रविवार, ३० जून, २०२४

महाजनस्य संसर्गः

 महाजनस्य संसर्गः 

=========


राजीव उपाध्ये, जून २०२४



पञ्चतंत्रात एक श्लोक आहे - 


महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः।

पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥


अर्थ- मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते. 


अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ (dominant) संस्कृतीच्या चालीरिती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. 


सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोईचे वास्तव आहे. कुणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे स्वीकारणे कमीपणाचे, अस्मितेला धक्कादायक मानले जाते. कारण ते "समते"च्या तत्त्वाविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ संस्कृती, समूह यांचा द्वेष, तिरस्कार करणे जास्त रूळले आहे. ते एक ’नवसामान्य’ बनले आहे.


जीवसृष्टीत मानव अनेक कारणांनी शीर्षस्थानी किंवा श्रेष्ठ मानला जातो. ज्ञानप्राप्तीचे आणि त्याचे विश्लेषण करून उपयोग करण्याचे विशेष कौशल्य मानवा इतके इतर प्राण्यात विकसित झालेले दिसत नाही. वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी हत्यारे बनविणे आणि त्यांचा उपयोग करणे, हे पण इतर प्राण्यामध्ये विकसित झालेले दिसत नाही. वेगवेगळ्या कलांचा विकास, पर्यावरणावरील प्रभुत्व, गुंतागुंतीची समाजरचना मानवा इतकी कळपात राहणार्‍या प्राण्यात नसते. शिवाय परिस्थितीशी जुळवून घेण्यात मनुष्यप्राण्याचा नंबर १ला लावावा लागतो. 


हे सगळे ठिक आहे. पण मला एक प्रश्न पडतो तो असा की मानवानंतर सर्वात वेगाने उत्क्रांत प्राणी या जीवसृष्टीत कोणता?  मी एआयच्या मदतीने या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला पुढील उत्तरे मिळाली -


० चिंपांझी आणि बोनोबो कुळातील माकडे

० डॉल्फिन 

० हत्ती

० कावळे

० ऑक्टोपस 


यासाठी नक्की कोणते निकष कसे लावले आहेत ते कळायला मार्ग नाही, पण मला ही उत्तरे पटली नाहीत. याचे कारण म्हणजे हत्ती आणि माकडे सोडली तर बाकीचे प्राणी पाळले जात नाहीत. हत्ती आणि माकडे  पाळली जात असली तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी संपर्कात येऊन जी वर्तन विषयक उत्क्रांती होणे अपेक्षित आहे , ती या दोन प्रजातींमध्ये दिसत नाही.


मानवी संपर्कात येऊन मोठ्याप्रमाणावर उत्क्रांत होत असलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. गेले काही वर्षे समाजमाध्यमांच्या कृपेने मी जगभरच्या पाळीव कुत्र्यांच्या वर्तनाची निरीक्षणे करीत आहे. कुत्र्यांचे मानवीकरण ज्या वेगाने होत आहे, तितके इतर कोणत्याच प्राण्याचे मानवीकरण होताना दिसत नाही. गाई,बैल, घोडे आणि हत्ती हे विशिष्ट हेतूने पाळले जातात. त्यांच्यात आणि त्यांच्या मालकात भावबंध पण निर्माण होतात (हे अगदी वाघसिंहासारख्या हिंस्र पशूमध्ये पण दिसते.). पण त्यांच्यात मानवी संपर्कामुळे, मानवीकरण कुत्र्यांच्या इतके वर्तनवैविध्य दिसत नाही. मानवाशी सर्वात जास्त जनुकीय साधर्म्य असलेले कपिबांधव वर्तनवैविध्यामध्ये मानवानंतर असायला हवे होते. पण ते तसे झालेले दिसत नाहीत. ही आश्चर्याची गोष्ट नाही का?


मी वर कुत्र्यांचे मानवीकरण असा शब्द वापरला, तो मुद्दामून वापरला. त्यात केवळ ’पाळणे’ अभिप्रेत नसते. मानवीकरणाचा परीघ पाळण्यापेक्षा बराच मोठा आहे. पाळणे हे मला संकुचित वाटते - त्यात त्या प्राण्याच्या मूलभूत गरजा भागवून त्याकडून कामे करून घेतली जातात. मानवीकरणात तो जीव मानव असे समजून त्याला वागवले जाते.  मानवीकरण केलेल्या कुत्र्यांमध्ये अशी श्रमांची अपेक्षा असतेच असे नाही (याला अपवाद विशिष्ट कोशल्ये शिकवले गेलेले म्हणजे - सैन्य, पोलिसदलातील कुत्रे, तसेच अपंग व्यक्तीना सोबत करण्यासाठी शिकवलेले सर्व्हिस डॉग्ज, गुरे राखण्यासाठी पाळले गेलेले बॉर्डर कॉली सारखे श्वान इ०). 


कुत्र्यांच्या मानवीकरणाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे, हे बघणे रंजक आहे-


० कुत्र्यांच्या वंशावळी ठेवल्या जातात


० कुत्र्यांना ज्या मानवी कुटुंबात ’दत्तक’ घेतले जाते, त्यांची कुलनामे बहाल केली आहेत.


० अनेक कुटुंबात लहान मुलांच्याबरोबर कुत्र्यांच्या पिलांना आणून वाढवले जाते. असे एकत्र वाढलेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे कुत्र्याबरोबर भावनिक नाते अजोड असते. 


० कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करणे हे तर सर्रास आहे. काही अतिउत्साही आणि हौशी लोक कुत्र्यांची लग्ने पण लावतात. पण हे माझ्या पहाण्यात फार नाही. 


० अलिकडे विशेषत: कुत्र्यांना माणसाप्रमाणे कपडे, बूट घालून नटवले जाते. केसाळ कुत्र्यांच्या वेण्या बांधल्या जातात. स्कूटर, सायकल सारख्या वाहनाने फिरायला जाताना कुत्र्याना हेल्मेट, गॉगल पण घातले जातात. भविष्यात कुत्र्यांना "नग्नावस्थेत" फिरायला नेऊ नये असे कायदे झाले तर तो मानवीकरणाचा कळस ठरेल. कदाचित नवे "विनयभंग" त्यातून निर्माण व्हायची शक्यता आहे.


० काही हौशी लोक त्यांच्या कुत्र्यांसाठी खास झोपण्यासाठी खास पलंग, जेवायला छोटी टेबल-खुर्ची वगैरे जामानिमा बाळगतात. 


० कुत्र्यांची सलून आणि पार्लर हे आता खूपच रूळले आहेत. 


० कुत्र्यांसाठी उद्याने, शाळा आणि हॉटेल्स खुप बघायला मिळाली. भारतात हा प्रकार अजून रूळलेला दिसत नाही. विमानप्रवासात अनेक जण कुत्र्यांना अगदी केबिन मध्ये बरोबर घेऊन प्रवास करतात. 


वरील प्रत्येक विस्तारशाखेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पण तो मुख्य मुद्दा नाही, तर मुख्य मुद्दा मानवीकरणातून कुत्र्यांचा झालेला बौध्दिक, भावनिक आणि शारीरिक/वर्तन विकास हा आहे.


अन्न, निवारा आणि जिव्हाळा मिळाल्याने कुत्रा माणसाला ’समर्पित’ करतो आणि आपल्यावर आवलंबून असलेले कुणीतरी जीव लावणारे मिळाल्याने माणसाचा ’अहं’ सुखावतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे माझ्यामते कुत्रा आणि माणसाच्या अनोख्या नात्याचे गुपित आहे.

 

कुत्र्यांचा बौध्दिक, भावनिक आणि शारीरिक/वर्तन विकास


मी जालावर शोध घेतला तेव्हा सर्वात बुद्धिमान कुत्र्यामध्ये बॉर्डर कॉली आणि पुडल या प्रजाती सर्वात बुद्धिमान असल्याचे मानले गेले आहे. "चेसर" नावाची कुत्री आतापर्यंत सर्वात बुद्धिमान मानली गेली आहे (https://www.youtube.com/watch?v=tGlUZWNjxPA). तिची स्मरणशक्ती, शब्दसंग्रह, शोधक्षमता अचाट असल्याने ती अनेकांच्या अभ्यासाचा विषय झाली आहे. 


पण अनेक कुत्र्यांना अल्पप्रमाणात संख्याज्ञान पण असते असे मानले जाते आणि माफक प्रमाणात अनेक काही कुत्री  शिकवल्यानंतर सोपी आकडेमोड (बेरजा आणि वजाबाक्या) करू शकतात. काही कुत्री "फुली गोळा" सारखे खेळ त्यांच्या मानवी मित्रांबरोबर खेळताना बघायला मिळतात. पण काही कुत्री डॉज बॉल, लपाछपी इ० खेळ पण खेळू लागली आहेत. स्केट बोर्ड वर स्केटींग करणार्‍या श्वानांची संख्या मोठी आहे. 


पालकांबरोबर  श्वानांना संवाद साधता यावा यासाठी काही बटन दाबून रेकॉर्ड केलेला संदेश ऐकवण्यासाठी उपकरणे उपलब्ध आहेत. ती वापरून श्वान आश्चर्यकारक संवाद साधतात. बाहेरून आल्यावर घरात येताना पाय पुसून घरात येणारी कुत्री बघून मी वेडा व्हायचा बाकी होतो.


मी सर्वात थक्क झालो ते चिनी पुडल या प्रजातीमुळे. मला कधीकधी हे श्वान चिनी लोकांनी प्रयोगशाळेत "जनुकीय बदल" घडवून विकसित केले असावेत अशी शंका येते.[१,२] 


अशी शंका येते याचे कारण चीन हे कसलेही नैतिक विधीनिषेध न बाळगणारे (एका दृष्टीने क्रुर) राष्ट्र आहे.  चिनी पुडल चतुष्पाद राहीलेले नसून आता ते द्विपाद झाले आहेत. हा मोठा बदल प्रयोग शाळेत जनुकीय बदल "गुपचुप" घडवून आणल्याशिवाय शक्य नाही असे मला वाटते.  प्रयोगशाळेतील सर्वच संशोधन जगासमोर येत नसते. 


उंदीर आणि डुकरांच्या गर्भात मानवी मूळपेशी/जनुक  कृत्रीमपणे भरून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळविण्यावर संशोधन चालू आहे. त्यामूळे असे प्रयोग खासगी/गुप्तपणे कुत्र्यांवर झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हे चिनी पुडल श्वान काय काय करत नाहीत? ते संगीताच्या तालावर नाचतात, अंथरूण घालतात, पंखे चालू करतात. ते आपल्या बाजूला वळवून घेतात. अगदी खोलीचे दार बंद करतात, तसेच कड्या उघडतात. लहान मुलांच्या अंगावरील पांघरूण पण सारखे करतात. त्यांच्या पालक/मालकांची छोटीछोटी कामे पण करतात. 


कुत्री माणसासारख्या भावना व्यक्त करतात, काही तर माणसासारखे स्मित करू लागले आहेत. हस्की कुळातील काही श्वान "आय लव्ह यु"  सारखी वाक्ये उच्चारतात (म्हणजे तशी नक्कल करतात. काही कुत्रे मालक नसताना घरातील पियानो वाजवून गायचा प्रयत्न करतात. 


टिव्ही वर कार्टून बघणे हा अनेक कुत्र्यांचा विरंगुळा आहे. ते बघत असताना त्यांना डिस्टर्ब केले तर ते नाराजी व्यक्त करतात. इतकच नाही तर खेळाच्या सामन्यातील उत्कंठावर्धक क्षणांना तितकाच प्रतिसाद देतात.


आपल्या पालकांचा मृत्यू झाल्यास श्वान पण दू;खी होतात. त्यांच्या खोड्या काढल्यास ते नापसंती दर्शवतात. 


कुत्र्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन घडवणारे डॉग शो, ब्रिटन गॉट टॅलेण्ट सारख्या कार्यक्रमातून दिसणारे  अनेक करामती करून दाखविणारे श्वान बघितल्यावर मन अचंबित होते. जनुकीय संपादनाच्या बदलामुळे भविष्यातील कुत्रे मानवी वाणीने बोलू लागले तर मला आश्चर्य वाटणार नाही.


मात्र अशा रितीने उत्क्रांत झालेला कुत्रा अजुनही आपल्या जातभाईना मानवाबरोबर कसे वागायचे याचे शिक्षण देत नाही. मानव त्याला अजुनही त्याच्या इच्छेनुसार "प्रजोत्पादन" करू देत नाही.  त्यामुळे अवगत केलेल्या गुणांचे जनुकीय संक्रमण पुढील पिढीत होत नाही.  कुत्र्यांच्या उत्क्रांतीमध्ये हे काही अपूर्णता ठेवणारे दुवे आहेत, असे मला वाटते.


आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (near human behaviour) बघितल्यावर कुत्रा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे ही एक प्रकारची लबाडी आहे, असे मानावे लागते. माणसाशी जुळवून घेणार्‍या कुत्र्यांचा हा विकास बघितल्यावर मी वर उल्लेख केलेला श्लोक किती चपखल आहे, हे पटल्याशिवाय राहणार नाही. 



१. https://www.newscientist.com/article/2330283-gene-edited-dogs-created-from-cloned-skin-cells-for-the-first-time/


२. https://ocm.auburn.edu/experts/2019/10/010117-designer-dogs-breeding.php




परिशिष्ट - 


माझा हा पण लेख मी नेहेमीप्रमाणे डॉ० दीक्षितांना वाचायला दिला होता. त्यांनी बर्‍याच उपयुक्त टिप्पण्या केल्या. त्या इथे स्वतंत्रपणे देत आहे.


० प्रथम कुत्रा मानवी संपर्कात आला, मग मानवी समूहांबरोबर राहून कित्येक हजार वर्षे उत्क्रांत होत राहीला.  (हे मला पटतं कारण अधर्वट टाकून दिलेली शिकार किंवा अन्न कुत्र्यांना त्यांची गरज भागविण्यासाठी आयती पर्वणी ठरली असणार -रा०उ०)


० कुत्र्यांसाठी अगदी पंचतारांकित हॉटेल्स, शाळेत नेण्या-आणण्यासाठी व्हॅन किंवा बसेस, खास टीव्ही चॅनेल्स, पोहण्य़ाचे तलाव इ० विकसित केले आहेत.


० आज समाजमाध्यमांमुळे दिसून येणारा कुत्र्यांमधील वर्तनविकास प्रयोगशाळेत इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीही बघायला मिळणार नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर लोकांनी हौसेने टाकलेल्या क्लिपा कुत्र्यांच्या वर्तनविकासाच्या संशोधनात महत्त्वाचे साधन ठरतात.


० इतर विकासाबरोबरच कुत्र्यांमधील मानवी भाषेची आकलन क्षमता आश्चर्यकारक आहे. 


० अलिकडे काही कुत्र्यांना कॅन्सरसारखे आजार अगोदरच कळतात, असे लक्षात आले आहे. विशेष शिक्षण दिलेले कुत्रे वृद्धाना उत्तम सोबत करतात.


रविवार, २ जून, २०२४

लैंगिक वर्तन

एका गृहस्थांनी मला मानवी लैंगिक-वर्तनावर नुकतीच चावी मारली.
मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते. दोन प्रमुख भोज्जे या संबंधीच्या चर्चेत वैयक्तिक जडणघडणीनुसार निवडले जातात-
१ ला भोज्जा - "सुसंस्कृत मानवसमाज"
"सुसंस्कृत" मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना कायम निसर्गाविरूद्ध केलेल्या आचरणाचे उदात्तीकरण करतात. मग "ब्रह्मचर्य", "षड्रिपू" सारख्या कल्पना गळी उतरवून जे आऊटलायर्स यात यशस्वी होतात त्यांना डोक्यावर घेतले जाते. याशिवाय नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना प्रत्येक संस्कृतीनुसार बदलतात, त्यामुळे उडणारा गोंधळ वेगळाच...
"सुसंस्कृत" मानव समाजाला आपण मूलत: माकडे आहोत हे स्वीकारायला जड जाते. आपण विचार करणारे असल्यामुळे जीवसृष्टीत आपले स्थान वेगळे आहे अशी एक भ्रामक कल्पना त्यात अंतर्भूत असते. प्रत्यक्षात माणसाचे असंख्य प्रश्न निसर्गापासून फटकून राहण्यातून निर्माण होतात, याचा पूर्णपणे सर्वांना विसर पडलेला असतो.वैज्ञानिक सत्ये चटण्या कोशिंबिरीसारखी तोंडी लावायला वापरली जाते.
आपण विचार करू शकतो म्हणून प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक व्यवहारावर नियंत्रण मिळवू शकतो, हा दर्प अशा लोकांमध्ये सहसा असतो.
हा भोज्जा पकडणार्यांचा जीवशास्त्राशी ३६ आकडा असतो. ही माणसे वैज्ञानिकांपेक्षा धर्मगुरूंना जास्त मानतात. स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना धर्माचा आधार घेतल्याने, आयुष्याचा ताबा आपोआप धर्मगुरूंकडे दिला जातो, हे विसरले जाते.
एकंदर आग "रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असा प्रकार असतो.
२ रा भोज्जा - मानवी जीवशास्त्र
हा भोज्जा पकडला तर मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे बर्यापैकी अलगद सुटते. प्रथम निसर्गाला मानवी समाजाचे नियम कळत नाहीत, तो त्याच्या नियमांनी पुढे जातो. हे (काहीसे गैरसोईचे) वास्तव स्वीकारणे आवश्यक ठरते. या शिवाय "मानव हा विचार करणारा" प्राणी असला तरी ती क्षमता अनेक कारणांनी सर्वांमध्ये समान विकसित होत नाही. किंबहुना ही क्षमता बहुसंख्य लोकात विकसितच होत नाही. त्यामुळे सर्वांकडून या धारणेला योग्य असे "विवेकप्रधान" वर्तन होत नाही. ज्यांना जीवशास्त्र पचवता येते, त्यांनाच हे कळू शकते.
आपण मूलत: माकडे असल्यामुळे आपले लैंगिक वर्तन आपल्या कपिकुळातील जातभाईंसारखेच असणार आहे, हे एकदा स्वीकारले की भ्रामक कल्पनांच्या गुंत्यात अडकावे लागत नाही. नीतिप्रधान उत्तरे शोधण्याऐवजी कल्पक पण गरजांना न्याय देतील अशी उत्तरे शोधण्याकडे कल असतो. उदा० लैंगिक भूक भागविणारी खेळणी वरील गटातील लोकांना अनैतिक, अभिरुचीहीन वाटतील पण २ र्या जीवशास्त्रवादी गटाला याचे काही वावगे वाटणार नाही. जीवशास्त्रवादी गट नीति-अनीतिच्या सुटसुटीत कल्पनांचा आदर ठेऊन पुढे जातो. मग "सुरक्षित आणि संमती" घेऊन केलेले लैंगिक आचरण "भोगवाद" न ठरता गरजांची पूर्तता करणारे ठरते.
जगात वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जाणारे "लैंगिकतेचे उत्सव" मग वावगे/चूकीचे वाटत नाहीत. "नग्नतेची" किळस वाटत नाही. तसेच हीरामंडीतील श्रीमंत पुरूषांना "शिक्षण" देणार्या, जर्मनीतील सर्वात जुन्या कुंटणखान्यातील इन्कमटॅक्स भरणार्या, अमेरिकेतील कुंटणखान्यातील पी०एच०डी० झालेल्या ’वेश्यांचे’ कौतूक वाटल्याशिवाय राहात नाही.
राजीव उपाध्ये

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

देशाचे भवितव्य

 देशाचे भवितव्य 

========



-राजीव उपाध्ये, एप्रिल २०२४



माझ्या काही धारणा (किंवा भूमिका) मी वारंवार तपासत असतो. माझी एक भूमिका अनेकांना, त्यातही भगव्या विचारसरणीच्या लोकांना माझी एक भूमिका अजिबात आवडत नाही. ही भूमिका म्हणजे - 


"भारत या देशाला फारसे भवितव्य नाही."


यात बहुतेक तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा बराच समावेश असतो. बरं या लोकांना स्वच्छ आणि लांबचा विचार अजिबात करता येत नाहीच, लिखाण तर दूरची गोष्ट. लगेच हमरीतुमरीवर येतात. 


"भारताला फारसे भवितव्य नाही", या माझ्या धाडसी दाव्याला काही महत्त्वाचे आधार आहेत. ज्या वेगाने देशापुढचे प्रश्न गंभीर बनत जा्त आहेत, त्यात तेल ओतणारे घटक म्हणजे बेसुमार लोकसंख्या, जागतिक तापमान वाढ (विशेषकरून विषुववृत्ताजवळचे स्थान), कल्पकतेचा अभाव.


०भारतातील बेसुमार लोकसंख्येने  लोकशाही राज्यव्यवस्था जवळपास कोलमडून पडली आहे असे कधीकधी मला वाटते. याचा अर्थ असा नाही की मी एकाधिकारशाहीचा समर्थक आहे. पण नागरिकांच्या उत्पादकतेच्या (क्षमतेच्या) व्यस्त प्रमाणात अस्मिता जाग्या होणे, सरकारकडून बेफाम आणि अवाजवी अपेक्षा, मर्यादित साधनसंपत्ती, भ्रष्ट नोकरशाही अशा ठळक कारणांनी लोकशाहीला चुना लागतो.


० जागतिक तापमान वाढीचा देशाच्या भवितव्याशी संबंध काय? असा प्रश्न कुणालाही पडेल. पण याचे भान असणारे एक टक्का जरी निघाले तरी डोक्यावरून पाणी गेले असे म्हणावे लागेल.


भारताचा मोठा भूभाग विषुववृतालगत असल्याने जागतिक तापमान वाढीने आपण जास्त पोळले जाणार आहोत. वाढत जाणारा उन्हाळा उर्जेची गरज वाढवणार, उर्जेचे उत्पादन मर्यादित आणि उत्पादन/वितरण खर्चातील वा्ढीने समाजातील मोठा घटक सुखाची झोप मिळवण्यापासून वंचित राहणार, कडक उन्हाळ्याने केवळ आर्थिक गणिते कोलमडणार नाहीत तर बहुसंख्य लोकांच्या उत्पादकतेवर तसेच मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम झाल्याने अनेक समस्या गंभीर बनतात. धार्मिक उन्माद वाढतो. विवेक संपतो. 


चिडेचिडेपणा वाढला किंवा लोकांचा संयम संपतो, टोकाचे पाउल उचलले जाते आणि अपघात, गुन्हेगारी वाढते. भारतीय समाजाची असंवेदनशीलता करोनाकाळात भरपूर दिसली आहे.


केवळ उन्हाळाच नाही तर पावसाळ्याचे चक्र पण जागतिक तापमान वाढीने कोलमडल्याचे आपण बघत आहोत. अवकाळी पावसाने होणार्‍या नुकसानाने शेतकर्‍यांच्या कष्टावरून जेव्हा बोळा फिरतो तेव्हा खूप अस्वस्थ व्हायला होते. नद्यानाल्यांना येणारे पूर, भूस्खलनाने होणारे नुकसान असे वाढलेल्या पावसाचे पण अनेक तोटे आहेत.


० असे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायला जी कल्पकता लागते, त्या कल्पकतेची उपासना आपल्याकडे शून्य आहे. हे फार धाडसी विधान आहे आणि मी ते पूर्ण जबाबदारीने केले आहे.  कल्पकता विकसित होण्यासाठी वेगळ विचार करावा लागतो, वेगळा विचार करणार्‍या लोकांचा आदर ठेवणारा समाज तयार व्हावा लागतो. आजचा भारतीय समाज वेगळा विचार स्वीकारू शकत नाही, तो लगेच हिंसक बनतो. 


सह्याद्रीमध्ये हिंडल्याशिवाय वेताळ टेकडी किती छोटी आहे याची समज येत नाही आणि हिमालयात हिंडल्याशिवाय सह्याद्रीचे छोटेपण कळत नाही. कल्पकतेचे पण तसेच आहे. 


समाजमाध्यमांच्या कृपेने आज शतकानुशतके कल्पकतेची उपासना करणार्‍या चीनी कल्पकतेचे दर्शन झाल्यावर आपण भारतीय किती छोटे आहोत हे समजते. चीनी कल्पकतेचे सामर्थ्य त्यांच्या पेटंटच्या संख्येत प्रतिबिम्बित झाले आहे. वेगळ्या विचाराला दंडित करणारी भारतीय मानसिकता चीनशी कल्पकतेची बरोबरी कधीही करू शकणार नाही, याचा मला ठाम विश्वास वाटतो. शतकानुशतकांचा कल्पकतेचा बॅकलॉग भरून काढणार कसा. आपले सामर्थ्य पेटंटमध्ये नसून फक्त टेंपलच्या संख्येत आणि संपत्तीत एकवटले आहे. कटु आहे पण सत्य आहे.


भगव्या मानसिकतेच्या मंडळीना या कटू सत्याची जाणीव करून दिल्यावर खुप राग येतो. मग ते खालच्या पातळीवर उतरून धमक्या द्यायला सुरुवात करतात. "झालेले काम तुम्हाला दिसत नाही का?" असे विचारतात.


या मूर्खांना मला इतकेच सांगायचे आहे समस्या ज्या वेगाने वाढत आहेत त्या प्रमाणात उपाय शोधण्याचा वेग नगण्य आहे. जे काम झाले आहे ते आवश्यक होते, पण पुरेसे नक्कीच नाही...


० वरील सर्व घटकांबरोबर आणखी एक चिंताजनक घटक म्हणजे भारतीय समाजाचे ढासळलेले आरोग्य - शाळेतल्या मुलांना येणारे हृदयविकाराचे झटके, त्याबरोबरच भारत आता कर्करोगाची जागतिक राजधानी बनल्याचे वृत्त कुणाला अस्वस्थ करत नसेल तर तुमचा भावनिक मृत्यू झाल्याचे खुशाल समजावे. कदान्नाला मिळणारी प्रतिष्ठा, सास्थ्य बिघडवणार्‍या जीवनशैलीचे नारायण मूर्तीसारख्या व्यक्तीकडून होणारे बेजबाबदार आणि अक्षम्य समर्थन भारतीय समाजाच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्याच्या पलिकडे नेतात.  


गेले कित्येक वर्षे टीकेचा विषय असलेला माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त आता "बियॉण्ड डाऊट" सिद्ध झाला आहे...





गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

=========================


-राजीव उपाध्ये (१४.०२.२०२४)


पर्यावरणातील आह्वानांनुसार मानसिक जडणघडणीत, शरीररचनेत अथवा अवयवात बदल घडून येणे हे जीवसृष्टीमध्ये सर्रास घडून येते. त्याची असंख्य उदा० आजूबाजूला माणसांमध्ये पण बघायला मिळतात. भारतात गुजराती समाजात उद्योग रक्तात भिनलेला आहे असे म्हटले जाते. भारतात पश्चिम किनार्‍यावर सिद्दींचे वंशज धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत [१]. दक्षिण आशियातील बजाऊ ही जमात प्राणवायुशिवाय पाण्यात बुड्या मारून मासेमारी करण्यासाठी प्रसिद्ध आहे [२]. अशी असंख्य उदा० देता येतात.


भारतीय समाजात ब्राह्मण दीर्घकाल समाजाच्या शीर्षस्थानी राहीले, हे आज कुणीही नाकारणार नाही. फार काय, याचमुळे ब्राह्मण इतर समाजबांधवांच्या तिरस्कारास पात्र ठरले. पण ब्राह्मणांचा तिरस्कार हा मला वर्गात अभ्यास करून  १ल्या येणार्‍या मुलांचा तिरस्कार वाटतो. वर्गात अभ्यासात पुढे असणारी मुले त्यांचे स्थान टिकविण्यासाठी भलेबुरे मार्ग अवलंबतातच. ब्राह्मणांनी पण तेच केले. पण इतरांना वाटणार्‍या तिरस्काराचे उदासिनीकरण (न्युट्रलायझेशन) करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळेच आजचे ब्राह्मण मोठ्या सामाजिक नामुष्कीला तोंड देत आहेत.


ब्राह्मणांच्या वर्चस्वाची समाजशास्त्रीय़ मीमांसा भरपूर झाली आहे. त्यात मला पडायचे नाही कारण तो चावून चोथा झालेला विषय आहे, त्यात नवे असे काही हाती लागणे मुष्कील आहे. पण त्या पलिकडे काही कारणे असू शकतात. 


*खरं तर बुद्धी, दीर्घायुष्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही.* पण एखाद्या मानवसमूहात काही गुणांचे प्रमाण लक्षणीय़ वाढलेले दिसत असेल तर ते का? याचे कोडे कोणत्याही चौकस व्यक्तीला सतावत राहते. 


*आपल्याकडे जे नाही ते जर दुसर्‍या कुणाकडे असेल तर वैषम्याची भावना निर्माण होते. उदा० पैसा, ताकद, आरोग्य/स्वास्थ, रुप इ० इ० ब्राह्मणांचा तिरस्कार माझ्यामते मुख्यत: त्यांच्या बुद्धीमुळे होतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये.* ब्राह्मणांना त्यांची बुद्धी निसर्गत: मिळाली की काळाच्या ओघात विकसित झाली? या प्रश्नावर थोडा उजेड टाकायचा हा एक छोटा प्रयत्न...

 

ज्यू, जपानी लोकांत आढळून येणा‌र्‍या दीर्घायुष्याची करणे शोधायचा प्रयत्न बराच झाला आहे. पण माझ्या आतापर्यंतच्या वाचनात/अभ्यासात ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे शोधायचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळले नाही आणि तसा शिस्तबद्ध अभ्यास कुणी करेल असे ही वाटत नाही. कारण अशा  अभ्यासाला निधी उपलब्ध होईल असे वाटत नाही. कारण चुकुनमाकुन अशा संशोधनाने ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब केलेच तर त्यासारखे अप्रिय (पोलिटिकली इन्करेक्ट) सध्याच्या काळात दुसरे काहीही नाही. 


त्यामुळेच मला ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाविषयी जे जीवशास्त्रीय विचार मांडायचे आहेत, त्यांच्याकडे काही  तर्कनिष्ठ अटकळी/अंदाज या कोनातूनच बघितले जावे. त्याची प्रेरणा मला आधुनिक चेता/मस्तिष्क विज्ञान, ध्यानावर झालेले संशोधन[३] यातून मिळाली आहे. *बुद्धी फक्त ब्राह्मणांकडे असते असा ही दावा मला करायचा नाही.* कारण बुद्धीचे अनेक पैलू असतात आणि ते वेगवेगळ्या परिस्थितीनुसार विकसित होतात. त्यामुळे असा कुणी तर्क किंवा आरोप केलाच तर तो मात्र एक निर्बुद्धपणा ठरेल.* महत्वाचे म्हणजे माझ्या मर्यादांचे मला पूर्ण भान आहे.*


भारत, आर्यावर्त, हिंदुस्थान इ० नावाने ओळखल्या गेलेल्या भूप्रदेशात मानवी संस्कृतीला स्थिरावायला बरेच पोषक वातावरण मिळाले. या संस्कृतीमध्ये जो अग्निपूजक समाज होता, त्याने केलेल्या वाङमय निर्मितीचे जतन करण्यासाठी, लेखनकला विकसित न झाल्यामुळे, फक्त मौखिक परंपरेचा पर्याय उपलब्ध होता. मौखिक परंपरेने कोणत्याही माहितीचे जतन करणे किती अवघड आहे, हे समजून घेणे इथे अतिशय आवश्यक आहे. 


रस्त्यावरील कोणत्याही १०० माणसांना त्यांनी शालेय जीवनांत पाठ केलेल्या कविता म्हणून दाखवायला सांगा. १ली ते १०वी या प्रत्येक इयत्तेमधील एक अशा दहा कविता म्हणून दाखविणारी १० माणसे तरी सापडतील का, याची मला शंका आहे. आणि समजा सापडली तर कर्तव्य म्हणून पाठांतर केलेली आणि आवड म्हणून पाठ केलेली माणसे वेगळी आहेत असे लक्षात येईल. कवितेचा अर्थ, चाल, लय आवडली तर पाठांतर सोपे होते. 


आधुनिक चेताविज्ञान असे सांगते की एकाग्रतेने मेंदूच्या उपाग्रखण्डाचा (prefrontal lobe) वेगाने विकास होतो. ज्या संवेदनांवर एकाग्रता जास्त होते त्यासंबंधी मेंदुच्या भागाशी उपाग्रखण्डाच्या जोडण्या वाढतात आणि मेंदूचा विकास होतो. जसे खेळात स्नायविक हालचाली नियंत्रित करणारा गतिबाह्यक आणि उपाग्रखण्डाबरोबर विकसित होतो [४]. संगीतात श्रवणशक्ती आणि काही भाषासदृश कौशल्यांचा विकास होतो. नृत्यकलेत अवकाश, संगीत, लय-ताल यांच्याशी संबंधित जाणीवा आणि स्मृती इ० केंद्रे जोडण्या निर्माण होऊन विकसित होतात[५]. गमतीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की सध्याच्या काळात स्मृतीभ्रंश आणि तत्सम आजारांचा सामना करण्यासाठी जे व्यायाम तयार केले गेले आहेत, त्यात याच कल्पना केंद्रस्थांनी आहेत.


वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले प्रचंड वाङमय जतन करण्यासाठी ब्राह्मणांना मेंदूचा मोठ्या प्रमाणावर वापर अतिशय एकाग्रतेने आणि कर्तव्यबुद्धीने करावा लागला. शतकानुशतके वेदसंहितांचे रक्षण करण्यासाठी जटा/घनपाठादी तंत्रे वापरली गेली. ही तंत्रे समजून घेतली [६] तर असे लक्षात येईल की संहितांमधला एकही शब्द हरवू नये हा या मागचा महत्त्वाचा उद्देश. वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गायत्री मंत्राच्या घनपाठाचे सादरीकरण या दुव्यावर पहाता येईल.  हे सर्व पाठ करताना मेंदूला जो व्यायाम होतो, त्यामुळे ब्राह्मणांमध्ये उपाग्रखण्डाचा वेगाने विकास झाला. वैदिक शिक्षण गुरुगृही आठव्या वर्षी चालू होई. बरेचसे वैदिक शिक्षण प्रजननपूर्व काळात होत असल्याने विकसित मेंदूशी संबंधित काही जनुकीय बद्दल पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांना फायदा झाला. परिणामी ब्राह्मण अधिकाधिक बुद्धिमान होत राहिले.


जेव्हा ब्राह्मणांचे पारंपरिक व्यवसाय मागे पडले तेव्हा या उत्क्रांतीला काही कारणांनी खीळ बसली. पण या जनुकीय बदलांचा फायदा  मात्र पुढल्या  पिढ्यांना बर्‍याच प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पण हा फायदा अनंतकाळपर्यंत ब्राह्मणांना मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण आता जनुकीय विद्राव्यता (genetic dilution) सांस्कृतिक अभिसरणामुळे खुप वाढली आहे. एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावून हे परत साधता येईल का? या प्रश्नाचे उत्तर पण नाही असे द्यावे लागेल. पिढ्या न पिढ्या सतत काही वर्षे काही संहितांची पारायणे करायची आणि एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावायची यात संख्यात्मक आणि गुणात्मक फरक नक्कीच आहे. त्यामुळे ब्राह्मणांचे बलस्थान (*वैदिकपठणाने विकसित पावलेला उपाग्रखण्ड*) काळाच्या ओघात सहज नाहीसा होईल. जनुककोषावर बाहेरून होणारे आघात (ताण, प्रदूषण, कुपोषण) देखिल यांस कारणीभूत ठरणार आहेत, हे विसरता कामा नये.


मी इथे मांडलेल्या या कल्पना conjecture स्वरूपाच्या असल्यामुळे बर्‍याच लोकांना (ब्राह्मणत्वाचा न्यूनगंड असलेल्यांना आणि ब्राह्मणांचा द्वेष करणार्‍यांना) हास्यास्पद वाटतील, पण त्यांनी एखादे अपरिचित काव्य "घनपाठाचे तंत्र" वापरून पाठ करायचा प्रयत्न करावा आणि मग मला सांगावे.




संदर्भ:

[१] https://www.youtube.com/watch?v=ped-uIlw_24

[२] https://www.scientificamerican.com/article/human-sea-nomads-may-have-evolved-to-be-the-worlds-elite-divers/

[३] https://www.youtube.com/watch?v=7CBfCW67xT8&rco=1

[४] https://www.apa.org/monitor/2019/03/athletic-brain

[५] https://www.frontiersin.org/articles/10.3389/fnhum.2017.00566/full

[६] https://www.youtube.com/watch?v=Ti4d31KGN1w

 

सोमवार, २५ डिसेंबर, २०२३

श्रेष्ठकनिष्ठ

श्रेष्ठकनिष्ठ
=====

--राजीव उपाध्ये, डिसे २०२३

सध्या हे श्वानशिशु आह्वानांचे व्हिडीओ बरेच नियमितपणे फेसबुकवर बघायला मिळत आहेत. हे कुणी सहज गंमत म्हणून तयार करत आहे की हे काही प्रयोग आहेत कळायला मार्ग नाही. पण आपल्या जीवसृष्टीच्या सदस्यांच्या अस्तित्वावर यामुळे बराच उजेड पडतो.


आधुनिक सुसंस्कृत मानव समाजात श्रेष्ठकनिष्ठ हा भेदभाव निंद्य/त्याज्य मानला गेला आहे. पण निसर्गाला समाजाचे नियम समजत नाहीत. तो त्याच्याच मगदूराप्रमाणे प्रकट होत राहतो. हे कटू सत्य आहे. आपल्या क्षमता आपले श्रेष्ठकनिष्ठत्व ठरवतात, हे मान्य करावेच लागते.

वरील प्रयोग कशासाठी केले जात असतील याविषयी मी काही अंदाज बांधले आहेत. 

१ला अंदाज  - केवळ श्वानांच्या वर्तनाचा अभ्यास. पण मनुष्यप्राणी स्वार्थी असल्याने ही शक्यता असली तरी इतकाच उदात्त हेतू यात असेल असे वाटत नाही. 
२ रा अंदाज - क्षमतेनुसार श्वानांचे वर्गीकरण करून त्यांची  "योग्य" किंमत ठरवता यावी यासाठी 
३ रा अंदाज - वेगवेगळ्या जातीच्या श्वानशिशुंना या चाचण्या लावून त्यातून निवडलेल्या पिल्लांची रवानगी योग्य कामासाठी करता यावी यासाठी (उदा० जर्मन शेपर्ड जातीच्या श्वानांमध्ये उत्तम श्वान निवडून ते सैन्यदल, पोलिस इत्यादि ठिकाणी पोचविणे केवळ अशा चाचणीमुळेच शक्य आहे)


"उद्दीष्टासाठी मुसंडी मारून ते साध्य करणारे" हे सर्वश्रेष्ठ मानता येईल का?

इथे मला या प्रयोगाशी सुसंगत असा एक अनुभव सांगावासा वाटतो - माझी मुलगी जेव्हा शाळेत होती तेव्हा मी अनेकदा तिला आणायला जायचो. तिच्या शाळेत एक "कडक" नियम होता (मला या नियमाचा भयानक राग यायचा). शाळेची घंटा वाजली की धावत सुटायचे नाही, हा तो नियम. तरी पण हा नियम तोडून काही मुले (सर्व वयाची) शाळा सुटली की धावत बाहेर यायची. ही मुले सहसा अभ्यासात आणि अभ्यासेतर उपक्रमात  पण पुढे असायची, असा मी माझ्यापुरता निरीक्षणे करून निष्कर्ष काढला होता. तो बरोबर होता. या वरील व्हिडीओमुळे माझे निष्कर्ष परत अधोरेखित झाले आहेत.

त्यानंतर नंबर लागतो तो चिकटपणे ध्येय प्राप्तीसाठी झगडणारे - म्हणजे भर्तृहरीच्या "उत्तमजनां" प्रमाणे कितीही विघ्ने आली तरी हातातले काम टाकून न देणारे... असो.

आता इथे एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतो - मुंबईसारख्या शहरात लोकल स्टेशनमध्ये शिरताक्षणी मुसंडीमारून आत शिरणारे चाकरमाने श्रेष्ठ मानायचे का? 

माझ्या मुलीच्या शाळेतील जी मुले नियमांचा आदर केल्यामुळे "मागे" राहात असत त्यांना कनिष्ठ मानायचे का?

तुमच्या उद्दीष्टाचे लाभार्थी जेव्हढे जास्त तेव्हढे तुमच्या मुसंडीचे महत्त्व जास्त आणि तेव्हढे तुम्ही श्रेष्ठ! पण मग नियम पाळणारे, कायद्याला भिणारे दुय्यम स्थानावर जातात आणि विचित्र समस्या उत्पन्न होते. 

पण नाही...  नियमांचा किंवा कायद्याचा आदर करणे हे विकसित मेंदू्चे निदर्शक असल्याने (याविषयी मी लवकरच सखोल लिहीणार आहे) ते पण तितकेच "श्रेष्ठ" ठरतात. कारण असे जीव समूहाच्या स्थैर्याला/स्थिर विकासाला हातभार लावतात.

तेव्हा आपले श्रेष्ठत्व आणि कनिष्ठत्व ठरवायचे तर हा प्रश्न स्वत:ला अवश्य विचारा - मी मुसंडी मारली तर फायदा कुणाला आणि किती? मी कायदा पाळला तर फायदा कुणाला आणि किती?








 

मंगळवार, ४ जुलै, २०२३

"अस्सल सांस्कृतिक"

 "अस्सल सांस्कृतिक"

=============




मानववंशशास्त्र हा माझ्या अत्यंत आवडीचा विषय! समाजातील, संस्कृतीमधील बदलांची निरीक्षणे करायला मला आवडते.


नुकताच ब-याच वर्षांनी पुण्यातल्या एका "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमाला गेलो होतो. "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रम हे पुण्यातल्या एखाद्या पेठेत मंगल कार्यालयातच असतात. सदाशिव किंवा शनिवार पेठेतील कार्यक्रम भौगोलिक माहात्म्यामुळे अस्सलतेमध्ये काकणभर सरसच असतात. लग्न आणि मुंजीनंतर  पुरस्कार समारंभ आणि मग व्याख्यान सहसा "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमात मोडतात.


कोणत्याही "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमाला चहापान असेल तर जरा कार्यक्रमाचे गांभीर्य वाढते आणि चहाबरोबर बिस्किटे असली तर मग विचारू नका. नदी अलिकडच्या (पश्चिम पुण्यातील) काही उच्चभ्रू संस्थामध्ये चहापाना बरोबर भजी पण मी खाल्लेली आहेत. तात्पर्य, चहापान हे त्या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते.


परवाच्या "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमात चहाचे पिंप दिसले तेव्हा मला हायसे वाटले. मग बिस्किटांचे ताट आले तेव्हा मी लगेच त्या दिशेने मुसंडी मारली आणि हक्काची बिस्किटे ताब्यात घेतली. 


पण तेव्हा मला एक धक्का बसला. चहापानातील चहाचे कप चिनीमातीचे जाऊन आता कागदी आले आहेत. पण इथपर्यंत ठीक आहे. पण त्या कपाचा आकार आता "घोटभर" म्हणण्या इतका पण राहीला नाही हे वास्तव अस्वस्थ करणारे होते.


यानंतर मात्र पुढे काय वाढून ठेवले आहे, या चिंतेने माझ्यातला मानववंशशास्त्रज्ञ व्यथित झाला. भविष्यात पूजेच्या पळीने लवकरच चहा तीर्थासारखा उपस्थितांना दिला जाणार असे चित्र डोळ्यासमोर तरळू लागले. 


पुणेरी "अस्सल सांस्कृतिक" कार्यक्रमातील चहापान हा अलौकिक घटक मूळ स्वरूपात टिकविणे प्रत्येक अस्सल पुणेकराचे आद्य कर्तव्य आहे...



-राजीव उपाध्ये




शनिवार, २४ जून, २०२३

जननेंद्रिये

 जननेंद्रिये

======
राजीव उपाध्ये (जून २०२३)
सध्या अचानक फेसबुकवर सेक्सटॉइजच्या जाहिराती मुबलक दिसू लागल्या आहेत. हा अचानक बदल "सनातनी" मानसिकतेला कितपत झेपेल माहित नाही. पण मला तो संस्कृतीच्या स्थित्यंतरात महत्त्वाचा वाटतो...
जननेंद्रियांविषयी लज्जा, तिरस्कार किंवा घृणा जगभर सापडते. हे एक acquired behavior आहे. मनुष्यप्राणी सभोवतालच्या निरीक्षणातून किंवा अनुभवातून योग्य काय आणि अयोग्य काय हे शिकत जातो. हे योग्य/अयोग्य त्या त्या समूहापुरतेच मर्यादित असते, याचे भान सहसा सर्वसामान्य व्यक्तीला नसते. जो समूह ताकदवान असतो, तो आपल्या योग्य/अयोग्यतेच्या कल्पना इतरांवर लादतो. भारतीय संस्कृती याला अपवाद नाही. पण भारतीय संस्कृतीमध्ये जननेंद्रियांची पूजा पण होते. हा परस्पर विरोध गमतीदार आहे.
पण जगभर मात्र एक मोठा वर्ग जननेंद्रियांविषयी नकारात्मक भावनातून मुक्त झालेला दिसतो. तसेच नग्नतेविषयी उदार दृष्टीकोन बाळगतो. मानवी जननेंद्रिये मोठ्या प्रमाणात कलाविष्काराचा (१,२, ३) विषय बनलेली दिसतात. teatro oficina या एका प्रसिद्ध नाटक कंपनीच्या एका नाटकात एक पात्र स्टेजवर हस्तमैथून करते. तर दूस-या एका नाटक कंपनीच्या एका ऑपेरात १२० पूर्णनग्न पात्रे गायन करतात! मला या कलाकारांच्या धाडसाचे कौतूक वाटते.
याच बरोबर जननेंद्रियांच्या आकारातील खाद्यपदार्थांची रेलचेल अनेक देशांत दिसून येते. पुरुष जननेंद्रियांच्या आकारातील बेकरीपदार्थ, आईस्क्रीम किंवा मिठाया इ० जपानपासून फ्रान्सपर्यंत अनेक युरोपीअन देशात दिसून येतात.
काल "मास्टरशेफ" या जगप्रसिद्ध पाकस्पर्धेत बैलांच्या जननेंद्रियांपासून (Bull's penis Pho) बनवलेला पदार्थ pressure test साठी निवडलेल्या स्पर्धकांना करायला सांगितला होता. हा पदार्थ चीन, व्हिएतनाममध्ये (४) एक delicacy म्हणून बनवला जातो. स्पर्धकांमध्ये असलेल्या एका मराठी महिलेने कोणताही थयथयाट न करता हा पदार्थ बनविण्याचे आह्वान स्वीकारले. या पार्श्वभूमीवर आपल्याकडे उर्फी जावेदच्या फॅशनमुळे उडवली गेलेली धूळ आठवली आणि हसू आले.

शनिवार, १० जून, २०२३

सत्त्वपरीक्षा

 सत्त्वपरीक्षा

========


-राजीव उपाध्ये


आयुष्यात सहनशीलतेची परीक्षा घेणारे प्रसंग तुम्ही कसे हाताळता? अशा प्रसंगात आपले कोण आणि परके कोण हे मात्र नक्की समजतात.


गेल्या वर्षी याच महिन्यात अपर्णाने (बायकोने) स्विगीवरून भेळ मागवली आणि एकदोन दिवसात हळूहळू तिची तब्येत बिघडायला सुरुवात झाली. प्रथम मळमळ आणि पोट बिघडणे ही सामान्य लक्षणे होती आणि प्राथमिक उपचारांनी बरे वाटेल, अशी अपेक्षा होती. पण नंतर लक्षणांची तीव्रता वाढून अपर्णाला ताप भरला. सुरुवातीला ताप साधा वाटला पण तो वाढला आणि त्यात अपर्णाचे बोलणे असंबद्ध होऊ लागले आणि ऑक्सीमिटरवर ऑक्सीजनची पातळी बघितली, तेव्हा मात्र मी घाबरलो आणि तिला हॉस्पिटलमध्ये जाऊ या, असे सुचवले. अपर्णाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हायचे नव्हते कारण घरातलं सगळं रूटीन बिघडेल, असा त्या अवस्थेत तिचा युक्तिवाद होता. 


खालावलेली ऑक्सीजन पातळी आणि असंबंद्ध बोलणे यामुळे मी पूर्णपणे हादरलो होतो आणि उशीर करणे माझ्या अंगलट येऊ शकले असते. शक्य तेव्हढ्या शांतपणे मी तिला पटवायचा प्रयत्न केला पण तो फोल ठरला. हळूहळू माझा धीर सुटायला लागला आणि मग मी नाईलाज झाला तेव्हा आवाज चढवला. खूप थयथयाट केला तेव्हा अपर्णा हॉस्पिटलमध्ये यायला तयार झाली. हॉस्पिटलमध्ये चाचण्या केल्यावर साधी कावीळ असे निदान झाले आणि डॉक्टरांच्या अपेक्षेप्रमाणे ताप २-३ दिवसात निघाला पण.) पण मुद्दा असा आहे की माझा थयथयाट त्यावेळेला कुणी रस्त्यावर ऐकला असता तर या बाईचा नवरा हिला किती छळतो, असा प्रश्न अनेकांना पडला असता. पण त्या अगोदर मी बराचवेळ शांतपणे समजावून सांगण्याचा केलेला प्रयत्न रस्त्यावर कुणाला कधीच कळला नसेल.


माझ्या सहनशक्तीची पराकोटीची परीक्षा मी माझ्या आईच्या मेनोपॉजमध्ये दिली. 


८६ साली वडील गेल्यानंतर आईची तब्येत हळूहळू ढासळायला सुरुवातीला झाली. भविष्याविषयीच्या अनेक स्वप्नांवर पाणी अगोदरच पडले होते. जे काही करायचे ते पुण्यात राहूनच करावे लागणार होते. "आईला सोडून दे" असे सांगणारे काही महाभाग मला तेव्हा भेटले. त्यांचे ऐकले असते तर नक्की काय आणि किती साधले असते, हे ठरवणे आता अवघड आहे. पण आईकडच्या नातेवाईकांनी मात्र मला कच्चे सोलून खाल्ले असते, हे मात्र नक्की...


आईच्या तेव्हाच्या मानसिक स्थितीला काही मानसिक आघातांची किनार होती, तसेच एका सुपरस्टीशनची पण त्याला किनार होती (माझ्या आयुष्यात ज्यांनी माती कालवली त्यात ज्योतिषांचा सहभाग खूप आहे). लायकी असून आपले आयुष्य वाया गेले, ही आईची भावना त्यात प्रमूख होती (हा त्यातला खरा तथ्याचा भाग. आईला जवळून ओळखणारे सर्व हे निर्विवाद मान्य करायचे.). तिचं सगळं वैफल्य माझ्यावर निघत होते. एकूलता एक असण्याचा हा दोष...


आज उशीरा का होईना मला आयुष्यातल्या बहुतेक सर्व प्रश्नांची उत्तरे मिळाली असल्याने retrospectively आईला समजून घेता येते, पण तेव्हा मात्र मी एका वणव्यात सापडलो होतो. तेव्हाचे मित्र तर असून नसल्यासारखे होते (आई तेव्हाही त्यांना "हे तुझे फक्त सुखाचे सोबती" असे म्हणायची. प्रत्यक्षात ते सुखाचे सोबती तरी होते का असा प्रश्न आता पडतोच). पण मनातली घालमेल बोलून दाखवायला दूर्दैवाने एकही योग्य जागा नव्हती. 


मला जेव्हा हे असह्य होई तेव्हा मी आमच्या तेव्हाच्या फॅमिली डॉक्टरांना भेटायचो. मग त्या मला Restyl घ्यायला सांगायच्या किंवा "आईला सायकियाट्रिस्टकडे घेऊन जा" म्हणून थंडपणे सांगायच्या. पण आईचे वागणे असे का आहे याबद्दल एक अवाक्षर त्या बोलल्या नाहीत. मी दोन सायकियाट्रिस्टकडे तिला घेऊन पण गेलो. पण अशा पेशंट बरोबर रॅपो निर्माण करणे ही डॉक्टरांची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यात ते सपशेल अपयशी ठरले. आज मला त्यांची आठवण झाली की पायातली चप्पल काढावीशी वाटते. पण  दिवसामागून दिवस जात होते. अधूनमधून आईची मनस्थिती खूप छान असायची. माझं संस्कृत तिच्यापेक्षा चांगलं होतं, याचा तिला अभिमान होता.  तिने दिलेला वाचनाचा आणि पाठांतराचा किडा मी जोपासला याचा पण तिला अभिमान होता. मी पुस्तकांची चळत घेऊन आरामखुर्चीत वाचत बसलो की तिला भारी कौतूक वाटायचे. मुलांनी आईवडीलांच्या पुढे गेलेच पाहिचे, हे आईने माझ्यावर मनावर बिंबवलेले महत्त्वाचे तत्त्व.  त्याच सुमारास माझ्या संगणकीय संगीतावरील कामाला भरपूर प्रसिद्धी मिळाल्याने अधूनमधून ती सुखावायची, पण ते सुख फार काळ टिकत नसे. 


असंच एकदा आईच्या मानसिक स्थितीने कमालीचा तळ गाठला होता आणि माझ्या आय० आय० टी० मधल्या एका डॉक्टर मित्राचा मला फोन आला की तो पुण्यात आहे आणि त्याला मला भेटायचे होते. आय० आय० टी० मध्ये मला जे काही थोडे चांगले मित्र मिळाले, त्यात हा एक होता. त्याची आई त्याच्या लहानपणी गेली होती आणि तरीही तो डॉक्टर झाला आणि आय० आय० टी० मध्ये एम०टेक० करायला आला, याचे माझ्या आईला खूप अप्रूप होते. आई त्याची वरचेवर चवकशी करायची.  आम्ही विद्यापीठात भेटलो, तेव्हा त्याने आईची चौकशी केली तेव्हा माझा चेहेरा कावराबावरा झाला आणि मी उत्तर देण्याचे टाळू लागलो. मग त्याने खोदूनखोदून चवकशी केली आणि मला म्हणाला, "मी आजच संध्याकाळी तुझ्या आईला येऊन बघतो". मी अतिशय हताशपणे त्याला "हो" म्हटले. 


त्या दिवशी आम्ही दोघेजण एकत्र घरी गेलो आणि आईची ओळख करून दिली. "हा डॉक्टर गौतम! माझा हॉस्टेल मधला मित्र! तुला भेटायला आला आहे".  आईचा चेहेरा किंचित उजळला. त्याने आईशी गप्पा मारता मारता तब्येतीची चौकशी करायला सुरुवात केली आणि मी चहा करायला आत गेलो. चहा आणि गप्पा झाल्यावर गौतम म्हणाला, "चल जरा पाय मोकळे करून येऊ. मग त्याने मला सांगितले की आईची परिस्थिती भयानक वाईट आहे कारण तिचा "मेनोपॉज" चालू आहे. त्या दिवशी आयुष्यात मला १ल्यांदा मेनोपॉज हा शब्द मला समजला आणि आईला काय होत आहे, हे समजले.


डॉक्टर गौतम म्हणाला, "तुला ताबडतोब आईला चांगल्या गायनेकॉलिस्ट किंवा सायकियाट्रिस्ट्कडे घेऊन जावे लागेल." मग मी त्याला माझे सायकियाट्रिस्ट्चे आलेले अनुभव सांगितले. परिस्थिती कठिण बनली होती. त्यावर डॉ० गौतमने मला सुचविले की मी आमच्या फॅमिली डॉक्टरांना परत भेटावे आणि त्यांना आमच्या भेटीत काय झाले हे सांगावे. गरज पडल्यास त्याने परत पुण्याला येऊन डॉक्टरांना भेटायची तयारी दाखवली. सुदैवाने ती वेळ आली नाही. मात्र यानंतर आमच्या फॅमिली डॉक्टरांनी त्यांची हटवादी भूमिका सोडली आणि मला एक मार्ग सूचवला. पुढे त्याचा ब-याच प्रमाणात मला उपयोग पण झाला. अधूनमधून त्या मला "आईचा फूल बॉडी चेक-अप करून घे" असा आग्रह करायच्या, पण आईला ते मान्य नसे. "उद्या काही निघाले आणि मी अंथरूणाला खिळले तर तुझ्या लग्नाचे कोण बघेल?" असा आईचा मला प्रश्न असे आणि माझ्याकडे त्याचे उत्तर नसे...


पुढे त्याच परिस्थितीमध्ये माझे लग्न झाले आणि आईच्या ढासळेल्या तब्येतीचा/व्यक्तीमत्त्वातील बदलाचा परिणाम माझ्या वैवाहिक आयुष्यावर पण व्हायचा तो झाला. एका प्रसंगानंतर आई अचानक भयानक मलूल होऊ लागली. हे मलूल होणे इतके विचित्र होते की मला काय करावे करेना ते कळेना. एक दिवस मात्र हद्द झाली. आईला पातळ नीट नेसता आले नव्हते. मी तिला सांगितले, तेव्हा ती ते स्वीकारायला तयार नव्हती, आणि तशीच बाहेर जायला निघाली, तेव्हा मी घाबरलो आणि अक्षरश: आरडओरडा, आदळआपट करून तिला थांबवले. लगेच आमच्या फॅमिली डॉक्टरांना फोन केला. त्यांनी तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये न्यायला सांगितले. त्या परिस्थितीमध्ये मी आईला ब-याच प्रयत्नानंतर कसेबसे जोशी हॉस्पिटलमधे नेले. प्राथमिक चाचण्यानंतर तातडीचा एम०आर०आय० स्कॅन केला तेव्हा निदान झाले - "शेवटच्या स्टेजचा rapidly advancing ग्लायोमा!"


आईच्या शेवटच्या दिवसात सख्खा मामा अमेरीकेहून, सख्खी मावशी नाशिकहून धावून आले. आईच्या ऑपरेशनच्या वेळी आजीने आईकडच्या सर्व नातेवाईकांची फौज उभी केली.  एके दिवशी  जोशी हॉस्पिटलमधे  रात्री मामाने  आईवर झालेल्या मानसिक आघातांबद्दल मला सविस्तर सांगितले (मानसिक आघात हे कॅन्सरचे एक प्रमुख कारण असतात असे मला पुढे सिप्ला कॅन्सर सेंटरमध्ये लावलेल्या पोस्टरमुळे आणि डॉक्टर बावडेकरांच्या आत्मचरित्रामुळे समजले). पण तोपर्यंत उशीर झाला होता. ते अगोदरच सांगितले असते तर आमचे नाते वेगळे आणि समृद्ध झाले असते पण आता जर-तर ला काही अर्थ नाही. 


हे सर्व आज लिहायचे कारण - सत्त्वपरिक्षेच्या प्रसंगात सहनशीलता संपते, मग काहीही करून उद्दीष्ट साधायचे असते.   उंटावरून शेळ्या हाकणारा समाज फक्त  आपल्याला दूषणे देण्यासाठी असतो. 


गुरुवार, १ जून, २०२३

*प्लास्टीक पिशव्या, सामाजिक जबाबदारी आणि कायद्याचा बडगा*


मी गेले अनेक महिने कुत्र्यांच्या मानवीकरणाचा (domestication) निरीक्षणात्मक अभ्यास करत आहे. जगभरच्या पाळीव कुत्र्यांची असंख्य निरीक्षणे केल्यावर काही आश्चर्यकारक गोष्टी लक्षात आल्या. पाळीव कुत्र्यांची अस्तित्वाची लढाई न्यूनतम असते. मालकाने अन्न आणि सुरक्षेची महत्त्वाची गरज भागवल्यामुळे कुत्री मालकाशी जुळवून घेतात. तसेच जेव्हा प्रेत्येक आज्ञापालनाचे काही ना काही बक्षिस मिळते, तेव्हा त्या आज्ञा निमूटपणे स्वीकारल्या जातात (प्रत्येक कुत्र्याचा स्वभाव वेगळा असतो आणि जनुकीय रचना वेगळी असल्याने थोडे इकडेतिकडे होऊ शकते) *पण केवळ योग्य वेळी योग्य बक्षिस दिल्याने, भावनिक आणि इतर गरजा पूर्ण झाल्याने कुत्री मानवी वर्तनाच्या किती जवळ जाऊ शकतात, याचे अत्यंत उत्तम उदाहरण म्हणजे चिनी पुडल जातीचे श्वान. भविष्यात जनुकीय अभियांत्रिकीमुळे चिनी लोक या कुत्र्यांना माणसाप्रमाणे कदाचित बोलायला पण शिकवतील पण तो भाग वेगळा...
 
हे सांगायचे महत्त्वाचे कारण असे पाळीव कुत्र्यांचा जगण्याचा संघर्ष जसा न्यूनतम पातळीवर आणता येतो, तसा माणसांचा जगण्याचा संघर्ष फार थोड्या व्यक्तींमध्ये न्यूनतम पातळीवर येतो. सहसा समाधानी माणसे थोडीफार जबाबदारीने वागताना दिसतात. विचार करा, *माणसाची पालनकर्ती राज्यव्यवस्था माणसाच्या प्रत्येक योग्य वर्तनाबद्दल कधीही शाबासकी देत नाही*. पण कुत्र्यांना मात्र प्रत्येक योग्य वर्तनाबद्द्ल शाबासकी मिळते. कदाचित असे बक्षिस देणे माणसाला आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. पण ज्या संस्कृतीमध्ये ताबडतोब, याच जन्मात जिथल्या तिथे बक्षिस मिळते तिथे मनुष्याने देदीप्यमान प्रगती केली आहे (उदा० भांडवलशाही देश, युरोपिअन संस्कृती).

भारतीय संस्कृतीचे दूर्दैव असे की असे बक्षिस मेल्यानंतर देण्याचे आश्वासन देते. बहुसंख्य भारतीय समाज जबाबदारीने वागत नाही याची खरी गोची हीच आहे. कुणाला पटो अथवा न पटो.

- राजीव उपाध्ये

शनिवार, २० मे, २०२३

Killer Instinct


Killer Instinct
 ==========

-- राजीव उपाध्ये

चार्वी शाळेत असताना मी अनेक वेळा तिला शाळेतून आणायला जायचो. शाळा सुटायच्या वेळेला काही निरीक्षणे करून मी माझ्या पुरताच एक सिद्धांत मांडला होता. तो असा की शारीरिक चापल्य आणि बौद्धिक चापल्य यांचा घनिष्ठ संबंध असतो. - शाळा सुटल्यावर काही मुले सुसाट गेट मधून बाहेर येत असत. ही सुसाट मुले अभ्यासात पण सुसाट होती, असे माझे निरिक्षणांती मत बनले होते. आमच्या मॅडम सुसाट नव्हत्या आणि अति रेंगाळणार्‍या पण नव्हत्या. त्या "वेल टू डू" वर्गात मोडणा-या होत्या. मी विषारी स्पर्धेच्या वातावरणात वाढल्यामुळे killer instinct चे महत्त्व ओळखून चार्वीला "सुसाट" करण्याचे तूफान प्रयत्न केले, पण ते एका मर्यादेपर्यंतच यशस्वी ठरले.

चार्वीच्या शाळेने विषारी स्पर्धा खुडायचे काम मुळापासून केले. "Killer instinct" हेच अंतिम सत्य मानणार्‍या मला (आणि अधूनमधून अपर्णाला) चार्वीच्या शाळेचा खूप राग यायचा. दर ६ महिन्यांनी आम्ही शाळा बदलायचे मनसूबे रचायचो. पण शाळा बदलणे, हे हॉटेल बदलण्यासारखे सोपे नसल्यामुळे मग तो बेत मग रहित व्हायचा.
आज चार्वी आय० आय० टी० मध्ये आणि अमेरिकेत गेली नाही याचे अजिबात दू:ख नाही. उलट तिला अमेरिकेचे आकर्षण अजिबात नाही याचे जास्त कौतूक वाटते. तिला मी अलिकडे विचारले - "How you will describe Scottish culture in one sentence?". ती उत्तरली - "Baba, live and let live". आज तिच्या तिकडच्या मित्रमैत्रीणी चार्वीने तिकडे परत यावे म्हणून प्रयत्न करतात, तेव्हा मला बाप असूनही स्वत:च्या मुलीचा हेवा वाटतो. मी तिच्या इतका नशीबवान नाही. अनेक जुनी मित्रमंडळी आणि "मास्तरडे" अजुनही माझ्याकडे तुच्छतेनेच बघतात...

हे सगळं आज लिहायचं कारण म्हणजे नुकतंच आय० आय० टी० मुंबई ने मुलांवरील ताण कमी करण्यासाठी दोन कोर्सेस कमी करण्याचे स्वागतार्ह पाऊल उचलल्याचे वाचले. याचे परिणाम दिसायला बराच वेळ जाईल पण परिणाम टिकाऊ असेल. Killer instinct ला अवाजवी महत्त्व देण्याच्या नादात अनेकदा वेगळ्या प्रतीची बुद्धीमत्ता नष्ट होते. वाफेवर अन्न शिजवताना जीवनसत्त्वे आणि पूरक द्रव्ये नष्ट होतात, तसेच काहीतरी. स्वत:च्या मगदूरा प्रमाणे शिकणे यात गैर काही नाही, याची आय० आय० टी० ने दखल उशीरा घेऊन फार नुकसान झाले आहे. Better late than never!