमित्त होऊ शकेल.

पण तरीही व्यक्तीस्वातंत्र्याचा आदर न करणारा समूह कितपत पुढारलेला मानायचा? हा प्रश्न उरतोच...

बुधवार, १२ जून, २०१९

"फार काय"



"फार काय"
=======

कुत्र्यांसाठी कपडे आले.
फार काय,
बो, टाय, टीशर्ट घालुन
बड्डे पार्टीसाठी श्वान सजले.


कुत्र्यांसाठी न्हावी आले,
तसेच ॲण्ड्रोईड गेम्स आले.
फार काय,
"जुजबी" प्रियराधनासाठी
पेट्स-पार्क्स आले.

कुत्री कोडी सोडवु लागली
बेरजा वजाबाक्या करू लागली
मालकाला खूश करण्यासाठी
I love you सुद्धा म्हणु लागली.
फार काय,
सुंदर मालकीणीशी संभोगाचा
आनंद पण लुटु लागली!

एव्हढे सगळे होऊनही
खांब आल्यावर तंगडी
वर होणे थांबले नाही.
फार काय,
कुत्र्याचा माणुस
इतक्यात काही होणे नाही!

-राजीव उपाध्ये

रविवार, २१ एप्रिल, २०१९

सल्ला







कालच्या म्हणजे शनिवारच्या म०टा० मध्ये एका वकीलीण बाईंचे सदर असते. त्या वेगवेगळ्या समस्यांवर "मार्गदर्शन" करीत असतात.


काल एका केस मध्ये मुलीने फक्त १२ दिवस संसार केला आणि नंतर मुलीकडच्यांनी जो त्रास दिला त्याचा पाढा आहे. मुलाला घटस्फोट हवा आहे अन तो पण पोटगीशिवाय. माझ्यामते जरी एकच बाजू पुढे असली तरी मुलाची अपेक्षा स्वाभाविक आहे.


पण वकीलीण बाईंचा सल्ला वाचून धक्का बसला. त्यांचा सल्ला असा आहे की पोटगी टाळण्यापेक्षा "कायदेशीर" मार्गाने त्यातून बाहेर पडावे...


वास्तविक अशा केस मध्ये बायकांनी पोटगीची भिक मागू नये अशी वकीलीणबाईंची भूमिका असायला हवी. पण वकील हे सर्वात नीच आणि हलकट असतात कारण अशीलांना झुंजवल्याशिवाय त्यांची पोटे भरत नाहीत.


या केसमधला या बाईंचा सल्ला वाचून दू:ख झाले...

मंगळवार, ९ एप्रिल, २०१९

घटना आणि अर्थ



व्यक्तीगत आयुष्यातील असो अथवा सार्वजनिक आयुष्यातील असो, एखादी घटना घडते तेव्हा तिला एक कारणपरंपरा असते. अनेक घटकांनी त्यात आपापली भर घातलेली असते. घटना घडून गेल्यावर जसाजसा काळ लोटायला लागतो तेव्हा त्या घटनेची कारणपरंपरा विरळ अथवा धूसर बनत जाते. या सर्व कारणपरंपरेतील सर्व टप्पे कधीच नोंदले जात नाहीत (भावनिक संदर्भ तर कधीच नाही) आणि मग ते वस्तुनिष्ठतेचे कातडे पांघरलेल्या (सहसा संवेदनाशून्य) चिकित्सकांच्या पथ्यावर पडते. असे चिकित्सक मग उपलब्ध पुरावे त्यांच्या मर्जीप्रमाणे जोडतात आणि हाच खरा इतिहास म्हणुन आपल्या घशात कोंबतात. मग स्वातंत्र्यासाठी जिवावर उदार झालेला एखादा देशभक्त नक्षलवादी ठरतो, तर एखाद्याला माफीवीर म्हणून त्याच्यावर बोळा फिरवला जातो...


घटना घडुन गेल्यावर जसा अधिकाधिक काळ लोटत जातो तसे त्या घटनेचे हवे ते अर्थ लावणे सोईचे जाते. तात्कालीन मूल्यांचा/धारणांचा या अर्थ लावण्यावर कळत नकळत परिणाम झालेला असतोच.

आधुनिक इतिहासकारांचे इतिहास ’अन्वयन’ (interpretation) आणि लेखन किती गांभीर्याने घ्यायचे हा माझ्यापुढे कायम न सुटलेला प्रश्न आहे.

रविवार, ३१ मार्च, २०१९

ओळख



रोज संध्याकाळी
नगरप्रदक्षिणेला निघतो
तेव्हा अनेक
आजोबा भेटतात.

काहींच्या मूकओळखी होतात.
काही आजोबा परत दिसले की हसतात
काही खिन्नपणे तर
काही निर्विकारपणे निघून जातात.
तरी पण ती ओळख असतेच...

बरेच महिने एक आजोबा दिसले नाहीत.
त्यांची आठवण झाली की
मन कावरे-बावरे व्हायचे
तसे ते माझ्याशी एकदाच बोलले...
तेव्हा त्यांनी मी सायकल चालवणे
का बंद केले म्हणून जाब विचारला
त्यांची मला खूप गंमत वाटली होती...
नंतर कित्येक महिने दिसले नाहीत
म्हणून बेचैन झालो.

आज ते अचानक दिसले
इतकंच नाही तर
त्यांनी लांबुन हसून हात केला ...

किती बरे वाटले म्हणुन सांगू! 

मंगळवार, १२ मार्च, २०१९

प्राण्यांचे मानवीकरण



मी गेले काही दिवस fbवर पाळीव प्राण्यांविषय़ीचे व्हिडीओज नियमित बघतोय. हे व्हिडीओ घरात पाळलेल्या वाघसिंहापासुन ते अजगर आणि वेगवेगळ्या पक्ष्यांपर्यंत आहेत. कुत्रा या पूर्ण रेंजचा मध्यबिंदू आहे.


हे व्हिडीओज बघताना प्राण्यांचे मानवीकरण किती वेगाने होते आहे, हे बघून मन अचंबित होते. घरातल्या लहान बाळांची काळजी घेणारी, त्यांचे पांघरूण सारखे करणारी, आजारी माणसांची काळजी घेणारी कुत्री, सोप्या बेरजा वजाबाक्या करणारी, नृत्य करणारी, इतकंच नव्हे तर गाणारी कुत्री बघून अचंबित व्हायला होते.


पाळीव प्राण्यांमध्ये वाढत असलेली ही मानव-सदृश वर्तन आणि बुद्धीमत्ता बघुन काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात येतात आणि पटतात


- आपली बुद्धीमत्ता जनुकांमध्ये असते. जनुकांचे व्यक्त होणे आजुबाजुच्या वातावरणावर अवलंबून असते. (नुकत्याच एका हायकोर्टाच्या निकालात या वास्तवाची दखल घेतली आहे).

- सुरक्षा, पोषण आणि चैतन्य (stimulation) ज्या वातावरणात मिळते तिथे बौद्धिक विकास झपाट्याने होतो आणि तिथेच निष्ठा, आपलेपणा निर्माण होतात

शुक्रवार, १ मार्च, २०१९

यमक



मधुमेही
मेंदूतून
झिरपलेली,
यमके
हुकल्यावर,


हुंगतात
उकीरडे
फेसबुकवर

मुग्धवांझोटी!


-- -राजीव उपाध्ये

रविवार, ३० डिसेंबर, २०१८

भावनिक बद्धकोष्ठ आणि प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र

भावनिक बद्धकोष्ठ आणि प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र
=================================

-- राजीव उपाध्ये

कोणत्याही सजीवाच्या या भूतलावरील अवतारात मलनिस्सारणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. निसर्गात मुक्तपणे संचार करणार्‍या जीवांच्या मलनिस्सारणावर फारसे निर्बंध नसतात, पण सुसंस्कृत (civilized society) समाजात राहणार्‍या मनुष्यप्राण्याच्या मलनिस्सारणावर मात्र अनेक निर्बंध आहेत. त्यामुळे कोंडमारा होऊन अनेक व्याधींना आमंत्रण मिळते आणि जगणे असह्य होते, हे सर्वांच्या पुरेसे परिचयाच्या आहे.

मलनिस्सारण म्हटले की सर्वांना फक्त घन-मलाचे म्हणजे पाचित अन्नाच्या मलाचे निस्सारण आठवते. पण मल (मळ) हा केवळ घन स्वरूपात नसतो, तर तो द्रव आणि  वायु स्वरूपात पण असतो आणि तो मूत्र आणि अपानवायुच्या रूपात शरीरातून बाहेर टाकला जातो.  याशिवाय आणखी एका मळाचे अस्तित्व बर्‍याच जणांना ठाऊक नसते. ते म्हणजे भावनिक मळाचे!  भावनिक मळाचा निचरा झाला नाही तर भावनिक बद्धकोष्ठतेचा दूर्धर विकार जडतो आणि त्याचे दूरगामी परिणाम केवळ मानसिक पातळीवर न राहता शारीरिक पातळीवर पण दिसून येतात, हे विज्ञानाने आता पुरेसे सिद्ध केले आहे.

भावनिक बद्धकोष्ठासारखा दूर्लक्षित विकार आधुनिक मानवाच्या आयुष्यात सापडणार नाही. भावनिक बद्धकोष्ठाला कारणीभूत ठरणारे घटक असंख्य आहेत. भावनिक नियंत्रणाच्या अवाजवी उदात्तीकरणातून भावनिक बद्धकोष्ठाची चिकट आणि दूर्धर व्याधी जडते. वेळच्या वेळी शौचाला झाले नाहीतर सुरुवातीला वेळी-अवेळी शौच-विसर्जनाची भावना अनावर होते आणि जवळपास सोय नसल्यास फजितीची वेळ येते.

भावनिक मळाचे पण बरेचसे असेच असते. वेळच्या वेळी त्याचे निस्सारण होणे महत्त्वाचे असते. पण समाजाच्या अवाजवी   निरर्थक कल्पनांमुळे (उदा० रडणे हे बायकी असते आणि ते पुरुषांना शोभत नाही इ०)   तो साठतो. मग काही जण व्यसनाधीन होतात तर काही जण क्षुल्लक कारणांनी प्रक्षुब्ध होतात. काहीवेळा अर्वाच्य शिव्यांच्या रूपात भावनिक मळ उद्रेक होऊन बाहेर पडतो.

या आणि इतर अनेक कारणांनी भावनिक मळाचा निचरा होऊ देणे यासाठी प्रभावी उपाय योजणे श्रेयस्कर ठरते. आम्ही यासाठी 
प्राचीन भारतीय मंत्रशास्त्रात काही उपाय सापडतात का यावर दीर्घकाल संशोधन केले असून, ते लवकरच आंतरराष्ट्रीय नियतकालिकांत यथावकाश प्रसिद्ध करू इच्छितो.

प्राचीन भारतीय मंत्रशास्त्र हा खूप गूढ आणि अथांग असा विषय आहे. तो एका लेखाचा विषय नक्कीच नाही. आपल्या मंत्रशास्त्रातील बीजमंत्र ही कल्पना महत्त्वाची असून, बीज मंत्रांच्या प्रभावाची आम्हाला खात्री पटली आहे.

भावनिक बद्धकोष्ठतेला मंत्रशास्त्रात काही उपाय सापडतो का याचा शोध घेताना आम्हाला असे लक्षात आले की ॐ **** फट्‍ स्वाहा।  हा मंत्र भावनिक बद्धकोष्ठतेवर अत्यंत प्रभावी असून यातील "फट्‍" ही बीजाक्षरे "फाट्यावर मारणे" या क्रियेचे गूढ प्रतीक आहेत, असे आम्हाला संशोधनांती लक्षात आले आहे. "मी अमक्याला/अमकीला फाट्यावर मारतो" अशा अर्थाचा हा प्रभावशाली मंत्र असून त्याचा विनियोग करताना यज्ञात आहूती दिली जात असे. अनेक भारतीय शास्त्रे यवनी व्यापार्‍यांबरोबर बाहेर गेली आणि युरोपियन देशात विकास पावली. मंत्रशास्त्राच्या विकासाला हे हितकारकच ठरले. "ॐ **** फट्‍ स्वाहा" हा मंत्र अधिक परिणामकारक स्वरूपात पुढे उपयोगात आला. "फक् यु" या पाश्चात्य मलनिस्सारक मंत्रात पण "फ" हे बीजाक्षर वापरले गेले आहे, हे चाणाक्ष लोकांच्या लक्षात येईलच.

मंत्राच्या परिणामकतेसाठी करण्यासाठी मंत्राची भाषा शुद्ध असणे अतिशय महत्त्वाचे आहे. "ॐ **** फट्‍ स्वाहा" या मंत्राचा जप करताना ज्याला/जिला फाट्यावर मारायचे त्याची/तिची चतुर्थी हे मंत्राच्य़ा विनियोगकर्त्याने लक्षात ठेवणे जरूरीचे आहे (यासाठी शब्दरुपावलीची प्रत विकत घेऊन संग्रही ठेवणे इष्ट ठरेल).

कोणतेही बीजमंत्र अनुष्ठानाने सिद्ध केले जातात. "ॐ **** फट्‍ स्वाहा" या मंत्राच्या सिध्दतेसाठी करायच्या अनुष्ठानाबद्दल लवकरच आम्ही स्वतंत्रपणे लिहू...

(वि०सू० - योग्य श्रेयाशिवाय सदर टिपण पुढे ढकलू नये.)

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

ध्यास आणि हव्यास


मागे एक प्लासिबॉलॉजिस्ट मी त्यांचे रुग्णत्व स्वीकारावे यासाठी माझ्या हात धुवून मागे लागले होते. तेव्हा मी त्यांना त्यांची हस्तमैथुनावरची मते विचारली तेव्हा त्यांची भंबेरी उडाली होती (कारण त्यांच्या ’पथी’ची पाठ्यपुस्तके हस्तमैथुनाच्या दूष्परिणामांनी भरलेली आहेत). मग मी त्यांना लांब ठेवले आणि तो शहाणपणा ठरला.
आत्ताच त्यांचे "ध्यास आणि हव्यास" विषयावरचे चिंतन वाचले. "ध्यास आणि हव्यास" यात फरक करता येणे फार महत्त्वाचे आहे, असा सूर त्यांनी आळवला आहे.
माझ्या मते "ध्यास आणि हव्यास" हा फरक फक्त अंतिम परिणामांनी निश्चित्त होतो. वास्तविक, जे यशस्वी होतात त्यांचा ध्यास असतो आणि अपयशी ठरतात त्यांचा हव्यास असतो. हे अर्थातच समाज (किंवा व्यक्ती) त्या त्या वेळच्या मूल्यानुसार ठरवतो.
या प्लासिबॉलॉजिस्टांनी विवेकवर्धनाचे पण दूकान थाटले आहे. पण हा फरक त्यांच्या लक्षात आला आहे की नाही याचे कोडे पडले आहे...

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

संपादक म० टा० स० न० वि० वि०

संपादक
म० टा०

स० न० वि० वि०

कालच्या म० टा० च्या मैफल पुरवणीमध्ये श्री० तन्मय कानिटकर यांचा लैंगिक अनुरुपतेचा प्रश्न उपस्थित करणारा लेख वाचला. काळजीपूर्वक लेख वाचल्यावर  एखादा प्रश्न समाजाला सोडवता आला नाही तर तो प्रश्न येन केन प्रकारेण गैरलागु ठरविण्यात हूशारी खर्च करायची अशातला हा प्रकार आहे असे वाटते.

मुळात लैंगिक-स्वास्थ्याची गरज माणसाला आहे की नाही या गैरसोईच्या प्रश्नाला श्री. कानिटकर हात घालत नाहीत. याची कारणे दोन असू शकतात - एकतर ते स्वत: अनभिज्ञ आहेत (ही शक्यता त्यांचे फेस्बुक प्रोफाईल तपासल्यावर कमी वाटते) किंवा जो समाज डॊळ्यासमोर ठेऊन त्यांनी हा लेख लिहीला आहे त्या मराठी समाजाची हा विषय पचवायची क्षमता नाही ( दूसरी शक्यता जास्त कारण आपण ते वेळोवेळी सिद्ध केले आहे. र. धो. कर्व्यांना दगड मारायची थोर परंपरा अशी ना तशी जपली आहे.). 

पृथ्वीच्या पाठीवर असंख्य मानवसमूह लग्नसंस्था स्वीकारून नांदत आहेत. लग्नसंस्था स्वीकारण्याची दोन कारणे श्री. कानिटकर आपल्या लेखात देतात. पण लग्नसंस्था रूजण्याचे आणखी एक कारण मानववंशशास्त्रज्ञ देतात ते म्हणजे माणसाच्या अपत्यांना असणारी दीर्घकाळ संगोपनाची गरज भागविण्यासाठी असलेली स्थिर कुटुंबाची गरज. स्थिर कुटुंबासाठी सशक्त लग्न-बंधन आवश्यक आहे. सशक्त लग्न-बंधनासाठी   लैंगिक-स्वास्थ्य आवश्यक आहे, याकडे श्री. कानिटकर यांचे दूर्लक्ष झाले याचे सखेद आश्चर्य वाटले.

सशक्त लग्न-बंधनासाठी लैंगिक-स्वास्थ्य आवश्यक आहे हे नाकारणे म्हणजे आपणच आपली फसवणूक करण्यासारखे आहे, असे मला वाटते. लैंगिक-स्वास्थ नाकारताना समाज अनेक घोडचूका करत असतो - त्यातली महत्त्वाची घोडचूक म्हणजे जे लैंगिक वर्तन साधारण (नॉर्मल) आहे त्याला विकृत ठरवणे.   हे लैंगिकस्वास्थ्य सध्याच्या काळात कसे मिळवायचे या प्रश्नाचे उत्तर मिळविण्यासाठी समाजाला प्रवृत्त केले असते तर कानिटकरांच्या लेखाची उंची वाढली असती. असो.

कळावे आपला
राजीव उपाध्ये