बुधवार, २१ जानेवारी, २००९

वास्तूचे लाभणे

वास्तूचे लाभणे

लोक जिवाच्या कराराने स्वत:च्या मालकीच्या वास्तूचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी
झगडतात. हे स्वप्न पुरे झाले की नव्या वास्तुमध्ये स्थलांतरीत होतात, पण कधी
कधी नव्या वास्तूत स्वास्थ्य लाभण्या ऐवजी जुने नष्ट्चक्र चालूच राहते. मग कुणी
तरी सांगते ही वास्तू तुम्हाला लाभत नाही. अमुक करून बघा, तमुक करून बघा.

वास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक
गोष्टी अशा -

- घरातील एकाच व्यक्तीच्या अपार जिद्दीने वास्तू उभी राहीली असेल तर बहूधा
कर्जबोजा आणि साठविलेली पुंजी वास्तुच्या निर्मितीत गेली असल्याने नव्या
वास्तूत समस्त कुटुंबाच्या हौशीमौजीला मोठ्या प्रमाणात मर्यादा पडतात. कमावती
व्यक्ती एक असल्यास हे विशेष जाणवते.

- नवी वास्तू ब‍र्याच वेळा मूळ ठिकाणापासून लांब बांधली जाते. वाड्यातून
अपा‍र्टमेंट किंवा, भाड्याच्या ब्लॉकमधून बंगला वगैरे वगैरे. अशावेळेस आपण एका
सामाजिक वर्तूळातून बाजूला पडतो आणि नवीन वर्तूळ तयार व्हायला अनेक कारणांनी
वेळ लागतो.

- जुन्या जागेत अनेक वर्षे अडचणीना तोंड द्यावे लागले असल्यास कुटुंबातल्या
सर्वांच्या स्वभावास वेगवेगळे घट्ट पिळ पडतात. हे पिळ नव्या जागेत सहजा सहजी
सुटत नाहीत.

- नवी वास्तू बांधतांना घरातील एका जरी व्यक्तीचा मनाने सह्भाग नसेल तरी नव्या
वास्तूत मन:स्वास्थ्याला विरजण पडायला वेळ पडत नाही.

ही यादी कदाचित यापेक्षा मोठीही असेल पण मूळ कारणे थोड्याफार तपशीलाच्या फरकाने
हीच असतात. पण लोकांना चमत्काराची अपेक्षा असते. आणि तो घडत नाही म्हणून
पत्रिका बघितली जाते, वास्तूत तोडफोड सूचवली जाते. इतकेच काय, लोक नवे घर
विकायला पण निघतात. माझ्या माहितीतल्या एका आयटी कंपनीच्या मालकाने धंदा वाढावा
म्हणून वास्तूदोष निवारणाचे त‍र्हेत‍र्हेचे उपाय केले पण त्याला आपल्या
कंपनीतील गळकी टॉयलेट्स काही केल्या दिसली नाहीत. असो.

तर मित्रहो तुमच्या परीचयात कुणी वास्तू लाभत नाही म्हणून तक्रार करत असेल तर
त्यांच्या हे मुद्दे जरूर लक्षात आणून द्या...

३ टिप्पण्या:

कोहम म्हणाले...

very good analysis

Astro and Vastu Counsellor म्हणाले...

" घर असावे घारासारखे | नकोत नुसत्या भिंती || तिथे असावा प्रेम, जिव्हाळा | नकोत नुसती नाती ||
त्या शब्दांना अर्थ असावा | नकोच नुसती फुका वाणी || सुर जुळवे परस्परांचे | नकोत नुसती रडगाणी ||
त्या अर्थाला अर्थ असावा नकोत नुसती नाणी || अश्रुतूनही प्रीत झरावी | नकोत नुसते पाणी ||
या घरट्यातून पिलू उडावे | दिव्य घेऊनी शक्ति || आकांक्षाचे पंख असावे | उंबरठ्यावर निष्काम भक्ति ||

या काळात या जगामध्ये अनेक गृहनिर्माण होत आहेत. अशा प्रकारे गृहनिर्माण करताना लाखो रुपये खर्च करतात त्यांना घन, दौलत, घरदार इस्टेटी असताना पति-पत्नी, पुत्र यांच्यामध्ये नेहमी असमाधान, भांडण, मानसिक चंचलता अशांतता असते. जीवन सुखी नसते. हे कशाला ? म्हणजेच आपण राहत असणारे घर छोट्या झोपडीपासून ते राजमहालापर्यंत का असेना त्याच्या निर्माणासाठी आपल्या पूर्वज ॠषीमुनींनी हजारो वर्षाचा प्रदिर्घ अनुभव घेऊन मानवाचे जीवन कल्याणमय होण्यासाठी ते सुत्र, नियम रुपाने ग्रंथरचना केली आहे. घर कसे बांधावे, कोणत्या दिशेला उंच बांधावे, कोणत्या दिशेला उतार, मोकळे, स्वच्छ असावे, कोणत्या दिशेला काय असावे, आयगणित, आयु, धन, ऋण, आय इत्यादीचा विचार करुन जे घर, प्रसाद, बंगला, दुकान बांधण्यात येते अशा प्रकारचे नियम सर्व एकत्र करुन त्याचे एक शास्त्र केले त्याचेच नाव " वास्तुशास्त्र " होय.

आजच्या काळात घराचा शो, रिकाम्या जागेचा जास्तित जास्त उपयोग करण्यात येतो, मुळ घर बांधताना या आर्किटेक्ट लोकांनी वरील विषयांचा विचार न करता शास्त्राचा विचार जास्त केला पाहिजे. वास्तुशास्त्राचा उपयोग करुन आपके घ्रर, कारखाना, दुकान इतर वास्तुचे निर्माण केल्याने सुख, ऐश्वर्य, आरोग्य, मानसिक सुख इत्यादीचा लाभ होतो. कुटुंबकल्याण झाल्यामुळे ते जगत्-कल्याण होते.

मनुष्य जीवनात दु:खाची सावट संपून सुखाची पाहाट येईल या आशेवरच जगत असतो. व्यक्तीच्या जीवनात अनेक शुभ घटना घडतात. नोकरी मिळणे, विवाह होणे, मूल होणे, घर बांधणे इत्यादींमुळे जीवनात आनंद होतो, त्यातल्यात्यात विवाह आणि घर बांधणे या शुभ घटनामुळे व्यक्तिच्या जीवनात आनंदाला पार उरत नाही, आपण काहीतरी मिळविल्याचे सार्थक वाटत असते.

जीवनात मिळणार्याम सुख दु:खाला त्या व्यक्तिचे चांगले वाईट कर्माचा जेवढा सहभाग तितकाच त्या वास्तुचाही सहभाग असतो. मिळणारे शुभाशुभ फळे देखिल वास्तूमुळे मिळतात. कारण मनुष्य जीवनाचे कुठलेही आराखडे तो त्या घरातच आखित असतो.
आजच्या महागाईच्या का़ळात मिळालेल्या कमीतकमी जागेत जास्तीत जास्त जाग कशी वापरता येईल याचा विचार माणूस करीत असतो. कधीकधी नकळत काही चुका घडतात. मग पुढे सुरु होतो दु:खाच पर्व.

मुले मोठी झालीत म्हणून म्हणा किंवा राहायला जागा पुरेना म्हणून म्हणा घरमालकाच्या तगाद्यामुळे म्हाणा, विभक्त कुंटुबा मुळे म्हणा आपले एखाद घर असावं म्हणून तो स्वतःची एक जागा मिळवितो त्या जागेत आपले स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करतो.

वसई-विरार परिसर मुंबई पासुन हाकेच्या अंतरावर असल्याने अनेक परिवार आपले सुंदर घर असावे अशा कल्पनेने या विभागात येतात. पण त्यांना कुटुंब प्रमुखाचे योग्य मार्गदर्शन नसल्या मुळे अनेक अडचणीना तोंड घ्यावे लागते. त्यातिल प्रमुख कारणे :-

१. ज्या परीसरात जागा निवडायची आहे त्या परीसराचा भौगोलिक व भूमिचा विचार.
२. इमारतीच्या वास्तुची दिशा व इमारतीचा मुख्य दरवाजा व मुख्य रस्ता.
३. सदनिकेचा मुख्य दरवाजा व त्या समोरील जिना किंवा व्दार.
४. घराच्या दाराला उबंरठा कशाचा असावा व का असावा?
५. स्वयपाक घर, संडास, बाथरुम, शयन कक्ष (बेडरुम) याची योग्य दिशा
६. मुहुर्तासहित भूमिपूजन ते वास्तुशांती पर्यंतचे अशास्त्रिय / अयोग्य विधी किंवा वास्तु प्रवेश
७. व्दार सजावट व घर सजावट. इत्यादि.....
संजीव नाईक
वास्तु व ज्योतिष समोपदेशक

Aditya म्हणाले...

नमस्कार..
आपण मुळ लेखात दिलेली कारणे तर असतातच, पण त्याशिवायही काही असू शकेल हे नाकारणे अशास्त्रीय नाही का वाटत? आजच्या शास्त्राला सगळे समजले आहे, आणि त्याच्या आवाक्याबाहेर काही नाही असे आपले मत आहे का?