रविवार, ३० जून, २०२४

महाजनस्य संसर्गः

 महाजनस्य संसर्गः 

=========


राजीव उपाध्ये, जून २०२४



पञ्चतंत्रात एक श्लोक आहे - 


महाजनस्य संसर्गः कस्य नोन्नतिकारकः।

पद्मपत्रस्थितं तोयं धत्ते मुक्ताफलश्रियम्॥


अर्थ- मोठ्या लोकांचा सहवास कुणाला प्रगतीकारक नसतो? कारण कमळाच्या पानावर पडलेले पाणी मोत्यांची शोभा धारण करते. 


अर्नोल्ड टॉयन्बी नावाचा एक इतिहासकार म्हणतो की दोन संस्कृतीची जेव्हा टक्कर होते, तेव्हा बलिष्ठ (dominant) संस्कृतीच्या चालीरिती कनिष्ठ संस्कृतीवर प्रभाव पाडतात आणि झिरपतात आणि मानवी समाज उत्क्रांत होत राहतो. 


सध्या हे मानववंशशास्त्रीय वास्तव राजकीयदृष्ट्या गैरसोईचे वास्तव आहे. कुणीतरी आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, हे स्वीकारणे कमीपणाचे, अस्मितेला धक्कादायक मानले जाते. कारण ते "समते"च्या तत्त्वाविरुद्ध आहे. त्यामुळे आपल्यापेक्षा श्रेष्ठ संस्कृती, समूह यांचा द्वेष, तिरस्कार करणे जास्त रूळले आहे. ते एक ’नवसामान्य’ बनले आहे.


जीवसृष्टीत मानव अनेक कारणांनी शीर्षस्थानी किंवा श्रेष्ठ मानला जातो. ज्ञानप्राप्तीचे आणि त्याचे विश्लेषण करून उपयोग करण्याचे विशेष कौशल्य मानवा इतके इतर प्राण्यात विकसित झालेले दिसत नाही. वेगवेगळ्या गरजांसाठी वेगवेगळी हत्यारे बनविणे आणि त्यांचा उपयोग करणे, हे पण इतर प्राण्यामध्ये विकसित झालेले दिसत नाही. वेगवेगळ्या कलांचा विकास, पर्यावरणावरील प्रभुत्व, गुंतागुंतीची समाजरचना मानवा इतकी कळपात राहणार्‍या प्राण्यात नसते. शिवाय परिस्थितीशी जुळवून घेण्यात मनुष्यप्राण्याचा नंबर १ला लावावा लागतो. 


हे सगळे ठिक आहे. पण मला एक प्रश्न पडतो तो असा की मानवानंतर सर्वात वेगाने उत्क्रांत प्राणी या जीवसृष्टीत कोणता?  मी एआयच्या मदतीने या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न केला तेव्हा मला पुढील उत्तरे मिळाली -


० चिंपांझी आणि बोनोबो कुळातील माकडे

० डॉल्फिन 

० हत्ती

० कावळे

० ऑक्टोपस 


यासाठी नक्की कोणते निकष कसे लावले आहेत ते कळायला मार्ग नाही, पण मला ही उत्तरे पटली नाहीत. याचे कारण म्हणजे हत्ती आणि माकडे सोडली तर बाकीचे प्राणी पाळले जात नाहीत. हत्ती आणि माकडे  पाळली जात असली तरी त्याचे प्रमाण नगण्य आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मानवी संपर्कात येऊन जी वर्तन विषयक उत्क्रांती होणे अपेक्षित आहे , ती या दोन प्रजातींमध्ये दिसत नाही.


मानवी संपर्कात येऊन मोठ्याप्रमाणावर उत्क्रांत होत असलेला प्राणी म्हणजे कुत्रा आहे, असे माझे स्पष्ट मत आहे. गेले काही वर्षे समाजमाध्यमांच्या कृपेने मी जगभरच्या पाळीव कुत्र्यांच्या वर्तनाची निरीक्षणे करीत आहे. कुत्र्यांचे मानवीकरण ज्या वेगाने होत आहे, तितके इतर कोणत्याच प्राण्याचे मानवीकरण होताना दिसत नाही. गाई,बैल, घोडे आणि हत्ती हे विशिष्ट हेतूने पाळले जातात. त्यांच्यात आणि त्यांच्या मालकात भावबंध पण निर्माण होतात (हे अगदी वाघसिंहासारख्या हिंस्र पशूमध्ये पण दिसते.). पण त्यांच्यात मानवी संपर्कामुळे, मानवीकरण कुत्र्यांच्या इतके वर्तनवैविध्य दिसत नाही. मानवाशी सर्वात जास्त जनुकीय साधर्म्य असलेले कपिबांधव वर्तनवैविध्यामध्ये मानवानंतर असायला हवे होते. पण ते तसे झालेले दिसत नाहीत. ही आश्चर्याची गोष्ट नाही का?


मी वर कुत्र्यांचे मानवीकरण असा शब्द वापरला, तो मुद्दामून वापरला. त्यात केवळ ’पाळणे’ अभिप्रेत नसते. मानवीकरणाचा परीघ पाळण्यापेक्षा बराच मोठा आहे. पाळणे हे मला संकुचित वाटते - त्यात त्या प्राण्याच्या मूलभूत गरजा भागवून त्याकडून कामे करून घेतली जातात. मानवीकरणात तो जीव मानव असे समजून त्याला वागवले जाते.  मानवीकरण केलेल्या कुत्र्यांमध्ये अशी श्रमांची अपेक्षा असतेच असे नाही (याला अपवाद विशिष्ट कोशल्ये शिकवले गेलेले म्हणजे - सैन्य, पोलिसदलातील कुत्रे, तसेच अपंग व्यक्तीना सोबत करण्यासाठी शिकवलेले सर्व्हिस डॉग्ज, गुरे राखण्यासाठी पाळले गेलेले बॉर्डर कॉली सारखे श्वान इ०). 


कुत्र्यांच्या मानवीकरणाचा विस्तार कुठपर्यंत झाला आहे, हे बघणे रंजक आहे-


० कुत्र्यांच्या वंशावळी ठेवल्या जातात


० कुत्र्यांना ज्या मानवी कुटुंबात ’दत्तक’ घेतले जाते, त्यांची कुलनामे बहाल केली आहेत.


० अनेक कुटुंबात लहान मुलांच्याबरोबर कुत्र्यांच्या पिलांना आणून वाढवले जाते. असे एकत्र वाढलेल्या मुलांचे आणि त्यांच्या पालकांचे कुत्र्याबरोबर भावनिक नाते अजोड असते. 


० कुत्र्यांचा वाढदिवस साजरा करणे हे तर सर्रास आहे. काही अतिउत्साही आणि हौशी लोक कुत्र्यांची लग्ने पण लावतात. पण हे माझ्या पहाण्यात फार नाही. 


० अलिकडे विशेषत: कुत्र्यांना माणसाप्रमाणे कपडे, बूट घालून नटवले जाते. केसाळ कुत्र्यांच्या वेण्या बांधल्या जातात. स्कूटर, सायकल सारख्या वाहनाने फिरायला जाताना कुत्र्याना हेल्मेट, गॉगल पण घातले जातात. भविष्यात कुत्र्यांना "नग्नावस्थेत" फिरायला नेऊ नये असे कायदे झाले तर तो मानवीकरणाचा कळस ठरेल. कदाचित नवे "विनयभंग" त्यातून निर्माण व्हायची शक्यता आहे.


० काही हौशी लोक त्यांच्या कुत्र्यांसाठी खास झोपण्यासाठी खास पलंग, जेवायला छोटी टेबल-खुर्ची वगैरे जामानिमा बाळगतात. 


० कुत्र्यांची सलून आणि पार्लर हे आता खूपच रूळले आहेत. 


० कुत्र्यांसाठी उद्याने, शाळा आणि हॉटेल्स खुप बघायला मिळाली. भारतात हा प्रकार अजून रूळलेला दिसत नाही. विमानप्रवासात अनेक जण कुत्र्यांना अगदी केबिन मध्ये बरोबर घेऊन प्रवास करतात. 


वरील प्रत्येक विस्तारशाखेत मोठी आर्थिक उलाढाल होत असते. पण तो मुख्य मुद्दा नाही, तर मुख्य मुद्दा मानवीकरणातून कुत्र्यांचा झालेला बौध्दिक, भावनिक आणि शारीरिक/वर्तन विकास हा आहे.


अन्न, निवारा आणि जिव्हाळा मिळाल्याने कुत्रा माणसाला ’समर्पित’ करतो आणि आपल्यावर आवलंबून असलेले कुणीतरी जीव लावणारे मिळाल्याने माणसाचा ’अहं’ सुखावतो, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. हे माझ्यामते कुत्रा आणि माणसाच्या अनोख्या नात्याचे गुपित आहे.

 

कुत्र्यांचा बौध्दिक, भावनिक आणि शारीरिक/वर्तन विकास


मी जालावर शोध घेतला तेव्हा सर्वात बुद्धिमान कुत्र्यामध्ये बॉर्डर कॉली आणि पुडल या प्रजाती सर्वात बुद्धिमान असल्याचे मानले गेले आहे. "चेसर" नावाची कुत्री आतापर्यंत सर्वात बुद्धिमान मानली गेली आहे (https://www.youtube.com/watch?v=tGlUZWNjxPA). तिची स्मरणशक्ती, शब्दसंग्रह, शोधक्षमता अचाट असल्याने ती अनेकांच्या अभ्यासाचा विषय झाली आहे. 


पण अनेक कुत्र्यांना अल्पप्रमाणात संख्याज्ञान पण असते असे मानले जाते आणि माफक प्रमाणात अनेक काही कुत्री  शिकवल्यानंतर सोपी आकडेमोड (बेरजा आणि वजाबाक्या) करू शकतात. काही कुत्री "फुली गोळा" सारखे खेळ त्यांच्या मानवी मित्रांबरोबर खेळताना बघायला मिळतात. पण काही कुत्री डॉज बॉल, लपाछपी इ० खेळ पण खेळू लागली आहेत. स्केट बोर्ड वर स्केटींग करणार्‍या श्वानांची संख्या मोठी आहे. 


पालकांबरोबर  श्वानांना संवाद साधता यावा यासाठी काही बटन दाबून रेकॉर्ड केलेला संदेश ऐकवण्यासाठी उपकरणे उपलब्ध आहेत. ती वापरून श्वान आश्चर्यकारक संवाद साधतात. बाहेरून आल्यावर घरात येताना पाय पुसून घरात येणारी कुत्री बघून मी वेडा व्हायचा बाकी होतो.


मी सर्वात थक्क झालो ते चिनी पुडल या प्रजातीमुळे. मला कधीकधी हे श्वान चिनी लोकांनी प्रयोगशाळेत "जनुकीय बदल" घडवून विकसित केले असावेत अशी शंका येते.[१,२] 


अशी शंका येते याचे कारण चीन हे कसलेही नैतिक विधीनिषेध न बाळगणारे (एका दृष्टीने क्रुर) राष्ट्र आहे.  चिनी पुडल चतुष्पाद राहीलेले नसून आता ते द्विपाद झाले आहेत. हा मोठा बदल प्रयोग शाळेत जनुकीय बदल "गुपचुप" घडवून आणल्याशिवाय शक्य नाही असे मला वाटते.  प्रयोगशाळेतील सर्वच संशोधन जगासमोर येत नसते. 


उंदीर आणि डुकरांच्या गर्भात मानवी मूळपेशी/जनुक  कृत्रीमपणे भरून प्रत्यारोपणासाठी अवयव मिळविण्यावर संशोधन चालू आहे. त्यामूळे असे प्रयोग खासगी/गुप्तपणे कुत्र्यांवर झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.


हे चिनी पुडल श्वान काय काय करत नाहीत? ते संगीताच्या तालावर नाचतात, अंथरूण घालतात, पंखे चालू करतात. ते आपल्या बाजूला वळवून घेतात. अगदी खोलीचे दार बंद करतात, तसेच कड्या उघडतात. लहान मुलांच्या अंगावरील पांघरूण पण सारखे करतात. त्यांच्या पालक/मालकांची छोटीछोटी कामे पण करतात. 


कुत्री माणसासारख्या भावना व्यक्त करतात, काही तर माणसासारखे स्मित करू लागले आहेत. हस्की कुळातील काही श्वान "आय लव्ह यु"  सारखी वाक्ये उच्चारतात (म्हणजे तशी नक्कल करतात. काही कुत्रे मालक नसताना घरातील पियानो वाजवून गायचा प्रयत्न करतात. 


टिव्ही वर कार्टून बघणे हा अनेक कुत्र्यांचा विरंगुळा आहे. ते बघत असताना त्यांना डिस्टर्ब केले तर ते नाराजी व्यक्त करतात. इतकच नाही तर खेळाच्या सामन्यातील उत्कंठावर्धक क्षणांना तितकाच प्रतिसाद देतात.


आपल्या पालकांचा मृत्यू झाल्यास श्वान पण दू;खी होतात. त्यांच्या खोड्या काढल्यास ते नापसंती दर्शवतात. 


कुत्र्यांच्या प्रतिभेचे प्रदर्शन घडवणारे डॉग शो, ब्रिटन गॉट टॅलेण्ट सारख्या कार्यक्रमातून दिसणारे  अनेक करामती करून दाखविणारे श्वान बघितल्यावर मन अचंबित होते. जनुकीय संपादनाच्या बदलामुळे भविष्यातील कुत्रे मानवी वाणीने बोलू लागले तर मला आश्चर्य वाटणार नाही.


मात्र अशा रितीने उत्क्रांत झालेला कुत्रा अजुनही आपल्या जातभाईना मानवाबरोबर कसे वागायचे याचे शिक्षण देत नाही. मानव त्याला अजुनही त्याच्या इच्छेनुसार "प्रजोत्पादन" करू देत नाही.  त्यामुळे अवगत केलेल्या गुणांचे जनुकीय संक्रमण पुढील पिढीत होत नाही.  कुत्र्यांच्या उत्क्रांतीमध्ये हे काही अपूर्णता ठेवणारे दुवे आहेत, असे मला वाटते.


आधुनिक श्वानांचे हे मानवसदृश वर्तन (near human behaviour) बघितल्यावर कुत्रा माणसानंतरचा उत्क्रांत प्राणी न मानणे ही एक प्रकारची लबाडी आहे, असे मानावे लागते. माणसाशी जुळवून घेणार्‍या कुत्र्यांचा हा विकास बघितल्यावर मी वर उल्लेख केलेला श्लोक किती चपखल आहे, हे पटल्याशिवाय राहणार नाही. 



१. https://www.newscientist.com/article/2330283-gene-edited-dogs-created-from-cloned-skin-cells-for-the-first-time/


२. https://ocm.auburn.edu/experts/2019/10/010117-designer-dogs-breeding.php




परिशिष्ट - 


माझा हा पण लेख मी नेहेमीप्रमाणे डॉ० दीक्षितांना वाचायला दिला होता. त्यांनी बर्‍याच उपयुक्त टिप्पण्या केल्या. त्या इथे स्वतंत्रपणे देत आहे.


० प्रथम कुत्रा मानवी संपर्कात आला, मग मानवी समूहांबरोबर राहून कित्येक हजार वर्षे उत्क्रांत होत राहीला.  (हे मला पटतं कारण अधर्वट टाकून दिलेली शिकार किंवा अन्न कुत्र्यांना त्यांची गरज भागविण्यासाठी आयती पर्वणी ठरली असणार -रा०उ०)


० कुत्र्यांसाठी अगदी पंचतारांकित हॉटेल्स, शाळेत नेण्या-आणण्यासाठी व्हॅन किंवा बसेस, खास टीव्ही चॅनेल्स, पोहण्य़ाचे तलाव इ० विकसित केले आहेत.


० आज समाजमाध्यमांमुळे दिसून येणारा कुत्र्यांमधील वर्तनविकास प्रयोगशाळेत इतक्या मोठ्या प्रमाणावर कधीही बघायला मिळणार नाही. त्यामुळे समाजमाध्यमांवर लोकांनी हौसेने टाकलेल्या क्लिपा कुत्र्यांच्या वर्तनविकासाच्या संशोधनात महत्त्वाचे साधन ठरतात.


० इतर विकासाबरोबरच कुत्र्यांमधील मानवी भाषेची आकलन क्षमता आश्चर्यकारक आहे. 


० अलिकडे काही कुत्र्यांना कॅन्सरसारखे आजार अगोदरच कळतात, असे लक्षात आले आहे. विशेष शिक्षण दिलेले कुत्रे वृद्धाना उत्तम सोबत करतात.


रविवार, २ जून, २०२४

लैंगिक वर्तन

एका गृहस्थांनी मला मानवी लैंगिक-वर्तनावर नुकतीच चावी मारली.
मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे सोडवताना काहीतरी भोज्जा (संदर्भबिंदू) पकडणे आवश्यक ठरते. दोन प्रमुख भोज्जे या संबंधीच्या चर्चेत वैयक्तिक जडणघडणीनुसार निवडले जातात-
१ ला भोज्जा - "सुसंस्कृत मानवसमाज"
"सुसंस्कृत" मानवसमाजाने निर्माण केलेल्या नैतिकतेच्या, धार्मिक जटिल कल्पना कायम निसर्गाविरूद्ध केलेल्या आचरणाचे उदात्तीकरण करतात. मग "ब्रह्मचर्य", "षड्रिपू" सारख्या कल्पना गळी उतरवून जे आऊटलायर्स यात यशस्वी होतात त्यांना डोक्यावर घेतले जाते. याशिवाय नैतिक-अनैतिकतेच्या कल्पना प्रत्येक संस्कृतीनुसार बदलतात, त्यामुळे उडणारा गोंधळ वेगळाच...
"सुसंस्कृत" मानव समाजाला आपण मूलत: माकडे आहोत हे स्वीकारायला जड जाते. आपण विचार करणारे असल्यामुळे जीवसृष्टीत आपले स्थान वेगळे आहे अशी एक भ्रामक कल्पना त्यात अंतर्भूत असते. प्रत्यक्षात माणसाचे असंख्य प्रश्न निसर्गापासून फटकून राहण्यातून निर्माण होतात, याचा पूर्णपणे सर्वांना विसर पडलेला असतो.वैज्ञानिक सत्ये चटण्या कोशिंबिरीसारखी तोंडी लावायला वापरली जाते.
आपण विचार करू शकतो म्हणून प्रत्येक निसर्गाच्या प्रत्येक व्यवहारावर नियंत्रण मिळवू शकतो, हा दर्प अशा लोकांमध्ये सहसा असतो.
हा भोज्जा पकडणार्यांचा जीवशास्त्राशी ३६ आकडा असतो. ही माणसे वैज्ञानिकांपेक्षा धर्मगुरूंना जास्त मानतात. स्वत:च्या प्रश्नांची उत्तरे शोधतांना धर्माचा आधार घेतल्याने, आयुष्याचा ताबा आपोआप धर्मगुरूंकडे दिला जातो, हे विसरले जाते.
एकंदर आग "रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असा प्रकार असतो.
२ रा भोज्जा - मानवी जीवशास्त्र
हा भोज्जा पकडला तर मानवी लैंगिक-व्यवहाराचे कोडे बर्यापैकी अलगद सुटते. प्रथम निसर्गाला मानवी समाजाचे नियम कळत नाहीत, तो त्याच्या नियमांनी पुढे जातो. हे (काहीसे गैरसोईचे) वास्तव स्वीकारणे आवश्यक ठरते. या शिवाय "मानव हा विचार करणारा" प्राणी असला तरी ती क्षमता अनेक कारणांनी सर्वांमध्ये समान विकसित होत नाही. किंबहुना ही क्षमता बहुसंख्य लोकात विकसितच होत नाही. त्यामुळे सर्वांकडून या धारणेला योग्य असे "विवेकप्रधान" वर्तन होत नाही. ज्यांना जीवशास्त्र पचवता येते, त्यांनाच हे कळू शकते.
आपण मूलत: माकडे असल्यामुळे आपले लैंगिक वर्तन आपल्या कपिकुळातील जातभाईंसारखेच असणार आहे, हे एकदा स्वीकारले की भ्रामक कल्पनांच्या गुंत्यात अडकावे लागत नाही. नीतिप्रधान उत्तरे शोधण्याऐवजी कल्पक पण गरजांना न्याय देतील अशी उत्तरे शोधण्याकडे कल असतो. उदा० लैंगिक भूक भागविणारी खेळणी वरील गटातील लोकांना अनैतिक, अभिरुचीहीन वाटतील पण २ र्या जीवशास्त्रवादी गटाला याचे काही वावगे वाटणार नाही. जीवशास्त्रवादी गट नीति-अनीतिच्या सुटसुटीत कल्पनांचा आदर ठेऊन पुढे जातो. मग "सुरक्षित आणि संमती" घेऊन केलेले लैंगिक आचरण "भोगवाद" न ठरता गरजांची पूर्तता करणारे ठरते.
जगात वेगवेगळ्या ठिकाणी साजरे केले जाणारे "लैंगिकतेचे उत्सव" मग वावगे/चूकीचे वाटत नाहीत. "नग्नतेची" किळस वाटत नाही. तसेच हीरामंडीतील श्रीमंत पुरूषांना "शिक्षण" देणार्या, जर्मनीतील सर्वात जुन्या कुंटणखान्यातील इन्कमटॅक्स भरणार्या, अमेरिकेतील कुंटणखान्यातील पी०एच०डी० झालेल्या ’वेश्यांचे’ कौतूक वाटल्याशिवाय राहात नाही.
राजीव उपाध्ये

मंगळवार, १६ एप्रिल, २०२४

देशाचे भवितव्य

 देशाचे भवितव्य 

========



-राजीव उपाध्ये, एप्रिल २०२४



माझ्या काही धारणा (किंवा भूमिका) मी वारंवार तपासत असतो. माझी एक भूमिका अनेकांना, त्यातही भगव्या विचारसरणीच्या लोकांना माझी एक भूमिका अजिबात आवडत नाही. ही भूमिका म्हणजे - 


"भारत या देशाला फारसे भवितव्य नाही."


यात बहुतेक तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा बराच समावेश असतो. बरं या लोकांना स्वच्छ आणि लांबचा विचार अजिबात करता येत नाहीच, लिखाण तर दूरची गोष्ट. लगेच हमरीतुमरीवर येतात. 


"भारताला फारसे भवितव्य नाही", या माझ्या धाडसी दाव्याला काही महत्त्वाचे आधार आहेत. ज्या वेगाने देशापुढचे प्रश्न गंभीर बनत जा्त आहेत, त्यात तेल ओतणारे घटक म्हणजे बेसुमार लोकसंख्या, जागतिक तापमान वाढ (विशेषकरून विषुववृत्ताजवळचे स्थान), कल्पकतेचा अभाव.


०भारतातील बेसुमार लोकसंख्येने  लोकशाही राज्यव्यवस्था जवळपास कोलमडून पडली आहे असे कधीकधी मला वाटते. याचा अर्थ असा नाही की मी एकाधिकारशाहीचा समर्थक आहे. पण नागरिकांच्या उत्पादकतेच्या (क्षमतेच्या) व्यस्त प्रमाणात अस्मिता जाग्या होणे, सरकारकडून बेफाम आणि अवाजवी अपेक्षा, मर्यादित साधनसंपत्ती, भ्रष्ट नोकरशाही अशा ठळक कारणांनी लोकशाहीला चुना लागतो.


० जागतिक तापमान वाढीचा देशाच्या भवितव्याशी संबंध काय? असा प्रश्न कुणालाही पडेल. पण याचे भान असणारे एक टक्का जरी निघाले तरी डोक्यावरून पाणी गेले असे म्हणावे लागेल.


भारताचा मोठा भूभाग विषुववृतालगत असल्याने जागतिक तापमान वाढीने आपण जास्त पोळले जाणार आहोत. वाढत जाणारा उन्हाळा उर्जेची गरज वाढवणार, उर्जेचे उत्पादन मर्यादित आणि उत्पादन/वितरण खर्चातील वा्ढीने समाजातील मोठा घटक सुखाची झोप मिळवण्यापासून वंचित राहणार, कडक उन्हाळ्याने केवळ आर्थिक गणिते कोलमडणार नाहीत तर बहुसंख्य लोकांच्या उत्पादकतेवर तसेच मानसिक स्वास्थ्यावर त्याचा परिणाम झाल्याने अनेक समस्या गंभीर बनतात. धार्मिक उन्माद वाढतो. विवेक संपतो. 


चिडेचिडेपणा वाढला किंवा लोकांचा संयम संपतो, टोकाचे पाउल उचलले जाते आणि अपघात, गुन्हेगारी वाढते. भारतीय समाजाची असंवेदनशीलता करोनाकाळात भरपूर दिसली आहे.


केवळ उन्हाळाच नाही तर पावसाळ्याचे चक्र पण जागतिक तापमान वाढीने कोलमडल्याचे आपण बघत आहोत. अवकाळी पावसाने होणार्‍या नुकसानाने शेतकर्‍यांच्या कष्टावरून जेव्हा बोळा फिरतो तेव्हा खूप अस्वस्थ व्हायला होते. नद्यानाल्यांना येणारे पूर, भूस्खलनाने होणारे नुकसान असे वाढलेल्या पावसाचे पण अनेक तोटे आहेत.


० असे गुंतागुंतीचे प्रश्न सोडवायला जी कल्पकता लागते, त्या कल्पकतेची उपासना आपल्याकडे शून्य आहे. हे फार धाडसी विधान आहे आणि मी ते पूर्ण जबाबदारीने केले आहे.  कल्पकता विकसित होण्यासाठी वेगळ विचार करावा लागतो, वेगळा विचार करणार्‍या लोकांचा आदर ठेवणारा समाज तयार व्हावा लागतो. आजचा भारतीय समाज वेगळा विचार स्वीकारू शकत नाही, तो लगेच हिंसक बनतो. 


सह्याद्रीमध्ये हिंडल्याशिवाय वेताळ टेकडी किती छोटी आहे याची समज येत नाही आणि हिमालयात हिंडल्याशिवाय सह्याद्रीचे छोटेपण कळत नाही. कल्पकतेचे पण तसेच आहे. 


समाजमाध्यमांच्या कृपेने आज शतकानुशतके कल्पकतेची उपासना करणार्‍या चीनी कल्पकतेचे दर्शन झाल्यावर आपण भारतीय किती छोटे आहोत हे समजते. चीनी कल्पकतेचे सामर्थ्य त्यांच्या पेटंटच्या संख्येत प्रतिबिम्बित झाले आहे. वेगळ्या विचाराला दंडित करणारी भारतीय मानसिकता चीनशी कल्पकतेची बरोबरी कधीही करू शकणार नाही, याचा मला ठाम विश्वास वाटतो. शतकानुशतकांचा कल्पकतेचा बॅकलॉग भरून काढणार कसा. आपले सामर्थ्य पेटंटमध्ये नसून फक्त टेंपलच्या संख्येत आणि संपत्तीत एकवटले आहे. कटु आहे पण सत्य आहे.


भगव्या मानसिकतेच्या मंडळीना या कटू सत्याची जाणीव करून दिल्यावर खुप राग येतो. मग ते खालच्या पातळीवर उतरून धमक्या द्यायला सुरुवात करतात. "झालेले काम तुम्हाला दिसत नाही का?" असे विचारतात.


या मूर्खांना मला इतकेच सांगायचे आहे समस्या ज्या वेगाने वाढत आहेत त्या प्रमाणात उपाय शोधण्याचा वेग नगण्य आहे. जे काम झाले आहे ते आवश्यक होते, पण पुरेसे नक्कीच नाही...


० वरील सर्व घटकांबरोबर आणखी एक चिंताजनक घटक म्हणजे भारतीय समाजाचे ढासळलेले आरोग्य - शाळेतल्या मुलांना येणारे हृदयविकाराचे झटके, त्याबरोबरच भारत आता कर्करोगाची जागतिक राजधानी बनल्याचे वृत्त कुणाला अस्वस्थ करत नसेल तर तुमचा भावनिक मृत्यू झाल्याचे खुशाल समजावे. कदान्नाला मिळणारी प्रतिष्ठा, सास्थ्य बिघडवणार्‍या जीवनशैलीचे नारायण मूर्तीसारख्या व्यक्तीकडून होणारे बेजबाबदार आणि अक्षम्य समर्थन भारतीय समाजाच्या आरोग्याचे प्रश्न सोडविण्याच्या पलिकडे नेतात.  


गेले कित्येक वर्षे टीकेचा विषय असलेला माझा "किडक्या प्रजेचा" सिद्धान्त आता "बियॉण्ड डाऊट" सिद्ध झाला आहे...





गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०२४

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

*ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे*

=========================


-राजीव उपाध्ये (१४.०२.२०२४)


पर्यावरणातील आह्वानांनुसार मानसिक जडणघडणीत, शरीररचनेत अथवा अवयवात बदल घडून येणे हे जीवसृष्टीमध्ये सर्रास घडून येते. त्याची असंख्य उदा० आजूबाजूला माणसांमध्ये पण बघायला मिळतात. भारतात गुजराती समाजात उद्योग रक्तात भिनलेला आहे असे म्हटले जाते. भारतात पश्चिम किनार्‍यावर सिद्दींचे वंशज धावपटू म्हणून प्रसिद्ध आहेत [१]. दक्षिण आशियातील बजाऊ ही जमात प्राणवायुशिवाय पाण्यात बुड्या मारून मासेमारी करण्यासाठी प्रसिद्ध आहे [२]. अशी असंख्य उदा० देता येतात.


भारतीय समाजात ब्राह्मण दीर्घकाल समाजाच्या शीर्षस्थानी राहीले, हे आज कुणीही नाकारणार नाही. फार काय, याचमुळे ब्राह्मण इतर समाजबांधवांच्या तिरस्कारास पात्र ठरले. पण ब्राह्मणांचा तिरस्कार हा मला वर्गात अभ्यास करून  १ल्या येणार्‍या मुलांचा तिरस्कार वाटतो. वर्गात अभ्यासात पुढे असणारी मुले त्यांचे स्थान टिकविण्यासाठी भलेबुरे मार्ग अवलंबतातच. ब्राह्मणांनी पण तेच केले. पण इतरांना वाटणार्‍या तिरस्काराचे उदासिनीकरण (न्युट्रलायझेशन) करण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळेच आजचे ब्राह्मण मोठ्या सामाजिक नामुष्कीला तोंड देत आहेत.


ब्राह्मणांच्या वर्चस्वाची समाजशास्त्रीय़ मीमांसा भरपूर झाली आहे. त्यात मला पडायचे नाही कारण तो चावून चोथा झालेला विषय आहे, त्यात नवे असे काही हाती लागणे मुष्कील आहे. पण त्या पलिकडे काही कारणे असू शकतात. 


*खरं तर बुद्धी, दीर्घायुष्य ही एका विशिष्ट वर्गाची मक्तेदारी नाही.* पण एखाद्या मानवसमूहात काही गुणांचे प्रमाण लक्षणीय़ वाढलेले दिसत असेल तर ते का? याचे कोडे कोणत्याही चौकस व्यक्तीला सतावत राहते. 


*आपल्याकडे जे नाही ते जर दुसर्‍या कुणाकडे असेल तर वैषम्याची भावना निर्माण होते. उदा० पैसा, ताकद, आरोग्य/स्वास्थ, रुप इ० इ० ब्राह्मणांचा तिरस्कार माझ्यामते मुख्यत: त्यांच्या बुद्धीमुळे होतो, असे म्हटले तर वावगे ठरू नये.* ब्राह्मणांना त्यांची बुद्धी निसर्गत: मिळाली की काळाच्या ओघात विकसित झाली? या प्रश्नावर थोडा उजेड टाकायचा हा एक छोटा प्रयत्न...

 

ज्यू, जपानी लोकांत आढळून येणा‌र्‍या दीर्घायुष्याची करणे शोधायचा प्रयत्न बराच झाला आहे. पण माझ्या आतापर्यंतच्या वाचनात/अभ्यासात ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाची जीवशास्त्रीय कारणे शोधायचा प्रयत्न कुणी केल्याचे आढळले नाही आणि तसा शिस्तबद्ध अभ्यास कुणी करेल असे ही वाटत नाही. कारण अशा  अभ्यासाला निधी उपलब्ध होईल असे वाटत नाही. कारण चुकुनमाकुन अशा संशोधनाने ब्राह्मणांच्या श्रेष्ठत्वावर शिक्कामोर्तब केलेच तर त्यासारखे अप्रिय (पोलिटिकली इन्करेक्ट) सध्याच्या काळात दुसरे काहीही नाही. 


त्यामुळेच मला ब्राह्मणांच्या बौद्धिक विकासाविषयी जे जीवशास्त्रीय विचार मांडायचे आहेत, त्यांच्याकडे काही  तर्कनिष्ठ अटकळी/अंदाज या कोनातूनच बघितले जावे. त्याची प्रेरणा मला आधुनिक चेता/मस्तिष्क विज्ञान, ध्यानावर झालेले संशोधन[३] यातून मिळाली आहे. *बुद्धी फक्त ब्राह्मणांकडे असते असा ही दावा मला करायचा नाही.* कारण बुद्धीचे अनेक पैलू असतात आणि ते वेगवेगळ्या परिस्थितीनुसार विकसित होतात. त्यामुळे असा कुणी तर्क किंवा आरोप केलाच तर तो मात्र एक निर्बुद्धपणा ठरेल.* महत्वाचे म्हणजे माझ्या मर्यादांचे मला पूर्ण भान आहे.*


भारत, आर्यावर्त, हिंदुस्थान इ० नावाने ओळखल्या गेलेल्या भूप्रदेशात मानवी संस्कृतीला स्थिरावायला बरेच पोषक वातावरण मिळाले. या संस्कृतीमध्ये जो अग्निपूजक समाज होता, त्याने केलेल्या वाङमय निर्मितीचे जतन करण्यासाठी, लेखनकला विकसित न झाल्यामुळे, फक्त मौखिक परंपरेचा पर्याय उपलब्ध होता. मौखिक परंपरेने कोणत्याही माहितीचे जतन करणे किती अवघड आहे, हे समजून घेणे इथे अतिशय आवश्यक आहे. 


रस्त्यावरील कोणत्याही १०० माणसांना त्यांनी शालेय जीवनांत पाठ केलेल्या कविता म्हणून दाखवायला सांगा. १ली ते १०वी या प्रत्येक इयत्तेमधील एक अशा दहा कविता म्हणून दाखविणारी १० माणसे तरी सापडतील का, याची मला शंका आहे. आणि समजा सापडली तर कर्तव्य म्हणून पाठांतर केलेली आणि आवड म्हणून पाठ केलेली माणसे वेगळी आहेत असे लक्षात येईल. कवितेचा अर्थ, चाल, लय आवडली तर पाठांतर सोपे होते. 


आधुनिक चेताविज्ञान असे सांगते की एकाग्रतेने मेंदूच्या उपाग्रखण्डाचा (prefrontal lobe) वेगाने विकास होतो. ज्या संवेदनांवर एकाग्रता जास्त होते त्यासंबंधी मेंदुच्या भागाशी उपाग्रखण्डाच्या जोडण्या वाढतात आणि मेंदूचा विकास होतो. जसे खेळात स्नायविक हालचाली नियंत्रित करणारा गतिबाह्यक आणि उपाग्रखण्डाबरोबर विकसित होतो [४]. संगीतात श्रवणशक्ती आणि काही भाषासदृश कौशल्यांचा विकास होतो. नृत्यकलेत अवकाश, संगीत, लय-ताल यांच्याशी संबंधित जाणीवा आणि स्मृती इ० केंद्रे जोडण्या निर्माण होऊन विकसित होतात[५]. गमतीचा आणि महत्त्वाचा मुद्दा असा की सध्याच्या काळात स्मृतीभ्रंश आणि तत्सम आजारांचा सामना करण्यासाठी जे व्यायाम तयार केले गेले आहेत, त्यात याच कल्पना केंद्रस्थांनी आहेत.


वैदिक संस्कृतीने निर्माण केलेले प्रचंड वाङमय जतन करण्यासाठी ब्राह्मणांना मेंदूचा मोठ्या प्रमाणावर वापर अतिशय एकाग्रतेने आणि कर्तव्यबुद्धीने करावा लागला. शतकानुशतके वेदसंहितांचे रक्षण करण्यासाठी जटा/घनपाठादी तंत्रे वापरली गेली. ही तंत्रे समजून घेतली [६] तर असे लक्षात येईल की संहितांमधला एकही शब्द हरवू नये हा या मागचा महत्त्वाचा उद्देश. वैदिक संस्कृतीमध्ये अत्यंत महत्त्वाच्या गायत्री मंत्राच्या घनपाठाचे सादरीकरण या दुव्यावर पहाता येईल.  हे सर्व पाठ करताना मेंदूला जो व्यायाम होतो, त्यामुळे ब्राह्मणांमध्ये उपाग्रखण्डाचा वेगाने विकास झाला. वैदिक शिक्षण गुरुगृही आठव्या वर्षी चालू होई. बरेचसे वैदिक शिक्षण प्रजननपूर्व काळात होत असल्याने विकसित मेंदूशी संबंधित काही जनुकीय बद्दल पुढच्या पिढ्यांमध्ये संक्रमित होत राहिले आणि त्यामुळे पुढच्या पिढ्यांना फायदा झाला. परिणामी ब्राह्मण अधिकाधिक बुद्धिमान होत राहिले.


जेव्हा ब्राह्मणांचे पारंपरिक व्यवसाय मागे पडले तेव्हा या उत्क्रांतीला काही कारणांनी खीळ बसली. पण या जनुकीय बदलांचा फायदा  मात्र पुढल्या  पिढ्यांना बर्‍याच प्रमाणात झाल्याचे दिसून येते. पण हा फायदा अनंतकाळपर्यंत ब्राह्मणांना मिळेल का? या प्रश्नाचे उत्तर नाही असे द्यावे लागेल. कारण आता जनुकीय विद्राव्यता (genetic dilution) सांस्कृतिक अभिसरणामुळे खुप वाढली आहे. एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावून हे परत साधता येईल का? या प्रश्नाचे उत्तर पण नाही असे द्यावे लागेल. पिढ्या न पिढ्या सतत काही वर्षे काही संहितांची पारायणे करायची आणि एकदोन स्तोत्रे मुलांना पाठ करायला लावायची यात संख्यात्मक आणि गुणात्मक फरक नक्कीच आहे. त्यामुळे ब्राह्मणांचे बलस्थान (*वैदिकपठणाने विकसित पावलेला उपाग्रखण्ड*) काळाच्या ओघात सहज नाहीसा होईल. जनुककोषावर बाहेरून होणारे आघात (ताण, प्रदूषण, कुपोषण) देखिल यांस कारणीभूत ठरणार आहेत, हे विसरता कामा नये.


मी इथे मांडलेल्या या कल्पना conjecture स्वरूपाच्या असल्यामुळे बर्‍याच लोकांना (ब्राह्मणत्वाचा न्यूनगंड असलेल्यांना आणि ब्राह्मणांचा द्वेष करणार्‍यांना) हास्यास्पद वाटतील, पण त्यांनी एखादे अपरिचित काव्य "घनपाठाचे तंत्र" वापरून पाठ करायचा प्रयत्न करावा आणि मग मला सांगावे.




संदर्भ:

[१] https://www.youtube.com/watch?v=ped-uIlw_24

[२] https://www.scientificamerican.com/article/human-sea-nomads-may-have-evolved-to-be-the-worlds-elite-divers/

[३] https://www.youtube.com/watch?v=7CBfCW67xT8&rco=1

[४] https://www.apa.org/monitor/2019/03/athletic-brain

[५] https://www.frontiersin.org/articles/10.3389/fnhum.2017.00566/full

[६] https://www.youtube.com/watch?v=Ti4d31KGN1w