शुक्रवार, ८ डिसेंबर, २०१७

एम्पथी


"तुझं माझं ब्रेक-अप" मधली केतकी चितळे सुरुवातीला माझ्या जाम डोक्यात गेली होती. पण ती एपिलेप्सीची बळी (victim) आहे असं तिच्याच तूनळी वरील एका क्लिपमधून कळले. मग माझं मत १८० अंशात बदलले आणि तिच्याबद्दल आदर वाटायला लागला.


लोक तिच्या विकाराला कसं असंवेदनशीलपणे घेतात आणि ते ती कसं हाताळते, हे बरेच शिकवून गेले. ही बया कदाचित माझ्या निम्म्या वयाची असेल. पण तिचे एक वाक्य माझ्या ऐकल्या पासून डॊक्यात रूंजी घालते आहे. ते साधारण असे आहे - "जर लोकांनी एखाद्या गोष्टीची वेदना अनुभवली नसेल तर त्यांच्याकडून संवेदनशीलतेची भलती अपेक्षा करणे व्यर्थ आहे".

असाच दूसरा अनुभव नुकत्याच पाहिलेल्या डि० एस० कुलकर्णींच्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ बघताना आला. डिएस्केंची माझ्या मनातली प्रतिमा म्हणजे स्वत:भोवती स्वत:च आरत्या ओवाळणारा एक नार्सिसिस्ट अशी होती. पण एका समाजवादी विचारसरणीच्या व्यक्तीने एव्हढे मोठे साम्राज्य निर्माण केले याचे आता अप्रूप वाटते. शिवाय त्या पत्रकार परिषदेतला या माणसाचा संयम अजोड होता.

काही वर्षांपूर्वी माझा एक वयाने मोठा आणि विक्षिप्त पण प्रचंड बुध्दीमान सहकारी माझ्याशी येता जाता खूप भांडायचा. त्या भांडणाला स्थळकाळाचे बंधन नसायचे. आजुबाजुच्या सहकार्‍याना हे बघायला खूप मौज वाटायची.

मग कानावर आले की त्याचा नुकताच घटस्फोट झाला होता. त्याच्या वागण्याचा त्रास मला व्हायला लागल्यावर माझी घरात चिडचिड सुरु झाली. तेव्हा आई म्हणाली, "घटस्फोट झालेल्या पुरुषाची वेदना तुला या वयात कळणार नाही. त्याच्याकडे दूर्लक्ष कर". आईच्या त्या म्हणण्याचा अर्थ कळायला पुढे बरीच वर्षे जावी लागली.

एम्पथी ही खुप मौल्यवान चीज आहे याची आता खात्री पटली आहे...

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

श्रेष्ठ कोण?



एकदा एक टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य एकमेकांना नगरप्रदक्षिणेस निघाले असताना भेटले. मग त्यांच्यात वाद सुरु झाला - राहुल गांधी श्रेष्ठ की नरेन्द्र मोदी श्रेष्ठ.

हा वाद इतका पेटला की रस्त्यात बघ्यांची अलोट गर्दी झाली. वाहतूक खोळंबली. महसूल बुडाला. रस्त्यात अडकून पडलेल्या रुग्णवाहिकांमधले रुग्ण दगावले. पण वाद संपायची काही लक्षणे दिसेनात.

कुणी म्हणाले यांचे अकाऊंट ब्लॉक करा. कुणी म्हणाले, "त्याने मूळ प्रश्न सुटणार कसा?"

त्याच वेळेस नारदमुनी तेथून आकाशमार्गाने जात होते. गर्दी बघून त्यांनी आपला मोर्चा तिकडे वळवला. अचानक प्रत्यक्ष नारदमुनी अवतीर्ण झाल्याचे बघून रस्त्यावरचा गलका थांबला.

नारदमुनीनी टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्यांचे  म्हणणे ऐकून घेतले. मग त्यांनी तोडगा सूचवला.

"तुम्हाला दोघांना मी भगवान शंकराकडे घेऊन जातो. ते आत्ताच समाधीतून बाहेर आले आहेत. पार्वतीने डोके खायला सुरुवात करायच्या अगोदर त्यांचे चित्त शांत असताना ते आपल्याला या प्रश्नाचे योग्य उत्तर देऊ शकतील."

साक्षात शंकराला भेटायची संधी मिळाल्यामुळे टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य मनोमन खुष झाले. त्यांनी नारदाबरोबर लगेच हिमालयाकडे प्रस्थान ठेवले.

कैलासावर पोचल्यावर नारदाने सर्व वृत्तांत कथन केला आणि समस्येविषयी मार्गदर्शन करण्याची हात जोडून विनंति केली.

भगवान शंकराने काही वेळ डोळे मिटले आणि निवाडा केला की राहुल गांधी श्रेष्ठ!

"राहुल गांधीच्या तपस्येने मला प्रभावित केले आहे."

पण या उत्तराने टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य या दोघांचेही समाधान झाले नाही. कारण कुणीही टॉम-डिक-हॅरी येतो आणि शंकराला प्रसन्न करतो. मग त्यांच्या वादाने कैलास पर्वत पेटला. मग नद्यांना पूर आले. जनजीवन पुन्हा धोक्यात आले.

मग नारदाने परत शक्कल लढवली. त्याने सुचवले आपण भगवान विष्णुला साकडे घालु या. समस्येचे उत्तर विचारू या!
टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्य यांना पर्याय पसंत पडला.

तिकडे भार्या-पद-मर्दित-शेषशायी-भगवान विष्णुंना अंतर्ज्ञानाने सर्व समजले. हे तिघेजण तिकडे पोचले तेव्हा त्यांचे उत्तर तयारच होते.   त्यांनी पाहुण्यांचे स्वागत केले आणि बसायची आज्ञा केली. मग ते म्हणाले,
"भारतवर्षाचा आता लोकसंख्येने इतका चुथडा झाला आहे की कोणताही विवेकी मनुष्य हा देश समर्थपणे चालवू शकणार नाही. प्रत्यक्ष ब्रह्मदेवाला पण आता तिथले प्रश्न आता सोडवता येण्याच्या पलिकडे गेले आहेत. बहुसंख्य प्रजानन भाबडे असतात, विवेकी नसतात. अशा लोकांना विवेकी कृतीपेक्षा धाडसी कृती जास्त प्रभावित करते. राहुल गांधींकडे धाडसही नाही आणि विवेकही नाही. त्यामुळे मोदीच श्रेष्ठ ठरतात..."

साक्षात् विष्णूने दिलेल्या उत्तराने टिवटिवाचार्य आणि फेस्बुकाचार्यांचे समाधान झाले आणि ते पृथ्वीतलाकडे निघाले...

सोमवार, १३ नोव्हेंबर, २०१७

आज मी विशेष खुषीत आहे.



लोकहो,

आज मी विशेष खुषीत आहे. काही जणांना अशी पोस्ट टाकणे बालीशपणा वाटेल. पण मला त्यामुळे काहीही फरक पडणार नाही.

नुकत्याच दोन "पवित्र" गुरुवर्यांनी दिलेल्या कडवट अनुभवानंतर हा अनुभव स्वत:वरचा विश्वास दृढ करणारा ठरला.


डॉ. जगन्नाथ दीक्षितांना मी अद्याप एकदाही प्रत्यक्ष भेटलेलो नाही. फार काय आमचे काहीवर्षांपूर्वी एका ग्रुपमध्ये कडाक्याचे भांडण झाले असूनही त्यांनी मला कोणताही कडवटपणा न ठेवता माझ्या लेखनप्रकल्पासाठी ’सहलेखक’ होशील का असे विचारले आणि मी पुढचा मागचा विचार न करता हो म्हटले. आणि लगेच आमचा प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पातील एक महत्त्वाचा टप्पा आम्ही काल पूर्ण केला. आज डॉ. दीक्षितांचे पुढे आलेले मेल मला बरेच काही देऊन गेले. त्याचे मूल्य मला करता येत नाही.

"Hello RU: I am done from reviewing the draft from my side and ready to sign off. Please give me your final OK and I will send the draft in 3 parts to Ekata. Then we need to talk about publishing it in a book both Marathi- and English translation in the same book. I will talk to you shortly. I want to thank you for your patience and input which definitely has nothing but made the final superior outcome. You almost had given up at the beginning of the year - but I had faith in you. Thanks again....JD"

मी मेडीकल लिटरेचर वाचू नये, असे सुरुवातीला त्यांचेही (अनेक डॉ.सारखे) मत होते. पण नंतर नाउमेद न करता त्यांनी माझ्या "खोडीचा" विधायक उपयोग करून घेतला. हे मी काहीजणांना उद्देशून आणि मुद्दामून लिहीत आहे. त्यातले पुष्कळ उंटावरून शेळ्या हाकणारे आणि स्वत:ला बुद्धीवादी म्हणवणारे आहेत.

हा प्रकल्प करताना मुख्य अडचण माझ्या पाठदूखीची होती. माझ्या पूर्णपणे कलाने घेऊन, माझ्या विचारांना आणि आकलनाला टवाळी न करता योग्य तो वाव हे लेखन करताना त्यांनी दिला. हा त्यांचा मोठेपणा मला नमूद करणे आवश्यक आहे.

Thank you Dr. Jay Dixit once again. It helped me to dissolve lot of pains.

सोमवार, ३० ऑक्टोबर, २०१७

अपशकुनातले विज्ञान


आज सक्काळी-सक्काळी बायको बरोबर चहा पिताना
एक अभद्र व्यक्ती दृष्टीस पडली

मी बायकोला म्हटले,
"आजचा दिवस वाईट जाणार".

मग बायकोने समजुतीच्या सुरात विचारले,
"तू अशा गोष्टी कधीपासून मानायला लागलास?"

खरं तर यात मानण्या न मानण्य़ाचा भाग नसून
पचायला जड जाईल असे विज्ञान आहे.

माणसांची व्यक्तीमत्त्वे आपल्या मनावर खोलवर परिणाम करतात.
अशी माणसे समोरून आली की आपण त्यांना टाळतो.
काही माणसांची तोंडे दिसली की Amygdala सक्रिय होते,
मग  Autonomous nervous system ची
sympathetic branch उद्दीपित होते आणि
मेंदूचा कल (bias) नकारात्मकतेकडे झुकतो.
आणि मग दिवस खराब जायला पार्श्वभूमी तयार होते.
हे सर्व काही क्षणात आपोआप घडत
असल्याने आपण बेसावध असताना नियंत्रण राहीलच असे नाही.
 या उलट काही माणसे दिसली की आपल्याला शांत किंवा प्रसन्न वाटते आणि आनंद होतो.
हे parasympathetic nervous system सक्रिय झाल्याने घडते.
काही दिवसांपूर्वी बघितलेल्या एका TED Talk
मध्ये याचे खुलासेवार विवे़चन बघायला मिळाले.

अपशकुनातले विज्ञान हे असे आहे. अनिस हे विज्ञान लोकांना समजावून सांगेल अशी अपेक्षा नाही...

बुधवार, ३० ऑगस्ट, २०१७

श्राव्यपुस्तके


गेले काही दिवस मला ’श्राव्यपुस्तक’ या कल्पनेने खुप पछाडलेले आहे. हा प्रकार जाम आवडला.  blinklist आणि audible  या दोन सेवांचे मी एका वर्षाचे शुल्क मोजून सभासदत्व पण घेऊन टाकले. blinklist वरील पुस्तके संक्षिप्त स्वरूपात असतात तर audible वरील पुस्तके ही पूर्ण स्वरूपात असतात.

गमतीचा भाग म्हणजे, या नंतर पुस्तक श्रवणाचा जो सपाटा सुरु झाला, त्यामुळे माझा मीच कोड्यात पडलो - हे मला यापूर्वीच का सुचले नाही? एक प्रश्न असाही पडला की श्राव्यपुस्तके आवडायला लागली म्हणजे आता वय झाले असे समजायचे का?

काय असेल ते असो. गेली काही वर्षे पुस्तक वाचन वेगवेगळ्या कारणांमुळे इतके मंदावले की आता ते बंद पडेल की काय अशी भीति निर्माण झाली होती. त्यात फेसबुकावरचा वापर वाढल्यामुळे तिथल्या विद्वानांनी न्यूनगंड निर्माण केला होता, तो वेगळाच.  पुस्तके ठेवायला लागणारी घरातली उपयुक्त जागा कमी होणे, पाठदूखी, माझी वाचनाची आवडती खुर्ची मोडणे आणि तशीच खुर्ची परत न मिळणे, अशी अनेक कारणे वाचन कमी होण्यामागे आहेत. पण वाचन झाल्याची अस्वस्थता काय असते, हे मात्र शब्दात मांडता येणे आहे. माझी मुलगी शिक्षणासाठी परगावी असल्यामुळे निर्माण झालेला मोकळा वेळ ही अस्वस्थता जास्त गहिरी करतो.

सहसा अव्यंग व्यक्ती, दृष्य आणि श्राव्य या दोन संवेदनांचा वापर ज्ञानसंपादनासाठी करते. यात श्रेष्ठ काय यात मला पडायचे नाही. पण या दोन संवेदनांद्वारे ज्ञानग्रहणाची क्षमता मात्र सारखी नसते, हे मात्र नक्की. सध्याच्या युगात दृष्य संवेदनांद्वारे ज्ञानसंपादनाचे असंख्य पर्याय उपलब्ध आहेत. पण  आमची पिढी आणि त्याअगोदरच्या कमीकमी एकदोन पिढ्या रेडीओ ऐकता-ऐकत लहानाच्या मोठ्या झाल्या. रेडीओने आमच्यावर केलेले संस्कार अनन्यसाधारण आहेत. माझ्या मेंदूचा श्राव्य-बाह्यक (auditory cortext) विकसित होण्यात रेडीओचा वाटा मोठा आहे. सकाळी वंदेमातरम्, उत्तमशेती, प्रादेशिक बातम्या, नाट्यसंगीत मग शालेय कार्यक्रम, शाळेतून घरी आल्यावर मराठी बातम्या किंवा न कळणार्‍या हिंदी/इंग्रजी बातम्या, मग नभोनाट्य, आपली आवड किंवा माझी आवड, युववाणी  हे ऐकतऐकत आमची पिढी घडली. यात  बाजारभाव, हवामानाचा अंदाज याबरोबर प्रासंगिक भाषणे किंवा चर्चा किंवा रात्रीच्या संगीतसभा, पुणे विद्यापीठाचे संस्कृत मधुन होणारे दीक्षांत समारंभाचे आणि इंदिरा गांधीच्या जाहिर सभांचे, क्रिकेट सामन्यांचे रेडीओवृत्तांत हे सगळे श्राव्य ज्ञानसंपादानाचे, मनोरंजनाचे विशेष मेनूआयटेम होते.

बरं तेव्हा रेडीओला रिमोट नव्हता. रेडीओ घरातली मोठी माणसे लावायची. मोठी माणसे सांगतील तेव्हा ऐकायचा आणि बंद करायचा. आपला रेडीओ बंद असेल तेव्हा शेजारच्यांचे रेडीओ त्यांचे काम करत असायचे. रेडीओने कुटुंब (टिव्ही मग कंप्युटर/स्मार्टफोनच्या तूलनेत) एका अदृष्य धाग्याने बांधले गेलेले असायचे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. मुख्य म्हणजे आज माणसागणिक कंप्युटर/स्मार्टफोन असतो किंवा कुटुंबागणिक टिव्ही असतो तसे रेडीओच्या बाबतीत नव्हते. कारमध्ये रेडीओ होता पण तो काही अंतरावर होता त्यामुळे मोबाईल सारखा धोकादायक बनला नव्हता.

श्राव्यपुस्तकांना निश्चित काही मर्यादा आहेत. ही पुस्तके आकृत्या, कोष्टके, चित्रे किंवा फोटोशिवाय आपल्याशी संवाद साधतात पण प्रभावीपणे साधतात. ही पुस्तके चाळता येत नाहीत आणि घरातली जागा पण अडवून ठेवत नाहीत. संदर्भ म्हणून पण श्राव्यपुस्तके वापरता येणे अवघड आहे पण श्राव्यपुस्तके लोळत ऐकता येतात. ही पुस्तके हूंगता येत नाहीत पण त्यांना वाळवी लागत नाही.

तात्पर्य एव्हढेच की रेडीओच्या श्रवणातली एकाग्रता श्रवणेंद्रियांच्या विकासात महत्त्वाची ठरली. ही विकास पावलेली श्रवणेंद्रिये मधल्या काळात कुठेतरी हरवली आणि निपचित पडली पडली होती. श्राव्यपुस्तकांनी ती आता परत खडबडून झाली आहेत.

शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

विघ्नकर्ता


काल रात्री दहा वाजता लेकीला आणायला विमानतळावर गेलो.


एक्झिट गेटमधून बाहेर पडताना भयानक ट्रॅफिक जॅम होता. वाहतूक नियंत्रण करायला पोलिस पण नव्हते आणि एअरफोर्सचे पण कुणी नव्हते. ट्रॅफिक पुढे सरकत नव्हता म्हणून डीझेल वाचविण्यासाठी इंजिन बंद केले. आणि मग नको होते ते झाले.

गाडी बंद पडली चालू होईना.

बराच वेळ प्रयत्न करूनही चालु होईना तेव्हा गाडी तिथेच सोडायचा निर्णय घेतला. जवळच्या पार्किंग लॉट पर्यंत गाडी ढकलत नेणे गर्दीत अशक्य होते.

गाडी जवळच आडोशाला उभी करायचे ठरवले. पण मदतीला कुणी आले नाही. शेवटी मी आणि चार्वीने कशीबशी ढकलत एक्झिट गेटच्या भिंतीजवळ आणली.

मनातल्यामनात हवालदिल झालो. एक मन म्हणाले,
"गणपतीला शिव्या घालतोस ना. चांगली अद्दल घडली".

गाडी लॉक केली. ओला आणि उबर बुकींग घेत नव्हते म्हणून प्रीपेड टॅक्सी केली. प्रीपेड टॅक्सीवाल्याने पण मनस्ताप दिला म्हणून रागाचा पारा चढला होता. त्यात तो परधर्मीय. त्यामुळे डोक्यात अनेक विचित्र भावना आणि विचारांची वादळे चालू झाली. शेवटी डेक्कन जिमखाना जवळ आल्यावर प्रीपेड टॅक्सी सोडून रिक्षाने घरी यायचे ठरवले.

प्रीपेड टॅक्सीवाला, डेक्कनला उतरल्यावर म्हणाला "साब रिसिट लेके जाओ". मग आणखी एक धक्का बसला, टॅक्सीवाल्याने खिशातून पाकीट काढले आणि म्हणाला, "डेक्कन का चार्ज ५५० ही है. १०० रु वापस ले लो"
माझी अपेक्षा नव्हती, पण मी ते मुकाट घेतले आणि रिक्षा पकडून घरी आलो. 

घरी आल्यावर मूड पूर्णपणे बिघडलेला होता. लेकीशी थोड्या गप्पा मारल्या आणि रात्री १२.३० ला झोपायला गेलो. झोप लागली नाही. मन सारखे हिणवत होते, 
"गणपतीला शिव्या घालतोस ना. चांगली अद्दल घडली".

रात्रभर डोक्यात असंख्य विचार... आता गणेशचतुर्थीला मेकॅनिक कसा शोधायचा, पोलिसांनी गाडी ओढून नेली असली तर ती कशी मिळवायची. एअरफोर्सच्या लोकांनी नेली असली तर त्यांना काय उत्तरे द्यायची. कुणाला किती पैसे चारायचे इ. इ.

सकाळी बायकोने आणि लेकीने सांगितले म्हणून मेकॅनिकच्या ऐवजी  टाटाच्या 24x7 road assistance service ला फोन केला आणि तक्रार नोंदवली. पाकीटात भरपूर पैसे बरोबर घेतले.
लेकीने धीर दिला,
"बाबा, काळजी करू नका. काहीही होणार नाही!"
जाताना एक मन मला डिवचत होते तर दूसरे मन नेहेमीप्रमाणे गणपतीला शिव्या घालत होते,
"विघ्नकर्त्या, बरोब्बर चतुर्थीला नावाला जागलास!"

त्यात पाउस चालु झाला आणि मी छत्रीत न्यायला विसरलो. मग टेंशन मध्ये आणखी भर...
शेवटी एकदाचा विमानतळावर पोचलो आणि आश्चर्याचा धक्काच बसला,

गाडी जागेवरच होती आणि गाडीला जॅमरपण नव्हता.
दोन पोलिस येऊन फक्त चवकशीकरून गेले आणि गाडी लवकर हलवा एव्हढंच म्हणाले. मग काही वेळाने टाटाचा मेकॅनिक आला आणि त्याने गाडी स्टार्ट करून दिली (बॅटरी संपली होती.)

आश्चर्याचा एक आणखी एक धक्का, टाटाने ठरवले होते तितकेच म्हणजे फकत साडेसहाशे घेतले. मीच मग त्याला शंभराची एक नोट काढून दिली (माझे जगण्याचे नियम फार सोप्पे आहेत. त्यातला एक - वाईट अनुभव देणार्‍याना मी शिक्षा करू शकत नाही पण चांगले अनुभव देणार्‍यांना शाबासकी नक्कीच देऊ शकतो). आज पाकीट हलके होणारच यासाठी मनाची तयारी केली होती त्या पार्श्वभूमीवर सगळंच अनपेक्षित घडत होते.

शेवटी स्वत:ला तिन-चार चिमटे काढले आणि गाडी स्टार्ट करून घराकडे निघालो. येताना सगळीकडचे गणपती माझ्याकडे बघून हसताहेत असा सारखा भास होता...

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

गूढ आणि धक्कादायक



१९९२ साली व्हिएन्ना येथे झालेल्या एका जागतिक परिषदेतील कार्यशाळेत माझा संशोधन निबंध प्रसिद्ध झाला होता (मला त्या कॉन्फरन्सला जाता आले नव्हते). त्या पेपरचा प्रथम लेखक मी होतो.

पण काळाच्या ओघात काहीतरी जादू झाली आहे...

तो पेपर नंतर २०११ साली, २०१३,  २०१६ आणि २०१७ मध्ये नंतरच्या संशोधकांनी संदर्भ म्हणून उल्लेख केला आहे.  धक्कादायक भाग असा हे सर्व नंतरचे संशोधक संदर्भाचा उल्लेख करताना माझा उल्लेख द्वीतिय लेखक म्हणून करत आहेत.

हे नंतरचे निबंध खालील प्रमाणे

- http://citeseerx.ist.psu.edu/viewdoc/download?doi=10.1.1.297.2901&rep=rep1&type=pdf
- http://pep.ijieee.org.in/journal_pdf/11-273-14709960557-9.pdf
- https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=21&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjPzIX8kNbVAhUHXLwKHafnBgY4FBAWCCYwAA&url=http%3A%2F%2Fpep.ijieee.org.in%2Fjournal_pdf%2F11-273-14709960557-9.pdf&usg=AFQjCNF8IiiWiGQ06B1LiK8tg9Zv7k5_dg
- https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=25&cad=rja&uact=8&ved=0ahUKEwjPzIX8kNbVAhUHXLwKHafnBgY4FBAWCEAwBA&url=http%3A%2F%2Fwww.ijarcs.info%2Findex.php%2FIjarcs%2Farticle%2Fdownload%2F3405%2F3409&usg=AFQjCNFRQfvc1CFH2Z_Kpx42MaO3Za5n4A


हा योगायोग किंवा अपघात नक्कीच नाही. कारण संशोधक संदर्भ यादी तयार करताना सहसा काळजी घेतात. पण हे काहीतरी गूढ आणि धक्कादायक आहे.

शनिवार, २२ जुलै, २०१७

इच्छापूर्ती

कुणी काहीही म्हणोत, निसर्गाने मला पुस्तकी हूशारी दिली नसली तरी सुपीक डोके भरपूर दिले आहे. आईवडिलांनी आणि शाळेत कवठेकरसरांनी त्यांच्या कुवतीनुसार माझ्या सुपीक डोक्याची भरपूर मशागत केली. दूर्दैवाने ही सुपिकता मोजायची तेव्हा पद्धतही नव्हती आणि त्यासाठी प्रगतीपुस्तकात रकानाही नव्हता. असता तर माझा नंबर १ला नक्की आला असता.

शाळेत असताना अनेक वेडगळ कल्पनांना बोलुन दाखवायची हक्काची जागा म्हणजे कवठेकरसरांचा हॉबीक्लब! कल्पनाशक्तीला खर्‍या अर्थाने पंख देणारी जागा तेव्हा पुण्यात एकाच शाळेत होती, ती म्हणजे नूमविमधला कवठेकरसरांचा हॉबीक्लब! कवठेकरसरांची दूसरी एक देणगी म्हणजे आमच्या संगीतद्वेष्ट्या घरात जन्म घेऊन त्यांच्यामुळे मला शास्त्रीय संगीताची गोडी लागली आणि माझ्या पणजोबांचे म्हणजे कै. विठ्ठल सीताराम गुर्जरांचे मोठेपण, कवठेकरसरांच्या वडिलांनी म्हणजे कै. दत्त रघुनाथ कवठेकरांनी सांगितल्यामुळे मला कळले.

तर या हॉबीक्लबमध्ये आम्ही आठवीत आणि नववीत असताना बरेच उद्योग केले! बर्‍याच गोष्टी करण्याचे भरपूर मनसुबे पण केले (त्यातले एक म्हणजे खराखुरा म्हणजे १६ मिमि प्रोजेक्टर हाताळून सगळ्यांना खरा सिनेमा दाखवायचा आनंद कवठेकर सरांमुळे मिळाला.). मी तेव्हा आणखी दोन गोष्टीनी खूप झपाटून गेलो होतो - एक म्हणजे ट्रान्समीटर आणि दूसरे म्हणजे स्टीम-इंजिन! या दोन गोष्टीसाठी मी बराच हट्ट, आदळआपट पण केलेली आहे. पण ट्रान्समीटर करू देण्यास कवठेकरसर त्यातल्या कायद्याच्या कटकटीमुळे राजी नव्हते. स्टीम-इंजिन करायला हरकत नव्हती पण योग्य सामग्री आणि त्यासाठी लागणारे वर्कशॉप मिळणे तेव्हा जरा अवघड होते. स्टीम-इंजिनचा आराखडा करण्यात मी असंख्य तास घालवले. साहित्य गोळा करण्यासाठी अनेक वर्कशॉपचे उकिरडे पालथे घातले. घरात कचरा गोळाकरण्यासाठी मार पण खाल्ला. कधी सिलेंडर साठी पाईपचा योग्य तुकडा मिळायचा तर कधी पिस्टन साठी. हे दोन्ही मिळाले तर फ्लायव्हील साठी योग्य धातूचा तुकडा मिळत नसे. वडिलांनी मला सांगितले होते की, "तुझे सगळे साहित्य गोळा झाले की मला सांग. मग मी ते जोडण्यासाठी योग्य वर्कशॉप शोधून देईन." एखादा योग्य तुकडा सापडला की वडिलांना आणि कवठेकरसरांना दाखवायचा आणि त्यांचे मत घ्यायचे हा तेव्हा नेम होता. तेव्हा दोघेही मला नाउमेद न करता गंभीरपणे सूचना करत असत. हे साहित्य गोळा करताकरता दहावी झाली. अकरावीत गेलो. अकरावीत असताना वडिलांना १ला हार्ट अटॅक आला आणि आयुष्य विस्कळीत झाले. मग सगळी स्वप्ने बासनात बांधून ठेवावी लागली होती. त्यात स्टीम एंजिनचे स्वप्न पण गुंडाळले गेले आणि अडगळीत गेले...

आज हे आठवायचे कारण म्हणजे आज सकाळी ऍमेझॉन वर घोटाळत असताना एक खेळणे दिसले. बराच वेळ निरखले तेव्हा मी ४० वर्षापूर्वी डिझाईन केलेल्या स्टिम-एंजिनला कुणी तरी प्रत्यक्षात आणून विकायला ठेवले होते. किंमत रुपये ३००० फक्त. खालच्या प्रतिसादात कुणीतरी आपल्या सत्तरीतल्या वडीलांना ते भेट दिले तेव्हा त्यांना झालेला आनंद वर्णन केला होता. मी बराच वेळ त्या खेळण्यात हरवून गेलो होतो, तेव्हा शेजारी बसलेल्या बायकोला कळेना नवरा एव्हढा एका खेळण्यात का हरवला आहे. तेव्हा मी तिला वरील सर्व हकीकत सांगितली अन् म्हणालो घ्यावे की न घ्यावे कळत नाहीये. आणि मग एक सुखद आश्चर्याचा धक्का बसला...

बायकोने हुकूम सोडला, "घेऊन टाक. माझी तुला वाढदिवसाची भेट!" :D
मग बायकोने कंप्युटरचा ताबा घेऊन लगेच ऑर्डर पण केले आहे.

आयुष्यात मी कदाचित एखादी महागडी कार घेईनही. पण या खेळण्याची सर त्या गाडीला नसेल. Thanks you Aparna!! :D

असो, आयुष्याचा एकंदर ताळेबंद मांडला तर पूर्ण झालेल्या स्वप्नांची संख्या अपूर्ण स्वप्नांपेक्षा किंचित जास्तच आहे. स्वप्ने बघायला शिकविण्यात आईवडिलांचे आणि कवठेकर सरांचे योगदान मोठ्ठे आहे...

शनिवार, १ जुलै, २०१७

प्राणायाम आणि संगीताचे पारंपरिक शिक्षण



प्राणायामाबद्दल मला लहानपणापासून एक जबरदस्त आकर्षण आणि कुतूहल होते. पण तेव्हाच्या प्रचलित समज आणि गैरसमजामुळे (लहान मुलांनी प्राणायाम करू नये, तो ’गुरु’च्या मार्गदर्शनाखालीच करावा, इ० इ०) प्राणायामाचा पूर्ण फायदा कधीच मिळवता आला नाही. पण सध्या डॉ. दीक्षितांबरोबर करत असलेल्या एका लेखनप्रकल्पामुळे प्राणायामाचे आकर्षण परत एकदा जागे झाले आहे

डॉ. दीक्षितांनी सांगितलेल्या तंत्रानुसार मला प्राणायामाच्या सरावाचा फायदा तात्काळ झाला असे म्हणणे अतिशयोक्ती होणार नाही. सध्या मला ७०%-८०% वेळा रक्तदाब आणि हृदयगति हूकमी (at will) कमी करून नियंत्रणात आणता येते. फेबुवर मी माझ्या प्राणायामोत्तर रक्तदाबाच्या आकड्यांचे फोटो शेअर केले आहेतच पण जनुकीय पातळीवर होणारा फायदा वेगळाच (तो मोजायचा खर्च रु २०,०००/ असल्याने सध्या तो विचार लांबणीवर टाकला आहे).

पण सांगण्यासारखा गमतीचा भाग आणखी वेगळाच आहे...

काही वर्षांपूर्वी उदय भवाळकरांच्याकडे धृपद शिकत असताना आम्ही आवाजाच्या तयारीसाठी पहाटे पाच वाजता तंबोरे घेऊन खर्जाचा सराव करत असू. पहाटे पाच वाजता उठून खर्जाचा अभ्यास करण्यामागे परंपरेचे एक तर्कशास्त्र आहे - पहाटेची वेळ मंद्रसप्तकातल्या सुरांच्या अभ्यासाठी आदर्श असते. मन स्वरावर एकाग्र करता येते वगैरे वगैरे.

पण खरी गंमत पुढे आहे...

थोडा खोल विचार केला तेव्हा असे लक्षात आले की खरजाचा अभ्यास हा एक उत्तम प्राणायाम आहे.  त्याचा शारीरपातळीवर होणारा परिणाम मात्र शरीर शांत करणारा आणि मेंदू बंद करणारा आहे. होय! मेंदू बंद करणारा आहे. प्राणायाम २० मि.पेक्षा जास्त वेळ करायचा नसतो. पण आमचा खर्जाचा अभ्यास  पहाटे पाचला सुरु होऊन सातवाजेपर्यंत चालत असे. म्हणजे प्राणायामाच्या ओव्हरडोसमुळे आम्ही खर्जाचा अभ्यास करून जेव्हा इतर रियाज करायचो तेव्हा आमचा मेंदू अर्धसुप्त किंवा पूर्णसुप्त नक्कीच असायचा. थोडक्यात ब्रेकवर पाय ठेवून गाडी ऍक्सिलरेट करण्याचा प्रकार...

सांगायचे तात्पर्य एव्हढेच की वर्षानुवर्षे मेंदूला inefficient करून मग तालमात्रांची गणिते सोडवत जे पुढे मोठे धृपदीये झाले ते केवळ थोरच नाहीत तर निसर्गाचा एक महान चमत्कार आहेत. एखादी कला काळाच्या ओघात जेव्हा टिकत नाही अशी ओरड जेव्हा होते तेव्हा त्यामागे डोके बंद करणारी शिक्षणपद्धती तर नसेल?

सोमवार, १२ जून, २०१७

लिओ वराडकर आणि भारतीय वंश






आयर्लंडच्या पंतप्रधानपदी नुकतेचे विराजमान झालेले श्री लिओ वराडकर यांना भारतीय वंशाचे ठरवण्याचा जो हास्यास्पद प्रयत्न करण्यात आला, तो वाचून फुकटचे श्रेय लाटण्याच्या भारतीय मनोवृत्तीची दया आली. आधुनिक जनुकशास्त्राला लोकाभिमुख करण्याची गरज यातून अधोरेखित झाली.


वास्तविक लिओ वराडकरांना टीचभर य गुणसूत्र (जे उत्क्रांतीमध्ये क्षीण होत चालले आहे) आणि काही जनुक भारतीय पित्याकडुन मिळाले. बाकी आयरीश आईकडुन मिळालेली जनुकीय देणगी आणि अधिजनुकीय देणगी, लहानपणापासून झालेले आयरीश वातावरणाचे संस्कार एकूण भारतीय देणगीच्या पेक्षा कितीतरी जास्त आहे. त्यामुळे त्यांना केवळ वडिलांमुळे भारतीय वंशाचे ठरवणे हास्यास्पद ठरते.


काही लोक खवळतील... पण आणखी एक उदा. घेऊन हा मुद्दा स्पष्ट करतो.


भारतीय स्वातंत्र्यलढ्यात चित्पावनांचे अजोड योगदान आहे. चित्पावन समाजाचे (काही अपवाद वगळता) जनुकीय मूळ ज्यू आणि युरिपिअन आहे. उद्या इस्रायलने किंवा युरोपने भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे श्रेय लाटायचा प्रयत्न केला तर ते आपल्याला चालणार आहे का?

सोमवार, २७ मार्च, २०१७

उणीव



काल माझ्या प्रोफाईलवरचा कव्हर फोटो बदलला, त्या निमित्ताने भ० गी० वर परत एकदा चिंतन झाले. सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणार्‍या कृष्णाला एक युद्ध थांबवता आले नाही या माझ्या आक्षेपाबरोबर आता एका नव्या ’ओरिजिनल’ आक्षेपाची भर -

अर्जुनाला कर्म करण्यास प्रवृत्त करण्यासाठी, ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबर” करणार्‍या कृष्णाला मोक्ष या भ्रामक कल्पनेचे गाजर दाखवावे लागले.      भ्रामक कल्पनेचे गाजर दाखवून काम करवून घेणे हे एक प्रकारचे ’शोषण’च आहे. या शिवाय ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी’ करणार्‍या कृष्णाला भ्रामक कल्पनेचा उपयोग करावा लागला म्हणजे -

० एक तर सामर्थ्यशाली परमेश्वर बुद्धिवादी नसतो, असा निष्कर्ष काढणे चूक ठरणार नाही.
० बुद्धीवाद कर्तव्यपालनास प्रेरणा देण्यास असमर्थ असतो असा एक उपनिष्कर्ष यातून सहज काढता येतो.
० समजा सामर्थ्यशाली परमेश्वर बुद्धिवादी असे क्षणभर मान्य केले तर अर्जुन राजपुत्र असुनही बुद्धिवादी नव्हता असे स्वीकारावे लागेल

तर सध्या माझी समस्या अशी की ’सहस्त्रसूर्यांच्या तेजाशी बरोबरी’  करणारा कृष्ण बुद्धिवादी होता आणि अर्जुन पण बुद्धिवादी होता असे मानले तर भगवतांनी अर्जुनाला नेमके कसे कर्मप्रवृत्त केले असते.

म्हणुन माझे (’या ठिकाणी’ ’फेसबुकच्या माध्यमातून’) तमाम बुद्धिवाद्यांना असे आवाहन आहे की त्यांनी ताबडतोब ’बुद्धिवादी भगवद्गीतेची’ उणीव युद्धपातळीवर भरून काढावी...

सोमवार, २ जानेवारी, २०१७

Purpose of Sex

What is the purpose of sex in (civilized) human life?

हा प्रश्न मी अनेक विचार करणार्‍या (किंवा तसा दावा करणार्‍या) अनेक लोकांना विचारला आहे आणि संधी मिळेल तेव्हा अजुनही विचारतो. या प्रश्नाची प्रमुख दोन उत्तरे मला वाचन, संवाद किंवा निरीक्षणातून मिळाली आहेत.

ती अशी -

० सेक्स निसर्गामध्ये प्रजनना व्यतिरिक्त एकत्रितपणे आनंद उपभोगायचा मार्ग आहे कारण त्यातुन bonding शक्य होते. हा आनंद एकतर्फी, संमतीशिवाय घेतला गेला तर ती सहसा वासना, बळजबरी, हिंसा असते.
० सेक्स हा फक्त प्रजननासाठी असतो.

यातील दूसरे उत्तर देणार्‍यांचा विचारवंतांचा गट प्राणी जगताकडे बोट दाखवतो. मनुष्येतर प्राणी फक्त प्रजोत्पादनासाठी मैथुन करतात. आनंदासाठी किंवा bonding साठी नाही, असे या गटाचे म्हणणे असते. साहजिक प्रजोत्पादना व्यतिरिक्त सेक्सची गरज ही विकृती किंवा वासना मानण्याकडे या गटाचा कल असतो.  या गटाला मनुष्य पॉलिगॅमस आहे हे स्वीकारता येत नाही किंवा स्वीकारायचे नसते. तसे स्वीकारले गेले तर माणसाच्या मनुष्यत्वाला कुठेतरी धक्का लागत असावा. आता माणसाचे मनुष्यत्व कशात आहे, हा प्रश्न मला तरी अनिर्णित आहे असे मला वाटते. कारण प्रत्येक मनुष्यसमूहानूसार मनुष्यत्वाच्या कल्पना बदलू शकतात.

पण ’सेक्स हा फक्त प्रजननासाठी असतो’ असे मानणा-यांचा गट जेव्हा प्राणी जगताकडे बोट दाखवतो तेव्हा काही गोष्टींकडे कानाडोळा करतो.

० प्राणीजगतात कोणत्याही नराला किंवा मादीकडे कोणत्याही नराकडे किंवा मादीकडे केव्हाही जाता येते.
० प्राण्यांमध्ये प्रजोत्पादनानंतर नर आणि मादी आपापल्या दिशेने जाउ शकतात. कुणाचीही जबाबदारी कुणावरही नसते.

म्ह० वरील मूळ प्रश्नाचे उत्तर म्हणून "प्रजनानासाठी सेक्स" हे तत्त्व स्वीकारताना  प्राणी जगतातील इतर संकेतांकडे कानाडोळा केला. कारण ते गैरसोयीचे ठरणार असल्याने स्वीकारता येणार नाहीत. गैरसोयीच्या प्रश्नांना वेगवेगळ्या तर्‍हेने बेदखल करणे यात मात्र माणसाचे मनुष्यपण नक्की सामावले आहे.

मानववंशशास्त्राच्या थोड्य़ाशाही परिचयाने धर्म आणि संस्कृतीने लादलेल्या काही ’उदात्त’ कल्पना कोलमडून पडतात त्या अशा...

रविवार, १ जानेवारी, २०१७

एक समस्या



अलिकडे व्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा हिरीरीने बर्‍याचवेळा नाट्य/चित्रपट इत्यादीतून मांडला जातो (राजवाडे ऍण्ड सन्स, काहे दिया परदेस सारखी मालिका काही उदा० म्हणून देता येतील. फार पुढे जाऊन बोलायचे झाले तर कोर्टाचे कौटुंबिक दाव्यांमधले निवाडे पण उदा० म्हणून देता येतील). थोडक्यात व्यक्ती आणि कुटुंबात संघर्ष उभा राहीला तर व्यक्तीला झुकते माप द्यायचा प्रघात वाढला आहे. पण हाच संघर्ष व्यक्ती आणि समाज (किंवा एखादा मोठा गट) यांच्यात उभा राहिला तर समाजाला झुकते माप दिले जाईल. सर्जनशील व्यक्ती (कलाकार) आणि समाज हे सहसा षड्डु ठोकून उभे असतात. आय आय टी, पवई येथील मूडइंडिगो मधल्या चित्राचा वाद (किंवा माझे अलिकडे एका ग्रुपमधून झालेले निष्कासन) हे याचे ताजे उदा० आहे.

थोडक्यात व्यक्ती आणि कुटुंब या वादात व्यक्ती महत्त्वाची आणि व्यक्ती आणि समाज या वादात समाज महत्त्वाचा... हे त्रांगडं काही सोडवता  येत नाही.