शनिवार, ११ एप्रिल, २०२०

मन:सामर्थ्य

एक मजेशीर प्रसंग आहे. आता त्या गोष्टीला १७-१८ वर्षे झाली असतील. मी तेव्हा संगीतोपचारामध्ये काही प्रयोग करत होतो. माझ्या तेव्हाच्या प्रयोगांना मला भारत देश सोडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. त्या सुमाराला माझ्या परिचयातल्या एका वकीलांनी माझे संगीतोपचारांचे प्रयोग त्यांच्या परिचयाच्या एका तरूणावर करण्यास सुचविले. त्या तरूणाचा प्रेमभंग झाल्यामुळे तो भावनिकदृष्ट्या उध्वस्त झाला होता. त्याचे परिणाम त्याच्या तब्येतीवर आणि रोजच्या व्यवहारांवर व्हायला लागल्यामुळे त्या तरूणाच्या निकटवर्तीयांना काळजी वाटत होती.

  सुदैवाने हा तरूण प्रयोग काय आहे हे समजल्यावर कोणतेही आढे-वेढे न घेता तयार झाला आणि एक दिवस आम्ही त्या वकीलांच्या घरीच प्रयोग करायचे ठरवले. या प्रयोगात कानाला इयरफोन लावून डोळे मिटून विशिष्ट त-हेने तयार केलेले नाद आणि संगीत २०-३० मि. ऐकत पडून राहायचे असते. सुमारे ९०% लोक हा ट्रॅक ऐकताऐकता पहिल्या ५-१० मि० मध्ये झोपी जाऊन घोरायला लागतात आणि ट्रॅक संपल्यावर जागे झाल्यावर वेगवेगळ्या आश्चर्यकारक प्रतिक्रिया देतात. बहूतेक सर्वांना प्रयोग संपल्यावर झोपेतून हलवून उठवावे लागते. मात्र या तरूणाच्या बाबतीत असं घडलं, की आम्ही थोडा वेळ घाबरून गेलो होतो. त्याला आम्ही ट्रॅक संपल्यावर ४० मि० गदागदा हलवून उठवायचा प्रयत्न करत होतो. एव्हढी गाढ झोप त्याला लागली होती. मग थोड्या वेळाने वकीलमहाशय माझ्यापाशी येऊन म्हणाले, "हा मेंटली फार वीक आहे. जगात इतकं वीक राहून चालत नाही". त्यांचा रोख मनाच्या ताकदीकडे होता हे लक्षात आले असेलच...
"मनाची ताकद" हे तसे आपल्याकडून अतिशय सैलपणे वापरले जाणारे शब्द! माणूस संकटात सापडला की त्याला हमखास मिळणारा सल्ला म्हणजे - "मनाची ताकद वाढवा". या "मनाच्या ताकदीचे" मला गेले कित्येक वर्षे गूढ कोडे आणि आकर्षण निर्माण झाले आहे. मनाची ताकद आपल्याला किती वाढवता येते? सामान्य माणसे मनाची ताकद वाढवायला बाह्य उपायांवर का अवलंबून राहतात? इत्यादि या संदर्भातले उपप्रश्न आहेत. हा विषय आध्यात्मिक गुरु आणि स्वयंमदत तज्ज्ञ यांनी बळकावला आहे. आध्यात्मिक गुरु हे फक्त गोंधळ वाढवतात (क्वचितच ते मुद्देसूद बोलतात, तसेच सैल विधाने करतात) तर स्वयंमदत तज्ज्ञ फार जुजबी आणि उथळ रितीने हा प्रश्न हाताळतात, असे माझे सध्या मत बनले आहे.

मी वैद्यकाचा विद्यार्थि नाही. जास्तीत जास्त एखादा मुरलेला हौशी खगोल किंवा पक्षी निरीक्षक यांच्या इतकीच माझी आणि वैद्यकाची जवळीक आहे. डॉ. दीक्षितांसारखे फार थोडे वैद्यकीय व्यवसायिक माझ्या नशीबाने मला माझी हौस भागवायला मदत करतात. या आणि काही वाचन एव्हढ्याच भांडवलावर "मनाची ताकद" म्हणजे काय याचा शोध घ्यायचा प्रयत्न मला करायचा आहे.
आता मन म्हणजे काय हे तपासायचा प्रयत्न करू या! मन म्हणजे काय याची आध्यात्मिक गुरुनी, योग्यांनी केलेल्या व्याख्या मला स्वीकारायची नाही कारण त्यात एकवाक्यता व्हायची शक्यता शून्य! दूसरे म्ह० चिकीत्सेचे त्यांना अतिशय वावडे असते. मनाची निर्मिती जडातूनच होते, हे आधुनिक विज्ञानाला गवसलेले सत्य मान्य केले तर मन म्हणजे मानवी मेंदू आणि उर्वरित शरीराचे सर्व ज्ञात आणि अज्ञात व्यवहार. ही कॅण्डेस पर्ट या सुप्रसिद्ध वैज्ञानिक विदुषीने (Molecules of Emotion या पुस्तकाची लेखिका) केलेली व्याख्या मला जास्त योग्य वाटते.
मुळात ताकद, बळ, सामर्थ्य, क्षमता, उर्जा या संज्ञा प्रामुख्याने जड वस्तूंच्या स्थानांतराशी किंवा रुपांतराशी (कार्याशी) निगडीत आहेत. त्यामुळे त्यांची गणिते मांडावी लागतात. स्थानांतर किंवा रुपांतर इच्छित किंवा नियंत्रित नसेल (ते जर अनियंत्रित असेल), तर ताकद, बळ, सामर्थ्य, क्षमता, उर्जा याची गणिते करावी लागत नाहीत. वस्तूवर निश्चित कार्य केले की त्याचे निश्चित फल मिळते. मानवी व्यवहारात हे फल मानसिक पातळीवर समाधान/नैराश्य, आर्थिक पातळीवर नफा/तोटा, शारीरिक पातळीवर पोषण/आरोग्य/अनारोग्य मिळवून देते. थोडक्यात अपेक्षित फल मिळाले तर सकारात्मक परिणाम होतो आणि अनपेक्षित मिळाले तर नकारात्मक परिणाम होतो.
आता मानसिक बळ या संकल्पनेचा अर्थ लावायचा प्रयत्न करता येईल. एखादे कार्य केवळ मानसिक पातळीवर घडण्यासाठी जे बळ लागते त्याला मानसिक बळ किंवा मन:सामर्थ्य म्हणणे योग्य होईल. हे बळ मिळणे म्ह० काही चेतारसायनांचे स्रवण (डोपामाईन?) प्रतिसाद म्हणून होत असणार. जेव्हा एखादी कृती मानसिक पातळीवर (म्ह० केवळ कल्पनेने) घडून येते किंवा केली जाते, तेव्हा शरीर आपल्याला उत्साही किंवा निरूत्साही बनवून मानसिक पातळीवर प्रतिसाद देते आणि कार्यप्रवृत्त अथवा परावृत्त करते. मेंदू मधली reward circuits उद्दीपित होउन, मनातल्या मनात एखादी कृती करताना पुरेसा उत्साह निर्माण झाला नाही तर ध्येय साध्य करण्याचे motivation नाहीसे होते आणि ती व्यक्ती नाउमेद होते.
सांगायचे तात्पर्य असे की एखाद्या काल्पनिक कृतीला शरीराचा अनुकूल प्रतिसाद मिळणे ही ऐच्छिक क्रिया नाही. ती जनुकीय भाग्याने नियंत्रित केलेली क्रिया आहे. जनुकीय भाग्य आहार, ताण-तणाव, आनुवंशिकता व आजुबाजुची परिस्थिती यांनी नियंत्रित केले जाते.
हे सर्व इथे सांगण्य़ाचे कारण असे की "आपलं मानसिक बळ वाढवा" असा सल्ला अनेकजण अनेकांना अत्यंत सैलपणे देत असतात, ते चुकीचे आहे असे मला वाटते. सामान्य आहाराने शारीरिक ताकद एका मर्यादेपर्यंतच वाढते, मग विशिष्ट आहारानेच (आणि व्यायामाने) वाढते, तसेच मानसिक ताकदीचे आहे. आजुबाजुची परिस्थिती एखाद्याला या खुराकापासून वंचित ठेवत असेल तर दोष आजुबाजुच्या परिस्थितीचा आहे. तात्पर्य एखाद्या व्यक्तीच्या मनाची ताकद वाढवण्याच्या प्रयत्नाला मर्यादा आहेत.
प्रार्थना, ध्यान, वेगवेगळे छंद हे ताण-तणाव कमी करतात आणि काही काळ समस्यापासून लांब राहायला मदत करतात, तसेच वेगळ्या दृष्टीकोनातून समस्यांकडे बघण्य़ासाठी जी अवस्था आवश्यक आहे ती मिळवण्यासाठी या उपायांची मदत होऊ शकते. पण मानसिक ताकद वाढवण्यासाठी "आडात असणे" आवश्यक आहे, असे माझे वैयक्तिक मत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: