गुरुवार, ३० मे, २०१३

वैदिक धर्माचे शास्त्रीय अधिष्ठान किंवा वेदांत विज्ञान कसे आले : एक शोध



जे जे वैदिक आहे ते पूर्णपणे शास्त्रीय आहे आणि म्हणुनच वैदिकधर्म हा एकच धर्म असा आहे की ज्याला पूर्णपणे शास्त्रीय अधिष्ठान आहे. हा महत्त्वाचा साक्षात्कार आत्ताच आम्हाला झाला. केवळ "शहाणे करून सोडावे सकळ जन" हे आमचे ब्रीद असल्यानेच हा स्टेटस-पोस्ट-प्रपञ्च...

संस्कृत मध्ये असलेला विद्‍ हा धातु वेद या शब्दाच्या मुळाशी आहे, हे सर्वाना ठाऊक आहे. पण विद्‍ आणि वेद यांना जोडणारी महत्त्वाची आर्ष संकल्पना म्हणजे विदा (डेटा) होय. वैदिक हा शब्द विदा पासून निर्माण होतो, जसे निसर्ग-नैसर्गिक. सांगायचे तात्पर्य असे की निसर्ग अगोदर असल्याशिवाय नैसर्गिक ही कल्पना अस्तित्वात येऊ शकत नाही त्याप्रमाणेच विदा अस्तित्वात असल्याशिवाय वैदिक, वेदादि संकल्पना निर्माण होऊ शकत नाहीत. विदा म्हणजे आमच्या रानटी ऋषीपूर्वजांनी केलेल्या इंद्रियगम्य निरीक्षणातून जी माहिती गोळा केली ती. विदा अस्तित्वात असल्याशिवाय वेद रचणे आणि वेदांत विज्ञान मांडणे केवळ अशक्य आहे असे आमचे आग्रहाचे मत आहे. विदा साठविण्याची कोणतीही आधुनिक साधने उपलब्ध नसल्याने हे विदाजन्य म्हणजेच वैदिक ज्ञान आमच्या ऋषीपूर्वजांनी मौखिकपद्धतीने जतन आणि संक्रमण करण्याचा उद्योग आरंभिला. कोणत्याही विद्यातून एखादा आलेख, त्यात लपलेले गणिती सूत्र जेव्हा विद्वान/शास्त्रज्ञ बाहेर काढतात (आणि शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध करतात) तेव्हा विद्याचे महत्त्व तसे संपुष्टातच येते. तद्वतच आमच्या ऋषीपूर्वजांनी गोळा केलेल्या विद्यातून जे ज्ञानकण वेचले, ते सूक्तांच्या रूपाने ग्रथित केल्यावर आमचे ऋषीपूर्वज विदा नष्ट करते झाले. त्यांनी शोधलेल्या जटा-घनपाठादि कल्पना वापरून जर विदा जर जतन केला गेला असता, तर हजारो वर्षे टिकून राहिलेल्या वैदिक परंपरेने दक्षिणेच्या रुपाने केव्हढा मोठा आर्थिक भार मधल्या काळातल्या आश्रयदात्या राजवटींवर टाकला गेला असता, याची कल्पनाच केलेली बरी. मुख्य म्हणजे ऋक्सामयजुर्वेदादि शाखांचे अध्ययन/पठण करणार्‍या ब्राह्मणांप्रमाणे कदाचित विदापठण करणारी ब्राह्मणांची एक (किंवा अधिक) शाखा निर्माण झाली असती.

आज विदापठण अस्तित्वात नसले तरी वेदकाळात विदापठण अस्तित्वात असावे आणि अग्निचयना सारखा विदाचयन असा एखादा विधी वेदकालात अस्तित्वात असावा (जो पुढे वर दिलेल्या कारणांमुळे नाहिसा झाला) असे आमचे आणि आमच्यासारख्या अनेक इंडॉलॉजिस्टांचे मत आहे. विदाचयनाच्या वेळी सूक्त करते ऋषि होमात आज्याची आहुती देत आणि विद्यातील संगती शोधायचा प्रयत्न करत. ही संगती सापडल्यावर त्यांनी जी सूक्ते रचली ती म्हणजे आजचे वेद आणि वेदांतील विज्ञान होय.

असो. सनातन प्रभात सारख्या संस्था, प. वि. वर्तकांसारखे पुण्यश्लोक द्रष्टे हे वेदांतले अमूल्य विज्ञान लोकांना सांगायचा जेव्हा प्रयत्न करतात तेव्हा त्यांची जी निंदा-नालस्ती केली जाते ते बघुन आम्ही व्यथित होतो. पण भविष्यात या भारतवर्षात एक दिवस असा नक्की उगवेल की घराघरात वैदिक-आज्याचा(*) ज्ञानदीप घराघरात पेटेल आणि "विदा दाखवा" अशा सारख्या आरोळ्या ठोकणार्‍या श्री. घासकडवी आणि इतर जालकंटकांची तोंडे कायमची बंद होतील अशी आशा करुयात...

* विदारुपी तुपाचा

1 टिप्पणी:

अनामित म्हणाले...

आपले स्वत्व (ego) सिद्ध करणे ही तुमच्यामाझ्यासकट प्रत्येकाची गरज असते. घासकडबी ही गरज भागविण्यासाठी वेदात विज्ञान नाही असे मानतात. आपण त्याना उत्तर देण्यापेक्षा आपला अभ्यास चालू ठेवणे योग्य ठरेल