रविवार, १९ जानेवारी, २०१४

विवाह कायदा आणि विधी



मी पूर्वी सप्तपदी विधीच्या आधुनिक काळातील अव्यवहार्यतेबद्दल पुरुषांची बाजु घेऊन लिहीले होते. त्याला बराच काळ लोटला आहे आणि तेव्हा उडालेली धूळ आता खाली बसली आहे. तरीही मी दरम्यानच्या काळात माझी भूमिका परत-परत तपासत होतो. ही भूमिका तपासत असताना काही गोष्टी नव्याने लक्षात आल्या...

स्त्री बद्ध असताना, स्त्री हे परक्याचे धन अशी समजुत समाजात प्रचलित असताना पुरुषाला जबाबदारीची जाण यावी म्हणून ’नातिचरामि’चा उच्चार करणे ही अपेक्षा स्वाभाविक ठरते. पुरुषवंशाची वृद्धी आणि स्थैर्य यासाठी समर्पण करून स्त्रीने माहेरचे पाश तोडणे हे समाजाला अपेक्षित होते. त्यामुळे विवाह विधींच्या तपशीलात डॊकावले तर समाजाची गरज ठळकपणे दिसते.

पण मी माझ्या मूळ लेखात म्हटल्याप्रमाणे आजची स्त्री मुक्त आहे किंवा मुक्त होऊ पहात आहे. पूर्वी डझन-अर्धा डझन मुलं होणे हे ’नॉर्मल’ असताना ’स्त्री परक्याचे धन’ ही कल्पना समाज स्वीकारू शकत होता. आज हे शक्य आहे का? मला वाटते नाही...

एकेकटी मुले असणारी कुटुंबे हे आज सर्वत्र दिसणारे चित्र आहे. अशा वेळेस जर एकुलती एक मुलगी असेल, त्यात ती शिकलेली आणि कमावती असेल तर ती मुक्त किंवा मुक्त होऊ पहाणारी स्त्री  "परक्याचे धन" मानायला  कितीजणी (किंवा त्यांचे आईबाप) तयार होतील?
अशा परिस्थितीमध्ये ’माहेरचे पाश’ स्त्रीने तोडायची अपेक्षा ठेवणे हे पण अव्यवहार्यच ठरते. असो...

आता आपण ’नाते’ ही संकल्पना तपासुन पाहु. सुरुवातीला नात्याची व्याख्या करणे योग्य ठरेल - दोन व्यक्तीमधला व्यवहार (अथवा संबंध) त्या कोणत्याही एका किंवा दोन्ही व्यक्तींची  तात्कालिक अथवा दीर्घकालीन कोणतीही गरज भागवत असेल तर त्या दोन व्यक्तीमध्ये तात्कालिक अथवा दीर्घकालीन नाते असते. यातील काही नात्याना मित्र, मालक-नोकर, आईबाप, नवरा-बायको अशी नावे मिळालेली आहेत तर कदाचित काही नात्याना अशी नावे नसतील.

दीर्घकालीन नात्याना स्थैर्य लाभावे म्हणुन जबाबदारीचे भान यावे यासाठी आकारीक/कायदेशीर करार, शपथा या अपरिहार्य ठरतात. शपथांचे/करारांचे गांभीर्य टिकावे म्हणुन त्या मोडणे दंडनीय ठरते.

या सर्व पार्श्वभूमीवर नवरा-बायकोचे नाते दीर्घकाळ टिकावे किंवा त्या नात्यात प्रवेश करताना जबाबदारीची जाणीव परस्पराना अधिक थेटपणे व्हावी याठी सुस्पष्ट "शपथ" घेतली जावी असे मला वाटते.

मला सध्याच्या बदलत्या संदर्भात "मी अमुक-तमुक चा पति-पत्नी म्हणुन स्वीकार करतो. मी पति-पत्नी म्हणुन अमुक-तमुकच्या शारिरीक, मानसिक, भावनिक, बौद्धिक गरजा भागविण्याची जबाबदारी घेतो/घेते."अशी शपथ घेणे जास्त योग्य ठरेल.

मला असं वाटतं अशा प्रकारच्या शपथेने "लग्न" समाजात जास्त गांभीर्याने  घेतले जाईल. कृपया हे अभिप्रेत असतच असा प्रतिवाद करु नये. देशाच्या घटनेवर विश्वास आहे हे गृहित धरणं आणि तसे ऍसर्ट करणे यात बराच गुणात्मक फरक आहे.

रविवार, ५ जानेवारी, २०१४

शेपूट

एकदा करटक आणि दमनक नावाचे दोन कोल्हे एका वृक्षाच्या स्निग्ध छायेत निवांतपणे काव्यशास्त्रविनोद करत बसले होते. करटकाने दमनकाला विचारले, "दमनका, कानावर आलं आहे की पलिकडच्या जंगलातला एक कोल्ह्यांचा कळप आता फुटला आहे आणि आता त्यातले आपले बांधव स्वतंत्रपणे शिकार करून आपला जीवनक्रम व्यतीत करत आहेत. कळपाला सोडायची अशी दूर्बुद्धी त्यांना का बरे झाली असावी?"

दमनक म्हणाला, "समूहात राहण्याचे फायदे  तोपर्यंतच असतात जोपर्यंत कळप त्या सदस्याची कसली ना कसली गरज भागवतो. ही गरज भागेनाशी झाली किंवा कळप जर सदस्याच्या अस्मितेला खुडायचे काम करत असेल तर कळप फुटतो."

करटकाने विचारले, "हे कसे?"

दमनक म्हणाला, "ऐक तर! एक घनदाट जंगल होतं...त्यात अनेक हिंस्र श्वापदे वास्तव्य करुन होती. त्यात पीतपुच्छ नावाचा एक देखणा कोल्हा आपल्या जातभाईंबरोबर शिकार करुन जीवन व्यतीत करत होता.

पीतपुच्छाची कोल्हेकुई ऐकुन अनेक कोल्हीणी घायाळ होतच, पण त्याची रुबाबदार, झुबकेदार शेपूट पण अनेक कोल्ह्यांच्या वैषम्याचा विषय ठरली होती. पीतपुच्छ कधी कळपाबरोबर शिकारीला जाई, तर कधी आपली रुबाबदार शेपटी उंचावुन हुंदडत बसे.

एके दिवशी कळपाबरोबर शिकारीला गेला असताना पीतपुच्छ कोल्ह्याच्या कळपावर गिधाडांनी हल्ला चढवला. जिवाच्या आकांताने पीतपुच्छाने धुम ठोकली. पळतापळता कळपापासुन तो वेगळा झाला आणि काटेकुटे, डोंगरदर्‍यांची पर्वा न करता तो पळत राहिला. एकटा पडलेल्या पीतपुच्छाला सोडतील तर ती गिधाडे कसली? त्या गिधाडांनी पण आकाशातुन त्याचा पाठलाग करायचा आणि जमेल तेव्हा झडप घालायचा प्रयत्न चालु ठेवला. त्या झटापटीत एक गिधाडाने पीतपुच्छाची शेपटी पकडली आणि करकचुन चावली. त्या चाव्याने खरं तर शेपटीचा तुकडाच पडायचा पण सुदैवाने मध्येच आलेल्या दगडाच्या कपारीमध्ये पीतपुच्छ शिरला आणि प्रतिहल्ला करुन गिधाडाना परतवुन लावले.

या झटापटित पीतपुच्छाची रुबाबदार शेपूट रक्तबंबाळ झाली. खरं तर ती तुटायचीच... पण दैव बलवत्तर होते म्हणुन वाचली.

त्याच दगडाच्या कपारीत कशीबशी रक्तस्राव थांबेपर्यंत त्याने वाट बघितली. नंतर मग ठणकणारी शेपूट घेऊन त्याने ३-४ दिवस आपला कळप शोधण्यात घालवली. शेवटी एकदाचा त्याला आपला कळप सापडला. पीतपुच्छाला पाहताच सर्व कोल्हीणी आनंदित झाल्या. पण हा आनंद फार टिकणार नव्हता. दुखर्‍या शेपटीच्या वेदनेने पीतपुच्छाचे गायन बंद पडले, तसेच कळपाबरोबर शिकार करणे पण पीतपुच्छाला कठीण झाले. पीतपुच्छ शिकारीला येईना तेव्हा बाकीच्या कोल्ह्याना त्याचा राग आला. एका वृद्ध आणि जाणत्या कोल्ह्याने त्याला सुचविले की, "ही शेपूट तू तोडुन का टाकत नाहीस?"

"आपल्या कळपात किती तरी जणांची शेपूट तुटली आहे. आणि ते सुखाने आयुष्य जगत आहेत".
एक-दोन शेपूट तुटलेल्या कोल्हयानी माना डोलवुन दुजोरा दिला.

त्यावर दुसरा एक अनुभवी कोल्हा म्हणाला, "केवळ वेदना आहे म्हणुन शेपटी तोडुन टाकणे हे शहाणपणाचे नक्कीच नाही. आज ना उद्या वेदना थांबु शकते. एकदा शेपटी तुटली की टिंगलटवाळी करायला सर्वाना निमित्त मिळते. तेव्हा शेपूट तोडुन टाकू नये असे मला वाटते. पीतपुच्छाची जखम बरी होईपर्यंत आपण त्याला सवलत द्यायलाच हवी कारण आजवर त्याने आपल्याला शिकारीत केलेली मदत विसरून चालणार नाही."

यावर कळपात मग बरेच चर्वितचर्वण झाले. शेपूट तुटलेल्या कोल्ह्यानी शेपूट नसण्याचे फायदे उच्चरवाने सांगितले. तेव्हा शेपूट असलेले आणि नसलेले कोल्हे-कोल्हीणी एकमेकांना फिदीफिदी हसलेच..

पीतपुच्छाला केवळ दुखते म्हणुन शेपूट तोडुन टाकणे पसंत नव्हते. "कळपावर माझी जबाबदारी अशी किती आहे की मी त्यांच्या मर्जी प्रमाणे माझे आयुष्य जगावे", असा विचार त्याने केला. आज ना उद्या दुखणे थांबेल मग आपण पूर्ववत शिकार करू शकु अशी त्याला आशा होती. त्याने शिकारीत आपला भार नको म्हणुन  कळपाला रामराम ठोकला. पुढे त्याची शेपूट बर्‍यापैकी बरी झाली आणि त्याने पूर्ववत् जीवनक्रम आरंभिला."

येथवर गोष्ट सांगुन दमनक म्हणाला, " म्हणुनच कळपाने आपण सदस्याची गरज किती भागवतो याची वेळोवेळी तपासणी करावी आणि मगच शहाणपणा शिकवावा. नाहीतर कळपाची शकले व्हायला वेळ लागत नाही".

रविवार, २४ नोव्हेंबर, २०१३

खात्री



सर,


तुम्ही फारच विकलांग झाला आहात!


अलिकडे बर्‍याचदा तुम्ही
या देवळाच्या पायरीवर
नाही तर त्या चौकातल्या बाकावर
कुणाला तरी शोधत असता.


जेव्हा जेव्हा मी तुम्हाला
बघतो तेव्हा अजिबात थांबावसं
वाटतं नाही की
चवकशी कराविशी वाटत नाही.


कारणे अनेक आहेत,
पण तो प्रसंग अजुनही चांगला
लक्षात आहे.


"अरे! तुझी स्वप्नं भंग पावली!"
असं तुम्ही बसमध्ये एकदा
भेट झाली तेव्हा हिणवले होते...


कदाचित
माझ्या स्वप्नांमध्ये
तुम्हाला काही वाटा नव्हता
म्हणुन असेल.


पण असो
काळ असा ना तसा,
आज ना उद्या,
न्याय करतो

तुमची भिरभिरती नजर
बघुन माझी
खात्री पटली आहे.

सोमवार, १८ नोव्हेंबर, २०१३

मूल्यमापन


आत्ताच फेसबुकवर एक प्रतिष्ठित प्रोफाइल बघत होतो. त्या प्रोफाइलच्या फोटोत एक मी काढलेला एक फोटो दिसला म्हणुन फोटोवर क्लिक केले आणि प्रतिक्रिया बघितल्या. फोटोवर ~७० लाईक्स आलेले बघुन मला गुद्गुल्या झाल्या. फोटो सदर प्रोफाइलधारकाच्या मित्र यादीतील एका व्यक्तीने शेअर पण केला होता.

असे मी काढलेल्या काही फोटोंच्या बाबतीत झाले आहे. मला माझ्या फोटोंची चोरी झाली तर फारसे वाईट वाट्त नाही. कारण ती माझ्या कामाला मिळालेली एक पावती आहे असे मी समजतो. सदर प्रतिष्ठित व्यक्तीने प्रामाणिकपणे "हा फोटो मी काढलेला नाही" असे घोषित केले असल्याने सध्या माझा पर्दाफाश वगैरे करायचा पण विचार नाही. पण गमतीचा भाग असा की हाच फोटो माझ्या फेसबुकवरील फोटोग्राफी पेजवर टाकलेला आहे आणि तिथे त्याला फक्त २च लाईक्स आलेले आहेत.

थोडक्यात मी केलेले काम मीच केलेले आहे यावर लोक विश्वास ठेवत नाहीत की याला नशीब म्हणायचे की आणखी काही? मला माहित नाही...

हा लहानपणापासुन सातत्याने येणारा हा अनुभव. या प्रकारातला १ला अनुभव मला शाळेत नववीत असताना आला. मला शाळेच्या मासिकात आपले लिखाण यावे अशी माझी तेव्हा खूप इच्छा होती. तेव्हा त्याचे खूप अप्रूप होते हे मात्र खरे. मी तेव्हा माझे पणजोबा कै. विठठल सीताराम गुर्जर यांच्या लेखनकर्तृत्वाने खुप प्रभावित झालो होतो. घरात आई आणि आजोबा त्यांच्या कथा-कादंबर्‍यांच्या गोष्टी अर्धवट सांगुन बाकी भाग मुळापासुन वाचायला प्रवृत्त करायचे. सुदैवाने माझ्या शाळेच्या ग्रंथालयाने माझी ही गरज मोठ्या प्रमाणात भागवली. मी "सावर्‍यातल्या मामांवर" (गुर्जरांवर) लेख लिहायचा मनोदय आजोबाना सांगितला तेव्हा ते मला पणजीकडे (इंदिराबाई गुर्जरांच्याकडे) आणि इतर नातेवाईकांकडे उत्साहाने घेऊन गेले. इंदिराबाई गुर्जरांनी त्यांच्याकडे असलेले फोटो, अत्र्यांनी मराठात लिहीलेला अग्रलेख, ध्रुव मासिकातील मुलाखत आनंदाने दिली.

घरातुन उत्तेजन मिळाल्याने मी तो लेख एका आठवड्यात एकट्याने लिहून पूर्ण केला. नंतर एक दिवस शाळेच्या वार्षिकासाठी मजकुर पाठवा अशी सूचना वर्गावर्गात फिरली तेव्हा मी मांडकेसरांना जाऊन भेटलो आणि लेख देऊन आलो आणी विसरुन पण गेलो. नंतर ३-४ आठवड्यानी मांडकेसर अचानक वर्गावर आले आणि "राजीव उपाध्ये कोण आहे. जरा बाहेर ये पाहू" असं म्हणुन मला बाहेर बोलावले. नंतर त्यांनी माझी प्राथमिक चवकशी केली आणि "तुझ्या घरात कुणी मराठी घेऊन एमए करत आहे का" असा प्रश्न विचारला. मी गोंधळलो. मी एकुलता एक असल्याने भाऊ-बहीण असण्याचा प्रश्न नव्हता. मग मांडके सर पुढे म्हणाले, "हा लेख मला नववीतल्या मुलाने लिहीलेला वाटत नाही. तु हा एखाद्या एमेच्या विद्यार्थ्याकडुन लिहुन घेतला असावा असे वाटते." त्यावर मी मात्र उडालोच. मग मी सरांना लेख लिहीण्यासाठी काय काय कष्ट घेतले ते कसेबसे समजावले. सरांची समजुत पटली असावी. सरांनी मग तो लेख काटछाट करून परत लिहून आण मग मी तो घेईन असे फर्मावले. मी पडत्या फळाची आज्ञा मानुन तो लेख संपादित केला आणि तो छापुन आल्यावर माझ्या आनंदाला पारावर उरला नाही.

पण गमतीचा भाग अजुन पुढेच होता. उन्हाळ्याची सुट्टी लागली आणि मी शिरस्त्याप्रमाणे कवठेकर सरांच्या घरी गेलो तेव्हा सरांनी माझे नेहेमीपेक्षा जास्त कौतुकाने स्वागत केले. सरांनी माझा लेख वाचला होता. सर मला तसेच त्यांच्या दिवाणखान्यात घेऊन गेले. तिथे त्यांच्या वडिलांशी म्हणजे दत्त रघुनाथ कवठेकरांशी गप्पा मारायला प्रा. म. ना. अदवंत आले होते. कवठेकर सरांनी प्रा. अदवंतांशी माझी ओळख करुन दिली आणि नूमवीय वार्षिक अंकातील माझा लेख त्यांना कौतुकाने वाचायला दिला. प्रा. अदवंतांनी त्यातले अक्षर-अन्-अक्षर वाचले आणि म्हणाले, "अभ्यासपूर्वक लिहीला आहेस, एमेचे विद्यार्थी पण असे लिखाण करत नाहीत". मला मांडके सरांबरोबर झालेला संवाद आठवला आणि अंगावर काटा उभा राहीला.

असे प्रसंग नंतर माझ्या आयुष्यात अनेक आले.

मी कॅलिग्राफी करायचो तेव्हा माझ्या कामाचे श्रेय माझ्या एका मित्राला मिळायचे. तो प्रसिद्ध सुलेखनकार प्रा. र. कृ. जोशींचा विद्यार्थी होता. मी र. कृंकडे एक (ती पण एक दिवसाची) कार्यशाळा वगळता शिकलो असं म्हणता येणार नाही. पण त्यांना काम करताना जेव्हा जेव्हा बघितले, तेव्हा र. कृ माझ्या डोक्यात भिनले. आणि त्यामुळे र.कृ. माझे मानस-गुरु बनले.

नंतर मग अचानक एकदा साक्षात र. कृ. जोशीना माझी कॅलिग्राफी दृष्टीला पडली. ते थबकून ती बराच वेळ न्याहाळत होते. मी तिथेच उभा होतो.

र. कृ. नी विचारले, "हे कुणाचे आर्ट्वर्क आहे?"
मी म्हटले, "सर, माझेच आहे"
"अरे! व्वा. कुणाकडे शिकलात?"
"सर, तुमच्याचकडे" असं म्हणुन मी त्यांना वाकुन नमस्कार केला. त्यावर रकृ गोंधळले आणि बाजुची खुर्ची ओढुन बसले आणि म्हणाले
"तुम्ही माझ्याकडे कधी येत होता?"
मग मी त्यांना सर्व खुलासा केला. त्यावर ते प्रसन्नपणे हसले आणि माझ्या इतर कामाची आस्थेने चवकशी केली आणि कॅलिग्राफी पुढे चालु ठेवायला उत्तेजन दिले. असो.

या सर्व प्रसंगांचा मथितार्थ एकच - आपल्या क्षमतेचे नकारात्मक मूल्यमापन करायला हिरीरीने पुढे येणारे शेकड्याने असतात पण खरे मूल्यमापन फकत अशा अनुभवांतुनच होत असते.

रविवार, २७ ऑक्टोबर, २०१३

"गोल्डमेडल"



ही गोष्ट आहे मी कॉलेजात असतानाची...

तेव्हा शुद्ध गणितात चमकणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांबद्दल माझ्या मनात एक असूया निर्माण झाली होती. या माझ्या मनातल्या असूयेने  मी त्यावेळेला गणितात गोडी वाढविण्यासाठी काहीसे दिशाहीन प्रयत्न करत होतो. ते बघुन माझा एक मित्र मला म्हणाला,
"तुला प्युअर मॅथ्समध्ये interest असेल तर माझ्या बरोबर प्रा. श्रीराम अभ्यंकरांकडे चल. ते उत्तेजन देतात आणि मदत पण करतात".

मला ती कल्पना आवडली आणि आम्ही एका दिवशी दुपारी ४ वाजता प्रा. अभ्यंकरांच्या घरी जाऊन थडकलो. बुट, चपला काढुन दिवाणखान्यात दारावर टक्टक करून पाऊल टाकले तेव्हा एका दिवाणावर बनियन, पायजमा अशा पोषाखात उशीवर हनुवटी टेकवुन पालथे पडलेले प्रा. अभ्यंकर दिसले. आमची चाहुल लागताच, न उठताच त्यानी "या बसा" केले.

मित्राने माझी ओळख करून दिली. प्रा. अभ्यंकरांनी लोळतच प्राथमिक चवकशी सुरु केली...

"काय सध्या वर्गात कोणता टॉपिक चालला आहे?"
"Determinants, Sir" - माझा मित्र उत्तरला...
"काय रे Determinants म्हणजे काय रे"?

आम्ही दोघांनी पाठ केलेल्या व्याख्या घडाघडा म्हणुन दाखवल्या.

मग  प्रा. अभ्यंकरांनी आणखी एक प्रश्न विचारला. आमच्याकडुन जसजशी उत्तरे मिळाली तेव्हा प्रश्नांची पातळी अधिकाधिक अवघड होत गेली. प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी कागद-पेन वापरायची परवानगी नव्हती. पुस्तके बरोबर नव्हती म्हणुन ती पण बघायचा प्रश्न नव्हता.

प्रश्नांची उत्तरे जेव्हा चुकली तेव्हा प्रा. अभ्यंकरांनी प्रश्नांची फोड केली किंवा पुनर्रचना केली. पण आमच्याकडुन बरोबर उत्तर मिळवायचेच आणि मग पुढचा प्रश्न टाकायचा हा उद्योग चालु ठेवला.

हे सर्व चालु असताना दिवाणावर उशीला कवटाळुन लोळणे चालुच होते. कधी नव्हे एव्हढे माझ्या डोक्याने सलग उत्तरे द्यायचे काम केल्याने डोक्याला मुंग्या यायला सुरुवात झाली आणि मग होता होता रात्रीचे आठ वाजले.

ते दिवस मोबाईलचे नव्हते. घरी आई-वडील वाट बघतील किंवा उशीर झाला म्हणुन रागवतील म्हणुन आम्ही प्रा. अभ्यंकरांना मध्येच थांबवले आणि परत यायची अनुमती मागितली. त्यावर प्रा. अभ्यंकरांनी गृहपाठ म्हणुन आणखी दोन प्रश्नांची उत्तरे शोधुन यायला सांगितले.

आम्ही उठुन बुट-चपला घालायला गेलो तेव्हा प्रा. अभ्यंकर दिवाणावरुन उठले आणि दारापाशी निरोप द्यायला आले आणि म्हणाले,
"तुमच्यापैकी प्युअर मॅथ्स पुढे कोण करणार?"

मी धीर करून म्हणालो,
"सर, प्युअर मॅथ्स करणं हे फक्त गणितात गोल्डमेडल मिळवणार्‍या ईश्वराच्या लाडक्या पुत्रांच काम..."

त्यावर प्रा. अभ्यंकर हसले आणि म्हणाले,
" एक मिनिट, जरा थांब... महाराष्ट्रात किती विद्यापीठे आहेत?"

अचानक वेगळाच प्रश्न आल्याने बुटाच्या नाड्या बांधता-बांधता माझी भंबेरी उडाली.
"पुणे, मुंबई, नागपुर, शिवाजी आणि मराठवाडा... " आम्ही पट्‍कन हिशेब मांडला.

"...आणि संपूर्ण भारतात अशी किती विद्यापीठे असतील" - प्रा अभ्यंकरांचा पुढचा प्रश्न.

"अंदाजे दीडशे-दोनशे" मी उत्तरलो.

"आता बघ प्रत्येक विद्यापीठात दरवर्षी बीएस्सीला एक आणि एमेस्सीला एक अशी दोन पदके दिली जात असतील. म्हणजे दरवर्षी भारतात साधारणपणे ४०० गोल्डमेडल्स दिली जातात. म्हणजे गेल्या १० वर्षांत एकंदर ४००० हजार गोल्डमेडॅलिस्ट भारतात तयार झाले. हे सगळे कुठे गेले? हे काही करताना दिसत नाहीत?"

मी "हे काही करताना दिसत नाहीत?" हे वाक्य ऐकुन नि:शब्द आणि थक्क झालो आणि त्याक्षणी माझ्या  मनातला प्युअर मॅथ्सबद्दल असलेला न्यूनगंड नाहिसा झाला. घरी परत येताना आम्ही त्या प्रश्नोत्तर संवादाची उजळणी केली तेव्हा केवळ तोंडी उत्तरे देतदेत त्या चार तासात जी मजल गाठली त्या जाणीवेने अंगावर मूठभर मांस नक्कीच चढले होते.

विज्ञानप्रचाराच्या नावाखाली स्वत:ला प्रसिध्दीच्या झोतात ठेवुन परीकथा पाडणारे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शास्त्रज्ञ वेगळे आणि विचारशक्ती फुलवुन भयगंड घालवणारे प्रा. अभ्यंकर निराळे...

सोमवार, ७ ऑक्टोबर, २०१३

हॊ मी वाईट आहे!



हॊ मी वाईट आहे!

मला माहित आहे की मी "वाईट" आहे
आणि खूप वर्षांपासुन आहे
आणि तसा मी वेडापण आहे...

आयुष्याची पन्नाशी नुकतीच गाठली
आणि माझ्या वाईटपणाचं मूळ
सापडलं...

फार तपशीलात जायची गरज नाही

मी कष्ट करून लिहिलेल्या संशोधन निबंधाला
सहलेखक म्हणुन त्यांचे नाव लावले नाही
मग मी त्यांच्या नजरेत  कायमचा वाईट बनलो.

MD परवानगीशिवाय मिटींग मध्ये
सिगरेटी फुंकुन वात आणे. त्याबद्द्ल नाराजी
दर्शवली तेव्हा मी वाईट ठरलो.

गरजा कमी ठेऊन, चार पैसे गाठीला बांधुन
सन्मानाने जगतो म्हणुन पण मी
वाईटच ठरलो.

त्यांच्या नजरेतुन जग बघत नाही
हा पण माझा एक वाईटपणाच आहे

अशी किती उदाहरणे द्यावीत तेव्हढी थोडीच...

थोडक्यात काय
माझ्या उत्कर्षाची किल्ली
मी सोडुन सर्वांकडे आहे
मी ती घ्यायला जात नाही
मग कुणी मला
कंट्रोल करु शकत नाही

नेमकं तेच
माझ्या वाईटपणाचं
मूळ आहे

बुधवार, २ ऑक्टोबर, २०१३

द विनर इफेक्ट



The Winner Effect

-----------------------




The Winner Effect: The Science of Success and How to Use It हे Ian Robertson चे पुस्तक घेऊन बरेच दिवस झाले होते. खरं तर ते मी माझ्या लेकीसाठी घेतले होते. पण तिला अभ्यासातुन वेळ मिळत नसल्याने मी वाचायला घेतले. पुस्तक मी क्रमश: वाचतोच असं नाही पण या वेळेला १ल्या प्रकरणापासुन वाचताना काही केल्या पकड घेतली जात नव्हती. शेवटी मी अधेमधे चाळत असताना The winner's brain हे प्रकरण रोचक वाटल्याने वाचायला सुरुवात केली.




सभोवतालच्या वातावरणाचा मेंदूच्या जडणघडणीवर परिणाम होतोच, पण यश/अपयश पण त्यावर अवलंबुन असते, असे प्रतिपादन The winner's brain या प्रकरणाची पाने चाळताना आढळल्याने मी अधिक उत्सुकतेने पुढे वाचन चालु ठेवले. अजुन पूर्ण वाचुन झाले नाही पण खालील काही मजकुर वाचल्यावर आजवर अनेक ज्या गोष्टींना अवास्तव महत्व दिले गेले किंवा निरर्थक मानले आहे, ते तसे नक्की नसते.




श्रीकृष्णाचे आणि माझे जाहिर वाकडे आहे. हजार सूर्यांच्या तेजाशी बरोबरी करणारा ( खरं तर गमज्याच ह्या) एक युद्ध थांबवु शकला नाही, हे काही केल्या पटत नाही. मला त्याचा कर्मयोग पण पटत नाही. चातुर्वण्याची तरफदारी तर नाहीच नाही. पण मी त्याला फकत गीतेमधल्या एका श्लोकासाठी माफ करतो. तो श्लोक म्हणजे -

अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम्‌ ।

विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम्‌ ॥




अर्थ यशस्वी होण्यासाठी पांच गोष्टीची आवश्यकता असते. त्या म्हणजे जागा, agent, साधने, प्रयत्न आणि शेवटचे म्हणजे दैव...




यात जागेचे महत्त्व आपल्याकडे "नाचता येईना अंगण वाकडे" सारख्या म्हणी प्रचारात आणुन कमी केले गेले आहे. पण आधुनिक मानसशास्त्रीय प्रयोगांचा हवाला देत केलेल्या प्रतिपादनानुसार यशस्वी होण्यात जागा निर्णायक ठरते. मागे पुणे विद्यापीठातले एकजण मी त्यांच्या हाताखाली पीएचडी करावी म्हणुन हात धुवुन मागे लागले होते. पण माझ्या आयायटितल्या एका प्राध्यपकांनी मला सूचक सल्ला दिला तो मी मानला आणि संभाव्य शोषणापासुन नंतर येणार्‍या वैफल्यापासुन स्वत:ला वाचवले. ( प्रा. अरूण कुमारांनी मला सांगितले होते की, पीएचडी करणे हे एक प्रकारे लग्नासारखे असते. जागेचा आणि ज्या व्यक्तीच्या हाताखाली पीएचडी करायची, त्यांचा कमीतकमी एक वर्षाचा अनुभव असल्याशिवाय त्या फंदात पडु नको. )




The Winner Effect या पुस्तकातला मला पुढे वाचायला प्रवृत्त करणारा मजकूर पुढे देत आहे -




It may seem strange that where you happen to be located determines what changes happen in the brain, and peculiar that Fuxjager's mice should show only these crucial brain changes when they fought at home. But something simillar happned during the Vietnam War, where it was estimated that majority of US service personnel had used heroin and one in five of them were addicted to it. A feared epidemic of returning drug addict did not transpire and most of the addicts did not remain addicts once back home in America. This was major headache for experts in addiction, who regarded heroin addiction as a biologically determined disease that once established, was very difficult to eradicate. [page 65]




...




Siegel's research shows us that very chemistry of our bodies is tuned to the physical, social and psychological environment. [...] Was Mike Tyson's testosterone-fuelled winner effect another example of brain and body chemistry being shaped by environment. [page 67]







Russell Hill and Robert Barton of the University of Durham in England made the discovery about the shirt colours when they studied the results of Athen's Olympics bouts in these blue-red sports. Hill and Barton were able to look just at bouts between competitotors of equal ability - this was possible by looking at their pre-Olympic rankings. And when they did this, an astonishing fact emerged: red shirted competitors won 62 per cent of the time, compared with only 38 percent of the blue shirted competitors. [page 70]




हे सर्व वाचल्यावर आपल्याला प्रसन्न ठेवणार्‍या वातावरणाचे, विधींचे (rituals), श्रद्धांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हे पटायला हरकत नाही. खच्ची करणारे नातेसंबंध, मित्र-परिचित केवळ "नाते टिकवणे महत्त्वाचे" या हट्टापायी जपणे हा निव्वळ मूर्खपणा आहे असे मला वाटते.




http://www.amazon.in/Winner-Effect-Epz-Edition-Robertson/dp/1408850060/ref=sr_1_4?ie=UTF8&qid=1380690534&sr=8-4&keywords=The+Winner+Effect

शुक्रवार, १३ सप्टेंबर, २०१३

संगीतातील हास्यरस



संगीतात हास्य रस नसतो असं म्हणतात. पण या समजाला आह्वान/छेद देतील अशा काही रचना मला अलिकडेच ऐकायला मिळाल्या. कुणाला हसवुन हसवुन मारायचे असल्यास या रचना ऐकवाव्यात. या कलाकृती सादर करणार्‍या कलाकारांच्या प्रयोगशीलतेचे कौतुक करावे तेव्हढे मात्र थोडेच आहे.








http://www.youtube.com/watch?v=GUAnlLnEuXo


http://www.youtube.com/watch?v=NeBqfDL77wA


यातली १ली पाश्चात्य रचनाकार रॉसिनी याच्या "विल्यम टेल" या रचनेवर आधारीत आहे. एक आई तिच्या मुलाना २४ तासात काय काय ऐकवते हे अनिता रेन्फोर्ट या गायिकेने २ मि ५५ से मध्ये बसवले आहे. हे सर्व कुठेही न अडखळता, कागद हातात न धरता सादर करायचे तिचे कौशल्य अचाट आहे.


२ री आणि ३री रचना मात्र भारतीय संगीतावर इंग्लिश शब्द प्रयोगांनी बांधल्या आहेत. २री रचना पोट धरधरून हसवते.


पुण्यात पूर्वी आफळेबुवा म्हणुन एक कीर्तनकार इंग्लिश्मध्ये कीर्तन करायचे त्याची या निमित्ताने आठवण झाली.

सोमवार, ९ सप्टेंबर, २०१३

शुभशकुन



दहा मिनिटापूर्वीची गोष्ट...


आमच्या मायक्रोवेव्हची bottom plate गेले ७-८ वर्षे अड्कून पडली होती. ती दुरुस्त पण होत नव्हती. अनेक कारणांमुळे मायक्रोवेव्ह टाकुन द्यायला मन धजत नव्हते (इतर कार्ये व्यवस्थित चालु होती).


आत्ता एक चमत्कार झाला...


चहा गरम करत असताना अचानक प्लेट फिरायला लागल्याचे दिसले... विवेकवादी कारण एकच- काल चहा प्लेट्शिवाय गरम करताना उतु गेला आणि सांडला (बायकोने कडकड पण केली). तो खालच्या jam झालेल्या प्लेट-होल्डरमध्ये झिरपला आणि वंगण मिळाल्याने प्लेट फेरायला लागली.


काहींच्या मते हा निव्वळ योगायोग...काहींच्या मते हे व्हायचेच होते.


मला मात्र अड्कून साचुन राहिलेली कामे अचानक मार्गी लागल्याने मनाला जी उभारी मिळते तसे काहीसे झाले आहे.


आजी आणि आई म्हणाल्या असत्या, "अरे, हा शुभशकुन आहे"


काहीही असो. मनाची उभारी महत्त्वाची...


शुभशकुन झिंदाबाद...

रविवार, ४ ऑगस्ट, २०१३

दिलासादायक : बायकी हलकटपणाला लगाम...

'बलात्काराची खोटी तक्रार करणाऱ्या महिलांवर खटला चालवा'

“काहीजण सहमतीने संबंध ठेवतात. पण काही बिनसल्यानंतर तक्रार केली जाते आणि नंतर सेटलमेंट करून तक्रार मागेही घेतली जाते. हा सध्या ट्रेण्ड होत चालला आहे. त्यामुळे समाजात चुकीचा संदेश जात असल्याचं” कोर्टाने म्हटलं आहे.

http://www.abpmajha.newsbullet.in/mumbai/103/31978

मला "लवकर बरे व्हा" असा संदेश देणारे, बायकांचा सरसकट कैवार घेणारे तसेच
माझ्याकडे विदा मागणा-या सर्वांची तोंडे आता बंद होतील ही अपेक्षा करतो...