शुक्रवार, ६ फेब्रुवारी, २००९

Social Cohesion and Human Nature या बर्ट्राण्ड रसेलच्या निबंधाचा स्वैर अनुवाद

टीप - निसर्गाचे नियम समाजाच्या नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. निसर्गाला दडपायचे असेल तर माणसाला फार मोठी किंमत मोजावी लागेल. हा या रसेलच्या निबंधातील गर्भित इशारा मला खूप भावला म्हणून मी त्याचा अनुवाद करायचा प्रयत्न केला आहे. हा निबंध वाचताना आजच्या संदर्भांच्या अनुषंगाने काही विचार डोक्यात आले ते तळटीपा म्हणून दिले आहेत. या टीपा मूळ निबंधात नाहीत. - राजीव उपाध्ये

मानवासहित सर्व समाजप्रिय प्राण्यामध्ये सहकार आणि एकी या पायाभूत प्रेरणा आहेत. मुंग्या आणि मधमाशांमध्ये या प्रेरणा पूर्णत्व पावलेल्या दिसतात. या कीटकांमध्ये समाजविरोधी कृती करण्याची प्रवृत्ती दिसून येत नाही. ते आपल्या घरट्याशी किंवा पोळ्याशी पूर्णपणे एकनिष्ठ असतात. एका मर्यादेपर्यंत या सार्वजनिक कर्तव्याचे, एकनिष्ठतेचे कौतुक वाटणे स्वाभाविक आहे. पण त्यात एक मोठ्ठी त्रुटी आहे. ती अशी की, मुंग्या आणि माशा उत्तम कलानिर्मिती करत नाहीत. शास्त्रीय शोध पण हे कीटक लावत नाहीत. फार काय, सर्व मुंग्या किंवा माशा या भगिनी आहेत, अशा विचारसरणीवर आधारित धर्माची रचना पण त्यांनी केलेली दिसत नाही. वस्तूत: त्यांचे समाजजीवन हे स्थिर, यांत्रिक आणि अतिशय अचूक असते. आपण माणसे (म्हणूनच) इच्छा करतो की, जीवनात थोडी तरी अस्थिरता असावी, जेणे करून उत्क्रांतीमधिल अशा अडथळ्यांपासून आपली सुटका होईल.

फार पूर्वी मानवप्राणी हा दूर्बळ आणि दूर्मिळ असा होता. त्याचे अस्तित्व अतिशय डळमळीत होते. काळाच्या ओघात त्याचे पूर्वज झाडांवरून खाली आले आणि घट्ट पकडीचे पंजे सोडून हात आणि पाय वापरू लागले. या बदलांचा फायदा असा झाला की, मनुष्यप्राण्याचे अस्तित्व जंगलांपुरते न राहता मोकळ्या प्रदेशात, जिथे आफ्रिकेतील उष्णकटिबंधातील जंगलांच्या तुलनेने अन्न कमी प्रमाणात होते, तिथे वाढायला लागले. सर आर्थर कीथ यांच्या अंदाजानुसार एका मनुष्यप्राण्यास सुमारे २ वर्गमैल इतका भूप्रदेश अन्नाची गरज भागविण्यास आवश्यक असे. मनुष्य सदृश माकडे (anthropoid ape) आणि काही अजूनही अस्तित्व टिकून असलेल्या आदिम जमातींच्या निरीक्षणावरून, आपले पूर्वज ५०-१०० च्या कळपामध्ये राहत असावेत. आपल्या कळपामध्ये एकोपा, सहकार्य आणि दूसर्‍या कळपाशी गाठ पडल्यास वैर असे या मनुष्य प्राण्यांचे वर्तन असे. जोपर्यंत मनुष्यप्राणी दूर्मिळ होता तोपर्यंत दोन कळपांची गाठ पडणे तसे अकस्मातच घडून येई. प्रत्येक कळपाचा वावर विशिष्ट प्रदेशापुरता मर्यादित होता. दोन कळपांमधला संघर्ष अशा प्रदेशाच्या हद्दीवर घडत असे. याकाळात प्रजोत्पादन हे कळपापुरतेच सहसा मर्यादित होते. त्यामुळे फार मोठ्या प्रमाणात आंतरजनन (inbreeding) तेव्हा झाले असणार. प्रजोत्पादनाच्या निर्माण झालेल्या चालीरीती कळपामध्ये तशाच पुढे चालू राहिल्या असणार. एखाद्या कळपाचा आकार जसा वाढत जाई, तेव्हा जागा अपुरी पडायला लागल्यावर तो कळप अन्य कळपांच्या संपर्कात येत असे. अशा वेळेस दोन कळपांमध्ये संघर्ष निर्माण होऊन आंतरजननामुळे फायदा मिळालेला सामर्थ्यशाली कळप आपल्या चालीरीती पुढे चालू ठेवत असे. सर आर्थर कीथ यांनी आपल्यासमोर हे सर्व अतिशय खुलासेवार मांडले आहे. आता हे ओघानेच आले की आपले रानटी पूर्वज कोणतेही विचारपूर्वक धोरण न स्वीकारता, केवळ सहज प्रेरणेने, आपल्या कळपाशी निष्ठा आणि दूसर्‍या कळपाचा तिरस्कार किंवा वैर, असे परस्परविरोधी वर्तन करत असत. [१,२]

या काळात निर्माण झालेला सर्वात ताकदवान आणि सहजप्रेरणेने प्रवृत्त असा गट म्हणजे कुटुम्ब होय. प्रदीर्घ बाल्यावस्थेमुळे मनुष्यप्राण्यात कुटुम्बसंस्थेची निर्मिती झाली. अन्न गोळा करण्यावर स्त्रीच्या पालनपोषणाच्या जबाबदारीमुळे मर्यादा आल्या. याचवेळेस, मनुष्यप्राण्याने पक्ष्यामध्ये दिसते त्याप्रमाणे पिता या घटकाचा कुटुम्बात अंतर्भाव केला, आणि पालनपोषणाच्या श्रमांची विभागणी या टप्प्यापासून सुरू झाली. कुटुम्ब ते जमात हे स्थित्यंतर शिकार करताना, सहकार्याचे महत्त्व मनुष्यप्राण्यास जसे उमगत गेले तसे घडत गेले. तसेच टोळीमधला एकोपा अन्य टोळ्यांशी अचानक संपर्कामुळे निर्माण होणार्‍या संघर्षातून वाढत गेला. [३]

मर्कटमानव ते आदिमानव या उत्क्रांतीमधिल टप्पे आज उपलब्ध असलेल्या अवशेषांवरून पुरेसे स्पष्ट होतात. आज सापडलेले मानवाचे सर्वात जुने अवशेष सुमारे एक कोटी वर्षांपूर्वीचे आहेत. त्यापूर्वी काही कोटी वर्षांपूर्वी मर्कटमानवाने वृक्ष सोडून जमिनीवर संचार करण्यास सुरुवात केली. उत्क्रांतीमधिल टप्प्यांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे मानवाच्या मेंदूचा आकार वाढत जाउन तो सध्या आहे त्या स्थितीपर्यंत कित्येक हजार वर्षांपूर्वी स्थिरावला. या हजारो वर्षांत माणसाचे ज्ञान, कौशल्ये, सामाजिक जडणघडणीचा विकास झाला, पण तस बघितलं तर जन्मजात बौद्धिक क्षमतेचा विकास मात्र तेवढा झालेला दिसत नाही. बौद्धिक क्षमता वाढीची प्रक्रिया काही हजार वर्षांपुर्वी थांबल्याचे आढळून येते. आपण जे शिकतो ते अश्मयुगीन मानवापेक्षा काही फार वेगळे आहे असे मानायचे काही कारण देता येत नाही [४]. ज्या प्रेरणानी आदिमानवाला आपल्या टोळीपुरता एकोपा आणि बाहेर इतरांशी वैर असे वर्तन करायला लावले, त्या प्रेरणा आजही अस्तित्वात आहेत. जे वर्तनातील बदल सुरुवातीच्या काळापासून होत आले आहेत ते पण एकतर सहजप्रेरणेने आहेत किंवा जाणीवपूर्वक समूहस्वार्थापोटी आहेत. मानवी सामाजिक जीवनात ताणतणावास कारण ठरणारी एक महत्त्वाची गोष्ट अशी की, एका ठराविक मर्यादेपर्यंतच ज्याला नैसर्गिक प्रेरणा नाहीत अशा वर्तनाला विवेकाच्या चौकटीतून जाणून घेता येते. ज्या वर्तनाने नैसर्गिक प्रेरणेवर ताण पडतो, तेव्हा निसर्ग अतिशय थंडपणा किंवा विध्वंस याद्वारे सूड काढतो, जेणेकरून विवेकाने प्रेरित रचना मोडून पडते.

सामाजिक एकोप्याची सुरुवात समूहनिष्ठेतून होते. शत्रुभयाने त्याची गरज अधोरेखित होते. नैसर्गिक आणि जाणीवपूर्वक प्रक्रियांतून सामाजिक एकोप्याचा आज आपल्याला ठाऊक असलेल्या 'राष्ट्र' संकल्पनेपर्यंत विकास झाल्याचे जगभर दिसून येते. या विकास प्रक्रियेत अनेक प्रवाह मिसळले गेले आहेत. सुरुवातीला समूहाच्या नेत्याशी निष्ठा म्हणजे समूहनिष्ठा असे मानले गेले. एखाद्या टोळीचा प्रमुख किंवा राजा त्या टोळीच्या सर्व सदस्याना ओळखत असे. अशा प्रकारे समूहनिष्ठे ऐवजी व्यक्तीनिष्ठेने, मूळ प्रेरणेला धक्का न लागता, टोळ्यांचा आकार वाढायला मदत झाली.

विकासाच्या पुढील टप्प्यात अस्तित्व पुसून टाकणार्‍या लढाया हळुहळु जय-विजयाच्या लढाया बनल्या. पराभूतांना मृत्युदंड देण्याऐवजी गुलाम म्हणून ठेवणे त्यांच्या जेत्यांनी पसंत केले. हे झाले तेव्हा टोळीत दोन प्रकारचे लोक दिसू लागले. ते म्हणजे, मुक्त असलेले टोळीचे मूळ सदस्य आणि केवळ भीतिपोटी आणि इच्छेविरूद्ध त्यांच्या आज्ञा पाळणारे गुलाम. निनव्हा[५] आणि बॅबिलोनची सत्ता खुप मोठ्या प्रदेशावर पसरली होती. ही सत्ता त्याप्रजेच्या स्वयंप्रेरणेने किंवा सामाजिक एकोप्याच्या भावनेतून निर्माण झाली नव्हती तर जेत्यांच्या युद्धसामर्थ्याने निर्माण झालेल्या दहशतीतून होती. त्या काळापासून युद्धाने टोळीचा किंवा जमातीचा आकार वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. भीतीने एकजुटीच्या भावनेवर विजय मिळविला. हा बदल फक्त मोठ्या जमातींपूरता मर्यादित नव्हता तर स्पार्टासारख्या ठिकाणी जिथे मुक्त नागरिक संख्येने कमी होते तिथे हेलट समाजाचे लोक निष्ठूरपणे दडपले गेले होते. स्पार्टाची सामाजिक एकोप्यासाठी कायम प्रशंसा केली गेली आहे पण हा एकोपा, दहशतीने निर्माण केलेल्या निष्ठेचा अपवाद वगळता, स्पार्टाच्या संपूर्ण लोक समुदायासाठी कधीच नव्हता.

नंतर मानवी संस्कृतीचा विकास होत असताना निष्ठेचे नवे रूप अस्तित्वात आले. ही निष्ठा एखाद्या भूप्रदेशाच्या ओढीतून किंवा वांशिक साधर्म्यावर आधारलेली नव्हती तर विचारसरणीवर आधारीत होती. पश्चिमेपुरते बोलायचे झाले तर ऑर्फिक संप्रदायात गुलामाना समान दर्जा मिळाला होता, तिथे या नव्या निष्ठेचा उगम झालेला दिसतो. त्यांच्या शिवाय धर्मसंस्था, राजसत्तेच्या इतक्या जवळ होती की धर्माच्या अनुयायांचे पंथ पण रानटी टोळयांच्या धर्तीवर विकास पावले. हळुहळु सांप्रदायिक ओळख ही खूप ताकदवान बनत गेली. इस्लामने ७व्या, ८व्या शतकात जिंकलेल्या लढायांवरून हेच सिद्ध होते. धार्मिक युद्धाना खतपाणी या नव्या निष्ठेतून मिळाले. सोळाव्या शतकात धार्मिक/दैवतवादी निष्ठा राष्ट्रीय निष्ठेपेक्षा श्रेष्ठ बनल्या. सध्या वैचारिक निष्ठा मात्र दोन मोठ्या गटात गेल्या आहेत. त्यातली पहिली म्हणजे साम्यवादी विचारसरणीची 'पवित्र ग्रंथा'[६] वरील निष्ठा आणि दुसरी म्हणजे अमेरीकन जीवन पद्धतीवरील निष्ठा. स्थलांतरीतांनी जन्माला घातलेल्या अमेरीकेला जैविक एकता नाही, पण तेथिल एकतेची भावना युरोपिअन राष्ट्रांप्रमाणेच तीव्र आहे. अब्राहम लिंकनने म्हटल्याप्रमाणे अमेरीका 'प्रमेया'शी एकनिष्ठ आहे. अमेरीकेचे स्थलांतरीत आपल्या युरोपातील मूलस्थानांबद्दल नेहमीच झुरत असतात तर त्यांची पुढची पिढी मात्र आपली अमेरीकन जीवनशैली वैश्विक व्हावी असा ठाम विश्वास बाळगून आहे. अमेरीकेत आणि रशियात वैचारिक आणि राष्ट्रीय एकता यातील भेद नाहीसा झाल्याने दोन्ही विचारसरणींमध्ये नवी ताकद निर्माण झाली. या स्पर्धक विचारसरणींचे आकर्षण मात्र भौगोलिक सीमा पार करून गेले आहे.

आधुनिक काळातील ज्या सांप्रदायिक निष्टा आपल्याला व्यक्तीगत पातळीवर समाधान देत असतात, त्यांचे स्वरूप प्राचीन काळातील टोळ्यांमध्ये विकास पावलेल्या मानसिक जडणघडणीप्रमाणेच असते. अजूनही जन्मजात मनुष्यस्वभाव, शालेय शिक्षण, धर्म, आर्थिक विचारसरणीचा प्रचार यांचा फारसा प्रभाव न पडता, आजच्या मेंदूच्या विकासपूर्व अवस्थेतील स्वभावाशी मिळताजुळता आहे. अगदी सहजपणे आपण मानवीसमाजाची मित्र-शत्रु अशी विभागणी करतो. मित्रांच्या बाबत आपली नीति सहकार्यावर आधारलेली असते तर शत्रूंच्या बाबतीत आपली नीति स्पर्धेवर आधारित असते. पण ही विभागणी सतत बदलत असते. एका क्षणापर्यंत स्पर्धक असलेले दोन व्यावसायिक काही आह्वान निर्माण होऊन अस्तित्व धोक्यात आले तर एकत्र येतात आणि एकमेकांकडे बंधुभावाने बघू लागतात. कुटुम्बाच्या सीमारेषेबाहेर पडल्यावर शत्रू हा नेहमी एकीला कारणीभूत ठरलेला मोठा घटक आहे.

जागतिक पातळीवर एकीकरणाचे प्रयत्न सफल का होत नाहीत याचे कारण आता स्पष्ट होईल. एक वैश्विक राष्ट्र, जर अस्तित्वात आणले गेले, तर शत्रू नसल्यामूळे मोडून पडायचीच शक्यता आहे. दोन थोर धर्मांनी - ख्रिश्चन आणि बौद्ध - आपल्या अनुयायांद्वारे बंधुभाव संपूर्ण मानवजातीपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला आहे. बंधुत्वाचा पुरस्कार करून माणसामाणसातील दरी संपवण्याचा प्रयत्न या दोन धर्मांनी केला आहे [७]. आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत म्हणून आपण एकाच कुटुंम्बाचे घटक आहोत. पण ज्यांनी हा विचार स्वीकारला नाही त्यांना ते परमेश्वराची लेकरे नाहीत असे मानून, प्राचीन टोळ्यांच्या अपपरभावाच्या मानसिकतेने, वैरी बनवले गेले. यात मूळ भावनेला (आपण सर्व माणसे परमेश्वराची लेकरे आहोत) तडा गेला.

धर्म, नीति, आर्थिक हितसंबंध आणि अस्तित्वाचा लढा यातून आपल्याला वैश्विक सहकाराचे समर्थन करून निरुत्तर करणारा युक्तिवाद पुढे करता येतो पण आपल्या जुन्या रानटी पूर्वजांच्या जैविक प्रेरणा अधूनमधून डोके वर काढतात. कदाचित जीवन बेचव होण्याच्या भीतीने आपण वैर, तिरस्कार सोडून द्यायला तयार होत नाही. संपूर्ण मानवजातीची एकी आपल्याला जर साधायची तर अंशत: कायद्याने आणि अंशत: मानवी आदिम भावनाना न दबवता त्यांचा निचरा होईल असे अभिनव मार्ग शोधूनच ते साध्य होईल.

हा प्रश्न सोडवणे सोपे नाही आणि केवळ नैतिकतेच्या मदतीने तर अजिबातच नाही. भरपूर गवागवा झालेल्या मनोविश्लेषण तंत्राने एक मौल्यवान सत्य आपल्या समोर आणले आहे. एक जुनी म्हण आहे की निसर्गाला चिमट्याने उचलून जरी बाजूला केले तरी तो परत प्रकट होतोच [८]. याचे सर्वात सुलभ स्पष्टीकरण मनोविश्लेषणाखेरीज दूसरे कोणतेही तंत्र आपल्याला देऊ शकत नाही. नैसर्गिक प्रेरणांच्या एकदम विरूद्ध जाणारे जीवन हे अत्यंत तणावकारक असते [९]. एका मर्यादेपलिकडे अनैसर्गिक जीवन जगणारे लोक हे मत्सर, द्वेष इत्यादि भावनानी ग्रासले जातात. काही वेळा त्यांचा जगण्यातला उत्साह संपून जातो. काही वन्यजमाती जेव्हा अचानक आधुनिक सुसंस्कृत समाजाच्या संपर्कात आल्या तेव्हा हे निरीक्षण करण्यात आले. श्वेतवर्णीयांनी पापुआतील नरभक्षक जमातीना त्यांच्या शिकारक्रीडेपासून जेव्हा वंचित ठेवले तेव्हा या जमातीतील लोकांमधिल चैतन्य संपुष्टात आल्याचे मानववंशशास्त्रज्ञांनी नोंदवून ठेवले आहे [१०]. या नरभक्षकांनी त्यांच्या हिंस्र चालीरीती पूर्ण बंद कराव्यात असे मला म्हणायचे नाही पण या चालीरीतींच्य जागी या लोकाना दूसरा पर्याय मनोवैज्ञानिकांनी द्यावा एवढेच मला सूचवायचे आहे. सुसंस्कृत मनुष्य हा पापुआतील नरभक्षकांप्रमाणे सद्प्रवृत्तीचा बळी ठरलेला असतो. आपल्यामध्ये सर्व प्रकारच्या आक्रमक प्रवृत्ती असतात तसेच रचनात्मक प्रेरणा पण असतात. समाज त्या दडपून टाकतो आणि जे पर्याय कुस्ती आणि फुट्बॉल मॅचच्या रुपात पुढे येतात ते अपुरे असतात. ज्यांना कुणाला युद्ध पृथ्वीतलावरुन नाहीसे करायचे आहे त्यांनी आपल्या उपजत नैसर्गिक प्रेरणांचे काय करायचे याचे उत्तर शोधायला हवे. माझ्यापुरते बोलायचे झाले तर मी हेरांच्या चातुर्यकथा वाचून माझ्या प्रेरणांना वाट देत असतो. त्या वाचत असताना मी आलटुन पालटुन गुन्हेगार आणि पोलीस या भूमिका वठवतो आणि तेवढ्याने माझे भागते. पण अशी काही माणसे आहेत की त्यांच्यासाठी हे फारच सौम्य आहे.

सामान्य माणसे स्पर्धेशिवाय आनंदी होऊ शकतील असे मला वाटत नाही कारण स्पर्धा ही अनेक मानवी उद्योगांचे मूळ आहे. स्पर्धा थांबवणे हे आपले ध्येय न ठेवता ती हानीकारक कशी होणार नाही याकडे लक्ष द्यायला हवे. खेळ आणि कलात्मक आविष्कारातील स्पर्धा या तूलनेने कमी हानीकारक आहेत. त्यातून युद्ध-प्रवृत्तींचा बर्‍याच प्रमाणात निचरा होतो.

युद्धानंतर आधुनिक मानवी संस्कृतीने सुरक्षिततेला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. जीवनातील सर्व धोके आपण बाजूला करू शकलो तर आयुष्यात फारसा आनंद उरेल असे मला वाटत नाही. सर आर्थर कीथ यांच्या New Theory of Human Evolution या पुस्तकातील एक परिच्छेद मला येथे द्यावासा वाटतो.

"जंगल न्यायाखाली जी माणसे जगत आहेत ती अधिक सुखी समाधानी असल्याचे मत अनेक अभ्यासकांनी नोंदवले आहे. फ्रेया स्टार्क यांनी दक्षिण अरेबियातील लोकांना सुरक्षितपणा ठाऊक नाही. पण तरीही ते सुखी आणि समाधानी असतात. डॉ. एच्‌. के. फ्राय यांनी ऑस्ट्रेलियातील आदिम जमातींबद्दल असेच म्हटले आहे. आणखी एक उदाहरण मला अमेरीकेतील क्रो-इंडियन जमातीचे द्यावेसे वाटते. क्रो-इंडियन आता काही प्रमाणात सुरक्षिततेचा अनुभव घेत आहेत. या जमातीचा अभ्यास डॉ. लॉरी करत आहेत. एखाद्या क्रो-इंडियनला आपण जर विचारले की तो धोका आणि सुरक्षितता यात काय पसंत करेल तर धोका हे उत्तर ऐकायला मिळते. माणसाच्या उत्क्रांतीचा फार मोठा काळ जंगली अवस्थेत गेल्यामुळे आजच्या माणसात रक्ताच्या बदल्याची चटक टिकून आहे."

१९१४ साली जेव्हा प्रथम मी याबद्दल वाचले तेव्हा मी तरी आश्चर्यचकीत झालो होतो. बरेच लोक जोपर्यंत झळा बसत नाहीत तोपर्यंत युद्धकाळात जास्त आनंदी असतात. शांत आयुष्य लोकाना कदाचित कंटाळवाणे होत असावे. चांगली वर्तणूक, धाडसशून्य अस्तित्व, आणि पुरेशी कमाई असलेल्या आणि तरी पण असमाधानी असलेल्या नागरीकांना ४००००० वर्षापूर्वी मागे नेऊन ठेवले तर त्यांना अन्नाचा शोध, शत्रूचा शिरच्छेद आणि श्वापदांपासून संरक्षण इत्यादी जीवनक्रम नक्कीच समाधानकारक वाटेल. जेव्हा युद्धाचे वारे वाहू लागतात तेव्हा एखादा कारकून
सैन्यात भरती होऊन, त्याच्या नैसर्गिक प्रेरणांना अनुकूल असे जीवन जगू शकतो. पण आज वैज्ञानिक प्रगतीने अशी काही साधने उपलब्ध झाली आहेत की त्यांच्या मुक्त वापराने उत्क्रांतीचा कोणताही हेतू साध्य होत नाही. आपल्या अनियंत्रित प्रेरणांशी जुळवून घेण्यात असलेल्या प्रश्नांचा पुरेसा अभ्यास झालेला नाही. वैज्ञानिक तंत्र जसे विकसित पावत आहे तशी या अभ्यासाची आवश्यकता वाढत आहे. जैविक बाजूने पाहिले तर असे लक्षात येते की वैज्ञानिक तंत्राची विनाशकारी रूपे ज्या वेगाने विकास पावली त्या वेगाने रचनात्मक रुपांचा विकास झाला नाही. एका घटकेत आज ५००००० माणसे मारता येतात. पण मनुष्य जन्माला यायला लागणारा लागणारा वेळ अजून कमी करता आलेला नाही.

त्यामुळे समाजसुधारकांपुढचा खरा प्रश्न हा सुरक्षिततेची साधने, उपाय शोधणे हा नाही. कारण जेव्हा सुरक्षितपणातून कोणतेही समाधान मिळत नाही तेव्हा लोक धाडसाकडे वळतात. त्यामूळे सुरक्षेची भावना आणि नागरी जीवनास धक्का देणार नाहीत अशा धैर्य, शौर्य आणि स्पर्धा प्रवृत्तीना वाट देणारी योग्य जीवनपद्धती शोधणे हा खरा प्रश्न आहे. आणि हे सर्व करत असताना आपण हे लक्षात ठेवले पाहिजे की आपली जीवन पद्धती, सामाजिक संस्था, ज्ञान हे सर्व बदलले असले तरीही आपल्या नैसर्गिक प्रेरणा मात्र हजारो वर्षांपूर्वीच्या आपल्या पूर्वजांसरख्याच आहेत. त्यात यत्किंचितही बदल झालेला नाही. हे असाध्य आहे असे मला वाटत नाही. मानववंशशास्त्रातील आजवरचे संशोधन हेच सिद्ध करते की मानवी स्वभाव हा अतिशय लवचिक आहे. मानवी जीवनपद्धतील जगभर दिसणारे वैविध्य हे याचे पुरेसे निदर्शक आहे. एखाद्याच नैसर्गिक प्रेरणेचे पूर्ण उच्चाट्न करुन हे साध्य होईल असे मला वाटत नाही. धाडसाशिवाय आयुष्य हे नीरस असले तरी वाट्टेल ते स्वरूप घेणारे धाडस हे मात्र आयुष्याच्या मूळावरच घाव घालते.

मी पूर्वी उल्लेख केलेल्या रेड इंडियनच्या उदाहरणात या सर्व गोष्टींचा उत्तम परिपोष आढळतो - रेड इंडियनना जुन्या जीवनपद्धतीची ओढ वाटते कारण त्यातच त्याना 'जान' सापडते. प्रत्येक उत्साही माणसाला 'जान' किंवा चैतन्याचा स्रोत म्हणून दाखवता येईल असे आयुष्यात काही हवे असते [११]. काही जणाना हे सर्व मिळते ते बहुधा नट, खेळाडू, सैन्यातील अधिकारी, राजकारणी म्हणून आपल्यापुढे येतात. बाकीच्याना दिवास्वप्ने रंगवत आपले आयुष्य घालवण्याशिवाय पर्याय नसतो. स्वप्ने रंगवणे यात अयोग्य काही नाही; कल्पकपणे जीवन जगण्यासाठी ते आवश्यक असते. पण वास्तवाची आणि स्वप्नांची सांगड घालता आली नाही तर मात्र मॊठ्या समस्याना तोंड द्यावे लागते कारण त्यामुळे मन:स्वास्थ्याला धक्का बसतो. कदाचित आपल्या यांत्रिक जीवनात नैसर्गिक प्रेरणांना वाट देण्याचे मार्ग काढता येणे अजूनही शक्य आहे. तसं जर झालं नाही तर विनाशकारी विचारसरणी माणसाच्या कर्तृत्वावरून केव्हाच बोळा फिरवून मोकळ्या होतील.

टीपा -
[१] मनुष्यप्राणी कितीही पुढारला असला तरीही अनेक जैविकप्रेरणा आधुनिक
मानवामध्ये तश्शाऽच टिकून आहेत. स्वजातीप्रेम, अन्य धर्मांचा द्वेष, तिरस्कार
मराठी-अमराठी वाद ही याच प्रेरणांची आधुनिक रूपे आहेत असे मला वाटते.

[२] जिथे पोषण होते किंवा अस्तित्वाच्या गरजा भागतात तिथे निष्ठा, प्रेम
इत्यादि भावनांचा विकास होतो असे निरीक्षण डेस्मण्ड मॉरीस (Human Zoo ) या
मानववंशशास्त्रज्ञाने मांडले आहे. हे निरीक्षण व्यक्तीपासून समष्टीपर्यंत
सर्वांना लागू पडते.

[३] ब्राह्मणांमध्ये वाढणारा एकोपा हा ब्राह्मणद्वेषातून वाढत आहे. त्यामुळे तो
प्रतिक्रियात्मक स्वरूपाचा आहे. शंकराचार्यांनी केलेली वैदिक धर्माची
प्रतिस्थापना अशीच प्रतिक्रियात्मक स्वरूपाची होती. राष्ट्रीय पातळीवर व्यक्त
होणारी दलितांची अस्मिता आणि जागतिक पातळीवर दिसून येणारी हिंदूची अस्मिता यात
गुणात्मक फरक करता येत नाही असे मत एका प्रसिद्ध मराठी तत्वज्ञाने नोंदवले
आहे. ते कसे याचा येथे खुलासा होतो.

[४] लेव्ही स्ट्रॉस या फ्रेंच मानववंशशास्त्रज्ञाने अशाच स्वरूपाचा युक्तिवाद
आपल्या Primitive Thinking and Civilized Mind या निबंधात केला आहे.

[५] असिरीयन संस्कृतीची राजधानी

[६] तेव्हा 'दास कापिटाल' आणि सोविएत युनियनचे अस्तित्व संपल्यामूळे ही जागा
आता 'पवित्र कुराणा'ने घेतली आहे.

[७] एका तिबेटी बौद्ध पंडिताने निर्वाण या कल्पनेचा सांगितलेला अर्थ मला खूप
भावला. कोणतीही दरी पार करणे किंवा बंधनातून बाहेर पडणे म्हणजेच निर्वाण असे
त्याने म्हटले आहे. निर्वाणाला समांतर असलेली मोक्ष ही भ्रांत कल्पना आहे, तर
निर्वाण हे वास्तववादी आहे. वर्णभेदाने निर्माण केलेली सामाजिक दरी पार करायची
ताकद आणि संधी बुद्धाने दिली म्हणून त्याचा 'धम्म' लोकप्रियतेस पात्र झाला.

[८] हा मुद्दा या निबंधातील परमोच्च बिंदू आहे असे मला वाटते. निसर्गाचे नियम
समाजाच्या नियमांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात. निसर्गाचे नियम दडपायचे असतील तर
माणसाला फार मोठी किंमत मोजावी लागेल.

[९] आपल्याकडे आचार्य रजनीशांनी हे ओळखले होते. आधुनिक सुसंस्कृत माणसाच्या काम-ऊर्जेचा कोंडमारा लग्नसंस्थेतून कसा होतो हे त्यांनी दाखवून दिले.

[१०] इथे मला माझे स्वत:चे निरीक्षण मांडायचे आहे. जंगली श्वापदे जेव्हा नागरी
संपर्कात येतात तेव्हा त्यांना पकडून पुन्हा 'सन्मानाने' जंगलात पाठवले जाते.
त्यांची शिकार करून उपजीविका करण्याची प्रेरणा नाहीशी होणार नाही याची काळजी
घेतली जाते. पण माणसे मात्र इतर माणसांच्या प्रेरणा आपल्या नियंत्रणाखाली
आणायच्या उद्योगात गुंतलेली असतात.

[११] धन, प्रतिष्ठा, अनुरूप जॊडीदार हे आधुनिक सामान्य माणसाच्या आयुष्यात
चैतन्य आणतात.

बुधवार, २१ जानेवारी, २००९

वास्तूचे लाभणे

वास्तूचे लाभणे

लोक जिवाच्या कराराने स्वत:च्या मालकीच्या वास्तूचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी
झगडतात. हे स्वप्न पुरे झाले की नव्या वास्तुमध्ये स्थलांतरीत होतात, पण कधी
कधी नव्या वास्तूत स्वास्थ्य लाभण्या ऐवजी जुने नष्ट्चक्र चालूच राहते. मग कुणी
तरी सांगते ही वास्तू तुम्हाला लाभत नाही. अमुक करून बघा, तमुक करून बघा.

वास्तू न लाभणे या प्रकाराचे निरीक्षण केल्यावर माझ्या लक्षात आलेल्या काही ठळक
गोष्टी अशा -

- घरातील एकाच व्यक्तीच्या अपार जिद्दीने वास्तू उभी राहीली असेल तर बहूधा
कर्जबोजा आणि साठविलेली पुंजी वास्तुच्या निर्मितीत गेली असल्याने नव्या
वास्तूत समस्त कुटुंबाच्या हौशीमौजीला मोठ्या प्रमाणात मर्यादा पडतात. कमावती
व्यक्ती एक असल्यास हे विशेष जाणवते.

- नवी वास्तू ब‍र्याच वेळा मूळ ठिकाणापासून लांब बांधली जाते. वाड्यातून
अपा‍र्टमेंट किंवा, भाड्याच्या ब्लॉकमधून बंगला वगैरे वगैरे. अशावेळेस आपण एका
सामाजिक वर्तूळातून बाजूला पडतो आणि नवीन वर्तूळ तयार व्हायला अनेक कारणांनी
वेळ लागतो.

- जुन्या जागेत अनेक वर्षे अडचणीना तोंड द्यावे लागले असल्यास कुटुंबातल्या
सर्वांच्या स्वभावास वेगवेगळे घट्ट पिळ पडतात. हे पिळ नव्या जागेत सहजा सहजी
सुटत नाहीत.

- नवी वास्तू बांधतांना घरातील एका जरी व्यक्तीचा मनाने सह्भाग नसेल तरी नव्या
वास्तूत मन:स्वास्थ्याला विरजण पडायला वेळ पडत नाही.

ही यादी कदाचित यापेक्षा मोठीही असेल पण मूळ कारणे थोड्याफार तपशीलाच्या फरकाने
हीच असतात. पण लोकांना चमत्काराची अपेक्षा असते. आणि तो घडत नाही म्हणून
पत्रिका बघितली जाते, वास्तूत तोडफोड सूचवली जाते. इतकेच काय, लोक नवे घर
विकायला पण निघतात. माझ्या माहितीतल्या एका आयटी कंपनीच्या मालकाने धंदा वाढावा
म्हणून वास्तूदोष निवारणाचे त‍र्हेत‍र्हेचे उपाय केले पण त्याला आपल्या
कंपनीतील गळकी टॉयलेट्स काही केल्या दिसली नाहीत. असो.

तर मित्रहो तुमच्या परीचयात कुणी वास्तू लाभत नाही म्हणून तक्रार करत असेल तर
त्यांच्या हे मुद्दे जरूर लक्षात आणून द्या...

शुक्रवार, १६ जानेवारी, २००९

नकारात्मक भविष्य का सांगितले जाते?

तमाम ज्योतिषांचे भविष्यकथनाच्या खासियतीप्रमाणे काही ठळक प्रकार सांगता येतात.
काही ज्योतिषी (विशेषत: भारतीय ज्योतिषी) फार ठामपणे बोलतात. भारतीयांचे समूहमन
अनिश्चिततेकडे विशिष्ट नजरेतून बघते. प्रत्येक जीवाच्या आयुष्यातील घटनाक्रम हा
पूर्वनियोजित असतो. हा घटनाक्रम फक्त "ज्ञानी" ज्योतिषाला कुंडलीवरून समजतो,
असा ठाम विश्वास भारतीय जातकांमध्ये असतो. त्यामुळे भारतीय जातक ज्योतिषाकडून
अवाजवी अपेक्षा ठेवतात. मी आज कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घातली आहेत, हे पण
ज्योतिषाने ओळखावे अशी अपेक्षा ठेवली जाते. पुष्कळदा ज्योतिषाच्या कक्षेत न
येणार्‍या समस्या पण ज्योतिषानेच सोडवाव्यात व आपले निर्णय ज्योतिषाने घ्यावे
ही अशीच सर्वत्र अनुभवास येणारी गैरवाजवी अपेक्षा. साहजिक अपेक्षा पूर्ण
करण्याकडे कळत, न-कळत ज्योतिषांचा कल असतो.

याउलट ठराविक काही ज्योतिषी फार गोड बोलतात आणि काही बर्‍याचदा नकारात्मक
बोलतात. पैकी नकारात्मक भविष्यकथनाची कारणमीमांसा करण्याचा हा एक प्रयत्न...

नकारात्मक भविष्यकथन करणार्‍यांचेही दोन गट करता येतील. यातील एक गट हा
गैरहेतूने म्हणजे बहूधा धनाच्या लालसेने जातकाना भीतियुक्त दडपणाखाली ठेऊन
वरचेवर नकारात्मक भविष्य सांगतात. 'चांगले न बोलणार्‍या' ज्योतिषांचा दूसरा गट
आणखी एक गट एका वेगळ्या भूमिकेतून जातकांना सावध करायचे काम करतो. आपण ज्याचा
सल्ला घेतो तो ज्योतिषी कोणत्या गटात मोडतो हे ओळखण्याची जबाबदारी जातकांची
आहे, असे माझे प्रामाणिक मत आहे.

माझं अ-शास्त्रीय (म्हणजे व्यक्तिगत) निरीक्षण असे आहे की नकारात्मक भविष्य
जास्त बरोबर ठरते. याचे महत्वाचे कारण असे की सर्वसाधारणपणे माणसाचा कल हा
विनाशाकडे आहे (Destructive human tendencies surpass cosntructive human
tendencies). कित्येकांना माझे हे विधान पटणार नाही पण संपूर्ण मानवजातीचा
आजवरचा इतिहास हेच सांगतो. प्रगत असो अथवा अप्रगत मानवसमाजाचे अस्तित्वाचे
प्रश्न, वेदना संख्येने जास्त व गंभीर आहेत. सुखे थोडी आणि दू:खे फार आणि
म्हणूनच मानवी आयुष्यात घडणार्‍या नकारात्मक घटनांचे प्रमाण जास्त आहे. हे झाले
नकारात्मक भविष्यकथनाचे प्राथमिक कारण. आता पूर्णपणे ज्योतिषाच्या चौकटीतून या
प्रश्नाचे उत्तर शोधायचा प्रयत्न करतो...

अतिशय चांगले (बृहत्त्रिकोण, बृहदायत) आणि अतिशय त्रासदायक (बृहच्चौकोन) असे
तुरळक दिसणारे योग (म्हणजे भौमितिक रचना) सोडले सर्वसाधारणपणे पत्रिकेत चांगले
आणि वाईट असे दोन्ही योग असतात. बृहत्त्रिकोण, बृहदायत, व बृहच्चौकोन
असणार्‍या पत्रिकांमध्ये चांगले अथवा वाईट भाकित ठामपणे करता येते. पण अन्य
पत्रिकांमध्ये त्रासदायक योगांचा विचार अगोदर करावा लागतो. त्रासदायक कालावधी
आपण कसा हाताळतो यावर नंतर येणारा भाग्यकारक ग्रहांचा सक्रियतेचा काळ अवलंबून
असतो. एखादी व्यक्ती खड्ड्यात पडली तर ती सावरून उभी राहील की नाही ते खड्डा
किती खोल आहे यावर अवलंबून असते. तसेच त्या व्यक्तीच्या जवळच्या सहवासातील
व्यक्तींचे ग्रह जर पीडित व्यक्तीला परतपरत खड्ड्यात ढकलत असतील म्हणजेच
नकारात्मक प्रतिसाद देत असतील तर मूळ पत्रिकेतील भाग्यकारक ग्रहांची साथ पुरेशी
पडत नाही. साहजिकच भाग्यकारक ग्रहांचे आणि त्यानी केलेल्या योगांचे परिणाम हे
त्रासदायक योगांच्या पार्श्वभूमीवर तपासावे लागतात.

जाता जाता भारतीय ज्योतिषांची एक खोड येते उघड केल्याशिवाय मला राहवत नाही. ती
म्हणजे सूताने स्वर्ग गाठणे. एका पत्रिकेवरून चराचर सृष्टीचे भविष्य सांगायचा
प्रयत्न करतात. यामूळे लोकांच्या अवाजवी अपेक्षा वाढतात. एखाद्या प्रश्नाचा
विचार करताना त्यासंबधित सर्व व्यक्तींच्या सर्व पत्रिका तपासल्याशिवाय कोणतेही
उत्तर देऊ नये. ज्योतिषात वापरल्या जाणार्‍या प्रत्येक तंत्राच्या मर्यादा
सल्ला देण्यापूर्वी जातकांना सांगणे हे प्रत्येक ज्योतिषाचे नैतिक कर्तव्य आहे
असे माझे स्पष्ट मत आहे.

शनिवार, २७ डिसेंबर, २००८

एका चर्चासत्राच्या निमित्ताने...

परवाच पुण्यातल्या एका नामवन्त वधूवर-सूचक मंडळाने आयोजित केलेल्या एका चर्चासत्राला उपस्थित राहिलो होतो. चर्चासत्रासाठी एक ज्योतिषी व एक डॉक्टरीण बाई आमंत्रित म्हणून उपस्थित होते.

या चर्चेत आयोजकांनी विवाह जुळवणे ही सामाजिक समस्या कशी बनते ही बाजू मांडली. विवाहाच्या आरोग्यविषयक शंकांचे समाधान डॉक्टरीणबाईनी केले. याशिवाय लग्न जुळण्यात पत्रिकेचे असलेले अनन्यसाधारण साधारण स्थान लक्षात घेता, त्याविषयीचे संभ्रम दूर करण्याचे काम ज्योतिषीमहोदयांनी केले.

एकंदर चर्चा अतिशय उद्बोधक झाली. पण जाताजाता वक्त्यांनी मांडलेले काही मुद्दे काही प्रश्न उपस्थित करून गेले. उदा. विवाह हा दोन व्यक्तींपुरता मर्यादीत नसतो, तर तो दोन कुटुम्बाना जोडतो, असे मत चर्चेच्या आयोजकांनी मांडले. पण प्रत्यक्षात कायदा मात्र दोन व्यक्तीनी प्रजोत्पादन करण्यासाठी एकत्र येऊन राहणे एवढाच अर्थ मानतो. दोन कुटुम्बांच्या एकत्र येण्याचा कायद्यात कुठेही विचार केलेला दिसत नाही.

कुटुंबात येणार्‍या मुलीला आर्थिक व्यवहारांची माहिती दिली जात नाही असा पण मुद्दा मांडण्यात आला. त्याचा परिणाम मुलगी सासरी एकरूप होण्यावर होतो, असेही सांगितले गेले. पण एका भयाण वास्तवाकडे यावेळी वक्त्यांकडून दूर्लक्ष झाले. ते असे की, ४९८-अ सारख्या एकतर्फी कायद्यांचा दुरूपयोग करणार्‍या मुलीना आर्थिक व्यवहारांची माहिती मिळाली तर आपल्याच पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे असते.

दूसरी एक गोष्ट आयोजकांनी मांडली, ती म्हणजे समानतावादी आधुनिक स्त्रीची दुटप्पी भूमिका. ही स्त्री संसारात नव‍र्‍याने बरोबरीने कष्ट करावेत अशी अपेक्षा ठेवताना उत्पन्नाच्या अथवा खर्चाच्या वाटणीची वेळ आली की सोयिस्करपणे घूमजाव करते. खर्चाच्या बाबतीत "नवर्‍याचे उत्पन्न हे आपलं सर्वांचं आणि माझं उत्पन्न हे फक्त माझा पॉकेटमनी" असा समानतावादी आधुनिक स्त्रीचा सूर असतो. हे निरीक्षण सार्वजनिक व्यासपीठावरून आणि तेही एका स्त्रीने मांडले याचेच मला मोठ्ठे कौतुक वाटले.

विवाहाच्या आरोग्यविषयक बाजूवर प्रकाश टाकण्यासाठी ज्या डॉक्टरीणबाई आल्या त्यांनी मात्र "समुपदेशनास दोघेही आले तर ही समस्या सुटू शकते" असे गुळमुळीत उत्तर बर्‍याच प्रश्नांना दिले. HIV testची आवश्यकता प्रतिपादन करताना ती नेमकी कितीवेळा करावी याचा खुलासा त्यांनी केला नाही. माझ्या माहितीप्रमाणे ही टेस्ट तीन महिन्यांच्या अंतराने दोनदा करणे आवश्यक असते. कामजीवनाविषयीच्या गैरसमजुतीना डॉक्टरीणबाईनी अजिबात हात लावला नाही.

या चर्चासत्रातील तिसरे वक्ते एक नामवंत ज्योतिषी आहेत. बरीच स्थळे ज्योतिषाच्या अर्धवट ज्ञानाने नाकारली जातात, असा महत्त्वाचा मुद्दा ज्योतिषी महाशयांनी मांडला. समाजात अनेक निरर्थक आणि निराधार समजुती कशा तग धरून आहेत हे त्यांनी निदर्शनास आणले. सप्तमस्थानातील मंगळ सोडून बाकी सर्व स्थानातील मंगळ फारसे त्रासदायक नसल्याचा निर्वाळा त्यांनी दिला.

या अनुषंगाने मला पत्रिका मांडायची पद्धत आणि त्यातून होणारी दिशाभूल याविषयी लिहायचे आहे. आपल्याकडे पत्रिका मांडण्याचे उत्तर आणि दक्षिण भारतीय असे दोन प्रकार आहेत. यात एका आयतामध्ये बारा भाग करून त्यात ग्रह (आणि त्यांच्या राशी) मांडले जातात.

समजा, १ अंश मेष आणि २९ अंश मेष या ठिकाणी अनुक्रमे मंगळ व चंद्र असल्यास कुंडलीत ते एकाच स्थानात मांडले जातात त्यामुळे पत्रिकेत मंगळ-चंद्र युति आहे असे कित्येक अर्धवट ज्ञानी लोक मानतात आणि पत्रिका टाकून देतात. याच्याच उलट रवि-गुरु, चंद्र-गुरु यांच्यात नसलेल्या नवपंचमादि शुभ योगांचा भास केवळ पत्रिका लिहीण्याच्या पद्धतीमुळे होतो व पत्रिका दूर्मिळ योगाची म्हणून खपवली जाते.

वास्तविक योग्य ते दीप्तांश विचारात घेउन रवि,चंद्र इत्यादि ग्रहांचे मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून, प्लुटो या ग्रहांशी अष्टामांश मालिकेतील योग होत असतील तर ते विवाह आणि व्यावसायिक भागिदारीत अडचणी दाखवतात. तसेच जोडीदाराच्या पत्रिकेतील मंगळ, शनि, हर्षल, नेपच्यून व प्लुटॊ हे ग्रह जातकाच्या रविचंद्रांशी अष्टामांश मालिकेतील योग करत असतील तर ते वैवाहिक अथवा व्यावसायिक नात्यात अडचणी निर्माण करतात.

ज्योतिषी महोदयांनी चर्चेत आणखी एक मुद्दा मांडला तो असा की ३६ गुण जुळण्याचा अट्टाहास पालकांनी करू नये. ३६ गुण जुळले की मुलाची आणि मुलीची रास एक यायची शक्यता असते. असे झाल्यास दोघांचीही साडेसाती एकदमच येते...

बर्‍याच वेळा असे दिसते की काही वेळा कौटुंबिक कलह दीर्घकाळ चालू राहतो. अशावेळेस कुटुंबातील सर्वांच्या पत्रिका एकत्र पाहिल्या तर असे दिसून येते की अशा कुटुम्बातील सदस्यांचे रविचंद्रादि ग्रह एकमेकांच्या अतिशय जवळ (युति नव्हे) असून ते मंदगती ग्रहांच्या भ्रमणांच्या तडाख्यात एका मागे एक असे सापडतात. साहजिकच ही परिस्थिती १+१ = ३ अशा स्वरूपाची असते.

तात्पर्य, आदर्श पत्रिकेच्या शोधात न राहता व्यावहारिक दृष्टीकोन स्वीकारून पत्रिकेचा उपयोग करून घेणे शहाणपणाचे ठरते.






गुरुवार, ११ डिसेंबर, २००८

गोत्र

परवाच एका साखरपुड्याच्या समारंभाला जाण्याचा योग आला. तेव्हा लांब बसून
त्रयस्थपणे गुरुजी करवून घेत असलेले विधी पहात व ऐकत होतो. मी अमुक गोत्राचा
तमुक कुलोत्पन्न असा-असा संकल्प सोडतो या अर्थाची संस्कृत वाक्ये गुरुजी
उच्चारत होते. संपूर्ण विधीमध्ये या घोषणे पलिकडे गोत्राला काही स्थान नव्हते.
मग गोत्राशिवाय संकल्प करता येत नाही असे मानयचे का? तसं असेल तर ते कोणत्याही
विवेकी बुद्धीला पटणारे नाही. पण गोत्रामुळे या उपवर मुलाच्या लग्नात आलेल्या
अडचणी मी डोळ्यादेखत पाहिल्या होत्या. हजारो वर्षांपूर्वी आमच्या काही रानटी
ऋषिपूर्वजांचे (इतिहासाचार्य राजवड्यांचा शब्द्प्रयोग) आपापसात पटले नाही
म्हणून त्यांनी रोटी-बेटी व्यवहार टाळले. आणि म्हणूनच काही गोत्रे जुळत नाहीत
अशा समजुती प्रचारात आल्या. आजही खेड्यापाड्यात ज्या घराण्यांत वंशपरंपरागत
भांडणे असतात तिथे, तसेच काही वैमनस्य असणार्‍या काही पंथांमध्ये (उदा. शैव व
वैष्णव) रोटी-बेटी व्यवहार होत नाहीत.

पण अजूनही वधूवरसूचक मंडळे वधूवरांच्या माहितीची रजिस्टरं तयार करताना
गोत्राच्या अनावश्यक माहितीची मागणी करतात. गोत्र आणि वंशशुद्धीच्या वेडगळ
कल्पना लोक अजूनही घट्ट्पणे उराशी बाळगतात तेव्हा गोत्र संकल्पनेतील पोकळपणा
सर्वांसमोर आणल्याशिवाय राहवत नाही.
गोत्र संकल्पनेतील काही मला उमगलेल्या त्रुटी अशा आहेत -
० गोत्रे कशी निर्माण झाली याचा अधिकृत पुरावा उपलब्ध नाही. वेदांच्या
वेगवेगळ्या शाखांचे अध्ययन करणा‍रे ‍ गोत्रांचे जनक मानले जातात. पण
सूक्ते रचणार्‍या अनेक ऋषींना गोत्रे नाहीत. ते गोत्रांचे जनकही मानले जात
नाहीत.
० गोत्राना कायदेशीर मान्यता पण नाही. विवाह कायदेशीर ठरण्यास गोत्र अनिवार्य
नाही. फारच काय सगोत्र विवाहाला कायदेशीर मान्यता आहे.
० ब्राह्मणांची अनेक गोत्रे त्यांच्या उपशाखांमध्ये समान आहेत. उदा. अत्रि,
कश्यप, गार्ग्य, वत्स इत्यादि. आता जी गोत्रे समान आहेत त्यांचे वंशज एकाच
पिंडसूत्राचे (bloodlineचे) सदस्य मानले तर अत्रि (कर्‍हाडे) किंवा अत्रि
(चित्पावन) यांच्यात भेद कसा मानायचा? दूसर्‍या शब्दात असेही विचारता येईल की
हे अत्रि, कश्यप, गर्ग , वत्स वेगवेगळे ऋषि की एकच?
० याशिवाय बर्‍याच जणांची झोप उडेल अशा दोन मुद्दयांचा विचार मला करायचा आहे.
राजवाड्यांच्या भारतीय विवाह संस्थेचा इतिहास या पुस्तकातले १लेच वाक्य वाचा.
राजवाडे म्हणतात, "मित्राला किंवा अतिथीला स्वस्त्री संभोगार्थ देण्याची चाल पुरातन कालापासून
पाणिनीच्या कालापर्यंत भारतीयांत होती.
अशा अतिथीसेवेतून जर संतती निर्माण झाली असेल
तर तिचे गोत्र कोणते? भारतामध्ये नियोगाची प्रथा अनेक वर्षे प्रचलित होती. नियोगात जेव्हा पतिकडून शक्य नसेल तेव्हा स्त्रीला हव्या त्या पुरूषाकडून संतती प्राप्त करून घेता येत असे. परवापरवा पर्यंत म्हणजे स्पर्मबॅंका, टेस्टट्युब बेबीचे तंत्रज्ञान अस्तित्वात येइपर्यत एखाद्या आध्यात्मिक गुरूच्या 'प्रसादाने' संतती प्राप्त झाल्याची उदाहरणे अधूनमधून ऐकू येत असत. ज्यांनी शबाना आझमी आणि श्रीराम लागू
यांचा Immaculate Conception हा चित्रपट बघितला आहे, त्यांना आध्यात्मिक गुरू कसा प्रसाद देत ते सहज लक्षात येईल. अशा प्रसादोद्भव संततीचे गोत्र कोणते? सध्याच्या काळात ज्यांना अपत्य नाही ते अनाथालयातून बालकाला दत्तक घेतात. अशा दत्तक बालकाचे गोत्र कोणते?

तात्पर्य, ज्या गोत्रांना आपण अजून घट्ट्पणे कवटाळले आहे ती संकल्पना किती
पोखरली गेली आहे हे आपल्या लक्षात येईल. असो...

मंगळवार, ९ डिसेंबर, २००८

सन २००९ मधल्या अमावस्यांचे शुभाशुभत्व

सन २००९ मध्ये खालील तारखाना अमावस्या होत असून त्यांच्या शुभाशुभत्वासंबंधी
मार्गदर्शन केले आहे. जिज्ञासूंनी त्यांचे आपल्या पत्रिकेसंदर्भातील महत्त्व
ठरविण्यासाठी ग्रहांचे सायन अंश पहावेत.

टीप - "प्रभावित व्यक्ती"ची व्याख्या - गोचर ग्रह पत्रिकेतील ग्रहांशी युति,
प्रतियुति, केंद्र, अर्धकेंद्र, नवपंचम, आदि योग करीत असतील तर त्या व्यक्ती
"प्रभावित" मानल्या जाव्यात.

२६ ०१ २००९ (ग्रहण) ६-३२ कुंभ
गुरुच्या युतीत असल्या मुळे बर्‍याच प्रमाणात शुभ, पण शनि-हर्षल प्रतियुतीत
सापडलेल्या व्यक्तींना अशुभ

२५ ०२ २००९ ६-३२ मीन
शनि-नेपचूनचा मध्यबिंदू अमावस्येशी केंद्रयोग करतो. त्यामुळे ५ ते ८ अंश
मीन-कन्या-मिथुन-धनु
मध्ये ज्यांचे ग्रह असतील त्यांना अशुभ


२६ ०३ २००९ ६-१० मेष
अमावस्येचा प्लुटोशी केंद्रयोग. गोचर शनि-हर्षल प्रतियुतीमध्ये मंगळ हर्षलशी
युति करण्यास जात आहे म्हणून अतिशय अशुभ

२५ ०४ २००९ ५-०१ वृषभ
प्लुटोशी नवपंचम योग. सायन मकर-वृषभ-कन्या राशी मध्ये ४ ते ६ अंशामध्ये ज्यांचे
ग्रह असतील त्यांना काही प्रमाणात शुभ. अशा व्यक्तींच्या आयुष्याला निर्णायक
वळण देणारी.

२४ ०५ २००९ ३-३१ मिथुन
संमिश्र फलदायी.

२३ जून २००९ १-२९ कर्क
गुरू-नेपचून युतीशी नवपंचम योगामुळे काही जणांना शुभ. प्लुटोशी प्रतियुतीमुळे
० ते २ अंश मकर-मेष-कर्क-तूळ मध्ये ज्यांचे ग्रह असतील त्यांना अशुभ

२४ जुलै २००९ २९-२२ कर्क
हर्षलशी नवपंचम योगामुळे प्रभावित व्यक्तींच्या आयुष्यात अनपेक्षित कलाटणी
देणार्‍या घटना.

२० ऑगस्ट २००९ २७-३३ सिंह
मंगळ-प्लुटो-शनि-हर्षल यांच्या अशुभ योगांची छाया असल्यामुळे बर्‍याच प्रमाणात
अशुभ.

१९ सप्टेंबर २००९ २५-५८ कन्या
अमावस्या शनीच्या युतीमध्ये आहे. शनि-प्लुटो केंद्र आणि शनि-हर्षल प्रतियुती
चालूच असल्यामुळे मोठ्ठ्या प्रमाणात अशुभ.

१८ ऑक्टोबर २००९ २४-५५ तूळ
गुरु, प्लुटो, नेपचूनशी शुभ योगांमुळे प्रभावित व्यक्तींना मोठ्ठ्या प्रमाणात
शुभ

१७ नोव्हेंबर २००९ २४-३३ वृश्चिक
संमिश्र फलदायी.

१६ डिसेंबर २००९ २४-४३ धनू
हर्षल बरोबर केन्द्र योगामूळे प्रभावित व्यक्तीना अशुभ.

शनिवार, ६ डिसेंबर, २००८

आपले नवे मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून श्री. अशोक चव्हाण यांची
निवड/नेमणूक झाली आहे. त्यांची जन्मतारीख २८ १० १९५८ अशी वृत्तपत्रात छापून आली
आहे. नुसती जन्मतारीख जेव्हा ठाऊक असते तेव्हा देखिल जातकाच्या भवितव्याबद्दल
बरेच मार्गदर्शन पत्रिकेतून मिळू शकते.

पत्रिकेला uniqueness देणारे चंद्र, लग्न आणि दशमभाव आरंभबिंदू हे अशा वेळी
विचारात घेता येत नाहीत.

चव्हाण यांच्या पत्रिकेत रविगुरू अंशात्मक युति असून रवि प्लुटोशी लाभयोग करतो.
हे एवढे योग चव्हाण यांना मुख्यमंत्री पदापर्यंत पोहचविण्यात कामी आले.
रवि-प्लुटो चे लाभ आणि नवपंचम योग असलेल्या व्यक्ती केवळ स्वत:चाच नाही तर
कुटुम्बाचा, त्यांच्या संपर्कात येणार्‍या व्यक्तींचा देखिल उत्कर्ष करताना
दिसतात. यात आणखी एक योगायोगाचा भाग म्हणजे चव्हाण यांच्या पत्रिकेत मंगळ आणि
प्लुटोचा केंद्रयोग जो हिंसाचार दाखवतो त्याच हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर श्री
चव्हाण यांनी सत्ताश्री संपादन केली आहे. त्यामुळे हिंसाचार आणि क्रौर्य यांची
गाढ छाया नव्या मुख्यमंत्र्याच्या कारकीर्दीवर पडेल असे वाटते.

याशिवाय रवि-नेपचूनची युति श्री चव्हाण यांच्या पत्रिकेत असून ती त्यांना हतबल
बनवेल. २०१२-१३ सालचे शनीचे या युतीवरील भ्रमण त्यांच्या राजकीय घोडदौडीला खो
घालायची शक्यता आहे. सहकार्‍यांपैकी ज्यांचे ग्रह श्री चव्हाण यांच्या
पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि दशमभाव आरंभबिंदू यांच्याशी युति, प्रतियुती,
केंद्र, अर्धकेन्द्र इ. योग करतात त्यांच्या कडून श्री चव्हाण यांच्या पदास
धोका आहे हे नक्की.

२६ जानेवारीचे सूर्यग्रहण श्री चव्हाण यांच्या रवि-नेपचून युतीला कार्यरत करते.
सूर्यग्रहणाचे परिणाम दीर्घकालीन असतात. तेव्हा श्री चव्हाण यांच्या कडून फार
अपेक्षा ठेवाव्यात असे मला वाटत नाही...

रविवार, ३० नोव्हेंबर, २००८

सुसंस्कृत भारतीय

मला कधि कधि स्वत:ला भारतीय म्हणवून घ्यायची लाज वाटते. तुम्हाला नक्कीच
प्रश्न पडेल की हा असा का बोलतो आहे.

मी पुण्यात जीथे राहतो तिथे जवळच ३-४ मंगल कार्यालये आहेत. मी हा मजकूर लिहीत
असताना रस्त्यावर एका लग्नाची एक वरात वाजत गाजत चालली आहे. अधूनमधून
फटाक्यांचे मोठे सर लावले जात आहेत. कुण्या धनदांडग्याच्या घरचा हा विवाह सोहळा
असावा. जणू काही घडलेच नाही असा माहोल आहे. शहाण्या लोकांना मला काय म्हणायचे
ते आता कळले असावे.

देशावर एवढे मोठे संकट कोसळले. प्राणहानी, वित्तहानी झाली त्याचे यत्किंचितही
दू:ख या मिरवणूकीतल्या लोकांना नाही. कदाचित दहशतवादी मारले गेले याचा आनंद या
वर्‍हाडीना झालेला असावा. पण या निर्बुद्ध लोकाना हे कळत नाही की दहशतवादी
मारले म्हणजे दहशतवाद मारला गेला असे नाही.

लग्नसमारंभ स्थगित करणे शक्य नाही हे समजू शकते पण तो साधेपणाने साजरा करण्याची
बुद्धी या लोकांना हिदूंच्या तेहतीस कोटी देवांपैकी एकाही देवाने दिली नाही हे
दूर्दैव.

काही वर्षापूर्वी दिवाळीत कोकणात गेलो होतो. मी ज्या कुटुम्बात उतरलो होतो त्या
कुटुम्बात दिवाळीची कोणतीही धामधूम नव्हती म्हणून मी आडून चवकशी केली. तेव्हा
असे कळले की नुकतेच शेजारच्या घरातल्या कर्त्या व्यक्तीचे अचानक निधन झालेले
होते. खेड्यातल्या अडाणी लोकांकडे जी संवेदनशीलता दिसली ती सुसंस्कृत
म्हणवणार्‍या भारतीय समाजात नक्कीच नाही. तसं असतं तर निदान १३ दिवस तरी
रस्त्यावर लग्नाच्या वाजतगाजत मिरवणूका या देशात निघणार नाहीत.

बुधवार, २६ नोव्हेंबर, २००८

जुनी दारू आणि नवी बाटली...

ज्योतिष शास्त्र आहे की नाही यावर वाद घालून धूळ उड्वत बसण्यापेक्षा ज्योतिष
उपयुक्त आहे की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे. उपयुक्ततता सिद्ध होण्यास
शास्त्रीयत्वाच्या कसोटीची गरज नाही, फक्त अनुभव पुरेसा आहे. मागे एकदा आय आय
टी मधल्या प्राध्यापक जोगांनी लोकसत्तेमधल्या एका लेखाचा संदर्भ दिला होता.
लेखकाचे नाव आठवत नाही, पण त्यातील शेवटचे वाक्य माझ्या लक्षात राहिले आहे. ते
असे, "विज्ञान माणसाला जगण्याचे बळ देत नाही". ज्यांना या विधानातील विदारक
सत्य पटेल, त्यांनाच ज्योतिषाची उपयुक्ततता पटेल. विज्ञानाने भले कितीही
प्रगती केलेली असो माझ्या जीवनातील अनिश्चितता झेलण्यास ते जितके उपयोगी पडेल,
तितकेच माझ्या जीवनात विज्ञानाचे महत्त्व असेल. माझ्या देशाने पूर्वी महासंगणक
तयार केला आणि आता चंद्र काबीज केला, पण त्याचा माझ्या घराच्या जवळ बसणारा
चांभार, चहाची टपरीवाला यांच्या रोजच्या जीवनक्रमात कसलाही बदल घडला नाही आणि
नजिकच्या भविष्यकाळात तसा बदल घडेल असेही नाही. म्हणून ज्या प्रगतीचा
एखाद्याला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष काही उपयोग नाही, ती त्याला असून नसल्या
सारखीच...किं तया क्रियते धेन्वा या न सूते न दूग्धदा (जी गाय प्रसवत नाही आणि
दूधपण देत नाही त्या गायीचा उपयोग काय)?

तात्पर्य, ज्या विज्ञाननिष्ठेचा, बुद्धिवादाचा फारसा उपयोग नाही त्याची कास
सरसकट धरण्याचा आग्रह धरणे म्हणजे एक प्रकारचा आततायीपणा आहे असे मला वाटते.

आपल्याकडे ज्योतिषाकडे अनेक दृष्टीकोनांतून पाहिले जाते. ज्योतिषाकडे बघायचा
आणखी एक दृष्टीकोन मला अमेरीकेतील एका प्रसिद्ध ज्योतिषीबाईनी (त्या आता हयात
नाही) मला दिला. त्यांचे नाव श्रीमती मॅरी डाउनिंग. त्यांच्या मते ज्योतिष हे
मानवी जीवनातील चक्रीय वास्तवाची प्रतिकृती आहे (Astrology is model of
circular reality in human life). हे चक्रीय वास्तव सुख आणि दू:ख,
अपेक्षापूर्ती आणि अपेक्षाभंग, प्रवृत्ती आणि निवृत्ती, अशा ध्रुवांमध्ये
आंदोलित होत असते.

माझ्या दृष्टीने मॅरी डाउनिंगच्या व्याख्येतील प्रतिकृती हा शब्द मला अतिशय
महत्त्वाचा वाटतो. कोणत्याही रचनेचे रूप आणि कार्य समजावून घेण्यासाठी
प्रतिकृती उपयोगी पडतात. आपण प्रतिकृती अथवा प्रतिक (प्रतिकृती अमूर्त होत जाते
तेव्हा त्याचे प्रतिक बनते) याचे सोपे उदाहरण म्हणून आपण वास्तूविशारदाने
बनवलेल्या घराच्या प्रतिकृतीचे घेऊ. या प्रतिकृतीमुळे आपल्याला वास्तूची कल्पना
करण्यास मदत होते. या प्रतिकृतीमध्ये वास्तूरचनेची सर्व तत्त्वे अमलात आणली जात
नाहीत. म्हणजे मला असे म्हणायचे आहे की, वास्तूची प्रतिकृती बनवताना आपण खर्‍या
दगड विटांचा आणी इतर बांधकाम सामानाचा उपयोग करीत नाही. संगणकावर बनवलेल्या
प्रतिकृती मध्ये तर ० आणी १ एवढाच कच्चा माल वापरला जातो. आणि म्हणून ती
प्रतिकृती बनवण्याचा आणी वापरण्याचा उद्योग अशास्त्रीय ठरत नाही किंवा तयार
झालेली प्रतिकृती अंधश्रद्धा होत नाही.

प्रतिकृतीला, ती ज्या उद्देशाने बनवली गेली आहे त्यानुसार, मर्यादा येतात.
पुठ्ठ्याचा वापर करून तयार केलेल्या वास्तूच्या प्रतिकृतीमध्ये प्रकाश किती
खेळेल किंवा याचा अंदाज बाधणे कठीण असते. शिवाय अशी प्रतिकृती बर्‍याचदा
वास्तूच्या बाह्य रुपाचाच अंदाज येण्यास उपयोगी ठरते. अंतर्भागाची तसेच हालचाल,
चलनवलन यांची कल्पना करण्यासाठी, संगणकीय प्रतिकृती उपयोगी पडतात.

हे सर्व सांगायचा खटाटोप एवढयाचसाठी की ज्योतिषाच्या मर्यादा आपण जर समजावून
घेतल्या तर ज्योतिषाचा योग्य उपयोग आपल्याला करता येऊ शकतो. माझे आयुष्य
एखाद्या सूत्रात बांधले गेले आहे का?, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यास प्रत्येक
व्यक्ती पूर्णपणे स्वतंत्र आहे. एखादे सूत्र ही त्यातील विशिष्ट घटकांच्या
परस्पर संबंधांची प्रतिकृती असते. जन्म आणि मृत्युच्या या अंतिम अवस्थांनी
बद्ध असलेल्या मनुष्याची पत्रिका ही म्हणूनच त्याच्या जीवनात येउ शकणार्‍या
वेगवेगळ्या अवस्थांची एक प्रतिकृती मानली तर त्यात वावगे काय?

ज्यांच्या जीवनाला स्थैर्य लाभले आहे ते ज्योतिषाकडे अनुदार किंवा साशंक
वृत्तीने बघतात. त्यांच्या जीवनातील अनिश्वितता एक तर कर्मधर्मसंयोगाने
मर्यादित असते, किंवा ती मर्यादित ठेवण्यात अशा व्यक्तीना यश मिळालेले असते.
त्यामुळे ज्यांच्या ज्यांच्या जीवनाला, कशामुळे का असेना, निश्चितता आहे
त्यांना ज्योतिषाबद्दल आकस, अनास्था वाटणे स्वाभाविक आहे.

याच मुद्द्याच्या अनुषंगाने मला एक महत्त्वाचे मत येथे मांडावेसे वाटते. आधुनिक
ज्योतिषी ग्रहांचे परिणाम अजिबात मानत नाहीत. ते ग्रहांच्या भ्रमणांचे किंवा
आकाशात तयार होणार्‍या विशिष्ट भौमितिक रचनांची मानवी जीवनातील अवस्थांशी सांगड
घालायचा प्रयत्न करतात. अशी सांगड घालण्याचा उद्योग अतिसुरक्षित आयुष्य
जगणार्‍या व्यक्तीच्या बाबत बर्‍याचवेळा फसतो. कारण त्यांच्या आयुष्यात नवे
काही घडायची शक्यता फारच थोडी असते. भरभराटीचे योग असणार्‍या सर्वच व्यक्तींची
भरभराट होताना दिसत नाही याचे कारण या स्पष्टीकरणात सापडेल. म्हणूनच ज्योतिष
अनिश्चितता असेल तेव्हाच पहावे.

ज्योतिषाचे निंदक विकृत बुद्धिवादाची इस्त्री सर्वसामान्य माणसाच्या मनावरून
फिरवून परिटघडीचा समाज बनवू इच्छितात काय़? बरं, हा बुद्धिवाद शाश्वत समाधानाची
हमी प्रत्येक प्रयत्नवादी व्यक्तीला देइल याची खात्री कोणीच देत नाही. तसे
असल्यास दूसरा एक प्रश्न उपस्थित होतो. निसर्गाने अशा बुद्धिवादाने मिळणारे
'समाधान' पचविण्याचे सामर्थ्य प्रत्येक व्यक्तीला दिले आहे काय? तशा चाचण्या
किंवा संशोधन झाले असल्यास मी त्याविषयी अधिक जाणून घेण्यास उत्सूक आहे.

Regards

Rajeev Upadhye
---------------------------
www.yuyutsu.biz
http://rajeev-upadhye.blogspot.com/
--------------------------

सोमवार, २४ नोव्हेंबर, २००८

शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेतील त्रासदायक ग्रहयोग


शनि
-हर्षल प्रतियुतीच्या छायेतील त्रासदायक ग्रहयोग

आगामी काळात म्हणजे १२ डिसेंबर ०८ व २६ जाने २००९ रोजी अनुक्रमे पौर्णिमा आणि अमावस्या हे दोन जोरदार चांद्रयोग होत आहेत. हे दोन्ही योग शनि-हर्षल प्रतियुतीच्या छायेत होत असल्याने तीव्र फलदायी ठरतील असे भाकीत वर्तवणे योग्य ठरेल. यापैकी ही पौर्णिमा अशुभ (त्यामुळे कोणत्याही नव्या सुरुवातीस ती वर्ज्य
आहे) असून, अमावस्येला सूर्यग्रहण होत आहे. ग्रहणाची अमावस्या मिश्र फलदायी ठरेल (त्याविषयी सविस्तर नंतर लिहीन).

प्रथम आपण १२ डिसेंबर ०८ रोजी असलेल्या पौर्णिमेचा विचार करू. ही पौर्णिमा सायन मिथुन-धनु रास २१ अंश या अक्षावर होत आहे. या पौर्णिमेची कुंडली मांडली असता खालिल ग्रहयोग दिसून येतात.

रवि केन्द्र शनी
रवि लाभ नेपचून
रवि युति मंगळ
रवि केन्द्र हर्षल

हे सर्व योग अंशात्मक आहेत. याशिवाय रवीच्या युतिमध्ये प्रभावी झालेला मंगळ गोचरीने शनि व हर्षल या प्रतियोगातील ग्रहांबरोबर केंद्र योग करतो.

याचे तात्पर्य असे की शनि व हर्षल प्रतियोगामुळे चालू झालेल्या उलथापालथीचा एक मोठा दणका कोणत्या ना कोणत्या अरिष्टाच्या स्वरूपात (मोठा भूकंप, रेल्वे अथवा विमान अपघात, घातपाती कारवाया) १२ डिसेंबर ०८ च्या मागेपुढे एक आठवडा या कालावधीत मिळू शकतॊ.

आता आपण या पौर्णिमेच्या प्रभावाखाली कोणत्या व्यक्ती सापडल्या आहेत त्यांचा विचार करू... ज्या व्यक्तींच्या पत्रिकेत सायन २० ते २२ अंश मिथुन-कन्या-धनु-मीन या क्षेत्रात कोणतेही ग्रह असतील तर त्यांना या पौर्णिमेची
जोरदार अशुभ फले अनुभवाला येतील. या फलांची तीव्रता मूळ पत्रिकेतील ग्रह योगांप्रमाणे असेल.

पुढे दिलेल्या तारखाना रवि कोणत्याही वर्षी २० ते २२ अंश सायन मिथुन-कन्या-धनु-मीन या क्षेत्रात असतो, म्हणून या तारखांना ज्यांचे जन्म झाले आहेत त्याच्या जन्मरवीशी पौर्णिमेतील मंगळ, शनी, हर्षल हे युति, प्रतियुति, केन्द्र हे योग करतात.

या तारखा अशा -
११ ते १४ मार्च ११ ते १४ जून १२ ते १५ सप्टेंबर १२ ते १५ डिसेम्बर

शरीरस्वास्थ्याच्या दृष्टीने हे योग अतिशय हानीकारक आहेत. शक्य असल्यास कोणतेही धाडस न करणे तसेच सौम्य धोरण स्वीकारून कलह टाळणे हे या काळात शहाणपणाचे ठरेल.

ज्यांना निरयन राशीचक्राप्रमाणे पौर्णिमेचा आपल्या पत्रिकेतील प्रभाव जाणून घ्यावयाचा असेल त्यांनी २५-२६-२७ अंश वृषभ-सिंह-वृश्चिक-कुंभ या क्षेत्रात आपल्या पत्रिकेत कोणते ग्रह आहेत ते तपासावेत.