गुरुवार, २ मे, २०१३

श्री. श्याम मानवांचे (आचरट) प्रश्न




(http://shyammanav.blogspot.in/2012/12/blog-post_7.html)

1) फलज्योतिष हे शास्त्र आहे का? 
तुम्हाला शास्त्र म्हणायचे नसेल तर नका म्हणू. पण ज्योतिष एक विद्या मात्र नक्की आहे.

2) पूर्वी फलज्योतिष आणि खगोलशास्त्र एकत्र होते. ग्रीकांपासून, आर्यभट्टापासून ते गॅलिलिओ- कोपर्निकसपर्यंत अनेक सुप्रसिद्ध खगोलशास्त्री ज्योतिषीही होते, पण एकोणिसाव्या शतकात खगोलशास्त्र व फलज्योतिष वेगळे झाले, ते का? 
असंख्य कारणे असू शकतात . शाखा, उपशाखा निर्माण होणे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. संगणकशास्त्रापासून अनेक नव्या शाखा जन्माला आल्या - संगणक अभियांत्रिकी, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी, कृत्रिम मेधा, मानव-यंत्र संवाद इत्यादि.

3) खगोलशास्त्र ही विज्ञानाची व वैज्ञानिक अभ्यासाची महत्त्वाची शाखा झाली. त्याचा अभ्यास जगभराच्या सगळय़ा विद्यापीठांमधून होता; परंतु फलज्योतिष मात्र चोथा समजून विज्ञानाने फेकून दिले. असे का? 

विज्ञान फक्त फलज्योतिषाला चोथा म्हणुन फेकून देत नाही तर मुख्य प्रवाहात नसलेल्या अनेक गोष्टीना चोथा मानते. मुख्यप्रवाहातील अस्तित्व अनेक बाबींवर अवलंबून असते - fashion, politics, funding etc.  कृत्रिम मेधा (Artifitial Intelligence) या शाखेला अनेक जण अजूनही चोथा मानतात (ही शाखा निर्माण झाली तेव्हाही मानत होते). तरीही अनेकजण अनेक विद्यापीठातून या विषयाचा अभ्यास करतात. ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची  थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. MD करताना सायकियाट्रीला जाणारे "मेडीसन सोडणारे" (म्हणजे अप्रत्यक्षपणे चोथा) म्हणून हिणवले जातात.  आयायटीत आमच्या वेळेला theoryचे लोक experimentalistना "चोथा" म्हणून हिणवत असत. आय़टिच्या विश्वात coding करणारे testing/debugging करणार्‍याना "चोथा"च समजतात.

तात्पर्य "चोथा होणे" ही भावना सापेक्ष आहे.

4) जगभराच्या 186 वैज्ञानिकांनी, ज्यात 19 नोबेल पारितोषिक विजेते शास्त्रज्ञ आहेत, 'फलज्योतिष हे शास्त्र नाही. तो केवळ काही लोकांचा पोट भरण्याचा धंदा आहे. त्यावर जनतेने विश्वास ठेवू नये,' असे पत्रक काढले व ते जगभर प्रसिद्ध केले. त्याबद्दल 'ज्योतिष अधिवेशनाचे' काय मत आहे? 

मी 'ज्योतिष अधिवेशनाचे' प्रतिनिधीत्व करत नसल्याने या प्रश्नाचे उत्तर देऊ इच्छित नाही.

5) आजचे फलज्योतिषी 9 (किंवा 12) ग्रह मानतात. त्यात राहू, केतू नावाचे ग्रहही मानतात. प्रत्यक्षात राहू-केतू अस्तित्वातच नाहीत. ते ग्रहही नाहीत. तरी ज्योतिषी मात्र आजही जनतेच्या कुंडल्यांमध्ये (होरोस्कोप) राहू-केतू फिरवतच असतात. ते का? कसे? अस्तित्वात नसलेल्या राहू-केतूंना स्थान देणार्‍या कुंडल्या किती विश्वसनीय असू शकतात? व त्या आधारावर उभ्या असणार्‍या फलज्योतिषात कितपत अर्थ असू शकतो?

श्याम मानव आणि ते ज्या गटाचे प्रतिनिधीत्व करतात त्यांच्या अडाणीपणाचा निदर्शक असा हा प्रश्न आहे. "ग्रह" ही तांत्रिक संज्ञा आहे. ज्याप्रमाणे "धातु", "मल", "अग्नि" या आयुर्वेदातील तांत्रिक संज्ञा आहेत. पाणिनीच्या व्याकरणात युस्त्र्याख्यौ नदी (1.4.3) असे एक सूत्र आहे. तेथे ईकारान्त आणि ऊकारान्त स्त्रीलिंगी शब्दाना "नदी" अशी तांत्रिक संज्ञा आहे.

तसेच ज्या बिंदुंचे भ्रमणकाल आणि कक्षा निश्चित झाले आहेत ते सर्व ग्रह मानावेत असा ज्योतिषात संकेत आहे. राहु-केतु, चंद्र-सूर्य या संकेतानुसार ग्रहच ठरतात.

6) चंद्र-सूर्याला ग्रह म्हणून आजही स्थान दिले जाते. चंद्र हा उपग्रह आहे, हे खगोलशास्त्राच्या ज्ञानामुळे पाचव्या वर्गातल्या मुलालाही ज्ञात असते. तरी सुशिक्षित विद्वान ज्योतिषीही चंद्राला ग्रह म्हणूनच कुंडलीत स्थान देतात. अशा अवस्थेत विद्वान ज्योतिष्यांपेक्षा पाचव्या वर्गातल्या मुलांनाही अधिक ज्ञान असते, असे का मानू नये? 

वर दिलेल्या प्र.क्र. ५च्या उत्तरात याचा खुलासा व्हावा अशी अपेक्षा करतो.

7) सूर्य हाही ग्रह म्हणूनच कुंडलीत मांडला जातो व आजही ज्योतिषी पृथ्वीभोवतीच (कुंडलीत) सूर्याला फिरवत असतात. सूर्य हा तारा आहे. तो ग्रह नाही व पृथ्वी इतर ग्रहांसोबत सूर्याभोवती फिरते हे शाळकरी मुलांना जसे शिकवले जाते तसेच ज्योतिष्यांना शिकवावे, प्रसंगी त्यांच्यासाठी स्वतंत्र शाळा काढाव्यात, अशी विनंती आम्ही सरकारला करावी काय? 

कुणी सरकारला कसली विनंती करावी हा ज्याच्या त्याच्या विवेकाचा, उपलब्ध वेळाचा आणि रिसोर्सेसचा प्रश्न आहे. पण याच न्यायाने आयुर्वेदातील संज्ञा, व्याकरणातील संज्ञा पण बदलण्याचा आग्रह धरावा. फक्त ज्योतिषाला बडवणे हे आकसाचे आहे.

8) पृथ्वी हा ग्रह आहे. त्याचा पत्रिकेत ग्रह म्हणून का समावेश नाही? 

Heliocentric astrology या नावाने एक ज्योतिषाची शाखा आहे. त्यानुसार ज्या पत्रिका तयार होतात त्यात पृथ्वी हा ग्रह दाखवला जातो. यात पत्रिकेतील निरीक्षक सूर्यस्थित असतो. ही शाखा मूलत: जागतिक पातळीवर घडणार्‍या मोठ्या घटनांशी संबंधित ग्रहयोगांचा अभ्यास करते.

9) ग्रहाचा मानवी जीवन प्रवाहावर परिणाम होतो असे फलज्योतिषी सांगतात व त्यावरच त्यांचे शास्त्र अवलंबून आहे. याला वैज्ञानिक आधार काय? एकाच स्थळी व एकाच ठिकाणी राहणार्‍या माणसांवर एकाच ग्रहाचे, ते केवळ वेगवेगळ्या वेळी जन्मले म्हणून वेगवेगळे परिणाम कसे होतील? 

मानवी भाषा व्यवहार हा जटिल प्रक्रियेतून निर्माण होतो. निरीक्षण, अनुभव, श्रद्धा आणि त्यांचे वर्णन करायला वापरली जाणारी  भाषा एकमेकांवर सतत प्रभाव पाडतात. मला कोकणात एके ठिकाणी उंच हा शब्द खोल या अर्थाने वापरला जात असल्याचे आढळले. "भयंकर सुंदर" हा अलिकडचा एक प्रयोग. अशी अनेक उदा देता येईल.

आधुनिक ज्योतिषी ग्रहांचे मानवी जीवनावर परिणाम अजिबात मानत नाहीत तर ते ग्रहांनी तयार केलेल्या भौमितिक रचनांची मानवी जीवनातल्या अवस्थांशी सांगड घालून अनिश्चितते आणि अपरिहार्यते विषयी मार्गदर्शन करायचा प्रयत्न करतात.

10) सगळे ग्रह व सूर्य यांची भ्रमणकक्षा व काळ निश्चित आहे. पुढील पाच हजार वा पाच लाख वर्षानंतर तो निश्चित ठरावीकच असणार आहे. याचाच अर्थ ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक मनुष्याचे भविष्य तो जन्मत:च ठरलेले असते. असे असतानाही अनेक ज्योतिषी ग्रहदशा बदलण्याचे व ग्रहांचे अरिष्ट टाळण्यासाठी अनेक पूजा, ताईत, खडे वगैरे उपाय सांगतात व ठरलेले आयुष्य बदलवता येते असेही सांगतात. ते कसे? ग्रहांची दिशा, स्थान व भ्रमण निश्चित असूनही या उपायांनी माणसांचे भविष्य बदलतेच कसे? हे सगळे उपाय म्हणजे सामान्य लोकांना लुबाडण्याची ज्योतिष्यांची एक क्लृप्ती नव्हे काय? मुळात माणसांचं आयुष्य ठरलेलं असतं हे सांगणंच लबाडी नव्हे काय? 

आपल्यामध्ये असलेले जनुक जसे आजुबाजुच्या परिस्थितीनुसार सक्रिय किंवा निष्क्रिय होतात. त्याप्रमाणेच आजुबाजुच्या परिस्थितीनुसार ग्रहयोगांनी सूचविलेल्या शक्यता व्यक्त होतात किंवा अव्यक्त राहतात. उपायांनी समस्येपासून काही काळ लांब राहता येते. आशा टिकून राहायला मदत होते. काही लोक लुबाडण्यासाठी हे वापरतात म्हणून उपाय करणे चूक ठरत नाही. कोणताही शहाणा ज्योतिषी "आयुष्य ठरलेलं असतं " असे सांगणार नाही. आयुष्यातील अनिश्चितता आणि अपरिहार्यता आपण कशी हाताळतो यावर ते अवलंबून असते.

11) माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? पण जर जन्म ठरलाच असेल तर मनुष्य स्वत: निर्णय घेऊन आजच्या काळात भारतीय कायद्याच्या परवानगीने कृत्रिम गर्भपात करतो व जन्माला येणार्‍या नव्या मनुष्याचे अख्खे आयुष्यच थांबवतो, हे कसे? ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 


माणसाचा जन्म आणि मृत्यू ठरलेला असतो का? 

जन्म होणं हा योगायोगाचा भाग आहे. पण प्रत्येक जीवित व्यक्ती कधी ना कधी मरणार हे मात्र नक्की आहे.

ठरलेला नसेल तर फलज्योतिषाला काही आधार उरेल काय? 

जीवन चालू झाल्यावर फलज्योतिषाला आधार निर्माण होतो (माझी भूमिका याच प्रश्नोत्तरात इतरत्र स्पष्ट केलेली आहे). कारण अनिश्चितता आणि अपरिहार्यता हाताळायची क्षमता प्रत्येक व्यक्तीला निसर्गाने समान बहाल केली आहे, असे दिसत नाही.

ठरलेला जन्म कृत्रिम उपायांनी थांबवणारा मनुष्य ग्रहांपेक्षा वा नियंत्यापेक्षा मोठा मानायचा का? 

हा प्रश्न मला खोडसाळ  आणि आचरट वाटतो.

12) मृत्यू ठरलेला असतो का? 

सध्या तरी  प्रत्येक जीवाचा मृत्यू ठरलेला आहे पण मृत्युची तिथी मात्र ठरलेली नाही.

अ) तो जर ठरलेला असेल तर, 1930 साली भारतीय माणसाचे सरासरी आयुष्य केवळ 18 वर्षे होते. आता ते 68 वर्षापेक्षा अधिक झाले आहे. हे अधिकचे सरासरी आयुष्य भारतीयांच्या वाटय़ाला कुठून आले? याचे उत्तर फलज्योतिष्यांना पत्रिकांमध्ये दाखवता येईल का? 

पत्रिकांमध्ये कशाकशाची उत्तरे ज्योतिषानी शोधावित अशी श्री मानव यांची अपेक्षा आहे. मूळात पत्रिका ही एक मानवी जीवनातील  सूचित अवस्थांची एक प्रतिकृती आहे. प्रत्येक प्रतिकृती सर्व प्रश्नांचे उत्तर देते का? घराची पुठ्ठ्याची प्रतिकृती घराचे आयुष्य किती या प्रश्नाचे उत्तर देईल का?

आ) मृत्यू ठरलेला असतो असे मानणारे ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? ते डॉक्टरांची मदत का घेतात? जर मृत्यू ठरलेल्या क्षणीच होणार असेल तर डॉक्टरांची मदत घेऊन स्वत:चा व स्वत:च्या नातेवाईकांचा जीव वाचविण्याचा प्रयत्न करून पैसा फुकट घालविणे मूर्खपणाचे नव्हे का? 

- ज्योतिषी आपल्या घरच्यांना व स्वत:लाही औषधोपचार का करतात? 

मृत्यु ही शक्यता पत्रिका दाखवत असेल तरीही जीवन स्वीकारायचे की मृत्यु हा पण प्रत्येक शुद्धीवर असलेल्या व्यक्तीचा प्रश्न आहे. आणि बेशुद्ध व्यक्तीच्या पत्रिकेत मृत्यु ही शक्यता असेल तर जगवायचे की मरू द्यायचे हा आप्तांचा (आणि कदाचित उपचार करणार्‍या डॉक्टरांचा प्रश्न). पुढे रस्ता बंद आहे असा कुणी सल्ला दिला तर तो न मानता तसंच पुढे जायच की मागे फिरून दुसरा रस्ता पकडायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. सल्ला मिळाला म्हणून तो मानलाच पाहिजे असं कुठे लिहीले आहे?

इ) एकाच अपघातात ज्यावेळी शेकडो लोक मरतात त्या वेळी त्या सगळ्यांचा मृत्युयोग असतो काय? नागासाकी-हिरोशिमा अणुस्फोट व सगळ्याच मोठय़ा अपघातांबद्दल काय? तसा पुरावा पत्रिका तपासून देता येईल काय? 

या प्रश्नांची उत्तरे मी सध्या तरी देऊ शकणार नाही कारण मी त्यासाठी आवश्यक असणारा अभ्यास मी केलेला नाही. मात्र लग्नाच्या वर्‍हाडांना होणारे अपघात आणि त्यात मरण पावणार्‍या व्यक्तींच्या पत्रिका तपासून काही अंदाज निश्चित बांधता येतील. आपली संघटना अशा अभ्यास-प्रकल्पाला मदत मिळवून देईल का?

13) अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती गेल्या पंचवीस वर्षापासून ज्योतिष्यांना सारखी आव्हाने देत आहे, तरी ज्योतिषी ती आव्हाने स्वीकारून अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे तोंड एकदाचे बंद का करीत नाही? 

उत्तर - अशा आह्वानतून कोणताही ठोस निष्कर्ष काढता येत नाही किंवा निघत नाही. एक ज्योतिषी जिंकला किंवा हरला हे ज्योतिष(शास्त्रा/विद्ये) बद्दल कोणतीही विधाने करण्यास करण्यास पुरेसे नाही. आह्वाने देणारे ज्योतिषाच्या मर्यादांमध्ये त्यांचे आह्वान तयार करत नाहीत, हे कशाच द्योतक? प्रत्येक ज्योतिषी जे दावे करतात त्या दाव्याच्या अनुरोधानेच आह्वान देण्यात यायला हवं. हे दावे प्रत्येक ज्योतिषी जे तंत्र वापरतो त्या तंत्रानुसार बदलु शकतात. हाडाची ऑपरेशन्स करणार्‍या डॉक्टरला आपण हृदयाची शस्त्रक्रिया करायचा चॅलेंज कधी देतो का?

ज्योतिष टाकून द्यायचे असेल तर वेगवेगळ्या पातळ्यांवर संशोधनकरून मग ते टाकून द्यायला हवे. त्यासाठी विज्ञानात जसे aggressively संशोधन होते तसे संशोधन ज्योतिषात व्हायला हवे. त्यासाठी मुळात ज्योतिषातील नियम जास्त चिकित्सक पद्धतीने तयार केले जायला  हवेत. असे सुसंशोधित नियम वापरून मगच आह्वाने स्वीकारायचा विचार करता येईल. मुळात ज्योतिषातील नियम हे व्याकरणाच्या/भाषेच्या नियमांप्रमाणे प्रवाही असतात. नियम बनविण्यासाठी कोणतीही साधने हाताशी नसलेले ज्योतिषी जुने ग्रंथ,  प्रसिद्ध ज्योतिषांची निरीक्षणे/मते आधार म्हणून वापरतात. काही ज्योतिषी स्वत:ची निरीक्षणे नियम बनविण्यासाठी वापरतात. यामुळे अचूक भविष्य वर्तविण्याला आपसूकच मर्यादा पडतात.

14) दोनदा 20-20 पत्रिकांच्या आधारे, माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा. दोन्ही वेळेस उत्तरे 90 टक्क्यांपेक्षा अधिक 95 टक्के अचूक निघायला हवीत. तर 15 लाख रुपयांचे पारितोषिक मिळेल किंवा मानवी जीवनातील, तपासून शहानिशा करता येतील अशा कोणत्याही पाच घटना (लग्न, मूल, नोकरी, शिक्षण, अपघात, बढती वगैरे) वीस पत्रिकांच्या आधारे सांगाव्यात. त्या 90 टक्के खर्‍या ठराव्यात. दोनदा वीस-वीस पत्रिकांची भाकिते 90 टक्के अचूक निघावीत. 15 लाख मिळतील; पण 70 टक्के जरी खरी निघाली (दोनदा 20-20) तरी ते शास्त्र असू शकते असे आम्ही मानू, अशी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन नागपूर समितीने पुणे, धुळे, अमरावती या चारही अ. भा. ज्योतिष अधिवेशनात जाहीर आव्हाने दिली होती. ती आव्हाने स्वीकारून आपली बाजू सत्य असल्याचे ज्योतिष महामंडळ का सिद्ध करू शकले नाही? याचा अर्थ, फलज्योतिषशास्त्र नाही असाच घ्यायचा का? 15) कोणताही महत्त्वाचा ज्योतिषी वा ज्योतिष महामंडळ, या आव्हानानंतर पुढे आले नाही; पण श्री. एम. कटककर नावाचे ज्योतिषी मात्र आव्हान स्वीकारण्याची एक बालिश भाषा घेऊन पुढे आले होते. ते म्हणाले होते, मी माणसांची स्वभाववैशिष्टय़े सांगतो. त्या वेळी अ. भा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने हे आव्हान एका अटीवर स्वीकारण्याचे मान्य केले. कटककरांसोबत पाचव्या वर्गातील, फलज्योतिषाचे कुठलेही ज्ञान नसलेली कुठलीही 10 मुले बसवू. त्या दहा मुलांना पत्रिका न पाहताच अंदाजे स्वभाववैशिष्टय़े सांगावीत व श्री. कटककर महाशयांनी पत्रिका पाहून स्वभाववैशिष्टय़े सांगावीत. एका जरी शाळकरी मुलाने कटककरांपेक्षा अधिक गुण प्राप्त केले, तर मात्र कटककरांनी त्या मुलाची व जनतेची जाहीर माफी मागावी व धंदा बंद करावा. त्या वेळी या प्रतिआव्हानातून एम. कटककरांनी चक्क पळ काढला. तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? या प्रश्नांची उत्तरं ज्योतिष्यांनी जाहीररीत्या द्यावीत. पण ज्योतिषी या प्रश्नांची उत्तरं न देता ज्योतिष्यावरची टीका म्हणजे हिंदू धर्मावरचा हल्ला अशी ओरड करतात. मग स्वातंर्त्यवीर सावरकर, स्वामी विवेकानंद हिंदू नव्हते का?

पत्रिका कुणी आणि कधी बघावी याबद्दल माझी भूमिका अशी आहे - २० वर्षांपर्यंत आणि सत्तरीनंतर (काही अपवाद वगळता) पत्रिका बघू नये असे माझे  स्पष्ट मत आहे. याची कारणे अशी-

विशीपर्यंत व्यक्तीची स्वयंनिर्णयाची क्षमता पूर्णपणे विकास पावलेली नसते. सहसा आईवडिलांवर मुले अवलंबून असतात. सत्तरीनंतर तब्येत ठणठणीत नसेल तर हळुहळु परावलंबित्व यायला सुरुवात होते. अनेक इच्छाना मुरड घालावी लागते. मनमुरादपणे वानप्रस्थाश्रमाचा काल व्यतीत करणे सर्वच ज्येष्ठाना शक्य असते नाही. थोडक्यात या परावलंबीत्वामुळे  एकंदरच संधी आणि निर्णय यावर मर्यादा असतात/यायला लागतात.

सांगायचे तात्पर्य असे की २० ते ७० या मधल्या काळात, सर्वसाधारणपणे स्वयंनिर्णयाचा हक्क बजावू शकणारी व्यक्तीच वेगवेगळ्या शक्यता/संधीना विवेकाने प्रतिसाद देऊ शकते. हे परावलंबी व्यक्तींच्या बाबतीत होऊ शकत नाही. पत्रिका ही केवळ शक्यता दाखवत असल्याने बंदिस्त आयुष्य जगणार्‍या व्यक्तींच्या आयुष्यात या शक्यता प्रत्यक्षात येऊ शकत नाहीत.

बाकी पत्रिकेतील प्रत्येक ग्रहयोग/रचना एक घटना कधिच दाखवत नाहीत. प्रत्येक ग्रहयोग/रचना, ज्या core issue कडे निर्देश असतो त्या core issue चा घटनापट (event spectrum), सूचित करते. त्यामुळे पत्रिकेने निर्देशीत केलेला core issue संदर्भाशिवाय उलगडता येत नाही. त्यामुळे "माणूस मेलेला आहे की जिवंत आहे व स्त्री की पुरुष आहे हे सांगा" इ. प्रश्न/आह्वाने मुदलातच आचरट ठरतात.

तरी असा पळपुटा ज्योतिषी, ज्योतिष महामंडळाच्याच नव्हे, तर अधिवेशनाच्या स्टेजवरही दिमाखाने मिरवतो आहे, हे ज्योतिष्यांना व अधिवेशनाला कितपत भूषणावह आहे? 

ज्योतिषाच्या नावाने बोंबाबोंब करणार्‍या एका जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रज्ञाची  थिअरी पण "चोथा" झाल्याचे ऐकून आहे. त्यांच्या थिअरीचा गाजावाजा झाल्यामुळे मिळालेले सन्मान ते त्यांची theory चोथा झाली म्हणुन परत करतील का?.

२ टिप्पण्या:

Harshal Naik म्हणाले...

videshatun paise gheun khise & pot bharnari hee sanstha ahe ANiS.. beshram lok ahet he.. dharm drohi....

Harshal Naik म्हणाले...

ANiS hee ek khotaradi sanstha ahe... no doubt,

tumchi uttare chhan ahet saheb...