गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

=========================


-राजीव उपाध्ये (१४.०२.२०२४)


पर्यावरणातील आह्वानांनुसार मानसिक जडणघडणीत, शरीररचनेत अथवा अवयवात बदल घडून येणे हे जीवसृष्टीमध्ये सर्रास घडून येते. त्याची असंख्य उदा० आजूबाजूला माणसांमध्ये पण बघायला मिळतात. भारतात गुजराती समाजात उद्योग रक्तात भिनलेला आहे असे म्हटले जाते. भारतात पश्चिम किनार्‍यावर सिद्दींचे वंशज धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत [१]. दक्षिण आशियातील बजाऊ ही जमात प्राणवायुशिवाय पाण्यात बुड्या मारून मासेमारी करण्यासाठी प्रसिद्ध आहे [२]. अशी असंख्य उदा० देता येतात.


भारतीय समाजात ब्राह्मण दीर्घकाल समाजाच्या शीर्षस्थानी राहीले, हे आज कुणीही नाकारणार नाही. फार काय, याचमुळे ब्राह्मण इतर समाजबांधवांच्या तिरस्कारास पात्र ठरले. पण ब्राह्मणांचा तिरस्कार हा मला वर्गात अभ्यास करून  १ल्या येणार्‍या मुलांचा तिरस्कार वाटतो. वर्गात अभ्यासात पुढे असणारी मुले त्यांचे स्थान टिकविण्यासाठी भलेबुरे मार्ग अवलंबतातच. ब्राह्मणांनी पण तेच केले. पण इतरांना वाटणार्‍या तिरस्काराचे उदासिनीकरण (न्युट्रलायझेशन) करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळेच आजचे ब्राह्मण मोठ्या सामाजिक नामुष्कीला तोंड देत आहेत.


ब्राह्मणांच्या वर्चस्वाची समाजशास्त्रीय़ मीमांसा भरपूर झाली आहे. त्यात मला पडायचे नाही कारण तो चावून चोथा झालेला विषय आहे, त्यात नवे असे काही हाती लागणे मुष्कील आहे. पण त्या पलिकडे काही कारणे असू शकतात. 


*खरं तर बुद्धी, दीर्घायुष्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही.* पण एखाद्या मानवसमूहात काही गुणांचे प्रमाण लक्षणीय़ वाढलेले दिसत असेल तर ते का? याचे कोडे कोणत्याही चौकस व्यक्तीला सतावत राहते. 


*आपल्याकडे जे नाही ते जर दुसर्‍या कुणाकडे असेल तर वैषम्याची भावना निर्माण होते. उदा० पैसा, ताकद, आरोग्य/स्वास्थ, रुप इ० इ० ब्राह्मणांचा तिरस्कार माझ्यामते मुख्यत: त्यांच्या बुद्धीमुळे होतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये.* ब्राह्मणांना त्यांची बुद्धी निसर्गत: मिळाली की काळाच्या ओघात विकसित झाली? या प्रश्नावर थोडा उजेड टाकायचा हा एक छोटा प्रयत्न...

 

ज्यू, जपानी लोकांत आढळून येणा‌र्‍या दीर्घायुष्याची करणे शोधायचा प्रयत्न बराच झाला आहे. पण माझ्या आतापर्यंतच्या वाचनात/अभ्यासात ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे शोधायचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळले नाही आणि तसा शिस्तबद्ध अभ्यास कुणी करेल असे ही वाटत नाही. कारण अशा  अभ्यासाला निधी उपलब्ध होईल असे वाटत नाही. कारण चुकुनमाकुन अशा संशोधनाने ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब केलेच तर त्यासारखे अप्रिय (पोलिटिकली इन्करेक्ट) सध्याच्या काळात दुसरे काहीही नाही. 


त्यामुळेच मला ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाविषयी जे जीवशास्त्रीय विचार मांडायचे आहेत, त्यांच्याकडे काही  तर्कनिष्ठ अटकळी/अंदाज या कोनातूनच बघितले जावे. त्याची प्रेरणा मला आधुनिक चेता/मस्तिष्क विज्ञान, ध्यानावर झालेले संशोधन[३] यातून मिळाली आहे. *बुद्धी फक्त ब्राह्मणांकडे असते असा ही दावा मला करायचा नाही.* कारण बुद्धीचे अनेक पैलू असतात आणि ते वेगवेगळ्या परिस्थितीनुसार विकसित होतात. त्यामुळे असा कुणी तर्क किंवा आरोप केलाच तर तो मात्र एक निर्बुद्धपणा ठरेल.* महत्वाचे म्हणजे माझ्या मर्यादांचे मला पूर्ण भान आहे.*


भारत, आर्यावर्त, हिंदुस्थान इ० नावाने ओळखल्या गेलेल्या भूप्रदेशात मानवी संस्कृतीला स्थिरावायला बरेच पोषक वातावरण मिळाले. या संस्कृतीमध्ये जो अग्निपूजक समाज होता, त्याने केलेल्या वाङमय निर्मितीचे जतन करण्यासाठी, लेखनकला विकसित न झाल्यामुळे, फक्त मौखिक परंपरेचा पर्याय उपलब्ध होता. मौखिक परंपरेने कोणत्याही माहितीचे जतन करणे किती अवघड आहे, हे समजून घेणे इथे अतिशय आवश्यक आहे. 


रस्त्यावरील कोणत्याही १०० माणसांना त्यांनी शालेय जीवनांत पाठ केलेल्या कविता म्हणून दाखवायला सांगा. १ली ते १०वी या प्रत्येक इयत्तेमधील एक अशा दहा कविता म्हणून दाखविणारी १० माणसे तरी सापडतील का, याची मला शंका आहे. आणि समजा सापडली तर कर्तव्य म्हणून पाठांतर केलेली आणि आवड म्हणून पाठ केलेली माणसे वेगळी आहेत असे लक्षात येईल. कवितेचा अर्थ, चाल, लय आवडली तर पाठांतर सोपे होते. 


आधुनिक चेताविज्ञान असे सांगते की एकाग्रतेने मेंदूच्या उपाग्रखण्डाचा (prefrontal lobe) वेगाने विकास होतो. ज्या संवेदनांवर एकाग्रता जास्त होते त्यासंबंधी मेंदुच्या भागाशी उपाग्रखण्डाच्या जोडण्या वाढतात आणि मेंदूचा विकास होतो. जसे खेळात स्नायविक हालचाली नियंत्रित करणारा गतिबाह्यक आणि उपाग्रखण्डाबरोबर विकसित होतो [४]. संगीतात श्रवणशक्ती आणि काही भाषासदृश कौशल्यांचा विकास होतो. नृत्यकलेत अवकाश, संगीत, लय-ताल यांच्याशी संबंधित जाणीवा आणि स्मृती इ० केंद्रे जोडण्या निर्माण होऊन विकसित होतात[५]. गमतीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की सध्याच्या काळात स्मृतीभ्रंश आणि तत्सम आजारांचा सामना करण्यासाठी जे व्यायाम तयार केले गेले आहेत, त्यात याच कल्पना केंद्रस्थांनी आहेत.


वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले प्रचंड वाङमय जतन करण्यासाठी ब्राह्मणांना मेंदूचा मोठ्या प्रमाणावर वापर अतिशय एकाग्रतेने आणि कर्तव्यबुद्धीने करावा लागला. शतकानुशतके वेदसंहितांचे रक्षण करण्यासाठी जटा/घनपाठादी तंत्रे वापरली गेली. ही तंत्रे समजून घेतली [६] तर असे लक्षात येईल की संहितांमधला एकही शब्द हरवू नये हा या मागचा महत्त्वाचा उद्देश. वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गायत्री मंत्राच्या घनपाठाचे सादरीकरण या दुव्यावर पहाता येईल.  हे सर्व पाठ करताना मेंदूला जो व्यायाम होतो, त्यामुळे ब्राह्मणांमध्ये उपाग्रखण्डाचा वेगाने विकास झाला. वैदिक शिक्षण गुरुगृही आठव्या वर्षी चालू होई. बरेचसे वैदिक शिक्षण प्रजननपूर्व काळात होत असल्याने विकसित मेंदूशी संबंधित काही जनुकीय बद्दल पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांना फायदा झाला. परिणामी ब्राह्मण अधिकाधिक बुद्धिमान होत राहिले.


जेव्हा ब्राह्मणांचे पारंपरिक व्यवसाय मागे पडले तेव्हा या उत्क्रांतीला काही कारणांनी खीळ बसली. पण या जनुकीय बदलांचा फायदा  मात्र पुढल्या  पिढ्यांना बर्‍याच प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पण हा फायदा अनंतकाळपर्यंत ब्राह्मणांना मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण आता जनुकीय विद्राव्यता (genetic dilution) सांस्कृतिक अभिसरणामुळे खुप वाढली आहे. एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावून हे परत साधता येईल का? या प्रश्नाचे उत्तर पण नाही असे द्यावे लागेल. पिढ्या न पिढ्या सतत काही वर्षे काही संहितांची पारायणे करायची आणि एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावायची यात संख्यात्मक आणि गुणात्मक फरक नक्कीच आहे. त्यामुळे ब्राह्मणांचे बलस्थान (*वैदिकपठणाने विकसित पावलेला उपाग्रखण्ड*) काळाच्या ओघात सहज नाहीसा होईल. जनुककोषावर बाहेरून होणारे आघात (ताण, प्रदूषण, कुपोषण) देखिल यांस कारणीभूत ठरणार आहेत, हे विसरता कामा नये.


मी इथे मांडलेल्या या कल्पना conjecture स्वरूपाच्या असल्यामुळे बर्‍याच लोकांना (ब्राह्मणत्वाचा न्यूनगंड असलेल्यांना आणि ब्राह्मणांचा द्वेष करणार्‍यांना) हास्यास्पद वाटतील, पण त्यांनी एखादे अपरिचित काव्य "घनपाठाचे तंत्र" वापरून पाठ करायचा प्रयत्न करावा आणि मग मला सांगावे.




संदर्भ:

[१] https://www.youtube.com/watch?v=ped-uIlw_24

[२] https://www.scientificamerican.com/article/human-sea-nomads-may-have-evolved-to-be-the-worlds-elite-divers/

[३] https://www.youtube.com/watch?v=7CBfCW67xT8&rco=1

[४] https://www.apa.org/monitor/2019/03/athletic-brain

[५] https://www.frontiersin.org/articles/10.3389/fnhum.2017.00566/full

[६] https://www.youtube.com/watch?v=Ti4d31KGN1w

 

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

श्रेष्ठकनिष्ठ

श्रेष्ठकनिष्ठ
=====

--राजीव उपाध्ये, डिसे २०२३

सध्या हे श्वानशिशु आह्वानांचे व्हिडीओ बरेच नियमितपणे फेसबुकवर बघायला मिळत आहेत. हे कुणी सहज गंमत म्हणून तयार करत आहे की हे काही प्रयोग आहेत कळायला मार्ग नाही. पण आपल्या जीवसृष्टीच्या सदस्यांच्या अस्तित्वावर यामुळे बराच उजेड पडतो.


आधुनिक सुसंस्कृत मानव समाजात श्रेष्ठकनिष्ठ हा भेदभाव निंद्य/त्याज्य मानला गेला आहे. पण निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत. तो त्याच्याच मगदूराप्रमाणे प्रकट होत राहतो. हे कटू सत्य आहे. आपल्या क्षमता आपले श्रेष्ठकनिष्ठत्व ठरवतात, हे मान्य करावेच लागते.

वरील प्रयोग कशासाठी केले जात असतील याविषयी मी काही अंदाज बांधले आहेत. 

१ला अंदाज  - केवळ श्वानांच्या वर्तनाचा अभ्यास. पण मनुष्यप्राणी स्वार्थी असल्याने ही शक्यता असली तरी इतकाच उदात्त हेतू यात असेल असे वाटत नाही. 
२ रा अंदाज - क्षमतेनुसार श्वानांचे वर्गीकरण करून त्यांची  "योग्य" किंमत ठरवता यावी यासाठी 
३ रा अंदाज - वेगवेगळ्या जातीच्या श्वानशिशुंना या चाचण्या लावून त्यातून निवडलेल्या पिल्लांची रवानगी योग्य कामासाठी करता यावी यासाठी (उदा० जर्मन शेपर्ड जातीच्या श्वानांमध्ये उत्तम श्वान निवडून ते सैन्यदल, पोलिस इत्यादि ठिकाणी पोचविणे केवळ अशा चाचणीमुळेच शक्य आहे)


"उद्दीष्टासाठी मुसंडी मारून ते साध्य करणारे" हे सर्वश्रेष्ठ मानता येईल का?

इथे मला या प्रयोगाशी सुसंगत असा एक अनुभव सांगावासा वाटतो - माझी मुलगी जेव्हा शाळेत होती तेव्हा मी अनेकदा तिला आणायला जायचो. तिच्या शाळेत एक "कडक" नियम होता (मला या नियमाचा भयानक राग यायचा). शाळेची घंटा वाजली की धावत सुटायचे नाही, हा तो नियम. तरी पण हा नियम तोडून काही मुले (सर्व वयाची) शाळा सुटली की धावत बाहेर यायची. ही मुले सहसा अभ्यासात आणि अभ्यासेतर उपक्रमात  पण पुढे असायची, असा मी माझ्यापुरता निरीक्षणे करून निष्कर्ष काढला होता. तो बरोबर होता. या वरील व्हिडीओमुळे माझे निष्कर्ष परत अधोरेखित झाले आहेत.

त्यानंतर नंबर लागतो तो चिकटपणे ध्येय प्राप्तीसाठी झगडणारे - म्हणजे भर्तृहरीच्या "उत्तमजनां" प्रमाणे कितीही विघ्ने आली तरी हातातले काम टाकून न देणारे... असो.

आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो - मुंबईसारख्या शहरात लोकल स्टेशनमध्ये शिरताक्षणी मुसंडीमारून आत शिरणारे चाकरमाने श्रेष्ठ मानायचे का? 

माझ्या मुलीच्या शाळेतील जी मुले नियमांचा आदर केल्यामुळे "मागे" राहात असत त्यांना कनिष्ठ मानायचे का?

तुमच्या उद्दीष्टाचे लाभार्थी जेव्हढे जास्त तेव्हढे तुमच्या मुसंडीचे महत्त्व जास्त आणि तेव्हढे तुम्ही श्रेष्ठ! पण मग नियम पाळणारे, कायद्याला भिणारे दुय्यम स्थानावर जातात आणि विचित्र समस्या उत्पन्न होते. 

पण नाही...  नियमांचा किंवा कायद्याचा आदर करणे हे विकसित मेंदू्चे निदर्शक असल्याने (याविषयी मी लवकरच सखोल लिहीणार आहे) ते पण तितकेच "श्रेष्ठ" ठरतात. कारण असे जीव समूहाच्या स्थैर्याला/स्थिर विकासाला हातभार लावतात.

तेव्हा आपले श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व ठरवायचे तर हा प्रश्न स्वत:ला अवश्य विचारा - मी मुसंडी मारली तर फायदा कुणाला आणि किती? मी कायदा पाळला तर फायदा कुणाला आणि किती?








 

मंगळवार, ४ जुलै, २०२३

"अस्सल सांस्कृतिक"

 "अस्सल सांस्कृतिक"

=============




मानववंशशास्त्र हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय! समाजातील, संस्कृतीमधील बदलांची निरीक्षणे करायला मला आवडते.


नुकताच ब-याच वर्षांनी पुण्यातल्या एका "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमाला गेलो होतो. "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रम हे पुण्यातल्या एखाद्या पेठेत मंगल कार्यालयातच असतात. सदाशिव किंवा शनिवार पेठेतील कार्यक्रम भौगोलिक माहात्म्यामुळे अस्सलतेमध्ये काकणभर सरसच असतात. लग्न आणि मुंजीनंतर  पुरस्कार समारंभ आणि मग व्याख्यान सहसा "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमात मोडतात.


कोणत्याही "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमाला चहापान असेल तर जरा कार्यक्रमाचे गांभीर्य वाढते आणि चहाबरोबर बिस्किटे असली तर मग विचारू नका. नदी अलिकडच्या (पश्चिम पुण्यातील) काही उच्चभ्रू संस्थामध्ये चहापाना बरोबर भजी पण मी खाल्लेली आहेत. तात्पर्य, चहापान हे त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.


परवाच्या "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमात चहाचे पिंप दिसले तेव्हा मला हायसे वाटले. मग बिस्किटांचे ताट आले तेव्हा मी लगेच त्या दिशेने मुसंडी मारली आणि हक्काची बिस्किटे ताब्यात घेतली. 


पण तेव्हा मला एक धक्का बसला. चहापानातील चहाचे कप चिनीमातीचे जाऊन आता कागदी आले आहेत. पण इथपर्यंत ठीक आहे. पण त्या कपाचा आकार आता "घोटभर" म्हणण्या इतका पण राहीला नाही हे वास्तव अस्वस्थ करणारे होते.


यानंतर मात्र पुढे काय वाढून ठेवले आहे, या चिंतेने माझ्यातला मानववंशशास्त्रज्ञ व्यथित झाला. भविष्यात पूजेच्या पळीने लवकरच चहा तीर्थासारखा उपस्थितांना दिला जाणार असे चित्र डोळ्यासमोर तरळू लागले. 


पुणेरी "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमातील चहापान हा अलौकिक घटक मूळ स्वरूपात टिकविणे प्रत्येक अस्सल पुणेकराचे आद्य कर्तव्य आहे...



-राजीव उपाध्ये




शनिवार, २४ जून, २०२३

जननेंद्रिये

 जननेंद्रिये

======
राजीव उपाध्ये (जून २०२३)
सध्या अचानक फेसबुकवर सेक्सटॉइजच्या जाहिराती मुबलक दिसू लागल्या आहेत. हा अचानक बदल "सनातनी" मानसिकतेला कितपत झेपेल माहित नाही. पण मला तो संस्कृतीच्या स्थित्यंतरात महत्त्वाचा वाटतो...
जननेंद्रियांविषयी लज्जा, तिरस्कार किंवा घृणा जगभर सापडते. हे एक acquired behavior आहे. मनुष्यप्राणी सभोवतालच्या निरीक्षणातून किंवा अनुभवातून योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकत जातो. हे योग्य/अयोग्य त्या त्या समूहापुरतेच मर्यादित असते, याचे भान सहसा सर्वसामान्य व्यक्तीला नसते. जो समूह ताकदवान असतो, तो आपल्या योग्य/अयोग्यतेच्या कल्पना इतरांवर लादतो. भारतीय संस्कृती याला अपवाद नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जननेंद्रियांची पूजा पण होते. हा परस्पर विरोध गमतीदार आहे.
पण जगभर मात्र एक मोठा वर्ग जननेंद्रियांविषयी नकारात्मक भावनातून मुक्त झालेला दिसतो. तसेच नग्नतेविषयी उदार दृष्टीकोन बाळगतो. मानवी जननेंद्रिये मोठ्या प्रमाणात कलाविष्काराचा (१,२, ३) विषय बनलेली दिसतात. teatro oficina या एका प्रसिद्ध नाटक कंपनीच्या एका नाटकात एक पात्र स्टेजवर हस्तमैथून करते. तर दूस-या एका नाटक कंपनीच्या एका ऑपेरात १२० पूर्णनग्न पात्रे गायन करतात! मला या कलाकारांच्या धाडसाचे कौतूक वाटते.
याच बरोबर जननेंद्रियांच्या आकारातील खाद्यपदार्थांची रेलचेल अनेक देशांत दिसून येते. पुरुष जननेंद्रियांच्या आकारातील बेकरीपदार्थ, आईस्क्रीम किंवा मिठाया इ० जपानपासून फ्रान्सपर्यंत अनेक युरोपीअन देशात दिसून येतात.
काल "मास्टरशेफ" या जगप्रसिद्ध पाकस्पर्धेत बैलांच्या जननेंद्रियांपासून (Bull's penis Pho) बनवलेला पदार्थ pressure test साठी निवडलेल्या स्पर्धकांना करायला सांगितला होता. हा पदार्थ चीन, व्हिएतनाममध्ये (४) एक delicacy म्हणून बनवला जातो. स्पर्धकांमध्ये असलेल्या एका मराठी महिलेने कोणताही थयथयाट न करता हा पदार्थ बनविण्याचे आह्वान स्वीकारले. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे उर्फी जावेदच्या फॅशनमुळे उडवली गेलेली धूळ आठवली आणि हसू आले.

शनिवार, १० जून, २०२३

सत्त्वपरीक्षा

 सत्त्वपरीक्षा

========


-राजीव उपाध्ये


आयुष्यात सहनशीलतेची परीक्षा घेणारे प्रसंग तुम्ही कसे हाताळता? अशा प्रसंगात आपले कोण आणि परके कोण हे मात्र नक्की समजतात.


गेल्या वर्षी याच महिन्यात अपर्णाने (बायकोने) स्विगीवरून भेळ मागवली आणि एकदोन दिवसात हळूहळू तिची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. प्रथम मळमळ आणि पोट बिघडणे ही सामान्य लक्षणे होती आणि प्राथमिक उपचारांनी बरे वाटेल, अशी अपेक्षा होती. पण नंतर लक्षणांची तीव्रता वाढून अपर्णाला ताप भरला. सुरुवातीला ताप साधा वाटला पण तो वाढला आणि त्यात अपर्णाचे बोलणे असंबद्ध होऊ लागले आणि ऑक्सीमिटरवर ऑक्सीजनची पातळी बघितली, तेव्हा मात्र मी घाबरलो आणि तिला हॉस्पिटलमध्ये जाऊ या, असे सुचवले. अपर्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे नव्हते कारण घरातलं सगळं रूटीन बिघडेल, असा त्या अवस्थेत तिचा युक्तिवाद होता. 


खालावलेली ऑक्सीजन पातळी आणि असंबंद्ध बोलणे यामुळे मी पूर्णपणे हादरलो होतो आणि उशीर करणे माझ्या अंगलट येऊ शकले असते. शक्य तेव्हढ्या शांतपणे मी तिला पटवायचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. हळूहळू माझा धीर सुटायला लागला आणि मग मी नाईलाज झाला तेव्हा आवाज चढवला. खूप थयथयाट केला तेव्हा अपर्णा हॉस्पिटलमध्ये यायला तयार झाली. हॉस्पिटलमध्ये चाचण्या केल्यावर साधी कावीळ असे निदान झाले आणि डॉक्टरांच्या अपेक्षेप्रमाणे ताप २-३ दिवसात निघाला पण.) पण मुद्दा असा आहे की माझा थयथयाट त्यावेळेला कुणी रस्त्यावर ऐकला असता तर या बाईचा नवरा हिला किती छळतो, असा प्रश्न अनेकांना पडला असता. पण त्या अगोदर मी बराचवेळ शांतपणे समजावून सांगण्याचा केलेला प्रयत्न रस्त्यावर कुणाला कधीच कळला नसेल.


माझ्या सहनशक्तीची पराकोटीची परीक्षा मी माझ्या आईच्या मेनोपॉजमध्ये दिली. 


८६ साली वडील गेल्यानंतर आईची तब्येत हळूहळू ढासळायला सुरुवातीला झाली. भविष्याविषयीच्या अनेक स्वप्नांवर पाणी अगोदरच पडले होते. जे काही करायचे ते पुण्यात राहूनच करावे लागणार होते. "आईला सोडून दे" असे सांगणारे काही महाभाग मला तेव्हा भेटले. त्यांचे ऐकले असते तर नक्की काय आणि किती साधले असते, हे ठरवणे आता अवघड आहे. पण आईकडच्या नातेवाईकांनी मात्र मला कच्चे सोलून खाल्ले असते, हे मात्र नक्की...


आईच्या तेव्हाच्या मानसिक स्थितीला काही मानसिक आघातांची किनार होती, तसेच एका सुपरस्टीशनची पण त्याला किनार होती (माझ्या आयुष्यात ज्यांनी माती कालवली त्यात ज्योतिषांचा सहभाग खूप आहे). लायकी असून आपले आयुष्य वाया गेले, ही आईची भावना त्यात प्रमूख होती (हा त्यातला खरा तथ्याचा भाग. आईला जवळून ओळखणारे सर्व हे निर्विवाद मान्य करायचे.). तिचं सगळं वैफल्य माझ्यावर निघत होते. एकूलता एक असण्याचा हा दोष...


आज उशीरा का होईना मला आयुष्यातल्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याने retrospectively आईला समजून घेता येते, पण तेव्हा मात्र मी एका वणव्यात सापडलो होतो. तेव्हाचे मित्र तर असून नसल्यासारखे होते (आई तेव्हाही त्यांना "हे तुझे फक्त सुखाचे सोबती" असे म्हणायची. प्रत्यक्षात ते सुखाचे सोबती तरी होते का असा प्रश्न आता पडतोच). पण मनातली घालमेल बोलून दाखवायला दूर्दैवाने एकही योग्य जागा नव्हती. 


मला जेव्हा हे असह्य होई तेव्हा मी आमच्या तेव्हाच्या फॅमिली डॉक्टरांना भेटायचो. मग त्या मला Restyl घ्यायला सांगायच्या किंवा "आईला सायकियाट्रिस्टकडे घेऊन जा" म्हणून थंडपणे सांगायच्या. पण आईचे वागणे असे का आहे याबद्दल एक अवाक्षर त्या बोलल्या नाहीत. मी दोन सायकियाट्रिस्टकडे तिला घेऊन पण गेलो. पण अशा पेशंट बरोबर रॅपो निर्माण करणे ही डॉक्टरांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यात ते सपशेल अपयशी ठरले. आज मला त्यांची आठवण झाली की पायातली चप्पल काढावीशी वाटते. पण  दिवसामागून दिवस जात होते. अधूनमधून आईची मनस्थिती खूप छान असायची. माझं संस्कृत तिच्यापेक्षा चांगलं होतं, याचा तिला अभिमान होता.  तिने दिलेला वाचनाचा आणि पाठांतराचा किडा मी जोपासला याचा पण तिला अभिमान होता. मी पुस्तकांची चळत घेऊन आरामखुर्चीत वाचत बसलो की तिला भारी कौतूक वाटायचे. मुलांनी आईवडीलांच्या पुढे गेलेच पाहिचे, हे आईने माझ्यावर मनावर बिंबवलेले महत्त्वाचे तत्त्व.  त्याच सुमारास माझ्या संगणकीय संगीतावरील कामाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने अधूनमधून ती सुखावायची, पण ते सुख फार काळ टिकत नसे. 


असंच एकदा आईच्या मानसिक स्थितीने कमालीचा तळ गाठला होता आणि माझ्या आय० आय० टी० मधल्या एका डॉक्टर मित्राचा मला फोन आला की तो पुण्यात आहे आणि त्याला मला भेटायचे होते. आय० आय० टी० मध्ये मला जे काही थोडे चांगले मित्र मिळाले, त्यात हा एक होता. त्याची आई त्याच्या लहानपणी गेली होती आणि तरीही तो डॉक्टर झाला आणि आय० आय० टी० मध्ये एम०टेक० करायला आला, याचे माझ्या आईला खूप अप्रूप होते. आई त्याची वरचेवर चवकशी करायची.  आम्ही विद्यापीठात भेटलो, तेव्हा त्याने आईची चौकशी केली तेव्हा माझा चेहेरा कावराबावरा झाला आणि मी उत्तर देण्याचे टाळू लागलो. मग त्याने खोदूनखोदून चवकशी केली आणि मला म्हणाला, "मी आजच संध्याकाळी तुझ्या आईला येऊन बघतो". मी अतिशय हताशपणे त्याला "हो" म्हटले. 


त्या दिवशी आम्ही दोघेजण एकत्र घरी गेलो आणि आईची ओळख करून दिली. "हा डॉक्टर गौतम! माझा हॉस्टेल मधला मित्र! तुला भेटायला आला आहे".  आईचा चेहेरा किंचित उजळला. त्याने आईशी गप्पा मारता मारता तब्येतीची चौकशी करायला सुरुवात केली आणि मी चहा करायला आत गेलो. चहा आणि गप्पा झाल्यावर गौतम म्हणाला, "चल जरा पाय मोकळे करून येऊ. मग त्याने मला सांगितले की आईची परिस्थिती भयानक वाईट आहे कारण तिचा "मेनोपॉज" चालू आहे. त्या दिवशी आयुष्यात मला १ल्यांदा मेनोपॉज हा शब्द मला समजला आणि आईला काय होत आहे, हे समजले.


डॉक्टर गौतम म्हणाला, "तुला ताबडतोब आईला चांगल्या गायनेकॉलिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट्कडे घेऊन जावे लागेल." मग मी त्याला माझे सायकियाट्रिस्ट्चे आलेले अनुभव सांगितले. परिस्थिती कठिण बनली होती. त्यावर डॉ० गौतमने मला सुचविले की मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना परत भेटावे आणि त्यांना आमच्या भेटीत काय झाले हे सांगावे. गरज पडल्यास त्याने परत पुण्याला येऊन डॉक्टरांना भेटायची तयारी दाखवली. सुदैवाने ती वेळ आली नाही. मात्र यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांची हटवादी भूमिका सोडली आणि मला एक मार्ग सूचवला. पुढे त्याचा ब-याच प्रमाणात मला उपयोग पण झाला. अधूनमधून त्या मला "आईचा फूल बॉडी चेक-अप करून घे" असा आग्रह करायच्या, पण आईला ते मान्य नसे. "उद्या काही निघाले आणि मी अंथरूणाला खिळले तर तुझ्या लग्नाचे कोण बघेल?" असा आईचा मला प्रश्न असे आणि माझ्याकडे त्याचे उत्तर नसे...


पुढे त्याच परिस्थितीमध्ये माझे लग्न झाले आणि आईच्या ढासळेल्या तब्येतीचा/व्यक्तीमत्त्वातील बदलाचा परिणाम माझ्या वैवाहिक आयुष्यावर पण व्हायचा तो झाला. एका प्रसंगानंतर आई अचानक भयानक मलूल होऊ लागली. हे मलूल होणे इतके विचित्र होते की मला काय करावे करेना ते कळेना. एक दिवस मात्र हद्द झाली. आईला पातळ नीट नेसता आले नव्हते. मी तिला सांगितले, तेव्हा ती ते स्वीकारायला तयार नव्हती, आणि तशीच बाहेर जायला निघाली, तेव्हा मी घाबरलो आणि अक्षरश: आरडओरडा, आदळआपट करून तिला थांबवले. लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितले. त्या परिस्थितीमध्ये मी आईला ब-याच प्रयत्नानंतर कसेबसे जोशी हॉस्पिटलमधे नेले. प्राथमिक चाचण्यानंतर तातडीचा एम०आर०आय० स्कॅन केला तेव्हा निदान झाले - "शेवटच्या स्टेजचा rapidly advancing ग्लायोमा!"


आईच्या शेवटच्या दिवसात सख्खा मामा अमेरीकेहून, सख्खी मावशी नाशिकहून धावून आले. आईच्या ऑपरेशनच्या वेळी आजीने आईकडच्या सर्व नातेवाईकांची फौज उभी केली.  एके दिवशी  जोशी हॉस्पिटलमधे  रात्री मामाने  आईवर झालेल्या मानसिक आघातांबद्दल मला सविस्तर सांगितले (मानसिक आघात हे कॅन्सरचे एक प्रमुख कारण असतात असे मला पुढे सिप्ला कॅन्सर सेंटरमध्ये लावलेल्या पोस्टरमुळे आणि डॉक्टर बावडेकरांच्या आत्मचरित्रामुळे समजले). पण तोपर्यंत उशीर झाला होता. ते अगोदरच सांगितले असते तर आमचे नाते वेगळे आणि समृद्ध झाले असते पण आता जर-तर ला काही अर्थ नाही. 


हे सर्व आज लिहायचे कारण - सत्त्वपरिक्षेच्या प्रसंगात सहनशीलता संपते, मग काहीही करून उद्दीष्ट साधायचे असते.   उंटावरून शेळ्या हाकणारा समाज फक्त  आपल्याला दूषणे देण्यासाठी असतो. 


गुरुवार, १ जून, २०२३

*प्लास्टीक पिशव्या, सामाजिक जबाबदारी आणि कायद्याचा बडगा*


मी गेले अनेक महिने कुत्र्यांच्या मानवीकरणाचा (domestication) निरीक्षणात्मक अभ्यास करत आहे. जगभरच्या पाळीव कुत्र्यांची असंख्य निरीक्षणे केल्यावर काही आश्चर्यकारक गोष्टी लक्षात आल्या. पाळीव कुत्र्यांची अस्तित्वाची लढाई न्यूनतम असते. मालकाने अन्न आणि सुरक्षेची महत्त्वाची गरज भागवल्यामुळे कुत्री मालकाशी जुळवून घेतात. तसेच जेव्हा प्रेत्येक आज्ञापालनाचे काही ना काही बक्षिस मिळते, तेव्हा त्या आज्ञा निमूटपणे स्वीकारल्या जातात (प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो आणि जनुकीय रचना वेगळी असल्याने थोडे इकडेतिकडे होऊ शकते) *पण केवळ योग्य वेळी योग्य बक्षिस दिल्याने, भावनिक आणि इतर गरजा पूर्ण झाल्याने कुत्री मानवी वर्तनाच्या किती जवळ जाऊ शकतात, याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे चिनी पुडल जातीचे श्वान. भविष्यात जनुकीय अभियांत्रिकीमुळे चिनी लोक या कुत्र्यांना माणसाप्रमाणे कदाचित बोलायला पण शिकवतील पण तो भाग वेगळा...
 
हे सांगायचे महत्त्वाचे कारण असे पाळीव कुत्र्यांचा जगण्याचा संघर्ष जसा न्यूनतम पातळीवर आणता येतो, तसा माणसांचा जगण्याचा संघर्ष फार थोड्या व्यक्तींमध्ये न्यूनतम पातळीवर येतो. सहसा समाधानी माणसे थोडीफार जबाबदारीने वागताना दिसतात. विचार करा, *माणसाची पालनकर्ती राज्यव्यवस्था माणसाच्या प्रत्येक योग्य वर्तनाबद्दल कधीही शाबासकी देत नाही*. पण कुत्र्यांना मात्र प्रत्येक योग्य वर्तनाबद्द्ल शाबासकी मिळते. कदाचित असे बक्षिस देणे माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. पण ज्या संस्कृतीमध्ये ताबडतोब, याच जन्मात जिथल्या तिथे बक्षिस मिळते तिथे मनुष्याने देदीप्यमान प्रगती केली आहे (उदा० भांडवलशाही देश, युरोपिअन संस्कृती).

भारतीय संस्कृतीचे दूर्दैव असे की असे बक्षिस मेल्यानंतर देण्याचे आश्वासन देते. बहुसंख्य भारतीय समाज जबाबदारीने वागत नाही याची खरी गोची हीच आहे. कुणाला पटो अथवा न पटो.

- राजीव उपाध्ये

शनिवार, २० मे, २०२३

Killer Instinct


Killer Instinct
 ==========

-- राजीव उपाध्ये

चार्वी शाळेत असताना मी अनेक वेळा तिला शाळेतून आणायला जायचो. शाळा सुटायच्या वेळेला काही निरीक्षणे करून मी माझ्या पुरताच एक सिद्धांत मांडला होता. तो असा की शारीरिक चापल्य आणि बौद्धिक चापल्य यांचा घनिष्ठ संबंध असतो. - शाळा सुटल्यावर काही मुले सुसाट गेट मधून बाहेर येत असत. ही सुसाट मुले अभ्यासात पण सुसाट होती, असे माझे निरिक्षणांती मत बनले होते. आमच्या मॅडम सुसाट नव्हत्या आणि अति रेंगाळणार्‍या पण नव्हत्या. त्या "वेल टू डू" वर्गात मोडणा-या होत्या. मी विषारी स्पर्धेच्या वातावरणात वाढल्यामुळे killer instinct चे महत्त्व ओळखून चार्वीला "सुसाट" करण्याचे तूफान प्रयत्न केले, पण ते एका मर्यादेपर्यंतच यशस्वी ठरले.

चार्वीच्या शाळेने विषारी स्पर्धा खुडायचे काम मुळापासून केले. "Killer instinct" हेच अंतिम सत्य मानणार्‍या मला (आणि अधूनमधून अपर्णाला) चार्वीच्या शाळेचा खूप राग यायचा. दर ६ महिन्यांनी आम्ही शाळा बदलायचे मनसूबे रचायचो. पण शाळा बदलणे, हे हॉटेल बदलण्यासारखे सोपे नसल्यामुळे मग तो बेत मग रहित व्हायचा.
आज चार्वी आय० आय० टी० मध्ये आणि अमेरिकेत गेली नाही याचे अजिबात दू:ख नाही. उलट तिला अमेरिकेचे आकर्षण अजिबात नाही याचे जास्त कौतूक वाटते. तिला मी अलिकडे विचारले - "How you will describe Scottish culture in one sentence?". ती उत्तरली - "Baba, live and let live". आज तिच्या तिकडच्या मित्रमैत्रीणी चार्वीने तिकडे परत यावे म्हणून प्रयत्न करतात, तेव्हा मला बाप असूनही स्वत:च्या मुलीचा हेवा वाटतो. मी तिच्या इतका नशीबवान नाही. अनेक जुनी मित्रमंडळी आणि "मास्तरडे" अजुनही माझ्याकडे तुच्छतेनेच बघतात...

हे सगळं आज लिहायचं कारण म्हणजे नुकतंच आय० आय० टी० मुंबई ने मुलांवरील ताण कमी करण्यासाठी दोन कोर्सेस कमी करण्याचे स्वागतार्ह पाऊल उचलल्याचे वाचले. याचे परिणाम दिसायला बराच वेळ जाईल पण परिणाम टिकाऊ असेल. Killer instinct ला अवाजवी महत्त्व देण्याच्या नादात अनेकदा वेगळ्या प्रतीची बुद्धीमत्ता नष्ट होते. वाफेवर अन्न शिजवताना जीवनसत्त्वे आणि पूरक द्रव्ये नष्ट होतात, तसेच काहीतरी. स्वत:च्या मगदूरा प्रमाणे शिकणे यात गैर काही नाही, याची आय० आय० टी० ने दखल उशीरा घेऊन फार नुकसान झाले आहे. Better late than never!

सोमवार, १६ जानेवारी, २०२३

उर्फी जावेद आणि तिचे अंगप्रदर्शन

उर्फी जावेदच्या (त्या अगोदर दीपिका पदुकोण, रणवीर यांच्या "स्वैराचारा"वर जी धूळ उडवली जात आहे. त्याबद्दल लिहावं की नाही त्याबद्दल मला निश्चित ठरवता येत नव्हतं. 

उर्फी जावेदच्या मागे लागलेल्या चित्रा वाघ यांनी घेतलेले मुख्य आक्षेप असे आहेत (आधार त्यांच्या मुलाखतींचे विविध व्हिडीओ)

० सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणा ही विकृती

० निष्पाप मुली विकृतांच्या शिकार

० फॅशनच्या नावाखाली कमी कपडे इ० इ० 

० शिवाजी महाराजांच्या राज्यात हे काय चालले आहे


आता वरील चार पैकी प्रथम तिन्ही मुद्द्यांचा लसावि काढला तर त्यात उर्फीच्या अर्धनग्नतेला श्रीमती वाघ यांचा आक्षेप आहे असे वाटते. या आक्षेपातले तथ्य निश्चित करण्यासाठी नग्नतेबद्दल काही गोष्टी तपासूया.

 

अलिकडेच काही वर्षांपूर्वी सध्याच्या सरकारने पोर्न वेबसाइटवर एक धडक मोहिम चालवून ते बंद करायचा धाडसी निर्णय घेतला. पण ते बंद झाल्याने पोर्नोग्राफी बंद झाली नाही की या देशातली उपलब्धता कमी झाली नाही. उद्या उर्फी जावेदला तुरूंगात टाकले तरी लैंगिक भावनांना उत्तेजन देणारे असंख्य स्रोत तसेच चालू राहणार आहेत. निर्भयाच्या आरोपींना फाशी देऊन बलात्कारांमध्ये यत्किंचितही फरक पडलेला नाही. 


कोणत्याही वर्तनाच्या योग्यायोग्यतेची चिकीत्सा मर्यादित पटलावर न होता व्यापक पटलावर होणे हे कधीही श्रेयस्कर असते. उदा० एखाद्या औषधाचा परिणाम तपासण्यासाठी अभ्यासलेला समूदाय (नमूना) जर लहान असेल तर निष्कर्ष एकांगी आणि चुकीचे निघतील. पण जर ते मोठा समूदाय  घेऊन तपासले तर निष्कर्ष स्वीकारार्ह असण्याची शक्यता असते. 


अंगप्रदर्शन, नग्नता (वि० सामाजिक नग्नता) हे वर्तन "योग्य किंवा अयोग्य" याचा निर्णय करायचा झाला तर संदर्भपटल व्यापक करण्यासाठी आपल्यापेक्षा प्रगत (आर्थिक, वैचारिक इ० किंवा ज्यांच्या चलनाचे मूल्य रुपयापेक्षा जास्त आहे असे देश) आणि अप्रगत अशा समाजात यासंबंधी कसे बघितले जाते हे तपासणे योग्य ठरेल आणि एक मोठ्ठी गंमत लक्षात येईल...


प्रथम आपल्यापेक्षा जगभरच्या अप्रगत समाजाचा विचार करू या. इथे अप्रगत अवस्थेचे वर सांगितलेले निकष लावले  तर आदिवासी आणि भटके इ० मनुष्य समुदायात नग्नता/अंगप्रदर्शन हे फारसे निषिद्ध नसल्याचे लक्षात येते. भारतात माझ्या लहानपणी एका विशिष्ट कष्टकरी वर्गातल्या स्त्रिया छाती फक्त पदराने झाकत असत. त्यांच्यात पोलकं वापरण्याची पद्धत नव्हती. या अप्रगत समाजातील नग्नतेने त्यातील स्रियांवर कुणी अत्याचार केल्याचे कधीही कानावर आलेले नाही. 


आता आपल्यापेक्षा प्रगत समाजात नग्नता/अंगप्रदर्शन यासाठी थोडे कष्ट घेतले तर लक्षात येईल की असंख्य देशात सामाजिक नग्नता ही अजूनही पूर्णपणे सामान्य मानली जाते. जगात सामाजिक नग्नतेला केंद्रस्थानी ठेऊन अनेक उत्सव साजरे केले जातात. पार जपान पासून (कानामारा मात्सूरी) ते ब्राझिल मधल्या कार्निव्हल पर्यंत उत्सवी नग्नतेला समाजमान्यता आहे. फ्रान्समध्ये कॅप द’आग्द हे गाव नग्नपंढरी म्हणून ओळखले जाते. ब्रिटनमध्ये सामाजिक नग्नतेला पार्लंमेंटने कायदा मंजूर करून मान्यता दिली. स्पेन्सर ट्युनिक नावाचा एक प्रसिद्ध फोटोग्राफर सामुदायिक नग्नतेच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या आयकोनिक फोटोग्राफीत सहभागी होण्यासाठी जगभरचे लोक प्रतिक्षा यादीत ताटकळत असतात.  ऑस्ट्रेलियाने नुकताच त्याच्यासाठी आपला कायदा बदलला असे वाचनात आले. चित्रपटातील पडद्यावरील नग्नता आपल्या परिचयाची आहे, जी आपण अजूनही पचवू शकलेलो नाही. पण युरोपात नाटकीय (थिएट्रीकल) नग्नता सर्रास आणि सामान्य आहे. स्वीडन आणि स्वित्झर्लंड सारख्या देशात भर गर्दीच्या चौकात, ज्यात सर्वजण पूर्ण नग्न आहेत असे नृत्यप्रयोग दिवसाढवळ्या होतात. याची असंख्य उदा० जालावर उपलब्ध आहेत.   आपल्या देशात मात्र धर्मप्रणित नग्नतेला (आणि ती पण पुरुषांच्या) "मान्यता" आहे. खरं तर ही एकप्रकारची लबाडी आहे पण असो.

ही मी कलात्मक नग्नतेशी संबंधित अतिशय मोजकी आणि माफक उदाहरणे इथे अशासाठी दिली याचे कारण असे की अशा व्यापक पार्श्वभूमीवर नग्नता आणि अंगप्रदर्शन यातील योग्यायोग्यता तपासताना आपला भारतीयांचा भोंगळपणा/लबाडी/दूटप्पीपणा आपोआप उघडा पडतो. जगातील एक मोठा वर्ग नग्नतेने उत्तेजित न होता अत्यंत हेल्दी नजरेने जर बघत असेल तर  मग इंचभर उघडे अंग बघून उत्तेजित होणारे आपण भारतीय लोक "विकृत" मानसिकतेचे ठरतो.  या सर्वाच्या मूळाशी स्त्रिने "मापात" राहावे, ही प्रवृत्ती असल्याचे मान्य करावे लागेल.


लेखाचा समारोप करण्यापूर्वी चित्रा वाघांच्या युक्तीवादातील पोकळपणा उघडकीस आणणे आवश्यक आहे - एक म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांना उगाच मधे ओढले आहे असे वाटते. कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती आज परत जन्मली तर ती व्यापक विचार करून आजच्या जीवनशैलीशी सुसंगत प्रागतिक मूल्ये स्वीकारेल की जुन्या मूल्यांना चिकटून बसेल? दूसरे असे की समजा उर्फी जावेदने आपल्या वर्तनात जर बदल केला आणि स्त्रियांवरील अत्याचार जर चालूच राहीले तर चित्रा वाघ आपली भूमिका बदलणार का? 


अर्थात मला याचे संयमित उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही कारण *आक्रस्ताळेपणा आणि निरर्थक थयथयाट* हा सध्याच्या भारतीय समाजाचा स्थायीभाव बनला आहे.

शुक्रवार, १७ जून, २०२२

गोत्राच्या मूर्खपणा विषयी...

 गोत्राच्या मूर्खपणा विषयी...

=================


-- राजीव उपाध्ये (जून २०२२)


(टीप - या लेखात काही त्रुटी आधळल्यास अवश्य लक्षात आणून द्याव्यात. मी माझ्या जनुकशास्त्रातील तज्ञमित्राना हा लेख दाखवला आहेच. त्यांचा स्पष्ट विरोध नसल्याने त्यांची "मूकसंमती" गृहित धरली आहे. :) ) 


गोत्र या संकल्पनेचा संबंध अनेक लोकांना जनुकशास्त्राशी लावायला फार आवडतो. "सापिण्ड्य", शुद्धवंश या कल्पनांमुळे लोक असं करायला प्रवृत्त होतात. पण ही कल्पना साध्यासोप्या गणिती तर्कावर तपासायची ठरवली तर पत्त्यांच्या मनो-यासारखी कोसळून पडते. हे कसे ते आता बघू या!


अ ही एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचे गोत्र क्ष आहे, असं आपण मानू या! 


अ१ अ२ अ३ अ४ अ५ अ६ अ७ अ८ अ९ अ१० अशी अ ला त्याच्या/तिच्याच लिंगाची मुले झाली असे मानू (म्हणजे अ पुरुष असेल तर अ०, अ१, अ२, अ३ ... पण पुरुषच आहेत). प्रत्यक्षात असे वंशसातत्य राहाण्यासाठी, पुढील प्रत्येक पिढीतील वंशजाचे लग्न होऊन त्यांना त्याच लिंगाचे एक तरी मूल होणे अपेक्षित आहे. पण ही शक्यता अनेक कारणांनी प्रत्यक्षात कमी होते, हे सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला कळायची अडचण नको. असो.


आता अ ही व्यक्ती मूळपुरूष किंवा मूळस्त्री मानली तर पुढच्या पिढीमध्ये "अ"चे जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार (गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आई कडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो. प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो). म्हणजेच अ१ मध्ये "अ"चे  ५०% जनुक येणार, तर पुढे अ२ मध्ये "अ"चे २५% जनुक येणार तर पुढील पिढ्यामध्ये अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४), ३.१२५% (अ५), १.५६२५% (अ६), ०.७८१२५% (अ७), ०.३९०६२५%(अ८), ०.१९५% (अ९), ०.०९७% (अ१०)  असा कमी कमी होत जातो.


या साध्या गणितावरून असे दिसते की साधारणपणे क्ष या गोत्राचा जनुकीय अंश दहाव्या पिढीत फक्त ०.०९७% इतकाच असतो. आता अ ही व्यक्ती आणि तिचे वंशज जर युद्ध, व्यापार किंवा व्यवसाय यासाठी स्थानांतर करत  राहीली तर "अ"च्या वंशजांमध्ये इतर ठिकाणचे जनुक मिसळत जातात. हे मिसळलेल्या जनुकांचे एकूण प्रमाण १० व्या पिढीमध्ये १०० - ०.०९७ म्हणजे ९९.९०३%  इतके असते. 


आता धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये (मूळ पुरुषाचा जनुकीय अंश ०.७८% असताना) आणि स्त्रिच्या ५ व्या पिढीत (मूळ स्त्रिचा जनुकीय अंश ३.१२५% असताना) सापिण्ड्य संपते किंवा मूळ गोत्राचा रक्तसंबंध संपतो. 


आता इथे काही विचित्र विसंगती डोके वर काढतात - मातेकडील सापिण्ड्य संपते तेव्हा मातेकडील जनुकीय वारसा पुरुषाकडील सापिण्ड्य संपताना असणा-या जनुकीय वारशाच्या जवळजवळ चौपट असतो. जनुकशास्त्र शास्त्रात dominant genes कल्पना आहे. आता बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे पण  धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही. तसेच प्रत्येक पिढी वयाच्या २० ते ३० व्या वयादरम्यान प्रजोत्पादन करते असे मानले तर साधारण २५० वर्षांनी म्हणजे साधारण आठव्या ते दहाव्या पिढीतील व्यक्ती स्थानांतरामुळे तसेच सामाजिक स्थित्यंतरांमुळे पूर्णपणे वेगळी असते! 


आता आणखी काही मजेशीर गोष्टी ...


१. माणसाच्या एका पेशीच्या केंद्रकातील (nucleus) मधले डि०एन०ए पूर्ण उलगडले तर त्याची लांबी २ मी० इतकी भरते. एका व्यक्तीच्या शरीरातील सर्व पेशीमधील सर्व डि०एन०ए पूर्ण उलगडले तर सूर्य ते पृथ्वी हे अंतर ३०० वेळा  कापता येईल! (https://www.nature.com/scitable/topicpage/dna-packaging-nucleosomes-and-chromatin-310/)


पण एका पेशीत १० पिढीतील पूर्वजाचा अंश शोधायचा झाला तर त्याची लांबी २मी गुणिले ०.०९७ म्हणजे १९.४ सेमी इतकी भरते. ही २३ गुणसूत्रांच्या जोड्यामध्ये विभागल्यावर ८.४३ मि.मि. इतका  १० व्या पिढीतील पूर्वजाचा वाटा एका पेशीमध्ये प्रत्येक गुणसूत्रात असतो. 


आता दहाव्या पिढीतील पूर्वजांची एकूण संख्या किती हे शोधू या!  प्रत्येक व्यक्तीला दोन जन्मदाते असतात. एकएक  पिढी मागे गेले त्याची संख्या पिढीगणिक दूप्पट होत जाते. 


आईवडील २‌**१ (दोनाचा १ला घात) 

(२ x २)    आजीआजोबा २‌**२ (दोनाचा २रा घात) 

(२ x २) x २ पणजी-पणजोबा २‌**३ (दोनाचा ३रा घात) 

((२ x २) x २) x २ खापर पणजी-पणजोबा २‌**४ (दोनाचा ४था घात) 


ही शृंखला दहा पिढ्या मागे नेल्यास २ चा १० वा घात म्हणजे १०व्या पिढीतील १०२४ व्यक्ती  (५१२ स्त्रिया आणि ५१२ पुरुष) आपल्या जन्मास कारणीभूत ठरतात. म्हणजे ख-या अर्थाने सापिंड्य टाळायचे असेल तर या १०२४ जणांची गोत्रे तपासून ती गोत्रे टाळायला हवीत. आता काही उपजातींमध्ये गोत्र संख्या ही मर्यादित आहे. उदा० चित्पावनांची मूळ गोत्रे १४ आहेत, तर क-हाड्यांची गोत्रे २४ आहेत (देशस्थांच्या एकूण गोत्र संख्येविषयी मला माहिती नाही कारण त्यांची गोत्रावळी कुणी प्रसिद्ध केलेली माझ्या पहाण्यात नाही. एखाद्या देशस्थाने माझे गोत्र अमूक असे सांगितले तर कशाशी तपासून बघायचे, ही समस्या निर्माण होते). म्हणजे जाती प्रेमाच्या हट्टापायी १०व्या पिढीतील या १०२४ व्यक्तीनी जर जातीमध्येच लग्न करायचे ठरवले तर "सापिंड्य" (आणि तदानुषंगिक संततीदोष) काही झाले तरी टाळता येणार नाही. तसेच १०२४ व्यक्ती मध्ये ज्या गोत्राची frequency सर्वात जास्त येईल ते गोत्र सर्वात जास्त dominant आणि प्रभावी ठरेल. पण धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही. 


कोणत्याही भटजीबुवाना हे वंशसात्यताचे गणित कळणे केवळ अशक्य आहे. शिवाय प्रश्न विचारणे, चिकीत्सा करणे परंपरेला फारसे रूचत नाही कारण परंपरेचे अस्तित्व धोक्यात येते.


हे सर्व करताना असे लक्षात येते जाती सारख्या संकल्पना जनुकीय वारशापेक्षा आचार-विचार, संस्कार, चालीरीती या आधारांवर उभ्या राहील्या आहेत आणि तग धरून आहेत. 


हे सर्व विश्लेषण केल्यावर शुद्धवंश ही कल्पना आणि त्यावर निर्माण केलेले डोलारे किती तकलादू आणि मूर्खपणाचे आहे, हे कळले तरी या हा उद्योग सत्कारणी लागला असे मी म्हणेन. 

   









सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

एका भेटीची गोष्ट ७ फेब्रु० २०२२



एका भेटीची गोष्ट

==========
-राजीव उपाध्ये ७ फेब्रु० २०२२
मला काहीजणांनी आत्मकथा लिही असं सुचवलं आहे. आत्मकथा हे काही साधे सोपे काम नाही. सत्याशी प्रामाणिक राहायचे तर अनेक मर्यादा येतात. रुपकाचा आधार घेतला तर सत्याची तीव्रता कमी होते आणि ते बोथट बनते. शिवाय आपले सत्य पटले नाही की "वेडा ठरवायचे" प्रयत्न होतात, ती डोकेदूखी वेगळीच. उदा० एका जगद्विख्यात आणि मराठी समाजाच्या लाडक्या व्यक्तीच्या घरातील सासू-सुनेच्या वादाचे एकदा माझ्यापुढे प्रदर्शन झाले होते. अशा गोष्टी आत्मकथेत सांगायच्या म्हणजे मोठीच पंचाईतच असते. असो. पण आज अनेक कारणांमुळे राहून गेलेल्या एका प्रसंगाबद्दल लिहायचे आहे. ही आठवण लता मंगेशकरांच्या अंत्यविधीचे प्रसारण बघताना जागी झाली. ती मात्र मी माझ्याबाजूने जशीच्यातशी कोणतेही रुपक न वापरता सांगणार आहे.
 
आज इतक्या वर्षांनी मागे वळून बघितल्यावर विजय भटकर या व्यक्तीबद्दल माझ्या शब्दकोशात एकही चांगला शब्द नाही, असे लक्षात येते. फारच ओढूनताणून सांगायचे झाले तर "नीच" किंवा "हलकट" इतका एकच शब्द या व्यक्तीबद्दल पुरेसा आहे. एखाद्याचे पंख कापायचे आणि उडून दाखव म्हणून सांगायचे ही या माणसाची विकृत खासियत!

माझे संगणक संगीतामधले काम गुंडाळल्यानंतर माझ्याकडे विजय भटकरांनी एका नव्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवली. तो प्रकल्प म्हणजे कुमारकोशाचा प्रकल्प. हा प्रकल्प सीडॅकला मिळावा याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. पण मी परत एकदा हे आह्वान घ्यायचे ठरवले.

नंतर या प्रकल्पाच्या निमित्ताने विश्वकोषाचे तेव्हाचे संपादक कै० मे० पुं० रेगे यांच्याशी नियमित भेटीगाठी चालू झाल्या. नंतर आमचा हळुहळु रॅपो पण तयार झाला. विश्वकोशाच्या संगणकीकरणासाठी सरकार उत्सूक असल्याचे रेगे मला वारंवार सांगत असत.

या प्रकल्पाचा पाठ्पुरावा करत असताना रेगे मला एकदा म्हणाले की, "अरे या शिवसेनेच्या सरकारचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे फार सख्य नाही. तुमची संस्था जर आमच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यानी प्रत्यक्ष बघितली तर सरकार अनुकूल निर्णय जास्त लवकर घेईल असे वाटते. आपण नवलकरांना एकदा सीडॅक दाखवूया!" नवलकर तेव्हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री होते.

आपल्या प्रकल्पासाठी चक्क एक मंत्री संस्थेत येणार याचा मला भयानक आनंद झाला. मी हर्षातिशयाने सगळ्यांना वेड्यासारखा सांगत सुटलो. पण कदाचित माझी ती चूक ठरली. नंतर मला रेग्यांबरोबर पाठपुरावा करताना आणखी एक नवा विषय मिळाला - नवलकर कधी येणार?

नंतर रेग्यांनी मात्र एक भेटीची संभाव्य तारीख मला सांगितली. मी ती परत वेड्यासारखी जाहिर केली. पण अचानक ती भेट रद्द झाली. तसं का झालं असावे याचे माझे काही अंदाज आहेत पण त्याविषयी उघड बोलणे योग्य होणार नाही.

यानंतर मात्र माझ्यावरचा दबाव वाढू लागला- "हे काय झालं? तू तर म्हणत होतास की मंत्री आपल्याला भेट देणार आहेत. कुठे आहेत नवलकर?" या भडिमारामुळे साहजिकच मी पण घायकुतीला आलो. मी माझी अस्वस्थता रेग्यांना बोलून दाखवली, ते मला म्हणाले की "हे बघ मी एकदा तुला प्रमोद नवलकरांकडे घेऊन जाईन. तेव्हा तू त्यांना तुमच्या संस्थेच्यावतीने भेटीचे आमंत्रण दे".

पुढे माझ्या नशीबाने हा योग लवकरच प्रत्यक्षात आला. या प्रकल्पाच्या निमित्ताने मी रेग्यांना एक परिषद करावी असे सुचविले होते. रेग्यांनी या कल्पनेला उत्साहाने उचलून धरले. सुरुवातीला सीडॅक आणि विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या सहयोगाने ही परिषद करायचे ठरले. पण अचानक भटकरांनी यातून काढता पाय घेतला आणि सीडॅक यात सहभागी होऊ शकणार नाही, असे एका मिटींगमध्ये जाहिर केले. मी चमत्कारिक पेचात सापडलो. पण रेग्यांनी माझी अवघड स्थिती ओळखली. ते मला म्हणाले, "हे बघ सीडॅकला सहकार्य शक्य नसले तरी ही परिषद होईलच. आपण तुला एक्स्पर्ट म्हणून बोलवू!".

पुढे ही परिषद ठरली आणि मला रितसर आमंत्रण पण आले, पण आमंत्रण देताना विजया राजाध्यक्षानी मी कुणाबरोबर पेपर लिहायचा हे परस्पर ठरवून (कुणाच्या तरी सांगण्यावरून हे नक्की) मला तसा जणु आदेशच दिला. या आदेशाने माझा फ्युजच उडाला. मी काळा की गोरा हे या बाईनी बघितले नाही आणि ज्या व्यक्तीशी माझा कसलाही संबंध नाही, त्या व्यक्तीबरोबर पेपर लिहायची सक्ती मला संयोजक कसे काय करू शकतात? तसेच या परिषदेचे कळल्यावर एक प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ मी त्यांच्या "मार्गदर्शना"खाली पेपर लिहावा म्हणून दबाव टाकत होते. ("तू ओरिजिनल पेपर लिहू नको" हे त्यांचे वाक्य मी अजून्ही विसरलो नाही.) मी परत रेग्यांकडे जाऊन चक्क थयथयाटच केला. त्यावर ते मला म्हणाले, की "मी काय करायचे ते बघतो. पण तू स्वतंत्र पणे पेपर लिही."

पुढे ही कॉन्फरन्स मुंबईला झाली आणि माझा मराठीतला स्वतंत्र पेपर प्रसिद्ध झाला. राज्य मराठी संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथात तो समाविष्ट पण झाला.

कॉन्फरन्सचे निश्चित झाले तेव्हा रेगे मला म्हणाले की, "तू मुंबईत येशील तेव्हा मी नवलकरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. तुला मी त्यांच्याकडे घेऊन जाईन. मग तू त्यांना सीडॅक भेटीचे आमंत्रण दे. फक्त यावेळी जास्त कुणाला सांगू नको." मी यावेळेला पडत्या फळाची आज्ञा मानून धोका पत्करायचे ठरवले. मी यावेळेला कुणालाच या प्लॅनविषयी सांगितले नाही.

कॉन्फरन्स संपली आणि दूस-या दिवशी ठरल्या प्रमाणे रेगे मला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमधून प्रमोद नवलकरांच्या बंगल्यावर घेऊन गेले. तो माझा लाल दिव्याच्या गाडीमधला १ला आणि शेवटचा प्रवास...
प्रमोद नवलकरांना भेटायला मी अत्यंत साध्या कपड्यात (म्ह० नॉन कॉर्पोरेट वेषात - नो टाय, नो शूज) गेलो होतो. बरोबर कोणतेही अधिकृत निमंत्रण किंवा कागदपत्र नव्हते. प्रमोद नवलकर कचेरीत फोनवर अधिका-यांवर खेकसतच आले. पण रेग्यांना बघितल्यावर त्यांचा पारा उतरला. त्यांनी मी औपचारिक निमंत्रण दिल्यावर कोणताही वेळ न दवडता डायरी बघून एक आठवड्यानंतरचा दिवस सांगितला. मी पण तो मुकाट्याने स्वीकारला. मी लगेचच पुण्याला परतलो.

रेग्यांनी दिलेल्या "हिण्ट"मुळे मी प्रमोद नवलकरांना भेटलो आणि त्यांना संस्थाभेटीचे आमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले आहे या विषयी मात्र कुणाशीही बोलायचे नाही असे ठरवले होते. रेग्यांनीच सांगितले होते की "भेट निश्चित झाली की तुला नवलकरांच्या कार्यालयातून अधिकृतपणे निरोप येईल. मगच तू सगळ्यांना सांग."
झालं. आठवडा पुढे सरकू लागला आणि निरोप येईना तशी माझ्या मनातली उत्कंठा, दड्पण आणि भीति वाढायला लागली. शेवटी नियोजित दिवसाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता मला पुणे जिल्हापरिषद कार्यालयातून फोन आला की "उद्या ठरल्याप्रमाणे मंत्रीमहोदय तुमच्या संस्थेला भेट देतील. तयारीत राहा."
मी फोन आदळला पण हर्षातिशयाने. तडक भटकरांचे ऑफिस गाठले आणि त्यांना सांगितले. त्यांचा चेहेरा खाड्कन उतरला आणि बघण्यासारखा झाला होता. ते माझ्या नजरेला नजर देऊ शकले नाहीत. त्यांनी माझ्याकडे न बघता मला विचारले,

"Who is going to receive him at the airport?"

मी त्यांच्याकडे प्रतिप्रश्नार्थक नजरेने बघितले. मनातून मला स्वत:ला जायला आवडले असते, पण भीडेखातर गप्प बसलो. कोणत्याही सरकारी संस्थेत यशस्वी व्हायचे म्हणजे पुढे-पुढे करता आले पाहिजे आणि आपण केलेल्या कष्टांचे श्रेय आपण न घेता इतर श्रेयलंपटाना देता आले पाहिजे. मी तिथेच मार खायचो.

"Coordinate it with Mr. Parelkar". भटकरांनी मला फर्ममावले. परेलकर म्हणून एक गृहस्थ आमच्या संस्थेचे तेव्हा रजिस्ट्रार होते.

मी परेलकरांकडे गेलो तेव्हा त्यांचा पण बातमीवर विश्वास बसला नाही. त्यांनी तर मी विमानतळावर जाऊ नये असे स्पष्टच सांगितले. आता मात्र मी या हलकटपणामुळे मनातून खूप चिडलो. मी तडक रेग्यांना फोन लावला.
रेग्यांनी मला अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की "मंत्र्यांच्या स्वागताला तूही जाऊ नको आणि मी पण जात नाही. माझा वासुदेव जाईल". वासुदेव म्हणजे वासुदेव जोशी, रेग्यांचे विश्वकोश निर्मिती मंडळातील स्वीय-सचिव.
नवलकरांची भेट पार पडली पण विजय भटकरांच्या नाराजीची छाया त्यावर स्पष्ट पडलेली होती. या भेटीत नवलकरांनी उत्साह भरपूर दाखवला पण कुमारकोश प्रकल्पाच्या मंजुरीबद्दल नवलकरांनी एक चकार शब्द काढला नाही. मंजुरीची लढाई अजुनही बाकी होती. मंत्र्यांचे स्वागत करायला स्वत: न जाता स्वत:च्या पी०ए० ला पाठवणा-या रेग्यांची ताकद आणि भटकरांचा हलकटपणा मला परत एकदा अनुभवायचे योग शिल्लक होते. पण त्या विषयी नंतर कधीतरी...
May be an image of 3 people and people standing
Bharat Mumbaikar, Padmakar Pandit and 2 others