रविवार, २० जुलै, २०१४

जीवसृष्टीचा शोध : निरर्थक उद्योग


माणुस अवकाशात जीवसृष्टीचा पृथ्वी व्यतिरिक्त शोध घेण्याचा प्रयत्न करतो आहे. पण माझ्या काही मूलभूत शंका आहेत...

समजा जीवसृष्टीचा शोध लागलाच तर ते जीव आपल्यापेक्षा मूलत: वेगळे असतील का? एकपेशीय जीव, प्राणी आणि वनस्पती यापेक्षा तिथे निराळी जीवसृष्टी असु शकेल का? मला वाटतं नाही. याची मुख्य कारणे अशी की, तिथली मूलद्रव्यं, तिथले पिरीयॉडिक टेबल आपल्यापेक्षा वेगळे नसणार. साहजिक ही मूलद्रव्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये विशिष्ट नियमांनी तीच संयुगे निर्माण करणार. कदाचित त्यांचे प्रमाण कमी-जास्त बदलेल, जसे वाळवंटात पाण्याचे प्रमाण कमी असते.

थोडक्यात निसर्गाचे मूलभुत नियम तिकडे वेगळे असायचे कारण नाही. आता हाच युक्तीवाद पुढे खेचला तर असे लक्षात येते की अंतराळातील जीवसृष्टी आपल्यापेक्षा फार वेगळी असेल असं नाही फक्त तेथील वातावरणानुसार काही जीवांचे प्राबल्य असेल. उदाहरणार्थ, अंतराळातील एखादा ग्रह जर फक्त पाण्याने आच्छादलेला असेल तर तिथे कदाचित फक्त जलचरच सापडतील. कदाचित तिथले काही जलचर पृथ्वीवर अस्तित्वात नसतील किंवा यायचे असतील. एव्हढेच... पण पाण्याखाली वसती करून राहणारा मानव तिथे अस्तित्वात यायची शक्यता किती. मला वाटतं शून्य. कारण पृथ्वीवर अजुन मनुष्य पाण्याखाली वस्ती करू शकत नाही.

थोडक्यात पृथ्वीवर कोट्यवधीवर्षात निसर्गनियमांच्या मर्यादांनी जे घडु शकलेलं नाही ते अवकाशातील जीवसृष्टीमध्ये पण घडु शकायची शक्यता पण शून्यच वाटते. निसर्गाचे नियम तिथे पण तेच असल्याने त्याच्या मर्यादा पण त्याच असणार.

म्हणुनच मला अंतराळातील जीवसृष्टीचा शोध एक निरर्थक उद्योग वाटतो...

रविवार, १३ जुलै, २०१४

"श्रेय"


४-५ वर्षापूर्वीची गोष्ट... एका पुरोगामी प्रतिष्ठितास मी एका प्रकल्पाची कल्पना सांगितली. त्यांनी हा प्रकल्प करता येईल असे उत्साहाने सांगितले .  पण मग हळुच मला एक थेट प्रश्न टाकला त्याने मात्र मी पार उडालो.

या गृहस्थानी विचारले, "या प्रकल्पाचे श्रेय कुणी घ्यायचे?"

मी नंतर त्या प्रकल्पाचा विचार डोक्यातुन काढुन टाकला...

याउलट दुसरा एक अनुभव. मी संगणक संगीतात काम करत होतो तेव्हा डॉ. किरण रेगे प्रा. सहस्रबुद्ध्यांच्या बरोबरीने माझ्या कामावर देखरेख ठेवायचे. मी त्यांच्याबरोबर बरोबर माझ्या प्रकल्पासंबधित अनेक तांत्रिक बाबींवर चर्चा करत असे. मी माझा १ला संशोधन निबंध लिहीला तेव्हा प्रा. सहस्रबुद्ध्यांनी मला डॉ. रेग्याना त्यांचे नाव सहलेखक म्ह्णुन लावायचे का? असे विचारायला सांगितले. मी डॉ.  रेग्यांना तसे विचारले तेव्हा त्यांनी नम्रपणे नकार दिला. ते म्हणाले, "तुला हवंच असेल, तर एक तळटीप देउन ’ऋणनिर्देश’ कर"! माझ्या याच निबंधाला त्याच संस्थेतल्या दुसर्‍या एका हलकट व्यक्तीने त्याचे नाव लावले नाही म्हणुन कायमचा डुख धरला.

माझ्या सदसद्विवेक-बुद्धीनुसार सामुहिक यशापयशात प्रत्येक घटकाची योग्य ती दखल घ्यायलाच हवी. पण ती त्या त्या व्यक्तीच्या योगदानाच्या प्रमाणात असावी. या संबधीची मार्गदर्शक तत्त्वे मला लिखित स्वरूपात कधी सापडली नाहीत.

आणखी एक मजेशीर अनुभव ... राज्य मराठी विकास संस्थेने एक सेमिनार आयोजित केला होता. त्यात निंबध पाठविण्यासाठी मला सेमिनारच्या निमंत्रकबाईंचा फोन आला ( या बाई ज्ञानपीठ पुरस्कार समितीवर पण होत्या). त्यांनी मला काही कसलाही आगापिछा न ठेवता सांगितले, "तुम्ही तुमचा निबंध अमुकतमुक व्यक्ती बरोबर लिहा आणि पाठवा". ते ऐकुन माझे डोके फिरले. ज्या व्यक्तीबरोबर मला निबंध लिहायला सांगण्यात आला होता ती व्यक्ती आमच्या संस्थेच्या ग्रंथालयात पुस्तकांवरची धूळ झाडायचं काम करायची.  याच सेमिनारमध्ये निबंध वाचनाचे आमंत्रण मला मिळाल्याची बातमी  ऐकल्यावर पुण्यातल्या एका प्रसिद्ध भाषाशास्त्रज्ञांनी मला बोलवुन सांगितले, "तू स्वतंत्र पेपर लिहू नकोस. मी तुला मुद्दे देतो". मला तात्पर्य समजले. मी प्रा. मे. पु. रेग्यांकडे माझी नाराजी याबद्दल व्यक्त केली. नंतर मला आयोजकबाईनी फोन करून स्वतंत्रपणे लिहीण्यास ’परवनागी’ दिली. माझा निबंध सादर केल्यानंतर सचिन तेंडुलकरच्या वडिलांनी म्हणजे प्रा. रमेश तेडुलकरांनी धावत येऊन माझे कोतुक केलेच पण दुसर्‍या दिवशीच्या मटामध्ये  सेमिनारच्या वार्तांकनात मला बर्‍यापैकी जागा मिळाली.

माझे संगणकीय-संगीताचे काम मला निधी पुरविण्यास अनेक संस्था उत्सुक असुन बंद पाडण्यास भाग पाडण्यात आले. पदोन्नती रोखणे हा खच्चीकरणासाठी सर्वोत्तम मार्ग  असतो.
आज मी मागे वळुन, भावना बाजुला ठेवुन, त्रयस्थपणे सगळ्या घटनाक्रमांकडे बघतो तेव्हा एक गोष्ट ठळकपणे लक्षात येते. माझ्या कामामुळे मला जो लाईमलाईट मिळाला त्यात प्रा. सहस्रबुद्ध्यांशिवाय कुणी खर्‍या अर्थाने वाटेकरी होऊ शकत नव्हते (आणि अनेकजणांचे खरे दु:ख तेच आहे).  संबंधित संस्थाचालकांना प्रा. सहस्रबुद्धे किती सलत होते, संगणक-विभागाची जागा बळकावण्यासाठी त्यांना किती भयानक अपमानास्पद वागणुक देण्यात आली याचे असंख्य साक्षीदार आहेत.  असो...

’श्रेय’ या विषयावरून ज्या आठवणी जाग्या झाल्या त्यात आणखी एक किस्सा सांगितल्याशिवाय राहवत नाही.

१९९४ मध्ये दिल्ली-दूरदर्शनला माझी मुलाखत राष्ट्रीय प्रसारणातील बातम्यासाठी घ्यायची होती आणि त्यांचे पथक पुण्याला येऊन थडकले. पण त्यामुळे माझ्यासमोर एक नैतिक अडचण निर्माण झाली. मी पदोन्नतीसाठी तडजोड करून माझे संगणक-संगीत विषयक काम थांबवले होते. असे असताना दूरदर्शनला मुलाखत देणे म्हणजे संस्थाचालकांची मूळव्याध चिघळणार होणार हे नक्कीच होते. मग मी दूरदर्शनच्या पथक प्रमुखाला विश्वासात घेऊन सर्व हकीकत सांगितली. त्यावर त्यांनी मला "काळजी करू नकोस. आपण तुमच्या संस्थाचालकांनाही मुलाखतीत सहभागी करू. ते येतील कसे ते मात्र तू बघ."

आमचे संस्थाचालक लाजत-मुरडत मुलाखतीसाठी तयार झाले. कॅमेरासमोर काय बोलायचे हे माझ्याकडुनच मागविण्यात आले. त्यांच्यानंतर माझी मुलाखत विनाअडचण पार पडली. दोन दिवसांनी राष्ट्रीय प्रसारणामध्ये मुलाखत प्रसारित झाली तेव्हा संस्थाचालकांचा भाग पूर्णपणे कापून टाकला गेला होता...





गुरुवार, १५ मे, २०१४

सुसंस्‍कृत माणसांचा मूर्खपणा



गोष्ट १ली

काल दुपारची ३ ची वेळ

बाहेर अंगणात गलका ऐकु आला म्हणुन बाहेर आलो तर १५-२० जणांचा एक घोळका आमच्या बंगल्याच्या आवरात शिरून आमच्याच बागेतल्या अशोकाच्या शेड्यांकडे नजर लावुन गहन चर्चा करण्यात मग्न झाला होता.

मी त्यांना हटकले तेव्हा त्यातल्या एकाने मला सांगितले की एक कावळा उडता उडता पतंगाच्या मांजाला अडकुन अशोकाच्या झाडाला लटकला होतात. मी त्यांना परवानगीशिवाय आत आले म्हणुन झाडले आणि घरात आलो. पण थोड्या वेळाने गलका परत वाढला म्हणुन परत बाहेर आलो. घोळक्यात कामधाम सोडुन सुमारे १०० जण गोळा झाले. पूर्ण वाढलेल्या अशोकाच्या शेंड्यावरऊन कावळ्याला कसे सोडवायचे याची मसलत  माझ्या घराच्या अंगणात रंगली होती.

कावळा फारच नशीबवान... त्यांच्या जिवावरचा प्रसंग एका पक्षीप्रेमीने पाहिला म्हणुन ... कारण काही मिनीटातच अग्निशमनदलाची गाडी घंटा वाजवत दारात हजर.

अग्निशमनदलाच्या जवानांनी (बहुधा मनातल्या मनात कपाळावर हात मारत) गर्दी पाहुन भराभर हालचाली केल्या. प्रथम काही जण आमच्या गच्चीवरुन ३ मोठे बांबू एकत्र बांधुन शेड्यापर्यंत पोचता येत का अजमावु लागले. तरी पण कावळ्यापर्यंत पोचता येईना तेव्हा शेजारच्या घराच्या गच्चीवरून काही पक्षीमित्र आणि अग्निशमन दलाचे जवान प्रयत्न करू लागले.

एव्हाना आजुबाजुच्या इमारतीमधुन हे ’नाट्य’ बघायला आणखी १००+ जण गोळा झाले होते.

कावळ्याचे नशीब खरेच बलवत्तर...

सलग २ तासांच्या प्रयत्नानंतर कावळ्याची सुटका झाली तेव्हा जमावाने शिट्ट्या आणि टाळ्या वाजवल्या. मला मात्र दोन प्रश्न सतावत होते - ही भूतदया माणसे अडचणीत असताना कुठे जाते.  आणि जमलेल्या घोळक्यातले किती पक्षीप्रेमी शाकहारी असतील?
-----------------------------------------------
गोष्ट दुसरी

सन १९८८-८९.

आय आय टी मुंबईचा परिसर

माझे काम संपले तोपर्यंत रात्रीच्या जेवणाची वेळ झाली होती. मी हॉस्टेल कडे जाताना मुलांचा एक घोळका हातात कसले तरी फलक घेऊन रस्त्यावरून विरूद्ध दिशेने निघाला होता.

मी दुर्लक्षकरून तडक मेसमध्ये जेवायला गेलो. तेव्हा काही जणांनी मेसमध्ये एका निषेधसभेचे पोस्टर लावले होते.

मी चोकशी केली. तेव्हा कळले की,

एका वन्यजीवप्रेमीने हॉस्टेल क्र. ८ च्या आवारात एका छोट्या अजगराला पकडले आणि दुसर्‍या दिवशी बोरीवलीच्या उद्यानात सोडुन द्यायचा विचार करून एका पोत्यात बांधुन ठेवले.  पण अजगर भुकेला राहिला तर काय म्हणुन त्याने सरळ मेस मधल्या मार्जारकुळातल्या एका मार्जार शिशुला पकडुन अजगराच्या तोंडी दिले आणि त्याच्या पोटापाण्याची व्यवस्था केली.

कॅम्पस मधल्या भूतदयावादी वन्यजीवप्रेमीना ही "अनैतिक" हकीकत समजली तेव्हा ते संतापले. त्यांनी मोर्चा काढुन निषेध सभा बोलवली होती...

मी तेव्हा पण कपाळाला हात मारून घेतला होता...

रविवार, १३ एप्रिल, २०१४

सध्याचे ग्रहमान



लोक हो,

गेले वर्षभर मी वैयक्तिक प्राधान्यक्रम बदलल्यामुळे माझे ज्योतिषविषय्क ब्लॉग लिखाण बंद ठेवले होते. ते मी आता पुन्हा चालु करणार आहे. याच बरोबर माझे ज्योतिष विषयक लिखाण मी फेसबुकवर पण माझ्या एका समूह-पृष्ठावर प्रसिद्ध करणार आहे. जिज्ञासूनी (https://www.facebook.com/CircularReality) या दूव्यावर क्लिक करुन सदस्यता घ्यावी. हे मराठी किंवा इंग्रजी भाषेतून सोयीनुसार केले जाईल.

आकाशात सतत काही ना काही ग्रह योग सतत चालु असतात. प्रचलित समजुतीप्रमाणे हे योग ज्या राशीमधुन होतात, त्या राशींच्या लोकांना कसे जातील हे स्थूल मानाने सांगितले जाते. पण हे असे सांगितलेले भविष्य अनेकदा चुकते कारण ग्रहयोगांच्या प्रभाव क्षेत्राचा विचार राशीनुसार वर्तवलेल्या भविष्यात केला जात नाही.

एखादा ग्रह-योग आपल्यासाठी महत्चाचा केव्हा मानावा? आपल्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांचे अंश आणि ग्रहयोगाचे अंश समान असतील तर अनुभवाला येण्याची शक्यता जास्त असते. ग्रहयोगाच्या दर्जानुसार या अंशाच्या अलिकडे आणि पलिकडे काही क्षेत्र या योगांचे प्रभावक्षेत्र मानले जाते. म्हणुन अंश समान किंवा प्रभाव क्षेत्रात असतील तर तो ग्रहयोग आपल्यासाठी महत्त्वाचा मानावा.

तेव्हा माझी नम्र सूचना अशी की ज्यांना आपल्या भविष्यात डोकवायचे आहे त्यानी केवळ आपल्या राशीचे भविष्य न बघता आपल्या पत्रिकेतील रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य यांचे अंश जाणुन घ्यावेत आणि मग एखादे ग्रहयोगाचे भाकीत आपल्यासाठी महत्त्वाचे आहे की नाही ते ठरवावे.

सध्याचे ग्रहमान

गुरु-प्लुटो-हर्षल यांच्यात सायन मेष-कर्क-मकर राशीतुन तयार झालेली टि-स्क्वेअर ही रचना अतिशय शक्तीशाली रचना आहे. ज्यांचे रवि, चंद्र, लग्न आणि ख-मध्य या रचनेत सापडले आहेत. त्यांच्या आयुष्यात मोठे आणि आमुलाग्र बदल सध्या चालु असण्याची शक्यता आहे. हे बदल साडेसाती पेक्षा जास्त त्रासदायक ठरू शकतात.

येत्या १५ तारखेला दोन महत्त्वाचे ग्रह-योग पत्रिकेत होत आहेत

- बुध-हर्षल युती

वर उल्लेख केलेल्या टि-स्क्वेअर या रचनेत बुध पण योगदान करत असल्याने ही रचना अधिक बलवान होते. वर म्हटल्या प्रमाणे आयुष्यात मोठ्या बदलाना ज्याना सामोरे जावे लागत असेल त्यांना अचानक अस्वस्थ करणारी बातमी या ग्रहयोगात ऐकायला मिळु शकते.

- पौर्णिमा (चंद्रग्रहण)

सायन मेष-तूळ राशीतुन २५ अंशावर ही पौर्णिमा होत आहे. याच दिवशी चंद्र-ग्रहण पण आहे. पण पौर्णिमेतील रवी-चंद्रांनी कोणतेही महत्त्वाचे योग केले नसल्याने जन्मपत्रिकेत २५ अंशावर जे ग्रहयोग होत असतील त्याप्रमाणे पौर्णिमेची फले मिळु शकतात.

जाता-जाता

नुकताच यु-ट्युबवर उत्क्रांतीवर एक व्हीडीओ (https://www.youtube.com/watch?v=hOfRN0KihOU&list=UUsXVk37bltHxD1rDPwtNM8Q) बघितला. त्यात कळलेली महत्वाची माहिती माझ्या अंदाजाना पुष्टी देणारी ठरली. नारळीकरांच्या कंपुने ज्योतिषाची चाचणी केली तेव्हा तेव्हा मी तेव्हा मतिमंदत्वाचे भाकीत करायला आई-वडीलांच्या पत्रिका बघायला हव्यात असे मत व्यक्त केले होते. याचे कारण असे की गर्भधारणेच्या काळातील आईवडीलांवरचे ताणतणाव जनुकीय-बदल घडवुन कारणीभूत ठरत असावेत असा माझा कयास होता. आत्यंतिक तणावांनी मेंदुच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतोच पण उतार वयात अल्झायमर सारखे विकार पण जडु शकतात. त्यामुळे गर्भधारणेच्या काळातील काळातील आईवडीलांवरचे ताणतणाव मतिमंदत्वास कारणीभूत ठरत असणार... हे ताणतणाव पत्रिकेत स्पष्ट्पणे दिसतात हे वेगळे सांगावयास नको.

असो. माझी अपेक्षा पूर्ण न झाल्याने मला चाचणीत भाग घेता आला नाही. पण ही चाचणी विश्वासार्ह किती मानायची हा मुद्दा उरतोच...

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०१४

डॉ एन राजम

काल मी साक्षात् सरस्वतीची छबी माझ्या कॅमेर्‍यात टिपली.

सरस्वती नेहमी वीणावादन करते. पण तिला वीणा वाजवायचा कंटाळा येतो तेव्हा ती व्हायोलिनपण वाजवते. ही व्हायोलिनधारक सरस्वती म्हणजेच पद्मभूषण डॉ एन राजम.

विम व्हॅन देर मिर नावाचा एक संगीत अभ्यासक (musicologist) एकदा पंडित उदय भवाळकरांकडे भेटला होता. त्याने बोलताना प्रश्न स्वत:च एक प्रश्न उपस्थित केला आणि स्वत:च त्याचे उत्तर देऊन टाकले. तो म्हणाला, "खरा श्रेष्ठ म्युझिशिअन कोण?" "जो दोन सुरांमधले अवकाश दाखवु शकतो तो". त्याची ही व्याख्या मला एकदम मनोमन पटली. पण काल श्रीमती एन राजम यांचे व्हायोलीन ऐकताना ही व्याख्या थोडी आणखी सुधारावी असे वाटले -



"खरा श्रेष्ठ म्युझिशिअन कोण?"

"जो दोन सुरांमधला आणि दोन मात्रांमधले अवकाश दाखवु शकतो तो"

एन राजम ओंकारनाथ ठाकुरांकडे शिकल्या. पण मला स्वत:ला, का कुणास ठाउक, ओंकारनाथ ठाकुर एव्हढे भावले नाहीत, पण राजम बाईंच्या व्हायोलिनमधुन जे दिसले ते एक प्रकारचे ठाकुरांचे स्वरानी रंगवलेले भन्नाट चित्रच म्हणावे लागेल. मला ते जास्त भावले. मूळ विषयापेक्षा कधीकधी आपल्याला प्रतिमा, प्रतिबिंब जास्त आवडते, तसे काहीसे हे म्हणता येईल.



तांत्रिक कारणामुळे तासभर उशीरा सुरु झालेल्या कार्यक्रमात पंडित सुरेश तळवळकरांचा, योगाचार्य व्यवहारे आणि पं. शेवलीकर यांचा सत्कार करण्यात आला. तेव्हा बोलताना तळवळकरांनी रियाझ आणि साधना यातला फरक सांगितला. तो असा, "रियाझ उणे अहम् म्हणजे साधना".

ही पण व्याख्या बरेच काही सांगुन जाते.

तुंडुंब भरलेल्या प्रेक्षागृहात राजम बाईनी तासभर यमन मग एक नाट्यपद आणि शेवटी भैरवी वाजवली. तबल्यावर रामदास पळसुले आणि व्हायोलिन साथ राजम यांची नात रागिणी शंकर हिने केली. रागिणी आपल्या आजीचा दिव्य वारसा पुढे चालवणार यात शंकाच नाही.

मी व्हायोलीनबरोबर काहीकाळ झटापट केलेली आहे. त्यामुळे "व्हायोलिन कशाशी खातात" हे मला पुरेपुर ठाउक आहे. गुंतागुंतीच्या स्वरकृतीनी नटलेले हे वादन अचंबित करणारे होतेच पण तरीही प्रासादिकतेला कुठेही धक्का पोचला नव्हता. पण एक मात्र खरे दोन शैलींचा संकर जेव्हा राजम यांच्या सारखा समर्थ कलाकर घडवतो, तेव्हा तो जे नवे निर्माण होते, ते कलेचा प्रवाह खळाळत पुढेच नेते.

काल मी डॉ एन राजमना मैफलीत प्रथमच ऐकले पण मला त्यांचे फोटो पण काढता आले. "हर्षेण जाता मम काप्यवस्था न तामहं वर्णयितुं समर्थ:..."

शुक्रवार, ७ फेब्रुवारी, २०१४

मी खरा कोण?

मी खरा कोण?
=========

मला माझ्या वडिलांच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही आहे
पण त्यांच्या आईवडिलांबद्दल यत्किंचितही प्रेम नाही.
आदर तर त्याहून नाही...

आज वडिलांचे वडिल हयात असते तर
मी त्यांना कदाचित चपलेने मारायला कमी केले नसते.

मला उपाध्ये कुळाकडुन उपाध्ये या आडनावाशिवाय काही मिळाले नाही.
जे काही मिळाले ते मातृकुळाकडुन मिळाले आणि ते खूप मिळाले.
संस्कार, जीवनदृष्टी आणि बरेच काही.
त्याला तोड नाही, असेच म्हणेन.

पण बर्‍याच लोकाना
माझे हे विचार आवडत नाहीत.
(माझे आईवडिल त्यात येत नाहीत)

नुकताच मी गुणसूत्रांच्या पातळीवर विचार केला ...

मी पुरुष म्हणजे माझ्यातील गुणसूत्रे "क्ष-य".
विज्ञान म्हणतं,
क्ष गुणसूत्रामध्ये २००० जनुके (genes)असतात
तर य गुणसूत्रामध्ये फक्त ७८ (genes) जनुके असतात.

म्हणजे २००० वाला क्ष आणि ७८ वाला य
यात खरा सामर्थ्यवान कोण
असा आता प्रश्न मला पडला आहे.
"य" मुळे मला फक्त पुरुषत्वाची "कार्ये" मिळाली
बाकी सगळं "क्ष" कडुन मिळालं.

मग मी खरा कोण?
"क्ष" की "य"?

मंगळवार, ४ फेब्रुवारी, २०१४

रहस्य



वयाच्या पन्नासाव्या वर्षी यश आणि प्रगती यांचे मला सापडलेले रहस्य असे आहे -

१. केवळ स्वत:च्या क्षमतेवर ठराविक मर्यादेपर्यंतच पल्ला गाठता येतो. आपली क्षमता विकास पावण्यात
   आजुबाजुची परिस्थिती निर्णायक ठरते.

२. त्यापुढचा पल्ला तुमची संपर्कक्षमता, तुम्ही कुणाचे कोण यावर ठरतो.

३. लोकाना मोठं केल्याशिवाय आपल्याला मोठं होता येत नाही. मोठं अशांनाच करायचे असते की आपल्या प्रगतीचे त्यांना दु:ख होणार नाही!

(ज्यांना तुमच्या प्रगतीत वाटेकरी होता येत नाही ते तुमच्या प्रगतीत काटे पसरवु शकतात!)

हे सर्व टप्पे एकमेकात मिसळेले असतात...किंबहुना मिसळेलेले असतील तर प्रत्येक टप्प्यावरचा संघर्ष थोडासा तरी सुसह्य होतो!

रविवार, १९ जानेवारी, २०१४

विवाह कायदा आणि विधी



मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...

स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते. त्यामुळे विवाह विधींच्या तपशीलात डॊकावले तर समाजाची गरज ठळकपणे दिसते.

पण मी माझ्या मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे आजची स्त्री मुक्त आहे किंवा मुक्त होऊ पहात आहे. पूर्वी डझन-अर्धा डझन मुलं होणे हे ’नॉर्मल’ असताना ’स्त्री परक्याचे धन’ ही कल्पना समाज स्वीकारू शकत होता. आज हे शक्य आहे का? मला वाटते नाही...

एकेकटी मुले असणारी कुटुंबे हे आज सर्वत्र दिसणारे चित्र आहे. अशा वेळेस जर एकुलती एक मुलगी असेल, त्यात ती शिकलेली आणि कमावती असेल तर ती मुक्त किंवा मुक्त होऊ पहाणारी स्त्री  "परक्याचे धन" मानायला  कितीजणी (किंवा त्यांचे आईबाप) तयार होतील?
अशा परिस्थितीमध्ये ’माहेरचे पाश’ स्त्रीने तोडायची अपेक्षा ठेवणे हे पण अव्यवहार्यच ठरते. असो...

आता आपण ’नाते’ ही संकल्पना तपासुन पाहु. सुरुवातीला नात्याची व्याख्या करणे योग्य ठरेल - दोन व्यक्तीमधला व्यवहार (अथवा संबंध) त्या कोणत्याही एका किंवा दोन्ही व्यक्तींची  तात्कालिक अथवा दीर्घकालीन कोणतीही गरज भागवत असेल तर त्या दोन व्यक्तीमध्ये तात्कालिक अथवा दीर्घकालीन नाते असते. यातील काही नात्याना मित्र, मालक-नोकर, आईबाप, नवरा-बायको अशी नावे मिळालेली आहेत तर कदाचित काही नात्याना अशी नावे नसतील.

दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते.

या सर्व पार्श्वभूमीवर नवरा-बायकोचे नाते दीर्घकाळ टिकावे किंवा त्या नात्यात प्रवेश करताना जबाबदारीची जाणीव परस्पराना अधिक थेटपणे व्हावी याठी सुस्पष्ट "शपथ" घेतली जावी असे मला वाटते.

मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते."अशी शपथ घेणे जास्त योग्य ठरेल.

मला असं वाटतं अशा प्रकारच्या शपथेने "लग्न" समाजात जास्त गांभीर्याने  घेतले जाईल. कृपया हे अभिप्रेत असतच असा प्रतिवाद करु नये. देशाच्या घटनेवर विश्वास आहे हे गृहित धरणं आणि तसे ऍसर्ट करणे यात बराच गुणात्मक फरक आहे.

रविवार, ५ जानेवारी, २०१४

शेपूट

एकदा करटक आणि दमनक नावाचे दोन कोल्हे एका वृक्षाच्या स्निग्ध छायेत निवांतपणे काव्यशास्त्रविनोद करत बसले होते. करटकाने दमनकाला विचारले, "दमनका, कानावर आलं आहे की पलिकडच्या जंगलातला एक कोल्ह्यांचा कळप आता फुटला आहे आणि आता त्यातले आपले बांधव स्वतंत्रपणे शिकार करून आपला जीवनक्रम व्यतीत करत आहेत. कळपाला सोडायची अशी दूर्बुद्धी त्यांना का बरे झाली असावी?"

दमनक म्हणाला, "समूहात राहण्याचे फायदे  तोपर्यंतच असतात जोपर्यंत कळप त्या सदस्याची कसली ना कसली गरज भागवतो. ही गरज भागेनाशी झाली किंवा कळप जर सदस्याच्या अस्मितेला खुडायचे काम करत असेल तर कळप फुटतो."

करटकाने विचारले, "हे कसे?"

दमनक म्हणाला, "ऐक तर! एक घनदाट जंगल होतं...त्यात अनेक हिंस्र श्वापदे वास्तव्य करुन होती. त्यात पीतपुच्छ नावाचा एक देखणा कोल्हा आपल्या जातभाईंबरोबर शिकार करुन जीवन व्यतीत करत होता.

पीतपुच्छाची कोल्हेकुई ऐकुन अनेक कोल्हीणी घायाळ होतच, पण त्याची रुबाबदार, झुबकेदार शेपूट पण अनेक कोल्ह्यांच्या वैषम्याचा विषय ठरली होती. पीतपुच्छ कधी कळपाबरोबर शिकारीला जाई, तर कधी आपली रुबाबदार शेपटी उंचावुन हुंदडत बसे.

एके दिवशी कळपाबरोबर शिकारीला गेला असताना पीतपुच्छ कोल्ह्याच्या कळपावर गिधाडांनी हल्ला चढवला. जिवाच्या आकांताने पीतपुच्छाने धुम ठोकली. पळतापळता कळपापासुन तो वेगळा झाला आणि काटेकुटे, डोंगरदर्‍यांची पर्वा न करता तो पळत राहिला. एकटा पडलेल्या पीतपुच्छाला सोडतील तर ती गिधाडे कसली? त्या गिधाडांनी पण आकाशातुन त्याचा पाठलाग करायचा आणि जमेल तेव्हा झडप घालायचा प्रयत्न चालु ठेवला. त्या झटापटीत एक गिधाडाने पीतपुच्छाची शेपटी पकडली आणि करकचुन चावली. त्या चाव्याने खरं तर शेपटीचा तुकडाच पडायचा पण सुदैवाने मध्येच आलेल्या दगडाच्या कपारीमध्ये पीतपुच्छ शिरला आणि प्रतिहल्ला करुन गिधाडाना परतवुन लावले.

या झटापटित पीतपुच्छाची रुबाबदार शेपूट रक्तबंबाळ झाली. खरं तर ती तुटायचीच... पण दैव बलवत्तर होते म्हणुन वाचली.

त्याच दगडाच्या कपारीत कशीबशी रक्तस्राव थांबेपर्यंत त्याने वाट बघितली. नंतर मग ठणकणारी शेपूट घेऊन त्याने ३-४ दिवस आपला कळप शोधण्यात घालवली. शेवटी एकदाचा त्याला आपला कळप सापडला. पीतपुच्छाला पाहताच सर्व कोल्हीणी आनंदित झाल्या. पण हा आनंद फार टिकणार नव्हता. दुखर्‍या शेपटीच्या वेदनेने पीतपुच्छाचे गायन बंद पडले, तसेच कळपाबरोबर शिकार करणे पण पीतपुच्छाला कठीण झाले. पीतपुच्छ शिकारीला येईना तेव्हा बाकीच्या कोल्ह्याना त्याचा राग आला. एका वृद्ध आणि जाणत्या कोल्ह्याने त्याला सुचविले की, "ही शेपूट तू तोडुन का टाकत नाहीस?"

"आपल्या कळपात किती तरी जणांची शेपूट तुटली आहे. आणि ते सुखाने आयुष्य जगत आहेत".
एक-दोन शेपूट तुटलेल्या कोल्हयानी माना डोलवुन दुजोरा दिला.

त्यावर दुसरा एक अनुभवी कोल्हा म्हणाला, "केवळ वेदना आहे म्हणुन शेपटी तोडुन टाकणे हे शहाणपणाचे नक्कीच नाही. आज ना उद्या वेदना थांबु शकते. एकदा शेपटी तुटली की टिंगलटवाळी करायला सर्वाना निमित्त मिळते. तेव्हा शेपूट तोडुन टाकू नये असे मला वाटते. पीतपुच्छाची जखम बरी होईपर्यंत आपण त्याला सवलत द्यायलाच हवी कारण आजवर त्याने आपल्याला शिकारीत केलेली मदत विसरून चालणार नाही."

यावर कळपात मग बरेच चर्वितचर्वण झाले. शेपूट तुटलेल्या कोल्ह्यानी शेपूट नसण्याचे फायदे उच्चरवाने सांगितले. तेव्हा शेपूट असलेले आणि नसलेले कोल्हे-कोल्हीणी एकमेकांना फिदीफिदी हसलेच..

पीतपुच्छाला केवळ दुखते म्हणुन शेपूट तोडुन टाकणे पसंत नव्हते. "कळपावर माझी जबाबदारी अशी किती आहे की मी त्यांच्या मर्जी प्रमाणे माझे आयुष्य जगावे", असा विचार त्याने केला. आज ना उद्या दुखणे थांबेल मग आपण पूर्ववत शिकार करू शकु अशी त्याला आशा होती. त्याने शिकारीत आपला भार नको म्हणुन  कळपाला रामराम ठोकला. पुढे त्याची शेपूट बर्‍यापैकी बरी झाली आणि त्याने पूर्ववत् जीवनक्रम आरंभिला."

येथवर गोष्ट सांगुन दमनक म्हणाला, " म्हणुनच कळपाने आपण सदस्याची गरज किती भागवतो याची वेळोवेळी तपासणी करावी आणि मगच शहाणपणा शिकवावा. नाहीतर कळपाची शकले व्हायला वेळ लागत नाही".

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

खात्री



सर,


तुम्ही फारच विकलांग झाला आहात!


अलिकडे बर्‍याचदा तुम्ही
या देवळाच्या पायरीवर
नाही तर त्या चौकातल्या बाकावर
कुणाला तरी शोधत असता.


जेव्हा जेव्हा मी तुम्हाला
बघतो तेव्हा अजिबात थांबावसं
वाटतं नाही की
चवकशी कराविशी वाटत नाही.


कारणे अनेक आहेत,
पण तो प्रसंग अजुनही चांगला
लक्षात आहे.


"अरे! तुझी स्वप्नं भंग पावली!"
असं तुम्ही बसमध्ये एकदा
भेट झाली तेव्हा हिणवले होते...


कदाचित
माझ्या स्वप्नांमध्ये
तुम्हाला काही वाटा नव्हता
म्हणुन असेल.


पण असो
काळ असा ना तसा,
आज ना उद्या,
न्याय करतो

तुमची भिरभिरती नजर
बघुन माझी
खात्री पटली आहे.