शनिवार, २७ डिसेंबर, २००८

एका चर्चासत्राच्या निमित्ताने...

परवाच पुण्यातल्या एका नामवन्त वधूवर-सूचक मंडळाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. चर्चासत्रासाठी एक ज्योतिषी व एक डॉक्टरीण बाई आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

या चर्चेत आयोजकांनी विवाह जुळवणे ही सामाजिक समस्या कशी बनते ही बाजू मांडली. विवाहाच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान डॉक्टरीणबाईनी केले. याशिवाय लग्न जुळण्यात पत्रिकेचे असलेले अनन्यसाधारण साधारण स्थान लक्षात घेता, त्याविषयीचे संभ्रम दूर करण्याचे काम ज्योतिषीमहोदयांनी केले.

एकंदर चर्चा अतिशय उद्बोधक झाली. पण जाताजाता वक्त्यांनी मांडलेले काही मुद्दे काही प्रश्न उपस्थित करून गेले. उदा. विवाह हा दोन व्यक्तींपुरता मर्यादीत नसतो, तर तो दोन कुटुम्बाना जोडतो, असे मत चर्चेच्या आयोजकांनी मांडले. पण प्रत्यक्षात कायदा मात्र दोन व्यक्तीनी प्रजोत्पादन करण्यासाठी एकत्र येऊन राहणे एवढाच अर्थ मानतो. दोन कुटुम्बांच्या एकत्र येण्याचा कायद्यात कुठेही विचार केलेला दिसत नाही.

कुटुंबात येणार्‍या मुलीला आर्थिक व्यवहारांची माहिती दिली जात नाही असा पण मुद्दा मांडण्यात आला. त्याचा परिणाम मुलगी सासरी एकरूप होण्यावर होतो, असेही सांगितले गेले. पण एका भयाण वास्तवाकडे यावेळी वक्त्यांकडून दूर्लक्ष झाले. ते असे की, ४९८-अ सारख्या एकतर्फी कायद्यांचा दुरूपयोग करणार्‍या मुलीना आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली तर आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असते.

दूसरी एक गोष्ट आयोजकांनी मांडली, ती म्हणजे समानतावादी आधुनिक स्त्रीची दुटप्पी भूमिका. ही स्त्री संसारात नव‍र्‍याने बरोबरीने कष्ट करावेत अशी अपेक्षा ठेवताना उत्पन्नाच्या अथवा खर्चाच्या वाटणीची वेळ आली की सोयिस्करपणे घूमजाव करते. खर्चाच्या बाबतीत "नवर्‍याचे उत्पन्न हे आपलं सर्वांचं आणि माझं उत्पन्न हे फक्त माझा पॉकेटमनी" असा समानतावादी आधुनिक स्त्रीचा सूर असतो. हे निरीक्षण सार्वजनिक व्यासपीठावरून आणि तेही एका स्त्रीने मांडले याचेच मला मोठ्ठे कौतुक वाटले.

विवाहाच्या आरोग्यविषयक बाजूवर प्रकाश टाकण्यासाठी ज्या डॉक्टरीणबाई आल्या त्यांनी मात्र "समुपदेशनास दोघेही आले तर ही समस्या सुटू शकते" असे गुळमुळीत उत्तर बर्‍याच प्रश्नांना दिले. HIV testची आवश्यकता प्रतिपादन करताना ती नेमकी कितीवेळा करावी याचा खुलासा त्यांनी केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे ही टेस्ट तीन महिन्यांच्या अंतराने दोनदा करणे आवश्यक असते. कामजीवनाविषयीच्या गैरसमजुतीना डॉक्टरीणबाईनी अजिबात हात लावला नाही.

या चर्चासत्रातील तिसरे वक्ते एक नामवंत ज्योतिषी आहेत. बरीच स्थळे ज्योतिषाच्या अर्धवट ज्ञानाने नाकारली जातात, असा महत्त्वाचा मुद्दा ज्योतिषी महाशयांनी मांडला. समाजात अनेक निरर्थक आणि निराधार समजुती कशा तग धरून आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. सप्तमस्थानातील मंगळ सोडून बाकी सर्व स्थानातील मंगळ फारसे त्रासदायक नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

या अनुषंगाने मला पत्रिका मांडायची पद्धत आणि त्यातून होणारी दिशाभूल याविषयी लिहायचे आहे. आपल्याकडे पत्रिका मांडण्याचे उत्तर आणि दक्षिण भारतीय असे दोन प्रकार आहेत. यात एका आयतामध्ये बारा भाग करून त्यात ग्रह (आणि त्यांच्या राशी) मांडले जातात.

समजा, १ अंश मेष आणि २९ अंश मेष या ठिकाणी अनुक्रमे मंगळ व चंद्र असल्यास कुंडलीत ते एकाच स्थानात मांडले जातात त्यामुळे पत्रिकेत मंगळ-चंद्र युति आहे असे कित्येक अर्धवट ज्ञानी लोक मानतात आणि पत्रिका टाकून देतात. याच्याच उलट रवि-गुरु, चंद्र-गुरु यांच्यात नसलेल्या नवपंचमादि शुभ योगांचा भास केवळ पत्रिका लिहीण्याच्या पद्धतीमुळे होतो व पत्रिका दूर्मिळ योगाची म्हणून खपवली जाते.

वास्तविक योग्य ते दीप्तांश विचारात घेउन रवि,चंद्र इत्यादि ग्रहांचे मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अष्टामांश मालिकेतील योग होत असतील तर ते विवाह आणि व्यावसायिक भागिदारीत अडचणी दाखवतात. तसेच जोडीदाराच्या पत्रिकेतील मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून व प्लुटॊ हे ग्रह जातकाच्या रविचंद्रांशी अष्टामांश मालिकेतील योग करत असतील तर ते वैवाहिक अथवा व्यावसायिक नात्यात अडचणी निर्माण करतात.

ज्योतिषी महोदयांनी चर्चेत आणखी एक मुद्दा मांडला तो असा की ३६ गुण जुळण्याचा अट्टाहास पालकांनी करू नये. ३६ गुण जुळले की मुलाची आणि मुलीची रास एक यायची शक्यता असते. असे झाल्यास दोघांचीही साडेसाती एकदमच येते...

बर्‍याच वेळा असे दिसते की काही वेळा कौटुंबिक कलह दीर्घकाळ चालू राहतो. अशावेळेस कुटुंबातील सर्वांच्या पत्रिका एकत्र पाहिल्या तर असे दिसून येते की अशा कुटुम्बातील सदस्यांचे रविचंद्रादि ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ (युति नव्हे) असून ते मंदगती ग्रहांच्या भ्रमणांच्या तडाख्यात एका मागे एक असे सापडतात. साहजिकच ही परिस्थिती १+१ = ३ अशा स्वरूपाची असते.

तात्पर्य, आदर्श पत्रिकेच्या शोधात न राहता व्यावहारिक दृष्टीकोन स्वीकारून पत्रिकेचा उपयोग करून घेणे शहाणपणाचे ठरते.






गुरुवार, ११ डिसेंबर, २००८

गोत्र

परवाच एका साखरपुड्याच्या समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा लांब बसून
त्रयस्थपणे गुरुजी करवून घेत असलेले विधी पहात व ऐकत होतो. मी अमुक गोत्राचा
तमुक कुलोत्पन्न असा-असा संकल्प सोडतो या अर्थाची संस्कृत वाक्ये गुरुजी
उच्चारत होते. संपूर्ण विधीमध्ये या घोषणे पलिकडे गोत्राला काही स्थान नव्हते.
मग गोत्राशिवाय संकल्प करता येत नाही असे मानयचे का? तसं असेल तर ते कोणत्याही
विवेकी बुद्धीला पटणारे नाही. पण गोत्रामुळे या उपवर मुलाच्या लग्नात आलेल्या
अडचणी मी डोळ्यादेखत पाहिल्या होत्या. हजारो वर्षांपूर्वी आमच्या काही रानटी
ऋषिपूर्वजांचे (इतिहासाचार्य राजवड्यांचा शब्द्प्रयोग) आपापसात पटले नाही
म्हणून त्यांनी रोटी-बेटी व्यवहार टाळले. आणि म्हणूनच काही गोत्रे जुळत नाहीत
अशा समजुती प्रचारात आल्या. आजही खेड्यापाड्यात ज्या घराण्यांत वंशपरंपरागत
भांडणे असतात तिथे, तसेच काही वैमनस्य असणार्‍या काही पंथांमध्ये (उदा. शैव व
वैष्णव) रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत.

पण अजूनही वधूवरसूचक मंडळे वधूवरांच्या माहितीची रजिस्टरं तयार करताना
गोत्राच्या अनावश्यक माहितीची मागणी करतात. गोत्र आणि वंशशुद्धीच्या वेडगळ
कल्पना लोक अजूनही घट्ट्पणे उराशी बाळगतात तेव्हा गोत्र संकल्पनेतील पोकळपणा
सर्वांसमोर आणल्याशिवाय राहवत नाही.
गोत्र संकल्पनेतील काही मला उमगलेल्या त्रुटी अशा आहेत -
० गोत्रे कशी निर्माण झाली याचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. वेदांच्या
वेगवेगळ्या शाखांचे अध्ययन करणा‍रे ‍ गोत्रांचे जनक मानले जातात. पण
सूक्ते रचणार्‍या अनेक ऋषींना गोत्रे नाहीत. ते गोत्रांचे जनकही मानले जात
नाहीत.
० गोत्राना कायदेशीर मान्यता पण नाही. विवाह कायदेशीर ठरण्यास गोत्र अनिवार्य
नाही. फारच काय सगोत्र विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.
० ब्राह्मणांची अनेक गोत्रे त्यांच्या उपशाखांमध्ये समान आहेत. उदा. अत्रि,
कश्यप, गार्ग्य, वत्स इत्यादि. आता जी गोत्रे समान आहेत त्यांचे वंशज एकाच
पिंडसूत्राचे (bloodlineचे) सदस्य मानले तर अत्रि (कर्‍हाडे) किंवा अत्रि
(चित्पावन) यांच्यात भेद कसा मानायचा? दूसर्‍या शब्दात असेही विचारता येईल की
हे अत्रि, कश्यप, गर्ग , वत्स वेगवेगळे ऋषि की एकच?
० याशिवाय बर्‍याच जणांची झोप उडेल अशा दोन मुद्दयांचा विचार मला करायचा आहे.
राजवाड्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकातले १लेच वाक्य वाचा.
राजवाडे म्हणतात, "मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातन कालापासून
पाणिनीच्या कालापर्यंत भारतीयांत होती.
अशा अतिथीसेवेतून जर संतती निर्माण झाली असेल
तर तिचे गोत्र कोणते? भारतामध्ये नियोगाची प्रथा अनेक वर्षे प्रचलित होती. नियोगात जेव्हा पतिकडून शक्य नसेल तेव्हा स्त्रीला हव्या त्या पुरूषाकडून संतती प्राप्त करून घेता येत असे. परवापरवा पर्यंत म्हणजे स्पर्मबॅंका, टेस्टट्युब बेबीचे तंत्रज्ञान अस्तित्वात येइपर्यत एखाद्या आध्यात्मिक गुरूच्या 'प्रसादाने' संतती प्राप्त झाल्याची उदाहरणे अधूनमधून ऐकू येत असत. ज्यांनी शबाना आझमी आणि श्रीराम लागू
यांचा Immaculate Conception हा चित्रपट बघितला आहे, त्यांना आध्यात्मिक गुरू कसा प्रसाद देत ते सहज लक्षात येईल. अशा प्रसादोद्भव संततीचे गोत्र कोणते? सध्याच्या काळात ज्यांना अपत्य नाही ते अनाथालयातून बालकाला दत्तक घेतात. अशा दत्तक बालकाचे गोत्र कोणते?

तात्पर्य, ज्या गोत्रांना आपण अजून घट्ट्पणे कवटाळले आहे ती संकल्पना किती
पोखरली गेली आहे हे आपल्या लक्षात येईल. असो...

मंगळवार, ९ डिसेंबर, २००८

सन २००९ मधल्या अमावस्यांचे शुभाशुभत्व

सन २००९ मध्ये खालील तारखाना अमावस्या होत असून त्यांच्या शुभाशुभत्वासंबंधी
मार्गदर्शन केले आहे. जिज्ञासूंनी त्यांचे आपल्या पत्रिकेसंदर्भातील महत्त्व
ठरविण्यासाठी ग्रहांचे सायन अंश पहावेत.

टीप - "प्रभावित व्यक्ती"ची व्याख्या - गोचर ग्रह पत्रिकेतील ग्रहांशी युति,
प्रतियुति, केंद्र, अर्धकेंद्र, नवपंचम, आदि योग करीत असतील तर त्या व्यक्ती
"प्रभावित" मानल्या जाव्यात.

२६ ०१ २००९ (ग्रहण) ६-३२ कुंभ
गुरुच्या युतीत असल्या मुळे बर्‍याच प्रमाणात शुभ, पण शनि-हर्षल प्रतियुतीत
सापडलेल्या व्यक्तींना अशुभ

२५ ०२ २००९ ६-३२ मीन
शनि-नेपचूनचा मध्यबिंदू अमावस्येशी केंद्रयोग करतो. त्यामुळे ५ ते ८ अंश
मीन-कन्या-मिथुन-धनु
मध्ये ज्यांचे ग्रह असतील त्यांना अशुभ


२६ ०३ २००९ ६-१० मेष
अमावस्येचा प्लुटोशी केंद्रयोग. गोचर शनि-हर्षल प्रतियुतीमध्ये मंगळ हर्षलशी
युति करण्यास जात आहे म्हणून अतिशय अशुभ

२५ ०४ २००९ ५-०१ वृषभ
प्लुटोशी नवपंचम योग. सायन मकर-वृषभ-कन्या राशी मध्ये ४ ते ६ अंशामध्ये ज्यांचे
ग्रह असतील त्यांना काही प्रमाणात शुभ. अशा व्यक्तींच्या आयुष्याला निर्णायक
वळण देणारी.

२४ ०५ २००९ ३-३१ मिथुन
संमिश्र फलदायी.

२३ जून २००९ १-२९ कर्क
गुरू-नेपचून युतीशी नवपंचम योगामुळे काही जणांना शुभ. प्लुटोशी प्रतियुतीमुळे
० ते २ अंश मकर-मेष-कर्क-तूळ मध्ये ज्यांचे ग्रह असतील त्यांना अशुभ

२४ जुलै २००९ २९-२२ कर्क
हर्षलशी नवपंचम योगामुळे प्रभावित व्यक्तींच्या आयुष्यात अनपेक्षित कलाटणी
देणार्‍या घटना.

२० ऑगस्ट २००९ २७-३३ सिंह
मंगळ-प्लुटो-शनि-हर्षल यांच्या अशुभ योगांची छाया असल्यामुळे बर्‍याच प्रमाणात
अशुभ.

१९ सप्टेंबर २००९ २५-५८ कन्या
अमावस्या शनीच्या युतीमध्ये आहे. शनि-प्लुटो केंद्र आणि शनि-हर्षल प्रतियुती
चालूच असल्यामुळे मोठ्ठ्या प्रमाणात अशुभ.

१८ ऑक्टोबर २००९ २४-५५ तूळ
गुरु, प्लुटो, नेपचूनशी शुभ योगांमुळे प्रभावित व्यक्तींना मोठ्ठ्या प्रमाणात
शुभ

१७ नोव्हेंबर २००९ २४-३३ वृश्चिक
संमिश्र फलदायी.

१६ डिसेंबर २००९ २४-४३ धनू
हर्षल बरोबर केन्द्र योगामूळे प्रभावित व्यक्तीना अशुभ.

शनिवार, ६ डिसेंबर, २००८

आपले नवे मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून श्री. अशोक चव्हाण यांची
निवड/नेमणूक झाली आहे. त्यांची जन्मतारीख २८ १० १९५८ अशी वृत्तपत्रात छापून आली
आहे. नुसती जन्मतारीख जेव्हा ठाऊक असते तेव्हा देखिल जातकाच्या भवितव्याबद्दल
बरेच मार्गदर्शन पत्रिकेतून मिळू शकते.

पत्रिकेला uniqueness देणारे चंद्र, लग्न आणि दशमभाव आरंभबिंदू हे अशा वेळी
विचारात घेता येत नाहीत.

चव्हाण यांच्या पत्रिकेत रविगुरू अंशात्मक युति असून रवि प्लुटोशी लाभयोग करतो.
हे एवढे योग चव्हाण यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचविण्यात कामी आले.
रवि-प्लुटो चे लाभ आणि नवपंचम योग असलेल्या व्यक्ती केवळ स्वत:चाच नाही तर
कुटुम्बाचा, त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींचा देखिल उत्कर्ष करताना
दिसतात. यात आणखी एक योगायोगाचा भाग म्हणजे चव्हाण यांच्या पत्रिकेत मंगळ आणि
प्लुटोचा केंद्रयोग जो हिंसाचार दाखवतो त्याच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री
चव्हाण यांनी सत्ताश्री संपादन केली आहे. त्यामुळे हिंसाचार आणि क्रौर्य यांची
गाढ छाया नव्या मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीवर पडेल असे वाटते.

याशिवाय रवि-नेपचूनची युति श्री चव्हाण यांच्या पत्रिकेत असून ती त्यांना हतबल
बनवेल. २०१२-१३ सालचे शनीचे या युतीवरील भ्रमण त्यांच्या राजकीय घोडदौडीला खो
घालायची शक्यता आहे. सहकार्‍यांपैकी ज्यांचे ग्रह श्री चव्हाण यांच्या
पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि दशमभाव आरंभबिंदू यांच्याशी युति, प्रतियुती,
केंद्र, अर्धकेन्द्र इ. योग करतात त्यांच्या कडून श्री चव्हाण यांच्या पदास
धोका आहे हे नक्की.

२६ जानेवारीचे सूर्यग्रहण श्री चव्हाण यांच्या रवि-नेपचून युतीला कार्यरत करते.
सूर्यग्रहणाचे परिणाम दीर्घकालीन असतात. तेव्हा श्री चव्हाण यांच्या कडून फार
अपेक्षा ठेवाव्यात असे मला वाटत नाही...