रविवार, १९ जानेवारी, २०१४

विवाह कायदा आणि विधी



मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...

स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते. त्यामुळे विवाह विधींच्या तपशीलात डॊकावले तर समाजाची गरज ठळकपणे दिसते.

पण मी माझ्या मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे आजची स्त्री मुक्त आहे किंवा मुक्त होऊ पहात आहे. पूर्वी डझन-अर्धा डझन मुलं होणे हे ’नॉर्मल’ असताना ’स्त्री परक्याचे धन’ ही कल्पना समाज स्वीकारू शकत होता. आज हे शक्य आहे का? मला वाटते नाही...

एकेकटी मुले असणारी कुटुंबे हे आज सर्वत्र दिसणारे चित्र आहे. अशा वेळेस जर एकुलती एक मुलगी असेल, त्यात ती शिकलेली आणि कमावती असेल तर ती मुक्त किंवा मुक्त होऊ पहाणारी स्त्री  "परक्याचे धन" मानायला  कितीजणी (किंवा त्यांचे आईबाप) तयार होतील?
अशा परिस्थितीमध्ये ’माहेरचे पाश’ स्त्रीने तोडायची अपेक्षा ठेवणे हे पण अव्यवहार्यच ठरते. असो...

आता आपण ’नाते’ ही संकल्पना तपासुन पाहु. सुरुवातीला नात्याची व्याख्या करणे योग्य ठरेल - दोन व्यक्तीमधला व्यवहार (अथवा संबंध) त्या कोणत्याही एका किंवा दोन्ही व्यक्तींची  तात्कालिक अथवा दीर्घकालीन कोणतीही गरज भागवत असेल तर त्या दोन व्यक्तीमध्ये तात्कालिक अथवा दीर्घकालीन नाते असते. यातील काही नात्याना मित्र, मालक-नोकर, आईबाप, नवरा-बायको अशी नावे मिळालेली आहेत तर कदाचित काही नात्याना अशी नावे नसतील.

दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते.

या सर्व पार्श्वभूमीवर नवरा-बायकोचे नाते दीर्घकाळ टिकावे किंवा त्या नात्यात प्रवेश करताना जबाबदारीची जाणीव परस्पराना अधिक थेटपणे व्हावी याठी सुस्पष्ट "शपथ" घेतली जावी असे मला वाटते.

मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते."अशी शपथ घेणे जास्त योग्य ठरेल.

मला असं वाटतं अशा प्रकारच्या शपथेने "लग्न" समाजात जास्त गांभीर्याने  घेतले जाईल. कृपया हे अभिप्रेत असतच असा प्रतिवाद करु नये. देशाच्या घटनेवर विश्वास आहे हे गृहित धरणं आणि तसे ऍसर्ट करणे यात बराच गुणात्मक फरक आहे.

रविवार, ५ जानेवारी, २०१४

शेपूट

एकदा करटक आणि दमनक नावाचे दोन कोल्हे एका वृक्षाच्या स्निग्ध छायेत निवांतपणे काव्यशास्त्रविनोद करत बसले होते. करटकाने दमनकाला विचारले, "दमनका, कानावर आलं आहे की पलिकडच्या जंगलातला एक कोल्ह्यांचा कळप आता फुटला आहे आणि आता त्यातले आपले बांधव स्वतंत्रपणे शिकार करून आपला जीवनक्रम व्यतीत करत आहेत. कळपाला सोडायची अशी दूर्बुद्धी त्यांना का बरे झाली असावी?"

दमनक म्हणाला, "समूहात राहण्याचे फायदे  तोपर्यंतच असतात जोपर्यंत कळप त्या सदस्याची कसली ना कसली गरज भागवतो. ही गरज भागेनाशी झाली किंवा कळप जर सदस्याच्या अस्मितेला खुडायचे काम करत असेल तर कळप फुटतो."

करटकाने विचारले, "हे कसे?"

दमनक म्हणाला, "ऐक तर! एक घनदाट जंगल होतं...त्यात अनेक हिंस्र श्वापदे वास्तव्य करुन होती. त्यात पीतपुच्छ नावाचा एक देखणा कोल्हा आपल्या जातभाईंबरोबर शिकार करुन जीवन व्यतीत करत होता.

पीतपुच्छाची कोल्हेकुई ऐकुन अनेक कोल्हीणी घायाळ होतच, पण त्याची रुबाबदार, झुबकेदार शेपूट पण अनेक कोल्ह्यांच्या वैषम्याचा विषय ठरली होती. पीतपुच्छ कधी कळपाबरोबर शिकारीला जाई, तर कधी आपली रुबाबदार शेपटी उंचावुन हुंदडत बसे.

एके दिवशी कळपाबरोबर शिकारीला गेला असताना पीतपुच्छ कोल्ह्याच्या कळपावर गिधाडांनी हल्ला चढवला. जिवाच्या आकांताने पीतपुच्छाने धुम ठोकली. पळतापळता कळपापासुन तो वेगळा झाला आणि काटेकुटे, डोंगरदर्‍यांची पर्वा न करता तो पळत राहिला. एकटा पडलेल्या पीतपुच्छाला सोडतील तर ती गिधाडे कसली? त्या गिधाडांनी पण आकाशातुन त्याचा पाठलाग करायचा आणि जमेल तेव्हा झडप घालायचा प्रयत्न चालु ठेवला. त्या झटापटीत एक गिधाडाने पीतपुच्छाची शेपटी पकडली आणि करकचुन चावली. त्या चाव्याने खरं तर शेपटीचा तुकडाच पडायचा पण सुदैवाने मध्येच आलेल्या दगडाच्या कपारीमध्ये पीतपुच्छ शिरला आणि प्रतिहल्ला करुन गिधाडाना परतवुन लावले.

या झटापटित पीतपुच्छाची रुबाबदार शेपूट रक्तबंबाळ झाली. खरं तर ती तुटायचीच... पण दैव बलवत्तर होते म्हणुन वाचली.

त्याच दगडाच्या कपारीत कशीबशी रक्तस्राव थांबेपर्यंत त्याने वाट बघितली. नंतर मग ठणकणारी शेपूट घेऊन त्याने ३-४ दिवस आपला कळप शोधण्यात घालवली. शेवटी एकदाचा त्याला आपला कळप सापडला. पीतपुच्छाला पाहताच सर्व कोल्हीणी आनंदित झाल्या. पण हा आनंद फार टिकणार नव्हता. दुखर्‍या शेपटीच्या वेदनेने पीतपुच्छाचे गायन बंद पडले, तसेच कळपाबरोबर शिकार करणे पण पीतपुच्छाला कठीण झाले. पीतपुच्छ शिकारीला येईना तेव्हा बाकीच्या कोल्ह्याना त्याचा राग आला. एका वृद्ध आणि जाणत्या कोल्ह्याने त्याला सुचविले की, "ही शेपूट तू तोडुन का टाकत नाहीस?"

"आपल्या कळपात किती तरी जणांची शेपूट तुटली आहे. आणि ते सुखाने आयुष्य जगत आहेत".
एक-दोन शेपूट तुटलेल्या कोल्हयानी माना डोलवुन दुजोरा दिला.

त्यावर दुसरा एक अनुभवी कोल्हा म्हणाला, "केवळ वेदना आहे म्हणुन शेपटी तोडुन टाकणे हे शहाणपणाचे नक्कीच नाही. आज ना उद्या वेदना थांबु शकते. एकदा शेपटी तुटली की टिंगलटवाळी करायला सर्वाना निमित्त मिळते. तेव्हा शेपूट तोडुन टाकू नये असे मला वाटते. पीतपुच्छाची जखम बरी होईपर्यंत आपण त्याला सवलत द्यायलाच हवी कारण आजवर त्याने आपल्याला शिकारीत केलेली मदत विसरून चालणार नाही."

यावर कळपात मग बरेच चर्वितचर्वण झाले. शेपूट तुटलेल्या कोल्ह्यानी शेपूट नसण्याचे फायदे उच्चरवाने सांगितले. तेव्हा शेपूट असलेले आणि नसलेले कोल्हे-कोल्हीणी एकमेकांना फिदीफिदी हसलेच..

पीतपुच्छाला केवळ दुखते म्हणुन शेपूट तोडुन टाकणे पसंत नव्हते. "कळपावर माझी जबाबदारी अशी किती आहे की मी त्यांच्या मर्जी प्रमाणे माझे आयुष्य जगावे", असा विचार त्याने केला. आज ना उद्या दुखणे थांबेल मग आपण पूर्ववत शिकार करू शकु अशी त्याला आशा होती. त्याने शिकारीत आपला भार नको म्हणुन  कळपाला रामराम ठोकला. पुढे त्याची शेपूट बर्‍यापैकी बरी झाली आणि त्याने पूर्ववत् जीवनक्रम आरंभिला."

येथवर गोष्ट सांगुन दमनक म्हणाला, " म्हणुनच कळपाने आपण सदस्याची गरज किती भागवतो याची वेळोवेळी तपासणी करावी आणि मगच शहाणपणा शिकवावा. नाहीतर कळपाची शकले व्हायला वेळ लागत नाही".