शुक्रवार, २७ जुलै, २०१२

"आयमाय"





कालचाच प्रसंग.

माझ्यातल्या माकडाने उत्क्रांतीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले.

सकाळी ११ च्या सुमारास बॅंकेत जाण्याच्या उद्देशाने मी घराबाहेर पडलो तेव्हा आमच्या घराच्या गेट समोर एका मंद्बुद्धी चालकाने भली मोठी बोलेरो वाट अडवून उभी केली होती. गाडीने पूर्ण रस्ता अडवला होता. ड्रायव्हर आसपास कुठेही दिसत नव्हता. मला माझी गाडी बाहेर काढायची असती तर कपाळाला हात मारून घेण्याशिवाय दूसरा कोणताही पर्याय नव्हता.

डोक्यात संतापाची तिडीक गेली. मी गाडीचे चाक पंक्चर करायचे ठरवले. प्रथम घरात जाऊन कॅमेरा आणला आणि गाडीचा एक फोटो काढला. पुरावा म्हणून. नंतर पंक्चर करायला हत्याराची शोधाशोध केली तेव्हा एक हॅण्ड्ड्रील हाताला लागले.

ते घेऊन मी चाकाला भोक पाडायला योग्य जागा शोधायला लागलो आणि नेमका ड्रायव्हर टपकला. मी चाकाला ड्रील लावले न लावले तोच तो भानावर य़ेऊन मला म्हणाला,

"काय करताय राव हे साहेब?"

"गाढवा, तू काय केलं आहेस ते तुला कळतय का?"

"गाढव, कुणाला म्हणता साहेब?"

यावर मी मात्र मी खवळलो. त्याच्या तोंडासमोर ड्रील  रोखून धरले अन म्हणालो,

"एक अक्षर बोललास तर याच ड्रीलने  तुझे डोळे फोडीन"

माझा त्वेष बघून त्या ड्रायव्हरने आपला मूर्खपणा आवरता घ्यायचे ठरवले असावे. एक अक्षर अधिक न बोलता त्याने गाडी तिथून काढायची कार्यवाही सुरू केली.

त्याने माघार घेतलेली पाहून मी पण तत्क्षणी सुखावलो. आणि आजपर्यंत ४८ वर्षांच्या आयुष्यात जे करायला धजलो नाही ते केले.

शुद्ध मराठीत त्याची "आयमाय" उद्धरली.  ड्रायव्हरने काही प्रतिक्रिया दिली नाही.

माझ्या तोंडातून जे शब्द निघाले त्यांची जाणीव झाल्यावर मीच थरथरायला लागलो होतो.

एव्ह्ढे होई पर्यंत स्वत:ला सावरायचा प्रयत्न सुरु केला आणि बॅंकेच्या दिशेने जायला निघालो. जाताना माझ्यातला बुद्ध जागा झाला आणि मानवी वाणीने माझ्याशी बोलू लागला,

"अरे तू त्याच्या गाडीचा नंबर बघितलास ना? तो रात्रभर प्रवास करुन दमून भागून आला असेल. आणि त्याला संडास-बाथरूमची घाई झाली असेल आणि त्यामुळे पटकन जागा दिसली म्हणून त्याने त्याने गेट समोर लावली असेल. काय चूकलं त्याचं, सांग बरं! या प्रश्नाचं उत्तर ठाऊक असून दिले नाहीस तर तुला कधिच निर्वाण प्राप्त होणार नाही..."

मी या निर्वाणीच्या भाषेने दचकलो...

आता मला गप्प बसणे शक्यच नव्हते. मी म्हटले,

"अरे, आत्ता माझ्या घरात आणीबाणीचा प्रसंग असता आणि रूग्ण्वाहिका बोलवावी लागली असती तर त्या ड्रायव्हरचे मलमूत्र उरकेपर्यंत वाट बघत बसायचे का?"

या माझ्या उत्तराने बुद्ध ओशाळला आणि डोळे मिटून त्याने परत मौन धारण केले...

मंगळवार, १७ जुलै, २०१२

दिनांक २ ऑगस्ट २०१२ रोजीची अत्यंत शुभ पौर्णिमा




दिनांक २ ऑगस्ट २०१२ रोजी सायन कुंभ राशीमध्ये १० अंशावर पौर्णिमा होता असून ती गोचर गुरुशी आणि हर्षलशी अत्यंत शुभ योग करते. त्यामुळे ही पौर्णिमा अनेकांना वेगवेगळ्या पातळ्यावर (म्हणजे मूळ पत्रिकेतील ग्रहयोगानुसार) शुभ/लाभदायी ठरण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे मार्गी लागणे, अचानक मार्ग अथवा दिशा सापडणे, नव्या संधी निर्माण होणे, अविवाहित असल्यास प्रतिपक्षाकडून होकार मिळणे अशा अनेक प्रकारची फळे या पौर्णिमेच्या प्रभावाखाली येणार्‍या व्यक्तीना मिळतील.

वक्री बुधाच्या आणि हर्षल-प्लुटो केंद्र्योगाच्या छायेत होणारी ही पौर्णिमा अनेकाना नवा हूरूप आणेल, हे नक्की.

सायन राशीचक्रातील मेष, मिथुन, सिंह, तूळ, धनु, कुंभ  या राशींमध्ये ६-१२ अंश हे क्षेत्र (म्हणजेच निरयन राशीचक्रातील वृषभ, कर्क, कन्या, वृश्चिक, मकर आणि मीन या  राशींमधील  १२ ते १८ अंश हे क्षेत्र) या पौर्णिमेने प्रभावित केलेले असून, या क्षेत्रांत रवी, चंद्र, लग्न, ख-मध्य असलेल्या व्यक्ती, तसेच याक्षेत्रात लाभ-नवपंचमादि योग होणार्‍या व्यक्ती या पौर्णिमेच्या शुभ प्रभावाखाली येतात.

बराच मोठा जनसमुदाय या शुभ पौर्णिमेच्या प्रभावाखाली येत असल्याने मी जन्मतारखांचे गणित यावेळेस देऊ शकत नाही.

सोमवार, १६ जुलै, २०१२

मुहूर्त - भाग २


राजेश वैद्य माझा आयआयटीमधला मित्र. मी त्याला बराच सीनिअर पण आम्ही हॉस्टेल तीनच्या एकाच विंगमध्ये राहात होतो. गेली अनेक वर्षे तो अमेरीकेत आहे. नुकतेच आम्ही फेसबुकमुळे एकमेकांच्या संपर्कात आलो. त्याने अमेरीकेत नुकतेच घर खरेदी केले आहे. त्याला गृहप्रवेशाच्या पूजेसाठी मुहूर्त काढून हवा होता. अमेरीकेत जी मंडळी भिक्षुकी करतात ती सहसा त्यांना सोयीचे दिवस मुहूर्त म्हणुन ठोकून देतात. हा प्रकार आपल्याकडे पण चालतो. एखाद्या भिक्षुकाला अमुक एक मुहूर्त चांगला का ते विचारा. तुम्हाला समाधानकारक उत्तर मिळाले तर मी पैज हरायला तयार आहे. कारण यजमानाने कोणताही प्रश्न विचारणे पुरोहित वर्गाला सोयीचे नसते.

आपण परंपरेने शुभ मानलेले दसरा, गुढी पाडवा इत्यादि दिवस नेहमीच शुभ असतात असे नाही, असे मला माझे एक आजोबा  (कै) वेदमूर्ती रामचंद्रभट्ट हर्डीकर यांच्याकडून  प्रथम  समजले. मी तेव्हा खूप लहान म्हणजे फक्त आठवीत असल्याने असे कसे हा प्रश्न आमच्या रामूमामांना विचारायचे धाडस झाले नाही. शिवाय त्यावेळेस ज्योतिषाची आवड पण निर्माण झाली नव्हती. पण पुढे ज्योतिषाच्या  अभ्यासात प्रगती झाल्यानंतर रामूमामांच्या म्हणण्यामागची कारणे समजली. मी यापूर्वी माझ्या ब्लॉगवर अशाच एका अशुभ गुढीपाडव्याबद्दल लिहीले आहे.

राजेश वैद्यच्या गृहप्रवेशासाठी मुहूर्त काढायची माझी तयारी होती. पण मी त्याला माझे मुहूर्त भिक्षुकांना तसेच जुन्या मताच्या मंडळीना पटत नसल्याची कल्पना दिली. यजमानाने काढलेला मुहूर्त स्वीकारायची भटजी/पुरोहित मंडळींची तयारी नसते. मागे एकदा माझे गुरुजी विख्यात धृपद गायक पंडित उदय भवाळकर यांना मी गृहप्रवेशासाठी मुहूर्त काढून दिला होता. योगायोगाने ती अमावस्या निघाली. पण ती अमावस्या जोरदार शुभ होती. विशेषत: आमच्या गुरुजींच्या पत्रिकेत अत्यंत शुभ फलदायी होती. पण सामान्य भटजी लोकांना एव्हढे सूक्ष्म ज्योतिष कुठुन कळणार. त्यांनी केवळ अमावस्या म्हणून त्या दिवशी पोरोहित्य करायचे नाकारले.

मुहूर्ताचा विषय निघाला आहे म्हणून मला आणखीन एक गंमत आठवली. काल रविवार होता. माझ्या घराजवळच्या दोन मंगलकार्यांमध्ये लग्नाची धामधूम होती. दोन्ही कार्यालये ऑक्युपाईड म्हणजे लग्नाचा मुहूर्त - ज्यांची लग्ने कालच्या मुहूर्तावर लागली त्यांच्या पत्रिकेत सध्या चालू असलेली मंगळ-हर्षल प्रतियुति नवदांपत्याला कशी आहे याचा विचार मुहूर्त काढताना केला गेला असेल का याबद्द्ल मी साशंकच आहे. मंगळ-हर्षल प्रतियुतीचे राहू दे. ऐन शनि-मंगळ युति शून्य अंशात असताना लोकांनी लग्ने लावली आहेत. माझ्या त्यांना शुभेच्छा!


राजेश वैद्यने मला मुहूर्तासाठी पुरेसा कालावधी दिला होता. त्याला येत्या ऑगस्टमध्ये पहिल्या पंधरवडयातला मुहूर्त हवा होता. दोन आठवड्यांचा कालावधी मुहूर्तासाठी तसा पुरेसा आहे पण काही लोक म्हणतात की "एखादा चांगला रविवार किंवा गुरुवार बघा". अशी अट घातल्यावर मला कपाळाला हात लावण्याशिवाय गत्यंतर नसते. आधुनिक पद्धतीने मुहूर्त काढताना जेव्हढ्या व्यक्ती प्राधान्याने प्रभावित होतात, त्या सर्वांच्या पत्रिका बघणे आवश्यक ठरते. उदा. लग्नाचा मुहूर्त काढायचा असेल तर वधू आणि वरांची दोघांची पत्रिका बघून मग त्या दोघांना शुभ ग्रहयोग असतील तो दिवस वैवाहिक आयुष्यात प्रवेश करण्यासाठी योग्य ठरते. आता माझ्या मित्राच्याबाबतीत त्याच्या पत्नीची पत्रिका गृहप्रवेशाच्या मुहूर्तासाठी कर्ती/जबाबदार व्यक्ती म्हणून आवश्यक ठरते. म्हणून त्या दोघांच्याही जन्मतारखा इ० नोंदी मी मागवून घेतल्या.

क्रमश:...

शुक्रवार, १३ जुलै, २०१२

मुहूर्त -भाग-१



मुहूर्त या कल्पनेला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे.  भारताबाहेर, पाश्चात्य ज्योतिषात Electional Astrology ही ज्योतिषाची एक शाखा मुहूर्त कल्पनेशी नाते सांगते. Electional Astrology मध्ये विशिष्ट कार्य करण्यास योग्य वेळ/दिवस कोणता याचा शोध घेतला जातो. भारतीय ज्योतिषात एखादा दिवस चांगला किंवा वाईट ठरवताना शुभाशुभ नक्षत्र, वेगवेगळ्या ग्रहांचे "बळ" म्हणजे राजदर्शनकाली रवीचे, विवाहास गुरुचे, युद्ध कार्यात मंगळाचे इत्यादि बघितले जायचे/जाते. चंद्रबळ सर्वकार्यासाठी पहावे असे सांगितले होते (मोघेकृत ज्योतिर्मयूख पृ ३९). "बळ" कल्पना प्राचीन पाश्चात्य ज्योतिषात पण सापडते ((तिथे "बळ" काढायच्या पद्धती निराळ्या आहेत) पण आधुनिक ज्योतिषी मात्र या गुंतागुंतीला फाटा देऊन ज्योतिषातीलच मूळकल्पनांवर आधारित पण सुटसुटितपणे मुहूर्त कसे काढतात याचा विचार मला या वेळी करायचा आहे.

मुहूर्ताच्या या प्राचीन कल्पना तपासल्या तर त्यात बराच गोंधळ दिसतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्याला मुहूर्त काढून हवा आहे त्या जातकाच्या मूळपत्रिकेचा फारच उथळ विचार  या जुन्या मुहूर्ताच्या कल्पनांमध्ये दिसतो. उदाहरणार्थ, जन्मराशीपासून चवथा, आठवा आणि बारावा चंद्र सर्व कार्यासाठी वर्ज्य समजावा. जन्मराशीपासून पांचवा चंद्र नवपंचम योग करतो पण तो कार्यनाशक आहे (बोंबला!) पण तो शुक्लपक्षातील असेल तर मात्र शुभ आहे.

एखाद्या दिवशी परस्परविरुद्ध योग आले तर काय करायचे याचे सुटसुटीत दिग्दर्शन मला आजतागायत माझ्या अभ्यासात सापडलेले नाही. याचे उदाहरण म्हणून अमृतसिद्धी योगाचे घेऊ. अमुक वारी अमुक नक्षत्र आले तर  अमृतसिद्धी योग होतो. जसे रविवारी हस्त, सोमवारी मृग, मंगळवारी अश्विनी इत्यादि. पण आता अमृतसिद्धी योग असून चंद्रबळ नसेल तर कार्य करायचे की नाही याचे उत्तर शास्त्रकार देत नाहीत.

थोडक्यात मुद्दा असा की नियमांची सुट्सुटीत उतरंड (heirarchy) उपलब्ध नाही.

सन १९११ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मोघ्यांच्याच ज्योतिर्मयूख या ग्रंथातील उदाहरण घ्यायचे झाले तर पृ  ४० व ४१ वर काही योग सांगितले आहेत. ते वाचून भरपूर करमणूक होते. "गुरुवारी पुष्यनक्षत्राच्या योगाने झालेला अमृतसिद्धि योग विवाहास वर्ज्य करावा. शनिवारी रोहिणी नक्षत्रामुळे होणारा अमृतसिद्धि योग प्रयाणास वर्ज्य करावा आणि मंगळवारी अश्विनीनक्षत्र आल्याने जो अमृतसिद्धि योग होतो तो गृहप्रवेशास वर्ज्य मानावा. कारण हे योग अत्यंत निंद्य मानिलेले आहेत".  म्हणजे आता बघा की, एखाद्या दिवशी चंद्रबल आहे पण निंद्य अमृतसिद्धि असेल तर काय करायचे याचा खुलासा शास्त्रकारांनी केलेला नाही.

भारतीय ज्योतिषातील नियम आणि अपवाद हे मारूतीच्या शेपटाप्रमाणे अंतरहित आहेत. मला तर कधी कधी पुरोहितांचे फाजिल स्तोम वाढविण्याकरता ते निर्माण करण्यात आले असावेत अशीही शंका येते. जेवढी गुंतागुंत जास्त तेव्हढया जातकाच्या भाबडेपणाचा फायदा घेण्याच्या संधी जास्त (ज्याप्रमाणे कायद्यातील गुंतागुंत वकीलांची पोटे भरते त्यातलाच प्रकार)...असो.

या लेखाच्या  पुढच्या भागात आधुनिक मुहूर्त कल्पनेचा परिचय मी सोदाहरण करून देईन.

गुरुवार, ५ जुलै, २०१२

भाकीताचा पडताळा: माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण



दिनांक ६ डिसेंबर २००८ च्या नोंदीमध्ये मी तत्कालीन नवे मुख्यमंत्री श्री अशोक चव्हाण यांच्या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या जन्मतारखेवरून काही भाकीत केले होते. ते असे होते - "रवि-नेपचूनची युति श्री चव्हाण यांच्या पत्रिकेत असून ती त्यांना हतबल बनवेल. २०१२-१३ सालचे शनीचे या युतीवरील भ्रमण त्यांच्या राजकीय घोडदौडीला खो घालायची शक्यता आहे." याशिवाय असेही मी म्हटले होते की "२६ जानेवारीचे सूर्यग्रहण श्री चव्हाण यांच्या रवि-नेपचून युतीला कार्यरत करते. सूर्यग्रहणाचे परिणाम दीर्घकालीन असतात. तेव्हा श्री चव्हाण यांच्या कडून फार
अपेक्षा ठेवाव्यात असे मला वाटत नाही..." (पहा - http://rajeev-upadhye.blogspot.in/2008/12/blog-post.html)

आज वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार सीबीआयने श्री चव्हाण यांच्यावर आरोपपत्र ठेवले आहे.

मी माझे भाकीत फक्त जन्मतारखेवरून वर्तवले होते. श्री चव्हाण यांची जन्मवेळ व जन्मस्थळ मला उपलब्ध न झाल्याने भाकीतात अचूकता आणण्यास मर्यादा निर्माण झाल्या होत्या. तरीपण उपलब्ध माहीतीवरून वर्तवलेले भविष्य खरे ठरले आहे हे कुणीही नाकारू शकणार नाही.

मंगळवार, ३ जुलै, २०१२

राहु-मंगळ युतीच्या तारखा



माझ्या ब्लॉगच्या बर्‍याच वाचकांनी राहु-मंगळ युतिवरील लेख वाचून मला राहु-मंगळ युति आतापर्यंत कधी जाली होती याची विचारणा केली.   त्यांच्या परिचयातल्या कोट्याधीश (गडगंज श्रीमंत)व्यक्तींच्या पत्रिकेत हा योग आहे का याची उत्सुकता त्यांना आहे. म्हणुन मी सन १९३५ ते १९८५ या कालावधीमध्ये राहु-मंगळ युति केव्हा झाली याचे गणित करून ते पुढे देत आहे. खालील तारखांना (+/- ३ दिवस) ज्यांचे जन्म जाले असतील त्यांच्या पत्रिकेत ही युति आढळून येईल. श्री आल्फी लाव्होइ यांच्या संशोधना प्रमाणे या व्यक्ती कोट्यधीश असायची शक्यता खूप आहे. भारतीय ज्योतिषांच्या मताप्रमाणे यांचे वैवाहिक आयुष्य गढूळ असायची शक्यता आहे.

16 Nov   1935
 31 Aug  1937
 6 Jan   1939
 22 Oct 1940
 8 Aug  1942
 21 May 1944
 18 Sep  1945
 4 Jul    1947
 24 Apr 1949
 16 Feb 1951
 10 Dec  1952
 20 Sep  1954
 7 Feb     1956
 24 Nov   1957
 12 Sep  1959
 26 Jun   1961
 22 Oct 1962
 2 Aug  1964
 22 May 1966
 13 Mar 1968
 3 Jan   1970
 9 Jun   1971
 19 Aug  1971
 24 Sep  1971
 5 Mar 1973
 25 Dec  1974
 14 Oct 1976
 1 Aug  1978
 28 Nov   1979
 14 Mar 1980
 20 Apr 1980
 3 Sep  1981
 22 Jun   1983
 10 Apr 1985