सोमवार, १६ जानेवारी, २०२३

उर्फी जावेद आणि तिचे अंगप्रदर्शन

उर्फी जावेदच्या (त्या अगोदर दीपिका पदुकोण, रणवीर यांच्या "स्वैराचारा"वर जी धूळ उडवली जात आहे. त्याबद्दल लिहावं की नाही त्याबद्दल मला निश्चित ठरवता येत नव्हतं. 

उर्फी जावेदच्या मागे लागलेल्या चित्रा वाघ यांनी घेतलेले मुख्य आक्षेप असे आहेत (आधार त्यांच्या मुलाखतींचे विविध व्हिडीओ)

० सार्वजनिक ठिकाणी उत्तानपणा ही विकृती

० निष्पाप मुली विकृतांच्या शिकार

० फॅशनच्या नावाखाली कमी कपडे इ० इ० 

० शिवाजी महाराजांच्या राज्यात हे काय चालले आहे


आता वरील चार पैकी प्रथम तिन्ही मुद्द्यांचा लसावि काढला तर त्यात उर्फीच्या अर्धनग्नतेला श्रीमती वाघ यांचा आक्षेप आहे असे वाटते. या आक्षेपातले तथ्य निश्चित करण्यासाठी नग्नतेबद्दल काही गोष्टी तपासूया.

 

अलिकडेच काही वर्षांपूर्वी सध्याच्या सरकारने पोर्न वेबसाइटवर एक धडक मोहिम चालवून ते बंद करायचा धाडसी निर्णय घेतला. पण ते बंद झाल्याने पोर्नोग्राफी बंद झाली नाही की या देशातली उपलब्धता कमी झाली नाही. उद्या उर्फी जावेदला तुरूंगात टाकले तरी लैंगिक भावनांना उत्तेजन देणारे असंख्य स्रोत तसेच चालू राहणार आहेत. निर्भयाच्या आरोपींना फाशी देऊन बलात्कारांमध्ये यत्किंचितही फरक पडलेला नाही. 


कोणत्याही वर्तनाच्या योग्यायोग्यतेची चिकीत्सा मर्यादित पटलावर न होता व्यापक पटलावर होणे हे कधीही श्रेयस्कर असते. उदा० एखाद्या औषधाचा परिणाम तपासण्यासाठी अभ्यासलेला समूदाय (नमूना) जर लहान असेल तर निष्कर्ष एकांगी आणि चुकीचे निघतील. पण जर ते मोठा समूदाय  घेऊन तपासले तर निष्कर्ष स्वीकारार्ह असण्याची शक्यता असते. 


अंगप्रदर्शन, नग्नता (वि० सामाजिक नग्नता) हे वर्तन "योग्य किंवा अयोग्य" याचा निर्णय करायचा झाला तर संदर्भपटल व्यापक करण्यासाठी आपल्यापेक्षा प्रगत (आर्थिक, वैचारिक इ० किंवा ज्यांच्या चलनाचे मूल्य रुपयापेक्षा जास्त आहे असे देश) आणि अप्रगत अशा समाजात यासंबंधी कसे बघितले जाते हे तपासणे योग्य ठरेल आणि एक मोठ्ठी गंमत लक्षात येईल...


प्रथम आपल्यापेक्षा जगभरच्या अप्रगत समाजाचा विचार करू या. इथे अप्रगत अवस्थेचे वर सांगितलेले निकष लावले  तर आदिवासी आणि भटके इ० मनुष्य समुदायात नग्नता/अंगप्रदर्शन हे फारसे निषिद्ध नसल्याचे लक्षात येते. भारतात माझ्या लहानपणी एका विशिष्ट कष्टकरी वर्गातल्या स्त्रिया छाती फक्त पदराने झाकत असत. त्यांच्यात पोलकं वापरण्याची पद्धत नव्हती. या अप्रगत समाजातील नग्नतेने त्यातील स्रियांवर कुणी अत्याचार केल्याचे कधीही कानावर आलेले नाही. 


आता आपल्यापेक्षा प्रगत समाजात नग्नता/अंगप्रदर्शन यासाठी थोडे कष्ट घेतले तर लक्षात येईल की असंख्य देशात सामाजिक नग्नता ही अजूनही पूर्णपणे सामान्य मानली जाते. जगात सामाजिक नग्नतेला केंद्रस्थानी ठेऊन अनेक उत्सव साजरे केले जातात. पार जपान पासून (कानामारा मात्सूरी) ते ब्राझिल मधल्या कार्निव्हल पर्यंत उत्सवी नग्नतेला समाजमान्यता आहे. फ्रान्समध्ये कॅप द’आग्द हे गाव नग्नपंढरी म्हणून ओळखले जाते. ब्रिटनमध्ये सामाजिक नग्नतेला पार्लंमेंटने कायदा मंजूर करून मान्यता दिली. स्पेन्सर ट्युनिक नावाचा एक प्रसिद्ध फोटोग्राफर सामुदायिक नग्नतेच्या फोटोग्राफीसाठी प्रसिद्ध आहे. त्यांच्या आयकोनिक फोटोग्राफीत सहभागी होण्यासाठी जगभरचे लोक प्रतिक्षा यादीत ताटकळत असतात.  ऑस्ट्रेलियाने नुकताच त्याच्यासाठी आपला कायदा बदलला असे वाचनात आले. चित्रपटातील पडद्यावरील नग्नता आपल्या परिचयाची आहे, जी आपण अजूनही पचवू शकलेलो नाही. पण युरोपात नाटकीय (थिएट्रीकल) नग्नता सर्रास आणि सामान्य आहे. स्वीडन आणि स्वित्झर्लंड सारख्या देशात भर गर्दीच्या चौकात, ज्यात सर्वजण पूर्ण नग्न आहेत असे नृत्यप्रयोग दिवसाढवळ्या होतात. याची असंख्य उदा० जालावर उपलब्ध आहेत.   आपल्या देशात मात्र धर्मप्रणित नग्नतेला (आणि ती पण पुरुषांच्या) "मान्यता" आहे. खरं तर ही एकप्रकारची लबाडी आहे पण असो.

ही मी कलात्मक नग्नतेशी संबंधित अतिशय मोजकी आणि माफक उदाहरणे इथे अशासाठी दिली याचे कारण असे की अशा व्यापक पार्श्वभूमीवर नग्नता आणि अंगप्रदर्शन यातील योग्यायोग्यता तपासताना आपला भारतीयांचा भोंगळपणा/लबाडी/दूटप्पीपणा आपोआप उघडा पडतो. जगातील एक मोठा वर्ग नग्नतेने उत्तेजित न होता अत्यंत हेल्दी नजरेने जर बघत असेल तर  मग इंचभर उघडे अंग बघून उत्तेजित होणारे आपण भारतीय लोक "विकृत" मानसिकतेचे ठरतो.  या सर्वाच्या मूळाशी स्त्रिने "मापात" राहावे, ही प्रवृत्ती असल्याचे मान्य करावे लागेल.


लेखाचा समारोप करण्यापूर्वी चित्रा वाघांच्या युक्तीवादातील पोकळपणा उघडकीस आणणे आवश्यक आहे - एक म्हणजे त्यांनी शिवाजी महाराजांना उगाच मधे ओढले आहे असे वाटते. कोणतीही ऐतिहासिक व्यक्ती आज परत जन्मली तर ती व्यापक विचार करून आजच्या जीवनशैलीशी सुसंगत प्रागतिक मूल्ये स्वीकारेल की जुन्या मूल्यांना चिकटून बसेल? दूसरे असे की समजा उर्फी जावेदने आपल्या वर्तनात जर बदल केला आणि स्त्रियांवरील अत्याचार जर चालूच राहीले तर चित्रा वाघ आपली भूमिका बदलणार का? 


अर्थात मला याचे संयमित उत्तर मिळेल याची अपेक्षा नाही कारण *आक्रस्ताळेपणा आणि निरर्थक थयथयाट* हा सध्याच्या भारतीय समाजाचा स्थायीभाव बनला आहे.

शुक्रवार, १७ जून, २०२२

गोत्राच्या मूर्खपणा विषयी...

 गोत्राच्या मूर्खपणा विषयी...

=================


-- राजीव उपाध्ये (जून २०२२)


(टीप - या लेखात काही त्रुटी आधळल्यास अवश्य लक्षात आणून द्याव्यात. मी माझ्या जनुकशास्त्रातील तज्ञमित्राना हा लेख दाखवला आहेच. त्यांचा स्पष्ट विरोध नसल्याने त्यांची "मूकसंमती" गृहित धरली आहे. :) ) 


गोत्र या संकल्पनेचा संबंध अनेक लोकांना जनुकशास्त्राशी लावायला फार आवडतो. "सापिण्ड्य", शुद्धवंश या कल्पनांमुळे लोक असं करायला प्रवृत्त होतात. पण ही कल्पना साध्यासोप्या गणिती तर्कावर तपासायची ठरवली तर पत्त्यांच्या मनो-यासारखी कोसळून पडते. हे कसे ते आता बघू या!


अ ही एक व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीचे गोत्र क्ष आहे, असं आपण मानू या! 


अ१ अ२ अ३ अ४ अ५ अ६ अ७ अ८ अ९ अ१० अशी अ ला त्याच्या/तिच्याच लिंगाची मुले झाली असे मानू (म्हणजे अ पुरुष असेल तर अ०, अ१, अ२, अ३ ... पण पुरुषच आहेत). प्रत्यक्षात असे वंशसातत्य राहाण्यासाठी, पुढील प्रत्येक पिढीतील वंशजाचे लग्न होऊन त्यांना त्याच लिंगाचे एक तरी मूल होणे अपेक्षित आहे. पण ही शक्यता अनेक कारणांनी प्रत्यक्षात कमी होते, हे सामान्य बुद्धीच्या व्यक्तीला कळायची अडचण नको. असो.


आता अ ही व्यक्ती मूळपुरूष किंवा मूळस्त्री मानली तर पुढच्या पिढीमध्ये "अ"चे जनुक दर पिढीगणिक निम्म्याने कमी होत जाणार (गणिताच्या सोईसाठी प्रत्येक व्यक्तीमध्ये आई कडून अर्धा आणि पित्याकडून अर्धा जनुकीय वारसा येतो. प्रत्यक्षात आईकडून जनुकीय वारसा जास्त येतो). म्हणजेच अ१ मध्ये "अ"चे  ५०% जनुक येणार, तर पुढे अ२ मध्ये "अ"चे २५% जनुक येणार तर पुढील पिढ्यामध्ये अ चा जनुकीय वारसा १२.५% (अ३), ६.२५% (अ४), ३.१२५% (अ५), १.५६२५% (अ६), ०.७८१२५% (अ७), ०.३९०६२५%(अ८), ०.१९५% (अ९), ०.०९७% (अ१०)  असा कमी कमी होत जातो.


या साध्या गणितावरून असे दिसते की साधारणपणे क्ष या गोत्राचा जनुकीय अंश दहाव्या पिढीत फक्त ०.०९७% इतकाच असतो. आता अ ही व्यक्ती आणि तिचे वंशज जर युद्ध, व्यापार किंवा व्यवसाय यासाठी स्थानांतर करत  राहीली तर "अ"च्या वंशजांमध्ये इतर ठिकाणचे जनुक मिसळत जातात. हे मिसळलेल्या जनुकांचे एकूण प्रमाण १० व्या पिढीमध्ये १०० - ०.०९७ म्हणजे ९९.९०३%  इतके असते. 


आता धर्मशास्त्रानुसार पुरुषाच्या ७ व्या पिढीमध्ये (मूळ पुरुषाचा जनुकीय अंश ०.७८% असताना) आणि स्त्रिच्या ५ व्या पिढीत (मूळ स्त्रिचा जनुकीय अंश ३.१२५% असताना) सापिण्ड्य संपते किंवा मूळ गोत्राचा रक्तसंबंध संपतो. 


आता इथे काही विचित्र विसंगती डोके वर काढतात - मातेकडील सापिण्ड्य संपते तेव्हा मातेकडील जनुकीय वारसा पुरुषाकडील सापिण्ड्य संपताना असणा-या जनुकीय वारशाच्या जवळजवळ चौपट असतो. जनुकशास्त्र शास्त्रात dominant genes कल्पना आहे. आता बलिष्ठजनुक जर मातृवंशाकडचे असतील तर मातेच गोत्र बलिष्ठ मानायला हवे पण  धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही. तसेच प्रत्येक पिढी वयाच्या २० ते ३० व्या वयादरम्यान प्रजोत्पादन करते असे मानले तर साधारण २५० वर्षांनी म्हणजे साधारण आठव्या ते दहाव्या पिढीतील व्यक्ती स्थानांतरामुळे तसेच सामाजिक स्थित्यंतरांमुळे पूर्णपणे वेगळी असते! 


आता आणखी काही मजेशीर गोष्टी ...


१. माणसाच्या एका पेशीच्या केंद्रकातील (nucleus) मधले डि०एन०ए पूर्ण उलगडले तर त्याची लांबी २ मी० इतकी भरते. एका व्यक्तीच्या शरीरातील सर्व पेशीमधील सर्व डि०एन०ए पूर्ण उलगडले तर सूर्य ते पृथ्वी हे अंतर ३०० वेळा  कापता येईल! (https://www.nature.com/scitable/topicpage/dna-packaging-nucleosomes-and-chromatin-310/)


पण एका पेशीत १० पिढीतील पूर्वजाचा अंश शोधायचा झाला तर त्याची लांबी २मी गुणिले ०.०९७ म्हणजे १९.४ सेमी इतकी भरते. ही २३ गुणसूत्रांच्या जोड्यामध्ये विभागल्यावर ८.४३ मि.मि. इतका  १० व्या पिढीतील पूर्वजाचा वाटा एका पेशीमध्ये प्रत्येक गुणसूत्रात असतो. 


आता दहाव्या पिढीतील पूर्वजांची एकूण संख्या किती हे शोधू या!  प्रत्येक व्यक्तीला दोन जन्मदाते असतात. एकएक  पिढी मागे गेले त्याची संख्या पिढीगणिक दूप्पट होत जाते. 


आईवडील २‌**१ (दोनाचा १ला घात) 

(२ x २)    आजीआजोबा २‌**२ (दोनाचा २रा घात) 

(२ x २) x २ पणजी-पणजोबा २‌**३ (दोनाचा ३रा घात) 

((२ x २) x २) x २ खापर पणजी-पणजोबा २‌**४ (दोनाचा ४था घात) 


ही शृंखला दहा पिढ्या मागे नेल्यास २ चा १० वा घात म्हणजे १०व्या पिढीतील १०२४ व्यक्ती  (५१२ स्त्रिया आणि ५१२ पुरुष) आपल्या जन्मास कारणीभूत ठरतात. म्हणजे ख-या अर्थाने सापिंड्य टाळायचे असेल तर या १०२४ जणांची गोत्रे तपासून ती गोत्रे टाळायला हवीत. आता काही उपजातींमध्ये गोत्र संख्या ही मर्यादित आहे. उदा० चित्पावनांची मूळ गोत्रे १४ आहेत, तर क-हाड्यांची गोत्रे २४ आहेत (देशस्थांच्या एकूण गोत्र संख्येविषयी मला माहिती नाही कारण त्यांची गोत्रावळी कुणी प्रसिद्ध केलेली माझ्या पहाण्यात नाही. एखाद्या देशस्थाने माझे गोत्र अमूक असे सांगितले तर कशाशी तपासून बघायचे, ही समस्या निर्माण होते). म्हणजे जाती प्रेमाच्या हट्टापायी १०व्या पिढीतील या १०२४ व्यक्तीनी जर जातीमध्येच लग्न करायचे ठरवले तर "सापिंड्य" (आणि तदानुषंगिक संततीदोष) काही झाले तरी टाळता येणार नाही. तसेच १०२४ व्यक्ती मध्ये ज्या गोत्राची frequency सर्वात जास्त येईल ते गोत्र सर्वात जास्त dominant आणि प्रभावी ठरेल. पण धर्मशास्त्राला हे विज्ञान कळत नाही. 


कोणत्याही भटजीबुवाना हे वंशसात्यताचे गणित कळणे केवळ अशक्य आहे. शिवाय प्रश्न विचारणे, चिकीत्सा करणे परंपरेला फारसे रूचत नाही कारण परंपरेचे अस्तित्व धोक्यात येते.


हे सर्व करताना असे लक्षात येते जाती सारख्या संकल्पना जनुकीय वारशापेक्षा आचार-विचार, संस्कार, चालीरीती या आधारांवर उभ्या राहील्या आहेत आणि तग धरून आहेत. 


हे सर्व विश्लेषण केल्यावर शुद्धवंश ही कल्पना आणि त्यावर निर्माण केलेले डोलारे किती तकलादू आणि मूर्खपणाचे आहे, हे कळले तरी या हा उद्योग सत्कारणी लागला असे मी म्हणेन. 

   









सोमवार, ७ फेब्रुवारी, २०२२

एका भेटीची गोष्ट ७ फेब्रु० २०२२



एका भेटीची गोष्ट

==========
-राजीव उपाध्ये ७ फेब्रु० २०२२
मला काहीजणांनी आत्मकथा लिही असं सुचवलं आहे. आत्मकथा हे काही साधे सोपे काम नाही. सत्याशी प्रामाणिक राहायचे तर अनेक मर्यादा येतात. रुपकाचा आधार घेतला तर सत्याची तीव्रता कमी होते आणि ते बोथट बनते. शिवाय आपले सत्य पटले नाही की "वेडा ठरवायचे" प्रयत्न होतात, ती डोकेदूखी वेगळीच. उदा० एका जगद्विख्यात आणि मराठी समाजाच्या लाडक्या व्यक्तीच्या घरातील सासू-सुनेच्या वादाचे एकदा माझ्यापुढे प्रदर्शन झाले होते. अशा गोष्टी आत्मकथेत सांगायच्या म्हणजे मोठीच पंचाईतच असते. असो. पण आज अनेक कारणांमुळे राहून गेलेल्या एका प्रसंगाबद्दल लिहायचे आहे. ही आठवण लता मंगेशकरांच्या अंत्यविधीचे प्रसारण बघताना जागी झाली. ती मात्र मी माझ्याबाजूने जशीच्यातशी कोणतेही रुपक न वापरता सांगणार आहे.
 
आज इतक्या वर्षांनी मागे वळून बघितल्यावर विजय भटकर या व्यक्तीबद्दल माझ्या शब्दकोशात एकही चांगला शब्द नाही, असे लक्षात येते. फारच ओढूनताणून सांगायचे झाले तर "नीच" किंवा "हलकट" इतका एकच शब्द या व्यक्तीबद्दल पुरेसा आहे. एखाद्याचे पंख कापायचे आणि उडून दाखव म्हणून सांगायचे ही या माणसाची विकृत खासियत!

माझे संगणक संगीतामधले काम गुंडाळल्यानंतर माझ्याकडे विजय भटकरांनी एका नव्या प्रकल्पाची जबाबदारी सोपवली. तो प्रकल्प म्हणजे कुमारकोशाचा प्रकल्प. हा प्रकल्प सीडॅकला मिळावा याची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. पण मी परत एकदा हे आह्वान घ्यायचे ठरवले.

नंतर या प्रकल्पाच्या निमित्ताने विश्वकोषाचे तेव्हाचे संपादक कै० मे० पुं० रेगे यांच्याशी नियमित भेटीगाठी चालू झाल्या. नंतर आमचा हळुहळु रॅपो पण तयार झाला. विश्वकोशाच्या संगणकीकरणासाठी सरकार उत्सूक असल्याचे रेगे मला वारंवार सांगत असत.

या प्रकल्पाचा पाठ्पुरावा करत असताना रेगे मला एकदा म्हणाले की, "अरे या शिवसेनेच्या सरकारचे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचे फार सख्य नाही. तुमची संस्था जर आमच्या सांस्कृतिक खात्याच्या मंत्र्यानी प्रत्यक्ष बघितली तर सरकार अनुकूल निर्णय जास्त लवकर घेईल असे वाटते. आपण नवलकरांना एकदा सीडॅक दाखवूया!" नवलकर तेव्हा महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री होते.

आपल्या प्रकल्पासाठी चक्क एक मंत्री संस्थेत येणार याचा मला भयानक आनंद झाला. मी हर्षातिशयाने सगळ्यांना वेड्यासारखा सांगत सुटलो. पण कदाचित माझी ती चूक ठरली. नंतर मला रेग्यांबरोबर पाठपुरावा करताना आणखी एक नवा विषय मिळाला - नवलकर कधी येणार?

नंतर रेग्यांनी मात्र एक भेटीची संभाव्य तारीख मला सांगितली. मी ती परत वेड्यासारखी जाहिर केली. पण अचानक ती भेट रद्द झाली. तसं का झालं असावे याचे माझे काही अंदाज आहेत पण त्याविषयी उघड बोलणे योग्य होणार नाही.

यानंतर मात्र माझ्यावरचा दबाव वाढू लागला- "हे काय झालं? तू तर म्हणत होतास की मंत्री आपल्याला भेट देणार आहेत. कुठे आहेत नवलकर?" या भडिमारामुळे साहजिकच मी पण घायकुतीला आलो. मी माझी अस्वस्थता रेग्यांना बोलून दाखवली, ते मला म्हणाले की "हे बघ मी एकदा तुला प्रमोद नवलकरांकडे घेऊन जाईन. तेव्हा तू त्यांना तुमच्या संस्थेच्यावतीने भेटीचे आमंत्रण दे".

पुढे माझ्या नशीबाने हा योग लवकरच प्रत्यक्षात आला. या प्रकल्पाच्या निमित्ताने मी रेग्यांना एक परिषद करावी असे सुचविले होते. रेग्यांनी या कल्पनेला उत्साहाने उचलून धरले. सुरुवातीला सीडॅक आणि विश्वकोश निर्मिती मंडळ यांच्या सहयोगाने ही परिषद करायचे ठरले. पण अचानक भटकरांनी यातून काढता पाय घेतला आणि सीडॅक यात सहभागी होऊ शकणार नाही, असे एका मिटींगमध्ये जाहिर केले. मी चमत्कारिक पेचात सापडलो. पण रेग्यांनी माझी अवघड स्थिती ओळखली. ते मला म्हणाले, "हे बघ सीडॅकला सहकार्य शक्य नसले तरी ही परिषद होईलच. आपण तुला एक्स्पर्ट म्हणून बोलवू!".

पुढे ही परिषद ठरली आणि मला रितसर आमंत्रण पण आले, पण आमंत्रण देताना विजया राजाध्यक्षानी मी कुणाबरोबर पेपर लिहायचा हे परस्पर ठरवून (कुणाच्या तरी सांगण्यावरून हे नक्की) मला तसा जणु आदेशच दिला. या आदेशाने माझा फ्युजच उडाला. मी काळा की गोरा हे या बाईनी बघितले नाही आणि ज्या व्यक्तीशी माझा कसलाही संबंध नाही, त्या व्यक्तीबरोबर पेपर लिहायची सक्ती मला संयोजक कसे काय करू शकतात? तसेच या परिषदेचे कळल्यावर एक प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञ मी त्यांच्या "मार्गदर्शना"खाली पेपर लिहावा म्हणून दबाव टाकत होते. ("तू ओरिजिनल पेपर लिहू नको" हे त्यांचे वाक्य मी अजून्ही विसरलो नाही.) मी परत रेग्यांकडे जाऊन चक्क थयथयाटच केला. त्यावर ते मला म्हणाले, की "मी काय करायचे ते बघतो. पण तू स्वतंत्र पणे पेपर लिही."

पुढे ही कॉन्फरन्स मुंबईला झाली आणि माझा मराठीतला स्वतंत्र पेपर प्रसिद्ध झाला. राज्य मराठी संस्थेने प्रकाशित केलेल्या ग्रंथात तो समाविष्ट पण झाला.

कॉन्फरन्सचे निश्चित झाले तेव्हा रेगे मला म्हणाले की, "तू मुंबईत येशील तेव्हा मी नवलकरांची अपॉइंटमेंट घेऊन ठेवतो. तुला मी त्यांच्याकडे घेऊन जाईन. मग तू त्यांना सीडॅक भेटीचे आमंत्रण दे. फक्त यावेळी जास्त कुणाला सांगू नको." मी यावेळेला पडत्या फळाची आज्ञा मानून धोका पत्करायचे ठरवले. मी यावेळेला कुणालाच या प्लॅनविषयी सांगितले नाही.

कॉन्फरन्स संपली आणि दूस-या दिवशी ठरल्या प्रमाणे रेगे मला त्यांच्या लाल दिव्याच्या गाडीमधून प्रमोद नवलकरांच्या बंगल्यावर घेऊन गेले. तो माझा लाल दिव्याच्या गाडीमधला १ला आणि शेवटचा प्रवास...
प्रमोद नवलकरांना भेटायला मी अत्यंत साध्या कपड्यात (म्ह० नॉन कॉर्पोरेट वेषात - नो टाय, नो शूज) गेलो होतो. बरोबर कोणतेही अधिकृत निमंत्रण किंवा कागदपत्र नव्हते. प्रमोद नवलकर कचेरीत फोनवर अधिका-यांवर खेकसतच आले. पण रेग्यांना बघितल्यावर त्यांचा पारा उतरला. त्यांनी मी औपचारिक निमंत्रण दिल्यावर कोणताही वेळ न दवडता डायरी बघून एक आठवड्यानंतरचा दिवस सांगितला. मी पण तो मुकाट्याने स्वीकारला. मी लगेचच पुण्याला परतलो.

रेग्यांनी दिलेल्या "हिण्ट"मुळे मी प्रमोद नवलकरांना भेटलो आणि त्यांना संस्थाभेटीचे आमंत्रण दिले व त्यांनी ते स्वीकारले आहे या विषयी मात्र कुणाशीही बोलायचे नाही असे ठरवले होते. रेग्यांनीच सांगितले होते की "भेट निश्चित झाली की तुला नवलकरांच्या कार्यालयातून अधिकृतपणे निरोप येईल. मगच तू सगळ्यांना सांग."
झालं. आठवडा पुढे सरकू लागला आणि निरोप येईना तशी माझ्या मनातली उत्कंठा, दड्पण आणि भीति वाढायला लागली. शेवटी नियोजित दिवसाच्या आदल्या दिवशी संध्याकाळी ४ वाजता मला पुणे जिल्हापरिषद कार्यालयातून फोन आला की "उद्या ठरल्याप्रमाणे मंत्रीमहोदय तुमच्या संस्थेला भेट देतील. तयारीत राहा."
मी फोन आदळला पण हर्षातिशयाने. तडक भटकरांचे ऑफिस गाठले आणि त्यांना सांगितले. त्यांचा चेहेरा खाड्कन उतरला आणि बघण्यासारखा झाला होता. ते माझ्या नजरेला नजर देऊ शकले नाहीत. त्यांनी माझ्याकडे न बघता मला विचारले,

"Who is going to receive him at the airport?"

मी त्यांच्याकडे प्रतिप्रश्नार्थक नजरेने बघितले. मनातून मला स्वत:ला जायला आवडले असते, पण भीडेखातर गप्प बसलो. कोणत्याही सरकारी संस्थेत यशस्वी व्हायचे म्हणजे पुढे-पुढे करता आले पाहिजे आणि आपण केलेल्या कष्टांचे श्रेय आपण न घेता इतर श्रेयलंपटाना देता आले पाहिजे. मी तिथेच मार खायचो.

"Coordinate it with Mr. Parelkar". भटकरांनी मला फर्ममावले. परेलकर म्हणून एक गृहस्थ आमच्या संस्थेचे तेव्हा रजिस्ट्रार होते.

मी परेलकरांकडे गेलो तेव्हा त्यांचा पण बातमीवर विश्वास बसला नाही. त्यांनी तर मी विमानतळावर जाऊ नये असे स्पष्टच सांगितले. आता मात्र मी या हलकटपणामुळे मनातून खूप चिडलो. मी तडक रेग्यांना फोन लावला.
रेग्यांनी मला अत्यंत स्पष्ट शब्दात सांगितले की "मंत्र्यांच्या स्वागताला तूही जाऊ नको आणि मी पण जात नाही. माझा वासुदेव जाईल". वासुदेव म्हणजे वासुदेव जोशी, रेग्यांचे विश्वकोश निर्मिती मंडळातील स्वीय-सचिव.
नवलकरांची भेट पार पडली पण विजय भटकरांच्या नाराजीची छाया त्यावर स्पष्ट पडलेली होती. या भेटीत नवलकरांनी उत्साह भरपूर दाखवला पण कुमारकोश प्रकल्पाच्या मंजुरीबद्दल नवलकरांनी एक चकार शब्द काढला नाही. मंजुरीची लढाई अजुनही बाकी होती. मंत्र्यांचे स्वागत करायला स्वत: न जाता स्वत:च्या पी०ए० ला पाठवणा-या रेग्यांची ताकद आणि भटकरांचा हलकटपणा मला परत एकदा अनुभवायचे योग शिल्लक होते. पण त्या विषयी नंतर कधीतरी...
May be an image of 3 people and people standing
Bharat Mumbaikar, Padmakar Pandit and 2 others

सोमवार, २५ जानेवारी, २०२१

कृष्णाला माफ करा...

कृष्णाला माफ करा...

==============

आत्ताच तूनळीवर एक "प्रेरणादायी व्हिडीओ" बघितला. स्वप्ने बघून ती सत्यात उतरवण्यासाठी केलेल्या ढोर मेहनतीची ती एक कहाणी होती. स्वप्ने सत्यात आणायला कष्ट महत्त्वाचे आहेत, असा काहीसा संदेश या व्हिडीओमधून दिला गेला. कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे, असे काहीसे तत्त्वज्ञान अशा त-हेच्या प्रेरणादायी कथनातून सतत दिले जाते.  पण यशामध्ये कष्टांशिवाय काही  महत्त्वाच्या घटकांचा समावेश होतो. हे घटक भ० गी० मध्ये शेवटच्या अध्यायात एका श्लोकात आहेत. माझ्यामते आणि आधुनिक जनुकशास्त्राच्या संदर्भात हा श्लोक अत्यंत महत्त्वाचा आहे. तो असा -

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्। विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्।।१८.१४॥ 

अर्थ - योग्य जागा (पोषक वातावरण), प्रयत्न करणारा स्वत:, विविध साधने (रिसोर्सेस),  कष्ट आणि सर्वात शेवटी दैव किंवा नशीब हे यशासाठी आवश्यक घटक आहेत. 

आधुनिक जनुकशास्त्र तुमच्या क्षमता विकसित होण्यासाठी पोषक वातावरणाची, ताणमुक्त वातावरणाची गरज अधोरेखित करते. दूर्दैवाने भारतीय समाजाने, तसेच गीतेला डोक्यावर घेणा-या धर्मगुरूंनी या सर्वात महत्त्वाच्या श्लोकाला "फाट्यावर मारले" आहे.

अलिकडेच माझा आणि जनुकशास्त्राचा ब-यापैकी परिचय झाला. मला अजुनही खगोलशास्त्राऐवजी जनुकशास्त्र लोकाभिमुख झाले तर मानवाचे जास्त कल्याण होईल याची मला खात्री आहे. या अभ्यासाच्या पार्श्वभूमीवर मी यशाचे वरील लोकप्रिय तत्त्वज्ञान तपासले तेव्हा "कष्ट उपसले तर यश तुमचेच आहे"  हे धादांत खोटे आहे, असे लक्षात येते. 

कारण साधे आहे, 

अपार कष्ट = अपार ताण 

अपार ताण = वाढलेली कॉर्टीसॉल पातळी

वाढलेली कॉर्टीसॉल पातळी = जनुकीय आणि पेशीय बदल व त्यातून शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी   

शारीरिक आणि मानसिक प्रकृतीची हानी = अनारोग्य, वैफल्य इ० इ०

याला एक किंचित अपवाद आहे - तो म्हणजे अपार कष्टातून तुम्हाला जर आनंद मिळत असेल किंवा मेहनतीचा कैफ चढत असेल तर तुमचा संघर्ष थोडाफार सुलभ होतो.

अपार कष्ट करून धनुर्विद्या मिळवलेल्या एकलव्याला अंगठा गमवावा लागला, हे लक्षात ठेवा. हजार सूर्यांच्या तेजाची बरोबरी करणा-या कृष्णाचे जीवशास्त्राचे/जनुकशास्त्राचे ज्ञान शून्यच होतं! तेव्हा फळाची अपेक्षा ठेऊ नको म्हणून सांगणा-या कृष्णाला माफ करा...

शनिवार, १६ जानेवारी, २०२१

विश्वास


© राजीव उपाध्ये, 9 जाने० २०२१
...पण तरीही राजा विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. त्याने ते प्रेत ओढून आपल्या खांद्यावर टाकले आणि स्मशानाचा रस्ता चालू लागला. तेव्हा प्रेतामधला वेताळ मानवी वाणीने बोलू लागला आणि म्हणाला, "राजा तुझ्या जिद्दीचे मला खूप कौतूक वाटते. तुझे श्रम हलके व्हावे म्हणून मी तुला एक गोष्ट सांगतो,
"फार पूर्वी दक्षिणेत महिलारोप्य नावाचे नगर होते. या नगरात अग्रसेन नावाचा एक धनाढ्य व्यापारी एका टोलेजंग हवेलीमध्ये राहात असे. अग्रसेनाचा व्यापार मोठा असल्याने घरात नोकरचाकरांचा राबता मोठ्या प्रमाणावर होता. लक्ष्मी प्रसन्न असली तरी अग्रसेनाच्या वागण्याबोलण्यात एकप्रकारची घमेंड आणि तुच्छता होती. यामुळे अनेकदा लोक दूखावले जायचे, पण त्याच्या वैभवामुळे त्याला कुणाची बोलायची हिम्मत होत नसे. अग्रसेनाला अनेक शौक होते. त्याने उत्तमोत्तम जातींचे श्वान पाळले होते. या श्वानांना तो वेगवेगळ्या करामती शिकवत असे. हा त्याचा आवडता छंदच बनला होता. अग्रसेनाचे श्वान त्याच्यावर जेव्हढे प्रेम करत असत, तितके त्याचे नोकर मात्र प्रेम करत नसत."
"अग्रसेनाच्या हवेलीबाहेर एक चिंचेचे झाड होते. त्या झाडावर अनेक पिशाच्चे वास्तव्याला होती. पिशाच्चे असूनही त्यांच्यात भांडणे होत नसत (कारण त्यांच्यात जातपात, धर्म, आदर्श नव्हते). त्यात तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण नावाच्या दोन पिशाच्चांची घनिष्ट मैत्री होती. या दोन्ही पिशाच्चांचे अग्रसेनाच्या हवेलीत चालणा-या घडामोडींचे निरीक्षण करण्याचा परिपाठ असे.
असेच एकदा तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण ही पिशाच्चे अग्रसेनाच्या हवेलीचे निरीक्षण करीत बसली होती. तेव्हा अग्रसेन आपल्या नोकरांबरोबर श्वानक्रीडेमध्ये रममाण झाला असताना, एका नोकराकडून श्वानाला अंघोळ घालताना काहीतरी क्षुल्लक चूक झाली आणि अग्रसेनाच्या आवडत्या श्वानाला इजा झाली. अग्रसेनाला कोप अनावर झाला आणि त्याने नोकराला ताबडतोब कामावरून काढून टाकले. रागावलेल्या नोकराने मग एक दिवस सूड घेण्यासाठी अग्रसेनाच्या श्वानशाळेला आग लावली आणि त्यात अग्रसेनाने वाढवलेले अनेक लाडके श्वान जळून मेले."
"या घटनांनी तीक्ष्णदंत आणि लंबकर्ण गोंधळून गेले. तीक्ष्णदंत म्हणाला, "मला मनुष्यप्राण्याच्या स्वभावाचे कायम कोडे पडले आहे. हा अग्रसेन कुत्र्यांनी करामत करून दाखवली की त्यांना दरवेळी बक्षिस देतो. त्यांना आंजारतो गोंजारतो, पण नोकरांना मात्र प्रत्येक चुकीला शिक्षा करतो. माणसे माणसांच्या चुकांना जेव्हढ्या शिक्षा करतात, तितक्या प्रमाणात शाबासकी देताना दिसत नाहीत".
लंबकर्णाकडे या प्रश्नाचे उत्तर नव्हते. शेवटी बराच वेळ झाला तेव्हा दोन्ही पिशाच्चे आपापल्या फांद्यावर झोपण्यासाठी गेली."
येथवर गोष्ट सांगून वेताळ म्हणाला, "विक्रमादित्या तू पराक्रमी आणि लोकप्रिय राजा आहेस. तुझ्याकडे पण नोकरचाकर खूप आहेत. तू तुझ्या नोकराला अशा चुकीबद्दल कामावरून काढले असतेस का? या प्रश्नाचे ठाऊक असून दिले नाहीस तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायाशी लोळू लागतील."
यावर विक्रमादित्याने आपले मौन सोडले आणि तो म्हणाला, "सृष्टीच्या निर्मात्याकडून मनुष्यप्राणी घडवताना अनेक विसंगती निर्माण केल्या गेल्या. मनुष्येतर प्राणी गरजा पूर्ण झाल्या की शांत होतात आणि जीवाला धोका असेल तरच अंगावर येतात. एरव्ही त्यांच्या सारखा निष्ठावंत सापडणे कठीण. अग्रसेनाने कुत्र्यांना त्यांच्या प्रत्येक करामतीला बक्षिस देऊन आणि गरजा पूर्ण करून त्यांचा विश्वास संपादन केला होता. पण नोकरांना मात्र हिडीसफिडीस करायचा. एकमेकांचा विश्वास संपादण्याचे महत्त्व जेव्हा माणसाला कळेल तेव्हा मनुष्यप्राणी ख-या अर्थाने सुखी होईल. कुणाचा विश्वास संकट काळात मदत केल्याने निर्माण होतो, तर कुणाचा विश्वास व्यवहारातल्या पारदर्शकतेने निर्माण होतो. कुणाला कशाचे महत्त्व वाटते, हे ओळखणे फार महत्त्वाचे...
विक्रमादित्याच्या या उत्तराने वेताळ खूश झाला पण त्याचा मौनभंग झाल्याने पुन्हा झाडावर जाऊन प्रेतासह लोंबकळू लागला.

बुधवार, २८ ऑक्टोबर, २०२०

नग्नता

"नग्नता" या विषयावरची माझी मते आता फेसबुकमुळे ब-यापैकी जगजाहिर आहेत. मी "नग्नतेला" मी अश्लील मानत नाही. श्लील/अश्लीलतेच्या कल्पना माणसे अवतीभवतीच्या लोकाचारातून कळत न कळत उचलतात आणि तेच बरोबर किंवा योग्य मानू लागतात. १०० मधल्या ९९ लोकांना आपण जे योग्य मानतो त्यापेक्षा विरुद्ध/वेगळे/योग्य/सामान्य असू शकते, हे मानायची तयारी नसते. माणसांची वैचारिक वर्तूळे जेव्हढी छोटी तेव्हढ्या श्लील/अश्लीलतेच्या कल्पना खुजा आणि दूरभिमान जास्त असतो. असा दूरभिमान नसेल तर माणसे बलाढ्य संस्कृतीच्या संपर्कात आली की त्यांची मूल्ये/श्रद्धा तपासायला उद्युक्त होतात आणि बदलतात. माझे तसेच काहीसे झाले...

आय० आय० टी० मध्ये असताना मी तिथे फिल्म क्लबचा सभासद होतो. फिल्म क्लबचे सभासदत्व १८ वर्षे पूर्ण असलेल्यानाच मिळायचे. फिल्म क्लबमध्ये दाखवले जाणारे चित्रपट सेन्सॉरची कात्री लागलेले नसायचे. हे चित्रपट वेगवेगळ्या देशांच्या दूतावासातून निवडक प्रेक्षकांसाठी वितरित होत असत. बहूसंख्य चित्रपट युरोपिअन देशात तयार झालेले असत. अनेक उत्तमोत्तम युद्धकाळावरील युरोपात निर्माण चित्रपट मला तेव्हा आमच्या फिल्म क्लबमध्ये बघायला मिळाले. अमेरीकन युद्धपट आणि युरोपिअन युद्धपट यात जाणवलेला महत्त्वाचा फरक म्हणजे अमेरिकन चित्रपटात वीरश्रीचे भडक चित्रण असते तर युरोपिअन चित्रपटात युद्धाचा माणसावर आणि समाजावर झालेला भयानक परिणाम वास्तववादी अंगाने चित्रित केला असायचा. या युरोपिअन वास्तववादाला मग काहीही वर्ज्य नसायचे. 

एकदा जर्मन एम्बस्सीमधून एक पूर्ण लांबीचा चित्रपट आला होता. आता नाव आठवत नाही. पण त्या चित्रपटातील एकंदर ४०-५० स्त्री आणि पुरुष पात्रे पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत पूर्णपणे नग्न होती. पण त्यात आपण ज्याला अत्यंत सैलपणे स्वैराचार संबोधून मोकळे होतो तसे एक ही लैंगिक दृष्य नव्हते. त्या दिवशी माझ्यातल्या सोवळ्या पुणेकराचा फ्युज कायमचा उडाला तो आजतागायत...

वर उल्लेख केलेल्या जर्मन चित्रपटाची आठवण करून देणा-या काही क्लिप्स युट्युबवर/व्हिमिओवर पहायला मिळाल्या. फेसबुकच्या नग्नतेविषयक गाईडलाइन्स अत्यंत आचरट आहेत (उदा० पुरुष स्तनाग्रे अश्लील नाहीत पण स्त्रिची स्तनाग्रे अश्लील (अप्रदर्शनीय) आहेत. तसेच पार्श्वनग्नता अश्लील नाही, पण पुरोनग्नता अश्लील आहे इ०) म्हणून या विषयावर "ससंदर्भ" लिहिता येत नव्हते आणि शेअर करता येत नव्हते. आज अचानक फेस्बुकच्या जाचक अटीतून सुटण्यासाठी जालीय दूवे देण्यासाठी एक उपाय सापडला. म्हणून मला आवडलेल्या दूव्यांचा अर्धसंदर्भ देत आहे...
० 137123723 (https://vimeo.com/)
० 8vL5xXWsgo8 (https://youtu.be/)
० 111078821 (https://vimeo.com/)

अर्धसंदर्भापासून पूर्णसंदर्भ तयार करणे अवघड जायला नकोच...

बुधवार, २० मे, २०२०

डी जीवनसत्त्व

डी जीवनसत्त्व
==========

काही वर्षांपूर्वी जेव्हा डी जीवनसत्त्वाबद्दल नवे ज्ञान निर्माण झाले आणि माझ्या वाचनात आले तेव्हा मी ते वाटायला सुरुवात केली होती. माझी तेव्हा यथेच्छ टिंगलटवाळी झाली.


इतकच नव्हे तर तेव्हा डॉ०ना न सांगता मी माझी डी जीवनसत्त्वाची चाचणी करून घेतली होती. आणि (प्रथमच केलेल्या) चाचणीत डी जीवनसत्त्व प्रचंड कमी आढळले होते म्हणून डॉ० ना दाखवले तेव्हा "न विचारता चाचणी केली" म्हणून डॉक्टरांनी कपाळाला आठ्या पाडून डोळे वटारले होते...पण आज मी शहाणा ठरलो आहे आणि निर्लज्जपणे स्वत: स्वत:चीच पाठ थोपटून घेताना मला अतिशय आनंद होत आहे.

या डी जीवनसत्त्वाने माझ्याबाबतीत झालेला एक महत्त्वाचा चमत्कार म्हणजे मला अचानक अंडी पचायला सुरुवात झाली. तेव्हापासून आजतागायत मला अंडी पोटात गेली नाही तर जीव कासाविस होतो. विश्वास बसत नसेल तर माझ्या बायकोला विचारावे...

ॲलोपथी समस्येच्या मुळाशी जात नाही असे बोलले जाते. पण जनुकीय पातळीवर काम करणारी औषधे आणि द्रव्ये मुळाशीच काम करतात अशी आता माझी ठाम समजूत आहे. डी जीवनसत्त्व जनुकीय पातळीवर आणि म्हणून असंख्य आघाड्यांवर काम करते.

अजुनही बरेच मूर्ख लोक डी जीवनसत्त्वाची चाचणी करायला, तसेच त्याचा पूरक पुरवठा करायला नाखूष असतात. सूर्यप्रकाशात हे जीवनसत्त्व तयार होत असले तरी सध्याच्या काळात सूर्यप्रकाश आणि तो मिळवण्यासाठी आवश्यक असलेला वेळ आणि जागेची अनुपलब्धता, कातडीचा वर्ण, अंग उघडे न टाकण्याबद्दलच्या (विशेषत: स्त्रियांच्या बाबतीत) आचरट कल्पना यामुळे आपण कायम याबाबतीत वंचित राहतो.

आज करोनाच्यासाथीमध्ये काही डॉक्टर डी जीवनसत्त्व आपल्या आजुबाजुच्या लोकांना भेट म्हणून वाटा असे सांगतात, तेव्हा आपले सरकार याबाबत मूग गिळून गप्प राहते याचे वाईट वाटते.

गुरुवार, ७ मे, २०२०

एका न झालेल्या पुस्तकाविषयी


नुकताच प्राणायामाच्या अभ्यासातला एक महत्त्वाचा टप्पा गाठला (माझ्या रक्तदाब आणि हृदयगतीच्या प्रगतीचे फोटो नुकतेच इथे टाकले होते). माझ्या दृष्टीने माझ्यासाठी ही एक मोठी उपलब्धी किंवा खरं सांगायच तर एक सिद्धीच आहे (कारण या टप्प्यावर किंवा इथुन पुढे तांत्रिकदृष्ट्या काही औषधांपासून मी मुक्त होऊ शकतो - जे मी सध्या तरी डॉ.च्या सल्ल्याशिवाय करणार नाही). पण या टप्प्यावर काही ठळक अनुभव इथे सांगायचे आहेत.

माझ्या परिचयातले काही जण कुजकटपणे "अरे, तुझ्या त्या पुस्तकाचे काय झालं?" असं विचारत असतात. एका डॉक्टरांनी तर  (डॉ. दीक्षितांना उद्देशून) "रेडिओलॉजिस्ट हे खरे डॉक्टर नसतात" असं सांगून माझा बुद्धीभेद करायचा प्रयत्न केला होता. एका ग्रुपमध्ये एक योगाभ्यासक प्राणायामावरील जुनाट, कालबाह्य ज्ञान लेखांद्वारे प्रसृत करत होते. तिथे आमची प्राणायामावरची लेखमाला मी प्रसृत केली तेव्हा हे योगाभ्यासक अस्वस्थ झाले. त्यांनी ज्ञान आणि माहिती असा सवतासुभा निर्माण करून आमची लेखमाला माहितीपूर्ण असली तरी ते "ज्ञान नव्हे" असा संदेश देऊन स्वत:चे महत्त्व वाढवायचा प्रयत्न केला. आपल्यासमोर आलेली माहिती कोणत्या प्रक्रियेतून निर्माण झाली आहे किंवा ज्ञान आणि माहिती यांच्यात काही परस्पर संबंध असतो (विशेषत: आंतरराष्ट्रीय दर्जाच्या नियतकालिकात वेगवेगळ्या जागतिक विद्यापीठामध्ये झालेले ताजे संशोधन हे केवळ माहिती नसते तर ते अत्यंत शिस्तबध्दपणे केलेले, जिज्ञासेने केलेले ज्ञानसंपादन असते, हे समजाऊन घेण्य़ाची कुवत त्या योगाभ्यासकांमध्ये आणि त्या समूहाच्या सदस्यांमध्ये नव्हती.

फार थोडे, अगदी मूठभर वैद्यकीय व्यावसायिक प्राणायामावर नि:संदिग्ध, अभ्यासपूर्ण मत मांडू शकतात असा माझा अनुभव/निरीक्षण आहे. बहुतांश वैद्यकीय व्यावसायिक आणि त्यांची ’रि’ ओढणारे विज्ञानवादी "हे अजून पुरेसे सिद्ध झालेले नाही" असे म्हणून प्राणायामावर बोळा फिरवण्याची हूशारी तत्परतेने दाखवतात. यांना डॉक्टर का मानावे, असा मला आता प्रश्न पडतो. असो.

प्राणायामाच्या अभ्यासात सर्वसामान्य लोकांना येणारी महत्त्वाची अडचण म्हणजे त्यांना स्वत:मध्ये घडून येणा-या बदलांचे निरीक्षण करता येत नाही आणि मग motivation संपते आणि monotony ने प्राणायाम नीरस आणि कंटाळवाणा बनतो. सध्या लॉकडाऊनमुळे माझी पत्नी आणि मुलगी माझ्याबरोबर प्राणायाम करतात. Pulse oximeter सारख्या स्वस्त आणि महत्त्वाच्या साधनाने त्यांना प्राणायामाचा हृदयगतीवर होणारा महत्त्वाचा परिणाम दिसल्याने त्यांचा उत्साह टिकून राहिला आहे.

आमची लेखमाला संपली तरी मी ताजे संशोधन वाचत राहिलो. Autonomous nervous system चा शरीरातील अवाढव्य पसारा, शरीरातील सूक्ष्म व्यवहारांवरील नियंत्रण अचंबित करणारे आहे. त्यामुळे एक महत्त्वाची गोष्ट निश्चितपणे सांगता येते - एखाद्या व्यक्तीला प्राणायामाचा विवक्षित फायदा होईल की नाही, हे अनेक कारणांनी निश्चितपणे सांगता आले नाही तरी काही ना काही फायदा नक्कीच होईल - कुणाची रक्तदाबाची औषधे सुटतील किंवा कमी होतील तर एखाद्याचा उद्या येऊ शकणारा हार्ट ॲटॅक किंवा कॅन्सर एकतर येणारच नाही किंवा पुढे ढकलला जाईल, किंवा एखाद्याचा मधुमेह नियंत्रणात राहिल किंवा बरा होईल. प्राणायामाचे निंदक याच गोष्टीची कुचेष्टा करतात. पुढे ढकललेल्या किंवा टाळल्या गेलेल्या धोक्याचं महत्त्व समजायची कुवत निसर्गाने दूर्दैवाने सर्वाना समान दिलेली नाही.

मंडळी, तेव्हा आमचं पुस्तक झालं नाही हा आमचा पराभव नसून आम्ही ज्या समाजाच्या भल्यासाठी ते लिहीले होते त्या समाजाचा पराभव आहे (आम्ही आमचे भले करून घेतले आहेच), हे कळले तरी पुरे...

शनिवार, ११ एप्रिल, २०२०

मन:सामर्थ्य

एक मजेशीर प्रसंग आहे. आता त्या गोष्टीला १७-१८ वर्षे झाली असतील. मी तेव्हा संगीतोपचारामध्ये काही प्रयोग करत होतो. माझ्या तेव्हाच्या प्रयोगांना मला भारत देश सोडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्या सुमाराला माझ्या परिचयातल्या एका वकीलांनी माझे संगीतोपचारांचे प्रयोग त्यांच्या परिचयाच्या एका तरूणावर करण्यास सुचविले. त्या तरूणाचा प्रेमभंग झाल्यामुळे तो भावनिकदृष्ट्या उध्वस्त झाला होता. त्याचे परिणाम त्याच्या तब्येतीवर आणि रोजच्या व्यवहारांवर व्हायला लागल्यामुळे त्या तरूणाच्या निकटवर्तीयांना काळजी वाटत होती.

  सुदैवाने हा तरूण प्रयोग काय आहे हे समजल्यावर कोणतेही आढे-वेढे न घेता तयार झाला आणि एक दिवस आम्ही त्या वकीलांच्या घरीच प्रयोग करायचे ठरवले. या प्रयोगात कानाला इयरफोन लावून डोळे मिटून विशिष्ट त-हेने तयार केलेले नाद आणि संगीत २०-३० मि. ऐकत पडून राहायचे असते. सुमारे ९०% लोक हा ट्रॅक ऐकताऐकता पहिल्या ५-१० मि० मध्ये झोपी जाऊन घोरायला लागतात आणि ट्रॅक संपल्यावर जागे झाल्यावर वेगवेगळ्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया देतात. बहूतेक सर्वांना प्रयोग संपल्यावर झोपेतून हलवून उठवावे लागते. मात्र या तरूणाच्या बाबतीत असं घडलं, की आम्ही थोडा वेळ घाबरून गेलो होतो. त्याला आम्ही ट्रॅक संपल्यावर ४० मि० गदागदा हलवून उठवायचा प्रयत्न करत होतो. एव्हढी गाढ झोप त्याला लागली होती. मग थोड्या वेळाने वकीलमहाशय माझ्यापाशी येऊन म्हणाले, "हा मेंटली फार वीक आहे. जगात इतकं वीक राहून चालत नाही". त्यांचा रोख मनाच्या ताकदीकडे होता हे लक्षात आले असेलच...
"मनाची ताकद" हे तसे आपल्याकडून अतिशय सैलपणे वापरले जाणारे शब्द! माणूस संकटात सापडला की त्याला हमखास मिळणारा सल्ला म्हणजे - "मनाची ताकद वाढवा". या "मनाच्या ताकदीचे" मला गेले कित्येक वर्षे गूढ कोडे आणि आकर्षण निर्माण झाले आहे. मनाची ताकद आपल्याला किती वाढवता येते? सामान्य माणसे मनाची ताकद वाढवायला बाह्य उपायांवर का अवलंबून राहतात? इत्यादि या संदर्भातले उपप्रश्न आहेत. हा विषय आध्यात्मिक गुरु आणि स्वयंमदत तज्ज्ञ यांनी बळकावला आहे. आध्यात्मिक गुरु हे फक्त गोंधळ वाढवतात (क्वचितच ते मुद्देसूद बोलतात, तसेच सैल विधाने करतात) तर स्वयंमदत तज्ज्ञ फार जुजबी आणि उथळ रितीने हा प्रश्न हाताळतात, असे माझे सध्या मत बनले आहे.

मी वैद्यकाचा विद्यार्थि नाही. जास्तीत जास्त एखादा मुरलेला हौशी खगोल किंवा पक्षी निरीक्षक यांच्या इतकीच माझी आणि वैद्यकाची जवळीक आहे. डॉ. दीक्षितांसारखे फार थोडे वैद्यकीय व्यवसायिक माझ्या नशीबाने मला माझी हौस भागवायला मदत करतात. या आणि काही वाचन एव्हढ्याच भांडवलावर "मनाची ताकद" म्हणजे काय याचा शोध घ्यायचा प्रयत्न मला करायचा आहे.
आता मन म्हणजे काय हे तपासायचा प्रयत्न करू या! मन म्हणजे काय याची आध्यात्मिक गुरुनी, योग्यांनी केलेल्या व्याख्या मला स्वीकारायची नाही कारण त्यात एकवाक्यता व्हायची शक्यता शून्य! दूसरे म्ह० चिकीत्सेचे त्यांना अतिशय वावडे असते. मनाची निर्मिती जडातूनच होते, हे आधुनिक विज्ञानाला गवसलेले सत्य मान्य केले तर मन म्हणजे मानवी मेंदू आणि उर्वरित शरीराचे सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यवहार. ही कॅण्डेस पर्ट या सुप्रसिद्ध वैज्ञानिक विदुषीने (Molecules of Emotion या पुस्तकाची लेखिका) केलेली व्याख्या मला जास्त योग्य वाटते.
मुळात ताकद, बळ, सामर्थ्य, क्षमता, उर्जा या संज्ञा प्रामुख्याने जड वस्तूंच्या स्थानांतराशी किंवा रुपांतराशी (कार्याशी) निगडीत आहेत. त्यामुळे त्यांची गणिते मांडावी लागतात. स्थानांतर किंवा रुपांतर इच्छित किंवा नियंत्रित नसेल (ते जर अनियंत्रित असेल), तर ताकद, बळ, सामर्थ्य, क्षमता, उर्जा याची गणिते करावी लागत नाहीत. वस्तूवर निश्चित कार्य केले की त्याचे निश्चित फल मिळते. मानवी व्यवहारात हे फल मानसिक पातळीवर समाधान/नैराश्य, आर्थिक पातळीवर नफा/तोटा, शारीरिक पातळीवर पोषण/आरोग्य/अनारोग्य मिळवून देते. थोडक्यात अपेक्षित फल मिळाले तर सकारात्मक परिणाम होतो आणि अनपेक्षित मिळाले तर नकारात्मक परिणाम होतो.
आता मानसिक बळ या संकल्पनेचा अर्थ लावायचा प्रयत्न करता येईल. एखादे कार्य केवळ मानसिक पातळीवर घडण्यासाठी जे बळ लागते त्याला मानसिक बळ किंवा मन:सामर्थ्य म्हणणे योग्य होईल. हे बळ मिळणे म्ह० काही चेतारसायनांचे स्रवण (डोपामाईन?) प्रतिसाद म्हणून होत असणार. जेव्हा एखादी कृती मानसिक पातळीवर (म्ह० केवळ कल्पनेने) घडून येते किंवा केली जाते, तेव्हा शरीर आपल्याला उत्साही किंवा निरूत्साही बनवून मानसिक पातळीवर प्रतिसाद देते आणि कार्यप्रवृत्त अथवा परावृत्त करते. मेंदू मधली reward circuits उद्दीपित होउन, मनातल्या मनात एखादी कृती करताना पुरेसा उत्साह निर्माण झाला नाही तर ध्येय साध्य करण्याचे motivation नाहीसे होते आणि ती व्यक्ती नाउमेद होते.
सांगायचे तात्पर्य असे की एखाद्या काल्पनिक कृतीला शरीराचा अनुकूल प्रतिसाद मिळणे ही ऐच्छिक क्रिया नाही. ती जनुकीय भाग्याने नियंत्रित केलेली क्रिया आहे. जनुकीय भाग्य आहार, ताण-तणाव, आनुवंशिकता व आजुबाजुची परिस्थिती यांनी नियंत्रित केले जाते.
हे सर्व इथे सांगण्य़ाचे कारण असे की "आपलं मानसिक बळ वाढवा" असा सल्ला अनेकजण अनेकांना अत्यंत सैलपणे देत असतात, ते चुकीचे आहे असे मला वाटते. सामान्य आहाराने शारीरिक ताकद एका मर्यादेपर्यंतच वाढते, मग विशिष्ट आहारानेच (आणि व्यायामाने) वाढते, तसेच मानसिक ताकदीचे आहे. आजुबाजुची परिस्थिती एखाद्याला या खुराकापासून वंचित ठेवत असेल तर दोष आजुबाजुच्या परिस्थितीचा आहे. तात्पर्य एखाद्या व्यक्तीच्या मनाची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नाला मर्यादा आहेत.
प्रार्थना, ध्यान, वेगवेगळे छंद हे ताण-तणाव कमी करतात आणि काही काळ समस्यापासून लांब राहायला मदत करतात, तसेच वेगळ्या दृष्टीकोनातून समस्यांकडे बघण्य़ासाठी जी अवस्था आवश्यक आहे ती मिळवण्यासाठी या उपायांची मदत होऊ शकते. पण मानसिक ताकद वाढवण्यासाठी "आडात असणे" आवश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

गुरुवार, ५ मार्च, २०२०

झालं-गेलं


आजकाल अनेकजण अनेकांना "झालं-गेलं विसरुन जा"चा सल्ला देत असतात. ब-याच वेळा ही अपेक्षा एकतर्फी ठेवली जाते. तत्त्वत: झालं-गेलं विसरुन तेव्हाच जाता येतं, जेव्हा निश्चित भविष्यकाळ दिसत असतो आणि तो आपल्या प्रगतीसाठी तसेच आनंदासाठी पुरेसा पोषक असतो (प्रगती आणि आनंद हे दोन महत्त्वाचे निकष आहेत). प्रत्यक्षात माणसांच्या स्वभावाचे पीळ काही झालं तरी सुटत नाहीत. अशा परिस्थितीमध्ये झालं-गेलं विसरून जाणं हा पायावर धोंडा पाडून घेणे असते... मुळात एखादी गोष्ट विसरणे ही नैसर्गिक प्रक्रिया आहे, आणि त्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण करावे लागते. विसरणे कोणत्याही दबावाखाली घडून येत नाही, हे ब-याच मूर्खाना कसं कळत नाही हे एक कोडे आहे.

तरी पण मला जेव्हा "झालं-गेलं विसरून जा"चा सल्ला मिळतो, तेव्हा त्या व्यक्तीला मला एक प्रयोग सुचवासा वाटतो. तो प्रयोग असा- मी त्या सुचवणा-या व्यक्तीला चारचौघात चपलेने दोन्ही गालांवर एकेक ठेऊन देईन आणि मग "झालं गेलं विसरून जाऊया"ची ऑफर करेन. आहे मान्य?

या टप्प्यापर्यंत प्रयोग व्यवस्थित पार पाडल्यावर काही व्यक्तींची यादी मी त्यांच्याकडे सुपूर्द करेन. या व्यक्तीना एखाद्या चौकात दोन्ही गालांवर दहा मारून एक मोजेन आणि "झालं गेलं विसरून जाऊया"ची ऑफर करेन.

व्यवस्थित प्रात्यक्षिक मिळाले तरं झालं-गेलं विसरून कसं जायचं याचा व्यवस्थित अभ्यास/सराव करता येतो...